Tag: navi arthkranti

  • Kisan Card: काय आहे किसान क्रेडिट कार्ड योजना? कसा कराल अर्ज? जाणून घ्या संपूर्ण माहिती

    Kisan Card: काय आहे किसान क्रेडिट कार्ड योजना? कसा कराल अर्ज? जाणून घ्या संपूर्ण माहिती

    सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड (KCC), जी शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक भांडवल उपलब्ध करून देते. या योजनेद्वारे शेतकरी कमी व्याजदरात कर्ज घेऊ शकतात आणि त्याचा उपयोग बियाणे, खते, कीडनाशके, शेती उपकरणे आणि इतर कृषी संबंधी गरजांसाठी करू शकतात. अलीकडेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ३ लाखांवरून ५ लाखांपर्यंत वाढवली, ज्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त २ लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे.

    या योजनेचे विविध फायदे असून, अल्प व्याजदर, परतफेडीवर सवलत आणि त्वरित निधी उपलब्ध होणे हे योजनेचे मुख्य आकर्षण आहेत. मात्र, अनेकांना या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, पात्रता निकष कोणते आहेत याची पुरेशी माहिती नसते. या लेखात किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष आणि योजनेचे संपूर्ण फायदे समजून घेऊया.

    काय आहे किसान क्रेडिट कार्ड योजना ?

    शेतीसाठी आवश्यक भांडवल मिळावे आणि पेरणीपूर्व अडचणींवर मात करता यावी, यासाठी भारत सरकारने १९९८ मध्ये किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बँकांकडून कमी व्याजदरात कर्ज मिळते, जे खते, बियाणे, कीटकनाशके तसेच शेतीच्या इतर गरजांसाठी वापरता येते. गरज पडल्यास शेतकरी या कार्डद्वारे रोख रक्कमही काढू शकतात, ज्यामुळे शेतीचा खर्च सहज भागवता येतो.

    ही योजना वेळोवेळी सुधारली गेली आहे. २००४ मध्ये यामध्ये गुंतवणूक कर्ज, दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन आणि पशुपालन यांसारख्या उपक्रमांचा समावेश करण्यात आला.२००६-०७ मध्ये व्याज अनुदान योजना (ISS) सुरू करण्यात आली, ज्यामुळे अल्पकालीन कृषी कर्ज शेतकऱ्यांना केवळ ७% व्याजदराने मिळू लागले आणि आर्थिक ओझे कमी झाले. २०१२ मध्ये डिजिटल युगाची कास धरत इलेक्ट्रॉनिक किसान क्रेडिट कार्ड (e-KCC) सुरू करण्यात आले, ज्यामुळे व्यवहार अधिक सोपे, वेगवान आणि पारदर्शक झाले. तसेच आता योजेनची मर्यादा वाढवली गेली, ज्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त २ लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे. 

    अर्ज करण्याची प्रक्रिया आणि फायदे 

    किसान क्रेडिट कार्ड योजना सरकारी आणि खासगी बँकांमार्फत राबवली जाते. राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका (RRBs), सहकारी बँका आणि प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हे कार्ड मिळू शकते. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या अधिकृत बँकेत जाऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरावा लागतो. अर्ज मंजूर झाल्यानंतर किसान क्रेडिट कार्ड दिले जाते, ज्यामुळे शेतकरी आपल्या गरजेनुसार ठराविक मर्यादेत कर्ज घेऊ शकतात.

    किसान क्रेडिट कार्डमुळे शेतकऱ्यांना सहज आणि कमी व्याजदरात कर्ज मिळते. हे कर्ज खते, बियाणे, कीटकनाशके आणि शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी वापरता येते. गरज भासल्यास शेतकरी या कार्डद्वारे रोख रक्कम काढू शकतात, त्यामुळे तातडीच्या खर्चासाठी मदत होते. व्याज अनुदान योजनेमुळे कर्जाचा आर्थिक बोजा कमी होतो, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळते आणि शेतीची उत्पादकता वाढते.

    निकष आणि आवश्यक कागदपत्रे 

    या योजनेत अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असावे लागते , मात्र कमाल वयाची कोणतीही मर्यादा नाही. या योजनेत 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते, आणि हे कर्ज पाच वर्षांच्या आत परतफेड करता येते. किसान क्रेडिट कार्डाची वैधता देखील पाच वर्षे असते.

    किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडे काही आवश्यक कागदपत्रे असावी लागतात. ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, वीज बिल किंवा पाणी बिल यापैकी कोणतेही एक कागदपत्र लागते. तसेच, शेतकऱ्याने जमिनीचा मालकी हक्क किंवा भाडेकराराचे दस्तऐवज सादर करणे आवश्यक आहे. जर जमीन स्वतःच्या नावावर असेल, तर खतौनी, जमाबंदी किंवा पट्टा यासारखे कागदपत्र चालतात. जर शेतकरी भाडेकरू असेल, तर वैध भाडेकराराची कागदपत्रे द्यावी लागतात.

    मित्रांनो, किसान क्रेडिट कार्ड योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आर्थिक मदत योजना आहे. या जर तुम्ही सुद्धा शेतकरी असाल आणि या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर आपल्या जवळच्या बँकेत जाऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करा आणि कमी व्याजदरात कर्ज मिळवण्याची ही संधी गमावू नका. 


    आणखी वाचा:

  • वयाच्या ११ व्या वर्षांपासून शेअर मार्केटमध्ये उतरून जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार बनलेले वॉरन बफे

    वयाच्या ११ व्या वर्षांपासून शेअर मार्केटमध्ये उतरून जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार बनलेले वॉरन बफे

    कुठलाही कायदा न मोडता, करचुकवेगिरी न करता, नैतिकतेच्या मार्गाने यशाचं शिखर सर करणाऱ्या फार कमी व्यक्ती असतात. त्यांपैकी एक व्यक्ती असणं आणि त्याच्याही पुढे जाऊन, मिळवलेल्या संपत्तीपैकी ९० टक्के संपत्ती फारसा गाजावाजा न करता समाजाला परत देणं, हेच बफेंच्या यशाचं वेगळेपण आहे. 

    ‘समभागधारक हेच कंपनीचे मालक’ अशी सर्वस्वी वेगळी समीकरणं प्रमाण मानून, यशाच्या वाटेवरून एकटं चालत न जाता आपल्या सहकारी आणि कर्मचाऱ्यांनाही यशाचं क्षितिज दाखवणाऱ्या बफेंकडून आपल्याला शिकण्यासारख्या असंख्य बाबी आहेत. 

    जगभरात गुंतवणूक गुरू म्हणून प्रसिद्ध असलेले वॉरन बफे यांचा आज जन्मदिवस. जगातील कोट्यवधी लोक शेअर बाजारातून पैसे कमविण्यासाठी त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा अवलंब करतात. गुंतवणुकीबाबत त्यांनी केलेले मार्गदर्शन आजही अतिशय प्रभावी ठरते. वॉरन बफे हे शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांपैकी एक मोठे नाव आहे. त्यांच्या गुंतवणुकीचा जगभरातील शेअर बाजारावर परिणाम होतो.  जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत ते आजही सातव्या स्थानावर आहेत. 

    बफे यांना आपल्या युवा अवस्थेतच Business आणि Investing विषयी आवड निर्माण झाली आणि त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षापासूनच गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. कोलंबिया बिजनेस स्कूलमधून ते पदवीधर झाले जिथे ते बेंझामिन ग्रॅहम यांच्याकडून गुंतवणुकीचे तत्त्वज्ञान आणि व्हॅल्यू इन्वेस्टिंगच्या कन्सेप्टविषयी बरेच काही शिकले. ओरॅकल ऑफ ओमाहा म्हणून ओळखले जाणारे वॉरन बफे आत्तापर्यंतच्या सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक समजले जातात. 

    वॉरन बफे यांचे 5 गुंतवणूक मंत्र : 

    1. गुंतवणुकीकडे दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा : 

    शेअर्स विकत घेतल्यानंतर एका दिवसात किंवा फार कमी वेळात विकण्यापेक्षा चांगल्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करून त्यामध्ये तुमची गुंतवणूक दीर्घकाळ टिकवून ठेवणे चांगले. शेअर मार्केटमधील दीर्घकालीन गुंतवणूक शेवटी जास्त परतावा देते, परंतु त्यासाठी तुम्ही योग्य शेअर्समध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

    2. रातोरात श्रीमंत होण्याचा विचार करू नका : 

    बाजारात लवकरात लवकर श्रीमंत होण्याची हाव तुम्हाला चुकीच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. चांगला Portfolio तयार करणे ही एक मोठी प्रक्रिया आहे. यासाठी खूप संयम लागतो. बाजारातून चांगल्या परताव्यासाठी तुम्ही अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी ज्यांचे Business Model तसेच त्यांचे व्यवस्थापन चांगले आहे.

    3. ध्येय ठेवून गुंतवणूक करा : 

    ध्येयाशिवाय केलेली गुंतवणूक अनेकदा फायदेशीर नसते. तुम्ही तुमच्या कष्टाने कमावलेला पैसा हुशारीने गुंतवा. त्या गुंतवणुकीत पैसा कसा वाढणार आहे हे समजत नसेल, तर त्यापासून दूर राहणेच बरे.

    4. वैविध्य समजून घ्या : 

    ‘जवळची सर्व अंडी एका टोपलीत ठेवू नये’ हे सूत्र गुंतवणुकीलाही लागू केले पाहिजे. तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी असलेली रक्कम वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वितरित करावी. संपूर्ण पैसा एकाच ठिकाणी गुंतवू नका, सर्वांमध्ये समतोल ठेवा.

    5. रास्त भावाने करा शेअर्सची खरेदी : 

    एखादी कंपनी उत्तम दर्जाची उत्पादने बनवत आहे किंवा ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देत आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही त्यात गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. वॉरन बफे असे सांगतात, एखाद्या मोठ्या कंपनीचे शेअर्स मोठ्या किंमतीला खरेदी करण्यापेक्षा चांगल्या कंपनीचे शेअर्स वाजवी किंमतीला विकत घेणे कधीही चांगले.

    वॉरन बफे यांचा हा प्रसिद्ध विचार प्रत्येक गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीने कायम लक्षात ठेवला पाहिजे.

     

  • १. नोकरी करावी की व्यवसाय?

    १. नोकरी करावी की व्यवसाय?

    वयाची १८-२२ वर्षे शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करावी का व्यवसाय करावा हा कोड्यात टाकणारा प्रश्न सर्व तरुणांना पडत असतो, कारण आईवडिलांवर अवलंबून राहण्याचे सोडून स्वतःच्या कर्तृत्वाने जगात आपला ठसा उमटवण्याचे हे वय असते. उमेद असते, आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी हवे ते करण्याची तयारी असते; पण आपल्याला काय हवे हे मात्र समजत नाही.

    महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरुन एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर पुढे काय करणार? नोकरी की व्यवसाय? ह्या प्रश्नाला मिळालेली काही उत्तरे.

    • १. नोकरी करणार कारण घरची परिस्थिती व वातावरण व्यवसायाला अनुकूल नाही, शिवाय भांडवलसुध्दा नाही.
    • २. काही काळ नोकरी करणार, मग स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरु करणार आहे. काही दिवस नोकरी केली तर, भांडवल उभारणी करता येईल.
    • ३. व्यवसायच करणार आहे काहीतरी. काहीही झाले तरी व्यवसायच करायचा.

    आता वरील तीनही प्रकारच्या तरुणांच्या मताचे विश्लेषण करुया. पहिल्या प्रकारात एकतर त्या तरुणाला नोकरीच करायची असते, मात्र व्यवसाय न करण्याची काही कारणे तो पुढे करत असतो. नोकरीची सुरूवात सुध्दा अगदी तुटपुंज्या उत्त्पन्नावर होते, मग पुढे त्या उत्त्पन्नात फार वेगाने वाढ होते असेही काही नाही. असे तरुण जीवनभर rat race मध्ये अडकून पडतात. नोकरी, पगार, घर, घराचे हप्ते, मुलांचे शिक्षण, आरोग्य असे नेहमीचे प्रश्न सोडवतंच आयुष्य पुढे सरकत असते, त्यात फार उल्लेखनीय असे काही घडत नाही, पण ह्या चक्रात अडकलेला माणूस सहजासहजी बाहेर पडत नाही. हा निर्णय घेण्याची काही कारणे आहेत, त्यामध्ये जोखीम घेण्याचे धाडस नसणे, इच्छाशक्तीचा अभाव व न्यूनगंड ही काही महत्वाची कारणे आहेत, यावर थोड्याफार प्रयत्नांनी मात करता येते.

    दुसऱ्या प्रकारच्या व्यक्तींना काही काळ नोकरी करुन भांडवल उभे करायचे असते. काही प्रमाणात उपजीविकेचा प्रश्न मार्गी लावायचा असतो. ह्या व्यक्तींना कमी प्रमाणात जोखीम घ्यायची असते. हेही थोड्याफार फरकाने पहिल्या प्रकारच्या व्यक्तीसारखी सुरवात करतात. मग पगार, संसाराचे प्रश्न व कौटुंबिक जबाबदाऱ्यामुळे rat race मध्ये अडकतात व बाहेर पडायची इच्छा असून बाहेर पडत नाहीत व पहिल्या प्रकारच्या व्यक्तीप्रमाणे यांचेपण आयुष्य फिरत राहते. स्वतः पैसे कमावणे हा भांडवल उभे करण्याचा केवळ एकमेव मार्ग नाही. इतर अनेक मार्गांनी भांडवल उभे करता येते. भांडवल निर्मितीचे इतर मार्ग पुढे आपण पाहणार आहोत. भांडवलाच्या इतर पर्यायांनी जीवनात वेगाने पुढे जाण्याचा मार्ग सापडेल.

    तिसऱ्या प्रकारचे तरुण हे काहीसे ठाम, पण द्विधा मनस्थितीत असतात. या तरुणांना अधिक खोलात जाऊन प्रश्न विचारले तेव्हा समजले की, काहीतरी व्यवसाय करायचा म्हणजे कोणता व्यवसाय करावा याचा पुसटसा अंदाजही यांनी बांधलेला नसतो. इच्छाशक्ती असते मात्र दिशा घ्यायला वेळ लागतो. सांगणारेही कुणी नसतात. मग स्वतःच्या अंदाजावर पुढे जाण्याचा प्रयत्न चालू होतो. हे तरुण खूप काही करण्याची उमेद ठेवतात. पुढे जाऊन त्यांना हवे करुनही दाखवतात.

    मी काही जणांना पाहिजे तेवढे भांडवल देतो, तुम्ही कोणता व्यवसाय करणार आहात, असा प्रश्न विचारला की मग त्यांच्याकडे काही उत्तर नसते. भांडवल, मनुष्यबळ, प्रशिक्षण याचा पुरवठा बाहेरुन करता येतो. त्याचे असंख्य मार्गसुध्दा आहेत. व्यवसाय करण्यासाठी लागणारी वृत्ती स्वतःतच असायला हवी किंवा तिची जोपासना स्वतःहून करायला हवी, मग व्यवसाय यशाच्या शिखरावर नेता येईल.

    नोकरी करताना उत्पन्नाच्या, खर्चाच्या मर्यादा पडतात. त्याउलट व्यवसायामध्ये २४ तास झोकून देऊन काम करता येते. शेकडो माणसांना काम देता येते. ती माणसे तुमच्यासाठी काम करत असतात. सुरूवातीची काही वर्षे संघर्ष केला की, मनाप्रमाणे उत्पन्न व पाहिजे तेवढा वेळ व्यवसायातून प्राप्त करता येतो. उत्पन्नात होणारी वाढ ही बांबूच्या रोपट्याप्रमाणे वेगाने होत असते. मनसोक्त जगण्याचा, स्वतःच्या स्वप्नांसाठी काम करण्याचा आनंद घेत व्यवसाय करणे हे नोकरीपेक्षा सरसच.

    भारत हा तरुणांचा देश आहे. जगातील सर्वात जास्त तरुणांचा हा देश म्हणजे प्रत्येकाचे लक्ष आकर्षित करुन घेत असतो, पण इथल्या तरुणाईला या गोष्टीची कितपत जाणीव आहे हे जाणून घ्यावे लागेल. या तरुणाईची अवस्था कस्तुरीमृगासारखी आहे. कस्तुरी ही मृगाच्या नाभीत असते. मृग कस्तुरी शोधण्यासाठी सर्व जंगलभर सैरावैरा धावत असतो, पण त्याला स्वतःच्या नाभीत असलेल्या कस्तुरीची जाणीव कधीच होत नाही. आपल्यातल्या अपार शक्तीची जाणीव फार कमी तरुणांना आहे.