Tag: marathiudyojak

  • बिझनेससाठी भांडवल कुठून व कसं मिळवायचं? हे आहेत ७ पर्याय

    बिझनेससाठी भांडवल कुठून व कसं मिळवायचं? हे आहेत ७ पर्याय

    आजच्या तरुण पिढीला स्वतःचं काहीतरी वेगळं करायचंय, स्वतःचा व्यवसाय सुरू करून मोठं व्हायचंय. अनेकांकडे नाविन्यपूर्ण कल्पना असतात, समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याची तळमळ असते आणि मेहनतीची तयारीही असते, पण प्रत्यक्षात व्यवसाय सुरू करताना अनेक अडथळे समोर येतात त्यात मार्केटमध्ये टिकून राहण्याची धडपड, स्पर्धा, व्यवस्थापन यासोबतच सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे पैशांचा, म्हणजेच फायनान्सिंगचा!

    व्यवसाय सुरू करायचा असेल, वाढवायचा असेल, नवीन कर्मचारी भरती करायची असेल, आधुनिक तंत्रज्ञान विकत घ्यायचं असेल किंवा उत्पादनाची जाहिरात करायची असेल, तर त्यासाठी भांडवल लागणारच. तर मग, या भांडवलाची व्यवस्था कुठून करायची? कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत? या लेखात आपण व्यवसायासाठी भांडवल उभारण्याचे विविध मार्ग समजून घेऊया.

    स्वतःची बचत वापरणं (Bootstrapping)

    व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वतःच्या बचतीचा वापर करणं हा सगळ्यात सोपा आणि सहज उपलब्ध पर्याय आहे. यात तुम्ही तुमच्या जमा केलेल्या पैशांतून व्यवसाय सुरू करता. कधी कधी कुटुंबातील सदस्य, जसे की आई-वडील, भाऊ-बहिण किंवा जवळचे नातेवाईकही सुरुवातीला आर्थिक मदत करू शकतात. या पद्धतीला बूटस्ट्रॅपिंग म्हणतात. यामध्ये बाहेरच्या गुंतवणूकदाराची तितकीशी आवश्यकता भासत नाही, त्यामुळे व्यवसायावर तुमचा संपूर्ण हक्क राहतो आणि कोणत्याही प्रकारच्या हस्तक्षेपाशिवाय तुम्ही तुमच्या पद्धतीने निर्णय घेऊ शकता.

    या पद्धतीचा एक मोठा फायदा म्हणजे तुम्हाला कोणत्याही कर्जाचा बोजा नसतो आणि नफा कमावला की तो पूर्णतः तुमचाच असतो. मात्र, यामध्ये एक मोठी अडचण म्हणजे पैशांची मर्यादा. तुमच्याकडे भांडवल कमी असल्यामुळे व्यवसायाची वाढ मर्यादित राहू शकते. मोठ्या संधींचा फायदा घेण्यासाठी किंवा विस्तार करण्यासाठी अतिरिक्त भांडवलाची आवश्यकता भासू शकते.

     एंजल इन्व्हेस्टर्स

    ‘एंजल’ म्हणजे देवदूत, आणि एंजल इन्व्हेस्टर्स हे खरंच तुमच्या व्यवसायासाठी तसंच काम करतात. हे अनुभवी उद्योजक किंवा मोठे गुंतवणूकदार असतात, जे आपल्या वैयक्तिक संपत्तीमधून त्यांना आवडणाऱ्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करतात. तुमच्या कल्पनेवर आणि व्यवसायाच्या भविष्यातील संधींवर विश्वास ठेवून ते तुम्हाला भांडवल देतात. मात्र, त्याबदल्यात ते व्यवसायात काही प्रमाणात भागीदारी (equity) घेतात.

    एंजल इन्व्हेस्टर्स फक्त पैसा देत नाहीत, तर त्यांचा अनुभव, उद्योग क्षेत्रातील ओळखी आणि व्यावसायिक सल्लाही देतात. त्यामुळे तुमच्या स्टार्टअपला योग्य दिशा मिळते आणि व्यवसाय वाढीला गती मिळते. योग्य एंजल इन्व्हेस्टर मिळाल्यास तुमच्या व्यवसायाला केवळ आर्थिक मदतच नाही, तर एक मजबूत आधारसुद्धा मिळतो.

    व्हेंचर कॅपिटल – मोठ्या प्रमाणात गुंतवणूक

    जेव्हा तुमचा व्यवसाय चांगला चालू होतो, ग्राहक वाढतात आणि विक्री होण्यास सुरुवात होते , तेव्हा पुढील विस्तारासाठी जास्त पैशांची गरज लागते. अशावेळी व्हेंचर कॅपिटलिस्ट्स (VC’s) मदतीला येतात. हे मोठ्या कंपन्यांचे फंड असतात, जे भविष्यात भरभराटीला जाणाऱ्या स्टार्टअप्समध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करतात. जर तुमच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची क्षमता असेल, तर हे इन्व्हेस्टर्स तुम्हाला भांडवल देतात.

    व्हेंचर कॅपिटलिस्ट्स फक्त पैसे देत नाहीत, तर व्यवसाय वाढवण्यासाठी महत्त्वाचे सल्लेही देतात. हे सुद्धा तुमच्या कंपनीत भागीदारी घेतात आणि काही निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग असतो. त्यामुळे तुमच्या व्यवसायावर काही प्रमाणात त्यांचं नियंत्रण राहतं. तरीही, जर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर व्यवसाय वाढवायचा असेल, तर व्हेंचर कॅपिटल हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

    सरकारी योजना आणि अनुदान

    सरकार नव्या स्टार्टअप्सना मदत करण्यासाठी विविध योजना राबवत असतं. यामुळे नवीन उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळतं. Startup India योजनेत सहभागी झाल्यास व्यवसाय नोंदणीवर सवलती, कर सवलत आणि इतर अनेक फायदे मिळतात. Mudra योजना ही लहान व्यवसायांसाठी आहे, जिथे कोणत्याही तारणाशिवाय छोटे कर्ज मिळू शकतं. तसेच, SIDBI (Small Industries Development Bank of India) ही योजना लहान आणि मध्यम उद्योगांसाठी कर्ज आणि आर्थिक सहाय्य देते.

    या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे व्यवस्थित व्यवसाय योजना (Business Plan) आणि अधिकृत नोंदणी असणं गरजेचं आहे. जर सर्व आवश्यक कागदपत्रे आणि अटी पूर्ण केल्या, तर सरकारकडून भांडवल उभारणं तुलनेनं सोपं होतं. योग्य योजनेचा लाभ घेतल्यास तुमचा व्यवसाय वेगाने वाढू शकतो.

    बँकेकडून कर्ज

    व्यवसायासाठी भांडवल उभारण्याचा सर्वात पारंपरिक आणि सहज मार्ग म्हणजे बँकेकडून कर्ज घेणं. जर तुमच्याकडे व्यवस्थित बिझनेस प्लॅन, आधीपासून काही उत्पन्न आणि चांगला क्रेडिट स्कोअर असेल, तर बँका तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि कर्ज देण्यास तयार होतात. हे कर्ज व्यवसाय सुरू करण्यासाठी, विस्तारासाठी किंवा नवीन उपकरणे खरेदीसाठी वापरता येतं.

    लहान आणि मध्यम उद्योगांसाठी MSME (Micro, Small & Medium Enterprises) योजनां अंतर्गत काही विशेष कर्ज सुविधा दिल्या जातात. या योजनांमध्ये तुलनेने कमी व्याजदर आणि सोप्या परतफेडीच्या अटी मिळतात. बँकेकडून कर्ज घेण्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे, व्यवसाय नोंदणी आणि आर्थिक स्थिरता दाखवावी लागते. जर तुमचा व्यवसाय सक्षम असेल आणि विश्वासार्हता असेल, तर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

    How to Raise Funding for Business?

    क्राउडफंडिंग 

    आजच्या डिजिटल युगात व्यवसायासाठी भांडवल उभारण्याचा एक नवीन आणि प्रभावी मार्ग म्हणजे क्राउडफंडिंग. यामध्ये तुम्ही तुमची व्यवसाय कल्पना ऑनलाइन शेअर करता आणि लोकांना त्यात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करता. Kickstarter, Wishberry, Ketto यांसारख्या प्लॅटफॉर्मवर तुमची संकल्पना जर लोकांना उपयुक्त, आकर्षक किंवा भावनिकदृष्ट्या जोडणारी वाटली, तर अनेक जण थोडीथोडी रक्कम देऊनही मोठी मदत करू शकतात.

    क्राउडफंडिंगमुळे मोठ्या गुंतवणूकदारांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होते आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी थोड्या-थोड्या मदतीतून मोठी रक्कम उभारता येते. याशिवाय, लोकांशी थेट संपर्क होतो आणि तुमच्या उत्पादन किंवा सेवेबाबत सुरुवातीपासूनच जागरूकता निर्माण होते. जर तुमची कल्पना इनोव्हेटिव्ह आणि लोकांना आवडणारी असेल, तर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

    इन्क्युबेटर आणि अ‍ॅक्सेलेरेटर प्रोग्रॅम्स

    इन्क्युबेटर आणि अ‍ॅक्सेलेरेटर प्रोग्रॅम्स हे नव्या स्टार्टअपसाठी मार्गदर्शन करणारे विशेष उपक्रम असतात. IIT, IIMसारख्या प्रतिष्ठित संस्थांपासून खासगी कंपन्यांपर्यंत अशा अनेक संस्था या प्रोग्रॅम्स चालवतात. यात स्टार्टअपला व्यवसायाची योग्य दिशा, तंत्रज्ञान, नेटवर्किंग, आणि कधी कधी थोडी गुंतवणूक मिळते. नव्याने व्यवसाय सुरू करत असाल, तर हे प्रोग्रॅम्स तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. यातून मार्केटिंग, व्यवस्थापन, संघटन कौशल्ये आणि निधी उभारणीचं ज्ञान मिळतं.

    व्यवसायासाठी योग्य फायनान्सिंग निवडणं महत्वाचं आहे. काहींसाठी स्वतःची बचत पुरेशी असते, तर काहींना गुंतवणूकदारांची मदत घ्यावी लागते. काहींना बँकेचे कर्ज योग्य वाटते, तर काहींसाठी सरकारी योजना फायदेशीर ठरतात. तुम्ही कोणत्या टप्प्यावर आहात आणि तुम्हाला किती भांडवलाची गरज आहे, यानुसार योग्य पर्याय निवडावा. योग्य निर्णय घेतल्यास तुमच्या स्टार्टअपचा यशाचा मार्ग सुकर होईल.

    सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे ठोस, स्पष्ट आणि विश्वासार्ह व्यवसाय योजना असणं गरजेचं आहे. कोणताही गुंतवणूकदार किंवा बँक कर्ज देण्यापूर्वी तुमच्या व्यवसायाची संकल्पना आणि योजना नीट समजून घेतं. तुमची कल्पना किती व्यवहार्य आहे, त्यातून किती नफा होऊ शकतो आणि ती किती काळ टिकू शकते ,हे सगळं त्यांना जाणून घ्यायचं असतं. त्यामुळे व्यववसायाचं उद्दिष्ट, उत्पन्नाचे स्रोत, खर्च, आणि विस्ताराची योजना या सर्व गोष्टी नीट मांडणं गरजेचं आहे. मजबूत व्यवसाय योजना असेल, तर गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकणं सोपं होतं आणि तुमच्या स्टार्टअपला भक्कम आधार मिळतो.

    आणखी वाचा

  • व्यवसायच का? नोकरदार आणि व्यावसायिक यातील फरक

    व्यवसायच का? नोकरदार आणि व्यावसायिक यातील फरक

    आपापल्या परीने प्रत्येक जण आपल्याला जमेल तसं परिस्थितीचा विचार करून, उपलब्ध संधींचा विचार करून, घरातून मिळणाऱ्या आर्थिक पाठबळाचा विचार करून स्वतःसाठी एखादं करिअर निवडतो आणि त्यामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी, घडविण्यासाठी प्रयत्न करत असतो. या सबंध करिअरच्या प्रवासात बऱ्यापैकी पिढी ही शिक्षण चालू असताना मला शिक्षण झाल्यावर व्यवसाय करायचा आहे, असे म्हणत नाही; तर एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी घ्यायची आणि आयुष्यात स्थिर व्हायचं असं बऱ्यापैकी जणांचं  म्हणणं असतं. 

    प्रत्येक व्यक्तीची जडणघडण ही त्या व्यक्तीला लाभणारे सामाजिक वातावरण, सहवासात येणारी माणसे, घेतलेले शिक्षण, वाचलेली पुस्तके, ऐकलेली भाषणे व चर्चा, आयुष्यात आलेले प्रसंग व या सर्व घटनांना त्या व्यक्तीने दिलेला प्रतिसाद यांच्याद्वारे झालेली असते त्यामुळे प्रत्येकाचे वेगळे विचार, वेगळे व्यक्तिमत्व आणि प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा व्यक्तीपरत्वे बदललेला असतो. 

    मग या दृष्टिकोनामध्ये नोकरीच्या ऐवजी सुरुवातीपासूनच आपल्याला व्यवसायाच करायचा आहे आणि तो का करावा? ही मानसिकता मनाशी पक्की होणं गरजेचं असतं, याच विषयावर आज आपण बोलणार आहोत की व्यवसायच का ?..

    आणि नोकरी का नको ?

    खरंतर सर्वात आधी, मला कुठेतरी माझी फाईल हातात घेऊन कंपन्यांची दारं भटकत नोकरी मागायची नाही; तर चार लोकांना माझ्या माध्यमातून नोकरी देऊन त्या देणाऱ्यांच्या रांगेत मला यायचं आहे, ही भावना मनाशी पक्की होणं ही खूप प्राथमिक पायरी आहे. कोणताही व्यावसायिक हा आधी त्याच्या मनात उद्योजक म्हणून तयार झालेला असतो, मगच तो जगाच्या समोर त्याचा उद्योग, व्यवसाय आणू शकतो. 

    व्यवसायच का ? 

    अतीव समाधान:

    खरंतर जेव्हा आपण कोणतातरी व्यवसाय करतो त्यावेळी तो व्यवसाय म्हणजे लोकांच्या कोणत्यातरी समस्येचं समाधान असतं. लोकांच्या एखाद्या प्रश्नावर आपण उत्तर शोधलेलं असतं. त्यामुळे कोणाचं तरी जगणं आपल्या काहीतरी करण्यातून सुखकर होणं हे समाधान कोणा दुसऱ्यासाठी आठ तासाची नोकरी करून आणि नऊ ते पाचच्या साच्यात स्वतःला बांधून ठेवून कधीच मिळणार नाही.

    आर्थिक सुबत्ता:

    असं म्हटलं जातं की पैसा हे सर्वस्व नाही, पण आजच्या काळात पैशाशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही हेही तितकंच खरं आहे. पैसा हे नक्कीच अंतिम साध्य नाही; परंतु आपल्या जीवनाचं अंतिम साध्य साधण्यासाठी पैसा हे नक्कीच एक उत्तम आणि आवश्यक साधन आहे. कुठंतरी नोकरी करत असताना एका ठराविक Limit पर्यंत आपण कमावू शकतो, पगार घेऊ शकतो परंतु एक व्यावसायिक असताना आपल्या उत्पन्नाला कोणतीच मर्यादा राहत नाही. आपण जितकं काम करू, जितके कष्ट करू, जितका स्वतःच्या व्यवसायाला वेळ देऊ, तितकं आपलं उत्पन्न वाढणार यात शंका नाही. आपण आपल्या कुटुंबाच्या गरजा, आपली इतर अपूर्ण स्वप्नं या आर्थिक उत्पन्नातून नक्कीच पूर्ण करू शकतो.

    स्वतःसाठी वेळ :

    आपण जर नोकरी करत असू तर आपल्या नोकरीच्या वेळी आपल्याला त्या ठिकाणी पोहोचणं हे बंधनकारक असतं. आपली कामाची वेळ संपल्याच्यानंतरच आपण तिथून बाहेर पडू शकतो; परंतु व्यवसायात तुम्ही स्वतः मालक असता, तुमच्यासाठी लोक काम करत असतात, त्यामुळे व्यावसायिक कामांचं योग्य नियोजन करून आपल्याला स्वतःला व्यवसायात किती वेळ द्यायचा आहे, स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यासाठी कोणता वेळ राखीव ठेवायचा आहे हे आपण स्वतः ठरवू शकतो.

    Risk Management:

    जेव्हा तुम्ही एक व्यवसायिक असता तेव्हा रोज नवनवीन आव्हानांना, अडचणींना तुम्हाला तोंड द्यावं लागतं या सर्व समस्या व्यवसायाचे मालक म्हणून तुम्हाला स्वतः त्यात लक्ष घालून सोडवाव्या लागतात. अशावेळी कधी कोणता निर्णय घ्यायचा? काय करायचं?  हे सगळं आपल्याला ठरवावं लागतं. तणावपूर्ण परिस्थिती आपल्याला आपल्या पद्धतीनेच हाताळावी लागते. अशावेळी वेगवेगळ्या अनुभवातून शिकत या अडचणींचा कसा सामना करायचा, अवघड परिस्थिती कशी हाताळायची यामुळे नकळत आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो आणि अप्रत्यक्षरित्या Risk Management चं महत्त्वाचं तंत्र आपल्याला अवगत होतं. 

    मग आता व्यवसायाच्या बाबतीत एवढ्या सगळ्या सकारात्मक बाबी असतील तर उशीर कशाला ? आजच आपल्या उद्योजकतेच्या प्रवासाला सुरुवात करा. डोक्यात असणाऱ्या कल्पनेला चांगल्या मार्गदर्शकासमोर मांडा, अनुभवी लोकांचे सल्ले घ्या आणि फक्त सुरुवात करा.. समोरची वाट पावलागणिक आपोआप दिसत जाईल.

  • भारताचा इलोन मस्क: भाविश अग्रवाल यांचा प्रेरणादायी प्रवास | Bhavish Aggarwal: The Inspiring Story of Ola Founder

    भारताचा इलोन मस्क: भाविश अग्रवाल यांचा प्रेरणादायी प्रवास | Bhavish Aggarwal: The Inspiring Story of Ola Founder

    भाविश अग्रवाल यांचा जन्म 28 ऑगस्ट 1985 रोजी पंजाबमधील लुधियाना येथे झाला. बालपणापासूनच ते अतिशय बुद्धिमान आणि मेहनती होते. त्यांचे आई वडील हे दोघेही पेशाने डॉक्टर आहेत. वडील हे ऑर्थोपेडिक सर्जन तर आई ह्या पॅथोलॉजिस्ट आहेत. आयआयटी मुंबई येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी. टेक. पूर्ण केल्यानंतर भाविश यांनी  2007 मध्ये मायक्रोसॉफ्ट रिसर्च इंडिया येथे रिसर्च इंटर्न म्हणून आपल्या कॉर्पोरेट प्रवासाची सुरुवात केली. येथे त्यांनी टेक्नॉलॉजीवर आधारित विविध प्रकल्पांमध्ये काम केले. 

    मायक्रोसॉफ्ट रिसर्चमध्ये ते विविध टेक्नॉलॉजीवर संशोधन करत होते आणि या शोधाच्या प्रक्रियेतच त्यांना दोन पेटंट्स मिळाले, परंतु 9 ते 5 च्या सुरक्षित नोकरीत त्यांना समाधान मिळत नव्हतं. त्यांच्या मनात स्वतःच्या व्यवसायाची तळमळ निर्माण झाली होती. उद्योजक होण्याची त्यांची तीव्र इच्छा होती, पण सुरक्षित नोकरीमुळे ते अडकले होते. 

    त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे 2008 मध्ये मायक्रोसॉफ्टने त्यांना सहाय्यक संशोधक म्हणून नियुक्त केले. दोन वर्षांहून अधिक काळ मायक्रोसॉफ्टमध्ये काम करताना भाविशला एक उद्योजक म्हणून काहीतरी नवीन करण्याची ओढ लागली होती.

    मनात कसा आला ‘ओला’ सुरु करण्याचा विचार?

    भाविश अग्रवाल  सांगतात की ओला (Ola) ची सुरुवात त्यांच्या एका प्रवासाच्या वैयक्तिक वाईट अनुभवातून झाली. एकदा त्यांनी बेंगळुरूहून बंदीपूरला जाण्यासाठी एक कार बुक केली होती. मात्र, त्या प्रवासाचा अनुभव खूपच निराशाजनक होता. प्रवासाच्या दरम्यान अर्ध्या रस्त्यातच ड्रायव्हरने अतिरिक्त पैसे मागायला सुरुवात केली, शिवाय त्याचं वागणं आणि बोलणं अत्यंत उद्धट होतं. या गैरवर्तणुकीमुळे त्रासून भाविश यांना रस्त्यातच गाडी सोडावी लागली आणि उर्वरित प्रवास बसने करावा लागला.

    बसमधून प्रवास करताना भाविश यांच्या मनात वारंवार विचार येत होता की, अशा वाईट सेवेमुळे प्रवाशांचे  किती हाल होत असतील. त्यांना जाणवलं की त्यांच्या सारखे अनेक लोक असतील, ज्यांना दर्जेदार कॅब सेवा मिळत नाहीये. आणि त्याच वेळी त्यांच्या मनात एक कल्पना आली की, एक आपण अशी सेवा सुरू करावी जी लोकांना गुणवत्तापूर्ण, विश्वासार्ह आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा देईल.

    ओलाची सुरुवात आणि सुरुवातीचा संघर्ष

    कल्पकता आणि कौशल्य यांचा व्यवस्थित समन्वय साधला, तर नवनिर्मितीचा चमत्कार घडतोच! भाविश अग्रवाल यांनी हेच सिद्ध करून दाखवलं आहे. त्यांनी आपल्या दूरदृष्टी आणि धडपडीच्या जोरावर ओला कॅब्सची कल्पना प्रत्यक्षात आणली. व्यवसायात येणाऱ्या अडथळ्यांना त्यांनी संधीमध्ये बदललं आणि आपल्या जिद्दीने एक नवीन यशस्वी प्रवासाला सुरुवात केली.

    कॅब सेवा क्षेत्रातील सर्व कमतरता समजून घेतल्यानंतर, भाविश यांनी उत्तम ग्राहकांना उत्तम अनुभव आणि परवडणाऱ्या किमतींसह एक कॅब एग्रीगेटर कंपनी सुरू करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी जोधपूरमधील आणखी एक आयआयटीयन मित्र अंकित भाटी यांना सोबत घेतले. 3 डिसेंबर 2010 रोजी मुंबईत त्यांनी एकत्रितपणे ‘ओलाट्रिप्स डॉट कॉम’ वेबसाइट लॉन्च केली, ज्यामध्ये ग्राहक बाह्य प्रवासासाठी कार बुक करू शकत होते.

    सुरुवातीला, भाविश आणि अंकित यांच्याकडे या कल्पनेत गुंतवणूक करण्यासाठी फारशी आर्थिक क्षमता नव्हती आणि कोणत्याही गुंतवणूकदाराकडून आधारही मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी आपल्या बचतीमधूनच ऑनलाइन ऍप्लिकेशन विकसित करण्यास सुरुवात केली. जून 2012 मध्ये, Olacabs ने एक मोबाईल ॲप लाँच केले. ओला ऍप लाँच झाल्यानंतर त्यांना ‘टायगर ग्लोबल मॅनेजमेंट’ कडून 5 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक मिळाली, तसेच अनुपम मित्तल आणि स्नॅपडीलचे कुणाल बहल यांच्याकडूनही निधी उभारला. सुरुवातीच्या वर्षांत, कॅब बुकिंग फर्मचे वापरकर्ते फोन कॉलद्वारे कॅब बुक करत होते. नंतर ॲप आल्यानंतर त्याचा वापर वाढण्यास सुरुवात झाली.

    पण प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता, भाविश अग्रवाल यांना भारतीय बाजारपेठेत ओला सादर करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. एकदा नाही, तर प्रत्येक वेळी जेव्हा त्यांनी काहीतरी नवीन आणले किंवा नवीन बाजारपेठेकडे पाऊल टाकले, तेव्हा त्यांना संघर्ष करावा लागला.

    प्रारंभीच्या काळात, रेडिओ ट्रॅफिक सर्व्हिसेस आणि फास्टट्रॅकसारख्या स्थानिक मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करणे ओलासाठी अवघड होते, परंतु यामुळे भाविश थांबले नाहीत. या अडचणींनी त्यांना वेगळ्या पद्धतीने विचार करण्यास आणि अनोख्या, पण समस्येचे निराकरण करणाऱ्या उपायांकडे पाहण्यास प्रवृत्त केले. याच वेळी ओलाने ऑल इंडिया परमिट असलेल्या ड्रायव्हर्सना कामावर घेण्यास सुरुवात केली आणि इंटरसिटी प्रवास सुविधा सुरू केली.

    ओलाचा यशस्वी प्रवास

    भाविश अग्रवाल यांच्या नेतृत्वात ओला आज भारतातील एक अग्रगण्य स्टार्टअप म्हणून उभी राहिली आहे. त्यांनी स्वतः नवीन कार विकत न घेता ड्रायव्हर्सना जोडण्यावर भर दिला, ज्यामुळे अनेक ड्रायव्हर्सना रोजगार मिळाला. त्यांनी ओला सेवेला एका अ‍ॅपद्वारे इंटरनेटशी जोडले, ज्यामुळे लोकांना राईड बुकिंगची सुविधा मिळाली. भाविश यांनी काही प्रसंगी स्वतः ओला ड्रायव्हर बनूनही सेवा दिली आहे.

    ओला कॅब सर्व्हिसची खासियत म्हणजे तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर. हे अ‍ॅप लोकांना त्यांच्या राईडसाठी सर्व आवश्यक माहिती देते, ज्यात रेटिंग्स, रिव्ह्यूज आणि क्वालिटी चेकिंगसाठी सुविधा आहेत. यामुळे ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवरूनच सर्व काही नियंत्रित करता येते.

    भाविश यांची दूरदृष्टी आणि सेवा गुणवत्ता यामुळे ओलाचा व्यवसाय झपाट्याने वाढला. त्यांनी कमी दरात उत्कृष्ट सेवा देण्याचा विचार केला आणि 2013-14 मध्ये ओलाचा टर्नओव्हर सुमारे 418.25 कोटी रुपयांचा होता. आज, 75 हून अधिक शहरांमध्ये 1.75 लाखांपेक्षा अधिक लोक रोज ओला वापरतात. भाविश यांच्याकडे ओलामध्ये 6.7% हिस्सेदारी आहे, ज्यामुळे त्यांची नेट वर्थ महत्त्वाची ठरते. ओलाचे सध्याचे मूल्यांकन $4.8 बिलियन डॉलर्सपेक्षा (40000 कोटी रुपये) जास्त आहे, जे तिच्या यशाची साक्ष देते.

    2017 मध्ये, भाविश यांनी ओला इलेक्ट्रिकची स्थापना केली, जी इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि बाईक्स तयार करते. या व्यवसायाची वाढही लक्षणीय आहे.

    ऑक्टोबर 2023 मध्ये, ओला इलेक्ट्रिकने टेमासेक आणि भारतीय स्टेट बँकेकडून 3,200 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवली. यामुळे त्यांच्या इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील विस्ताराला गती मिळाली. भाविश अग्रवाल यांनी दोन कंपन्या उभारल्या, ज्यांचे मूल्यांकन 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे आणि यामुळे त्यांच्या दूरदृष्टीची आणि नेतृत्वाच्या कौशल्याची झलक दिसते.

    भारतातील पहिले स्वदेशी  AI-प्लॅटफॉर्मकृत्रिम’ केलं लॉन्च 

    भाविश अग्रवाल यांनी 15 डिसेंबर 2023 रोजी भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) प्लॅटफॉर्म ‘कृत्रिम’ लाँच केले. हे प्लॅटफॉर्म सुमारे 22 भारतीय भाषा समजू शकते आणि सध्या ओपन एआयच्या चॅट जीपीटी तसेच गुगलच्या जेमिनीशी स्पर्धा करत आहे .

    लाँचिंग कार्यक्रमादरम्यान, अग्रवाल यांनी AI चॅटबॉटचे प्रात्यक्षिक दाखवले, जो चॅट जीपीटी आणि जेमिनीसारखचं प्रश्नांची उत्तरे देण्यास सक्षम आहे. हा चॅटबॉट कवितांपासून कथांपर्यंत विविध प्रकारची सामग्री तयार करू शकतो. ‘कृत्रिम’ हे प्लॅटफॉर्म 22 भारतीय भाषा समजू शकते आणि 10 भाषांमध्ये मजकूर तयार करण्याची क्षमता ठेवते. कंपनीच्या मते, हे भारताचे पहिले पूर्ण-स्टॅक AI आहे, जे स्थानिक भारतीय ज्ञान, भाषा आणि डेटावर आधारित आहे. अग्रवाल यांनी हे साधन सर्वांसाठी उपयुक्त असल्याचे म्हटले आहे.

    मानसन्मान आणि पुरस्कार  

    भाविश हे भारतातील सर्वात तरुण आणि श्रीमंत उद्योजकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. कठोर कॉर्पोरेट जीवनशैलीच्या पलीकडे, त्यांना सायकलिंग, स्क्वॅश खेळणे, आणि फोटोग्राफीची आवड आहे. ते एक लोकप्रिय फोटोब्लॉग देखील चालवतात, जिथे ते त्यांच्या छायाचित्रांद्वारे स्वतःचे विचार मांडतात.

    2013 मध्ये भाविश आणि Ola ला दक्षिण आशियाच्या mBillionth पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, हा पुरुस्कार तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उत्कृष्टता दर्शवणाऱ्या स्टार्टअप्सना दिला जातो, त्याच वर्षी, Internet and Mobile Association of India (IAMAI) द्वारे Ola ला वर्षातील सर्वोत्कृष्ट स्टार्टअप म्हणून गौरवण्यात आले. 2017 मध्ये, द इकॉनॉमिक टाइम्सने भाविश अग्रवाल यांना त्यांच्या नेतृत्वाच्या कौशल्यासाठी ET सर्वोत्कृष्ट आणि तेजस्वी पुरस्काराने सन्मानित केले.

    या व्यतिरिक्त भाविश उत्तम गुंतवणूकदार, व्याख्याते आणि उत्तम छायाचित्रकार सुद्धा आहेत. ते नवीन उद्योजकांना नेहमीच प्रोत्साहन देत असतात. त्यांनी बऱ्याच नवीन स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. ज्यात ओव्हा, कार्किनोस ऑफ बिझनेस, सुपरसूट, टॉर्क मोटर्स, हॅशलर्न अशी काही उदाहरणं देता येतील. उद्योगात  आणि समाजसेवेतील त्यांच्या यशाव्यतिरिक्त, भाविश एक वक्ते आणि लेखक म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी अनेक मंचांवर आपल्या विचारांचे आदानप्रदान केले आहे आणि उद्योजकतेबद्दल अगणित लेख लिहिले आहेत.

    आज, भाविश आपल्या नवीन उपक्रमाच्या दिशेने लक्ष केंद्रित करत आहेत. आपल्या साहसी मनासह, त्यांनी अक्षय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. हवामान बदल आणि वाढत्या ऊर्जेच्या गरजा या जगासमोरील सर्वांत महत्त्वाच्या आव्हानांपैकी आहेत आणि भाविश या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाय विकसित करण्याबद्दल वचनबद्ध आहेत. भाविश म्हणतात, “मला विश्वास आहे की अक्षयऊर्जा ही भविष्याची गरज आहे आणि या क्षेत्रात भरीव योगदान देणे हे माझे ध्येय आहे. 

    आणखी वाचा