Tag: marathi

  • रेल्वे रुळांवर इतिहास घडवणारी मराठमोळी लेक | Surekha Yadav

    रेल्वे रुळांवर इतिहास घडवणारी मराठमोळी लेक | Surekha Yadav

    “महिलांना जगातली सर्व कठीण कामे जमतील, पण ड्रायव्हिंग हे त्यांचे काम नाही,” हे वाक्य आपण आजही अनेकदा ऐकतो. पण या पुरुषी मानसिकतेला खोटं ठरवत एका मराठमोळ्या लेकीने थेट रेल्वे इंजिनचं सारथ्य केलं. ती लेक म्हणजे साताऱ्याच्या कन्या, सौ.. सुरेखा यादव. भारतातीलच नव्हे, तर संपूर्ण आशियातील पहिल्या महिला रेल्वे चालक (लोको पायलट) होण्याचा मान मिळवून त्यांनी इतिहास घडवला. तब्बल ३६ वर्षांच्या शानदार सेवेनंतर त्या या नवरात्रोत्सवात  निवृत्त होत आहेत. चला, जाणून घेऊया रुळांवर आपलं कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या या असामान्य व्यक्तिमत्त्वाची प्रेरणादायी गोष्ट.

    जन्म आणि शिक्षण: साताऱ्याच्या मातीतील अंकुर

    सुरेखा यादव (Surekha Yadav) यांचा जन्म २ सप्टेंबर १९६५ रोजी महाराष्ट्राच्या साताऱ्यात एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील रामचंद्र भोसले आणि आई सोनाबाई. पाच भावंडांमध्ये सर्वात मोठ्या असलेल्या सुरेखा लहानपणापासूनच हुशार आणि महत्त्वाकांक्षी होत्या. त्यांचे शालेय शिक्षण साताऱ्यातील सेंट पॉल कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये झाले. खरं तर, त्यांना शिक्षिका व्हायचे होते आणि त्यासाठी त्यांनी बी.एड. करण्याची योजनाही आखली होती. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.

    शालेय शिक्षणानंतर त्यांनी तांत्रिक शिक्षणाची वाट धरली आणि कराड येथील सरकारी पॉलिटेक्निकमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा पूर्ण केला. याच तांत्रिक ज्ञानाच्या जोरावर त्यांनी भविष्याची एक नवी दिशा निवडली.

    रेल्वे रुळांवरचा ऐतिहासिक प्रवास

    १९८६ साली रेल्वेमध्ये असिस्टंट ड्रायव्हर पदासाठी भरती निघाली. त्या काळात हे क्षेत्र पूर्णपणे पुरुषांची मक्तेदारी मानले जायचे. पण सुरेखा यांनी धाडसाने अर्ज केला. लेखी परीक्षा आणि मुलाखत यशस्वीपणे पार करत त्यांनी रेल्वेमध्ये प्रवेश निश्चित केला. कल्याणच्या ट्रेनिंग स्कूलमध्ये सहा महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून १९८८  साली त्या भारतीय रेल्वेमध्ये सहाय्यक चालक म्हणून रुजू झाल्या आणि एका नव्या इतिहासाला सुरुवात झाली.

    त्यांचा प्रवास सोपा नव्हता. सुरुवातीला त्यांनी मालगाडी चालवण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यांची मेहनत, अचूकता आणि कौशल्य पाहून रेल्वे प्रशासनाचा विश्वास वाढत गेला.

    यशाचे एकेक शिखर

    • २०००: त्यांना ‘मोटरवुमन’ म्हणून बढती मिळाली.
    • २०१०: पश्चिम घाटासारख्या आव्हानात्मक आणि कठीण रेल्वे मार्गावर गाडी चालवण्याची जबाबदारी त्यांना मिळाली.
    • ८ मार्च २०११: ‘डेक्कन क्वीन’ अर्थात ‘दख्खनच्या राणी’ या प्रतिष्ठित गाडीचे पुणे ते मुंबई सारथ्य करण्याचा ऐतिहासिक मान त्यांना मिळाला. हा दिवस भारतीय रेल्वेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला.
    • २०११: त्यांची एक्सप्रेस मेल पायलट म्हणून नियुक्ती झाली, ज्यामुळे त्या आशियातील पहिल्या पूर्णवेळ महिला ड्रायव्हर ठरल्या.
    • १३ मार्च २०२३: त्यांनी सोलापूर ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) पर्यंत ‘वंदे भारत एक्सप्रेस’ चालवून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. वंदे भारत चालवणाऱ्या त्या पहिल्या महिला लोको पायलट ठरल्या.
    भारतीय रेल्वेची चालक शक्.ची प्रेरणादायी यशोगाथा

    कुटुंबाचा भक्कम पाठिंबा

    सुरेखा यादव यांच्या या यशस्वी प्रवासात त्यांच्या कुटुंबाचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचे पती शंकर यादव हे महाराष्ट्र पोलिसात इन्स्पेक्टर पदावर कार्यरत आहेत. दोन मुलांची आई असलेल्या सुरेखा नेहमी सांगतात की, “कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय मी इथपर्यंत पोहोचू शकले नसते.” नोकरीची वेळ, जबाबदारी आणि ताण सांभाळून घराची जबाबदारी सांभाळण्यात त्यांच्या पतीने आणि कुटुंबाने दिलेली साथ मोलाची ठरली.

    सेवानिवृत्ती आणि प्रेरणादायी वारसा

    तब्बल ३६ वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर, सुरेखा यादव ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. आपल्या कारकिर्दीतील शेवटची फेरी त्यांनी हजरत निजामुद्दीन (दिल्ली) – CSMT राजधानी एक्सप्रेस चालवून पूर्ण केली.

    त्यांच्या सेवानिवृत्तीवर मध्य रेल्वेने अत्यंत भावनाप्रधान शब्दात म्हटले आहे, “श्रीमती सुरेखा यादव या एक खऱ्या अर्थाने पथप्रदर्शक (trailblazer) आहेत. त्यांनी अडथळ्यांना पार करून अगणित महिलांना प्रेरणा दिली आणि हे सिद्ध केले की परिश्रम घेण्याची तयार असेल तर कोणतेही स्वप्न अपूर्ण राहू शकत नाही. त्यांचा प्रवास भारतीय रेल्वेमध्ये महिला सक्षमीकरणाचे प्रतीक म्हणून सदैव स्मरणात राहील.”

    सुरेखा यादव यांची गोष्ट केवळ एका नोकरीची कहाणी नाही, तर ती स्वप्न पाहण्याचे आणि ते पूर्ण करण्यासाठी कोणत्याही मर्यादा न मानण्याची गाथा आहे. ‘चूल आणि मूल’ या चौकटीतून बाहेर पडून महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करू शकतात, हे त्यांनी सिद्ध केले. त्यांचा हा प्रवास येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत आणि दीपस्तंभ म्हणून कायम प्रकाश देत राहील.

    आणखीन वाचा

  • Pulse Candy: कोणतीही जाहिरात न करता ३५० कोटींचा टप्पा गाठलेला यशस्वी ब्रँड!

    Pulse Candy: कोणतीही जाहिरात न करता ३५० कोटींचा टप्पा गाठलेला यशस्वी ब्रँड!

    आजच्या काळात कोणताही नवीन ब्रँड मोठा करण्यासाठी जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च होतात. मोठमोठे सेलिब्रिटी, आकर्षक टीव्ही ऍड्स आणि सोशल मीडियावर महागड्या मार्केटिंग मोहिमांचा वापर केला जातो. मात्र, Pulse कँडीने हे सर्व नियम मोडून एक नवा इतिहास रचला. कोणतीही जाहिरात न करता, केवळ आपल्या अनोख्या चवीच्या जोरावर या ब्रँडने ३५० कोटींचा टप्पा ओलांडला.

    ही कँडी २०१५ मध्ये बाजारात आली आणि काही महिन्यांतच ती सर्वाधिक विक्री होणाऱ्या कँडींपैकी एक बनली. तिच्या यशामागे प्रचंड मेहनत, एक अनोखी रणनीती होती, ज्यामुळे या साध्या वाटणाऱ्या कँडीला FMCG (Fast-moving consumer goods) क्षेत्रात सर्वात मोठा ब्रँड बनवलं. चला तर मग, या लेखात आपण Pulse च्या या अद्भुत यशामागची कारणे जाणून घेऊया!

    बाजारातील संधी ओळखून नवा प्रयोग

    २०१५ मध्ये भारताच्या ₹ ८,००० कोटींच्या कँडी मार्केटमध्ये प्रामुख्याने गोडसर कँडीजचा दबदबा होता. मात्र, भारतीय चविष्ट खाद्यसंस्कृती पाहता, आंबट-तिखट चव असलेल्या कँडीची मागणी असू शकते, हे DS ग्रुपने (Rajnigandha आणि Pass Pass फेम) अचूक ओळखलं. लोकांना लहानपणीची आठवण करून देणारी, कैरीवर मीठ-मिरची लावून खाल्ल्याचा स्वाद देणारी कँडी बाजारात नव्हती. याच संधीचा फायदा घेत त्यांनी Pulse कँडी तयार केली. ही कॅंडी चॉकलेट किंवा गोडसर मिठाईसारखी नव्हती, तर भारतीय चवीशी एकरूप झालेली होती. Pulse लाँच होताच ग्राहकांनी ती उचलून धरली. चटकदार चव आणि योग्य किंमत यामुळे लोक स्वतःच या कँडीची जाहिरात करू लागले.

    शून्य जाहिरात खर्च, तरीही अफाट लोकप्रियता!

    Pulse च्या चटपटीत आणि वेगळ्या चवीनं लोकांना लगेचच आकर्षित केलं. एकाने खाल्ल्यानंतर दुसऱ्यालाही खायला दिली, मित्रांनी एकमेकांना सांगितलं, कुटुंबात आणि नातेवाईकांमध्येही चर्चा सुरू झाली. हळूहळू “वर्ड ऑफ माऊथ” हेच Pulse चं सर्वात प्रभावी मार्केटिंग ठरलं. केवळ चवीच्या जोरावर ही कँडी घराघरात पोहोचली आणि भारतीय कँडी मार्केटमध्ये नवा ट्रेंड निर्माण केला.

    टीव्ही ऍड्स, सोशल मीडिया मार्केटिंग, सेलिब्रिटी प्रमोशन यांसारख्या विविध मार्गांचा वापर करून कंपन्या आपली उत्पादने लोकप्रिय करतात. मात्र, Pulse कँडीसाठी कंपनीने जाहिरातीवर एकही रुपया खर्च केला नाही. ना कोणतीही जाहिरात मोहीम राबवली, ना मोठ्या ब्रँड्सप्रमाणे सेलिब्रिटींच्या मदतीनं प्रमोशन केलं. तरीही ही कँडी तुफान गाजली आणि संपूर्ण भारतभर पोहोचली.

    DS ग्रुपची अनोखी मार्केटिंग युक्ती

    DS ग्रुपला मार्केटिंगचं तंत्र चांगलंच ठाऊक होतं. रजनीगंधा आणि पास पाससारख्या यशस्वी उत्पादनांचा अनुभव त्यांच्याकडे होता. त्यांनी ओळखलं की लोकांना Pulse कँडीची चव आवडतेय आणि तिची मागणी वाढतेय. ही उत्सुकता टिकून राहावी आणि कँडीला अधिक महत्त्व मिळावं, म्हणून त्यांनी सुरुवातीला Pulse मर्यादित प्रमाणातच बाजारात आणली.

    Pulse प्रथम केवळ गुजरात आणि राजस्थानमध्ये लाँच करण्यात आली. लोकांनी ही कँडी शोधायला सुरुवात केली. विक्रेत्यांनी स्टॉक मर्यादित ठेवल्यामुळे ती मिळवण्यासाठी स्पर्धा वाढली. त्यामुळे Pulse ही सामान्य कँडी न राहता, एक एक्सक्लुझिव्ह प्रॉडक्ट वाटू लागली. या रणनीतीमुळे कँडीची लोकप्रियता झपाट्याने वाढली आणि Pulse एक मोठा ब्रँड बनला.

    ८ महिन्यांत १०० कोटींची विक्रमी विक्री

    Pulse हा केवळ महिन्यांत १०० कोटींची विक्री करणारा भारतातील सर्वात वेगाने वाढणारा FMCG ब्रँड ठरला. यामागे काही महत्त्वाची कारणे होती. कँडीची किंमत फक्त रु. असल्यामुळे कोणालाही सहज खरेदी करता येत होती. हिरवट-पिवळ्या आकर्षक पॅकेजिंगमुळे ती लगेचच लक्ष वेधून घेत होती. 

    Pulse ची मागणी इतकी वाढली की दुकानांमध्ये ती मिळवण्यासाठी रांगा लागत होत्या. काही किरकोळ विक्रेत्यांनी तर Pulse मिळवण्यासाठी वेटलिस्ट तयार केली होती, तर काहींनी जास्त किमतीला विकायला सुरुवात केली. लोकांमध्ये निर्माण झालेल्या या क्रेझमुळे Pulse कँडीच्या लोकप्रियतेला अधिकच गती मिळाली आणि ती भारतभर गाजली.

    भारतातून परदेशापर्यंत पोहोचलेली Pulse!

    २०१८ पर्यंत Pulse भारतातील २० लाखांहून अधिक दुकानांमध्ये उपलब्ध झाली. प्रवासी भारतीय ही कँडी परदेशात घेऊन जाऊ लागले आणि हळूहळू ती अमेरिका आणि दुबईतही प्रसिद्ध झाली. या लोकप्रियतेला आणखी चालना देण्यासाठी DS ग्रुपने संत्री, अननस आणि पेरू असे नवीन फ्लेवर्स सादर केले. मात्र, कच्चा आंबा हा मूळ फ्लेवर सर्वाधिक विकला गेला.

    २०१९ मध्ये कंपनीने  बाजारात फॅमिली पॅक्स आणि गिफ्ट पॅक्स आणले, ज्यामुळे विक्रीत मोठी वाढ झाली आणि Pulse ने तब्बल ३५० कोटींचा टप्पा पार केला. इतकंच नाही तर, कँडी मार्केटमध्ये ४८% मार्केट शेअर मिळवत Pulse ने नवा विक्रम प्रस्थापित केला. हे यश केवळ उत्कृष्ट चवीमुळे नव्हतं, तर त्यामागे बाजारपेठेचा सखोल अभ्यास आणि योग्य व्यूहरचना होती. ग्राहकांच्या आवडी समजून DS ग्रुपने नेमकी त्याच चवीची कँडी बाजारात आणली आणि इतिहास घडवला. 

    मित्रांनो, Pulse कँडीचे यश हे उत्तम मार्केटिंग आणि ब्रँडिंगचं उदाहरण आहे. योग्य नियोजन, उत्कृष्ट चव आणि प्रभावी वितरण यांच्या जोरावर जाहिरात न करता देखील एखादं उत्पादन मोठं होऊ शकतं, हे Pulse ने सिद्ध केलं आहे. आजही ती बाजारात तितकीच लोकप्रिय असून, नव्या ब्रँड्सच्या स्पर्धेत टिकून आहे.

  • Referrush Success Story: लकवा झाला… पण आज कमवतो रोज दीड लाख रुपये!

    Referrush Success Story: लकवा झाला… पण आज कमवतो रोज दीड लाख रुपये!

    यशाचा मार्ग कधीच सोपा नसतो. त्यात मेहनत, संघर्ष आणि जिद्द असते. प्रत्येकजण या मार्गावर यशस्वी होतोच असं नाही, पण काही जण अपयशाला न जुमानता पुढे जातात आणि स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करतात. विक्रम पै हे या गोष्टीचं उत्तम उदाहरण आहे.

    बंगळुरूमधील हा तरुण उद्योजक आज ReferRush या प्रसिद्ध ई-कॉमर्स रेफरल सेल्स प्लॅटफॉर्मचा संस्थापक आणि सीईओ आहे. पण त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. गेल्या सहा वर्षांत त्याने पाच व्यवसाय सुरू केले, पण त्यातला एकही यशस्वी झाला नाही. त्यामुळे त्याला तब्बल दोन कोटी रुपयांचे नुकसान सहन करावं लागलं. तरीही त्याने हार मानली नाही. प्रत्येक अपयशातून शिकत, जिद्दीने पुढे जात अखेर ReferRush हा यशस्वी व्यवसाय उभारला. आज तो केवळ एक यशस्वी उद्योजक नाही, तर चिकाटी आणि मेहनतीचं उत्तम उदाहरण आहे. या लेखात आपण त्याच्या संघर्षमय प्रवासावर एक नजर टाकूया.  

    सुरुवातीचा संघर्ष आणि सलग अपयश

    बंगळुरूमध्ये जन्मलेल्या विक्रमने शिक्षण पूर्ण केल्यानंतर मोठ्या आत्मविश्वासाने आणि उत्साहाने उद्योजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्याची स्वप्नं मोठी होती, यशस्वी होण्याची जिद्दही होती. मात्र, व्यवसायाच्या वाटचालीत अनेक अडथळे आले. अनुभव आणि योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे त्याने सुरू केलेले एक-दोन नव्हे, तर तब्बल पाच व्यवसाय अपयशी ठरले. सततच्या अपयशामुळे मोठं आर्थिक संकट कोसळलं. त्याला जवळपास दोन कोटी रुपयांचं नुकसान झालं. परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत गेली. मित्रांनी दुरावा निर्माण केला, नातेवाईक टीका करू लागले आणि आईचाही त्याच्यावरचा विश्वास कमी झाला. एका क्षणाला परिस्थिती अशी आली की, खिशात फक्त ४,००० रुपये उरले. कर्मचाऱ्यांना पगार देणेही शक्य नव्हते. काही जणांनी त्याची थट्टा केली. “एलन मस्क बनायचा प्रयत्न करतोय का?” असे टोमणे मारले.

    सततच्या तणावाचा परिणाम त्याच्या प्रकृतीवर झाला. मानसिक तणावामुळे शरीर साथ सोडू लागलं. अखेर त्याला लकवा झाला आणि त्याचे चालणे, बोलणेही कठीण झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्यासारखी वाटू लागली. तो खचला, रडला, पण हार मानली नाही. डोळ्यांतले स्वप्न जिवंत ठेवत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. या कठीण काळात स्वतःशीच लढण्याचा निर्धार केला आणि नव्या उर्जेने पुन्हा उभं राहण्याचा निश्चय केला.

    ReferRush ची स्थापना आणि पहिलं यश

    अनेक अपयशांनंतरही विक्रमने हार मानली नाही. नव्या उमेदीनं त्याने ReferRush या रेफरल मार्केटिंग प्लॅटफॉर्मची सुरुवात केली. सुरुवातीला हा व्यवसायही अपयशी ठरेल, असं अनेकांना वाटत होतं. पण यावेळी विक्रम मागे हटणार नव्हता. ReferRush व्यवसायांना त्यांच्या ग्राहकांच्या माध्यमातून नवीन ग्राहक मिळवण्यासाठी मदत करतं. ग्राहक कंपनीच्या उत्पादनांची माहिती इतरांना सांगतात आणि त्याबदल्यात त्यांना कमिशन मिळतं. त्यामुळे कंपन्यांना विश्वासार्ह ग्राहक मिळतात, तर ग्राहकांनाही घरबसल्या कमाईचा पर्याय उपलब्ध होतो. हळूहळू हा व्यवसाय स्थिरावत गेला आणि ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला.

    सुरुवातीला पहिल्या एक लाख रुपयांसाठी तब्बल चार महिने लागले. पण विक्रमने मेहनत आणि जिद्द कायम ठेवली. त्याच्या प्रयत्नांचा परिणाम दिसू लागला आणि आज ReferRush दररोज १.५ लाख रुपये कमवतो. अपयशाच्या काळात खचून न जाता ज्या चिकाटीने विक्रमने प्रयत्न सुरू ठेवले, त्याच जिद्दीमुळे त्याला यशाचा हा टप्पा गाठता आला.

    निखील कामतकडून ReferRush ला फंडिंग – यशाच्या नव्या पर्वाची सुरुवात

    विक्रमच्या अथक मेहनतीला अखेर मोठं यश मिळालं. त्याच्या ReferRush या रेफरल मार्केटिंग स्टार्टअपने उद्योगविश्वात ठसा उमटवायला सुरुवात केली होती. याच प्रवासात, भारतातील नामवंत उद्योजक निखील कामत यांच्या कंपनीने ReferRush ला इनिशिएटिव्ह फंडिंगसाठी निवडलं. तब्बल २,४०० कंपन्यांमधून ReferRush ची निवड होणं हे विक्रमसाठी एका मोठ्या यशाचं प्रतीक होतं. यामुळे केवळ आर्थिक पाठबळच नाही, तर या प्लॅटफॉर्मच्या भविष्यासाठीही एक मजबूत दिशा मिळाली. आता त्याला ठाम विश्वास आहे की, लवकरच प्रत्येक ई-कॉमर्स ब्रँड आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी ReferRush चा वापर करेल.

    2

    विक्रमच्या मते, त्याचा संपूर्ण प्रवास हा शिकण्याचा होता. सुरुवातीची पाच वर्षं त्याने प्रयोग आणि चुका यातून शिकण्यात घालवली. अपयश आलं तरीही आत्मविश्वास कधीही गमावला नाही. व्यवसायात संकटं आली, आर्थिक तोटा सहन करावा लागला, शारीरिक आणि मानसिक त्रासही सोसावा लागला. पण तरीही तो जिद्दीने लढत राहिला. त्याच्या मते, “जर तुमच्या मूलभूत गरजा पूर्ण होत असतील, तर तुम्ही तुमचं स्वप्न नक्कीच साकार करू शकता.”

    आज विक्रमच्या संघर्षाची कहाणी हजारो तरुण उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अपयशाला घाबरून थांबण्यापेक्षा त्यातून शिकून पुढे जाणं हेच यशाचं खरं रहस्य आहे. विक्रमने ते करून दाखवलं. 

    आणखी वाचा:

  • Railways Book Now Pay Later Scheme | अचानक रेल्वेने प्रवास करायचा आहे, पण तिकीटासाठी पैसे नाहीत? भारतीय रेल्वेची ‘बुक नाऊ, पे लेटर’ योजना मदतीसाठी तयार!

    Railways Book Now Pay Later Scheme | अचानक रेल्वेने प्रवास करायचा आहे, पण तिकीटासाठी पैसे नाहीत? भारतीय रेल्वेची ‘बुक नाऊ, पे लेटर’ योजना मदतीसाठी तयार!

    भारतीय रेल्वे कोट्यवधी प्रवाशांसाठी स्वस्त, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा उत्तम पर्याय आहे. आपण घरापासून लांब राहत असू किंवा अचानक कुठे प्रवास करण्याची गरज भासली, तर रेल्वेचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. मात्र, काही वेळा तिकीट बुक करताना आपल्याकडे पुरेसे पैसे नसतात आणि त्यामुळे अडचण निर्माण होते.

    पण आता काळजी करण्याची गरज नाही! भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी ‘बुक नाऊ, पे लेटर’ ही नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे आपण तिकीट त्वरित बुक करू शकतो आणि त्यासाठीचे पेमेंट प्रवासानंतर १४ दिवसांच्या आत करू शकतो. म्हणजेच, अचानक प्रवास करावा लागला आणि तिकीटासाठी पुरेसे पैसे हाताशी नसले, तरीही ही योजना मदतीला येते.

    या लेखात जाणून घेऊया की ही योजना नेमकी कशी कार्य करते, कोणाला याचा लाभ मिळू शकतो आणि त्याचे फायदे काय आहेत.

    ‘बुक नाऊ, पे लेटर’ योजनेचा लाभ कसा घ्यावा?

    भारतीय रेल्वेने ही योजना फक्त ऑनलाईन तिकीट बुकिंगसाठी लागू केली आहे. याचा फायदा घेण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा 

    1. रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी सर्वप्रथम IRCTC वेबसाइट किंवा मोबाईल अ‍ॅपवर लॉगिन करा.

    2. आपल्या प्रवासासाठी योग्य ट्रेन, प्रवाशांची संख्या आणि प्रवासाची तारीख निवडा. त्यानंतर उपलब्ध तिकिटे तपासा आणि तुमच्या सोयीच्या गाडीसाठी तिकीट निवडा.

    3. तिकीट बुक करताना पेमेंट करण्यासाठी वेगवेगळे पर्याय दिसतील. त्यापैकी ‘पे लेटर’ हा पर्याय निवडा, ज्यामुळे तुम्हाला तिकीट शुल्क त्वरित न भरता प्रवासानंतर १४ दिवसांच्या आत पैसे भरण्याची सुविधा मिळते.

    4. जर तुम्ही पहिल्यांदाच या सुविधेचा वापर करत असाल, तर EpayLater या प्लॅटफॉर्मवर जाऊन तुमची नोंदणी करा. यासाठी तुमचा मोबाईल नंबर, ई-मेल आणि KYC संबंधित आवश्यक माहिती द्यावी लागेल.

    5. EpayLater वर नोंदणी झाल्यानंतर, तुमच्या IRCTC खात्यातून तिकीट बुकिंग प्रक्रिया पूर्ण करा. तिकीट यशस्वीपणे बुक झाल्यावर तुम्हाला ई-मेल आणि SMS द्वारे त्याचा तपशील मिळेल.

    6. तिकीट बुक केल्यानंतर तुमच्या प्रवासानंतर १४ दिवसांच्या आत EpayLater च्या माध्यमातून पेमेंट करणे आवश्यक आहे. जर दिलेल्या वेळेत पैसे भरले, तर कोणतेही अतिरिक्त शुल्क लागणार नाही. मात्र, उशीर झाल्यास व्याज किंवा दंड आकारला  जातो.

    ‘बुक नाऊ, पे लेटर’ योजना का उपयुक्त आहे?

    रेल्वे प्रवास करताना अनेकदा अचानक प्रवास करण्याची गरज भासते, पण तिकीट बुक करताना तत्काळ पैसे उपलब्ध नसतात. अशा वेळी ‘बुक नाऊ, पे लेटर’ ही योजना अत्यंत फायदेशीर ठरते. या सुविधेमुळे तिकीट त्वरित बुक करता येते, पण त्याचे पैसे नंतर भरता येतात. त्यामुळे अचानक प्रवासाची वेळ आली तरीही कोणतीही अडचण न येता तुम्ही सहज प्रवास करू शकता.

    प्रवाशांना पैशांची व्यवस्था करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. शिवाय, ही प्रक्रिया अगदी सोपी असून जास्त कागदपत्र लागत नाहीत. फक्त IRCTC च्या EpayLater च्या मदतीने काही मिनिटांत तिकीट बुक करता येते.

    ही योजना वारंवार रेल्वे प्रवास करणारे प्रवासी, विद्यार्थी, नोकरीसाठी प्रवास करणारे नोकरदार आणि व्यावसायिक यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तिकीट बुकिंगच्या वेळी पैशांची कमतरता जाणवत असेल, तर ही सुविधा नक्कीच दिलासा देणारी ठरेल.

    योजनेचे फायदे 

    • तिकीट बुक करताना लगेच पैसे द्यावे लागत नाहीत, त्यामुळे अचानक प्रवास करायचा असल्यास आर्थिक ताण येत नाही.
    • ही सुविधा फक्त ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी उपलब्ध असल्याने तिकीट सहज आणि झटपट मिळते.
    • ठरवलेल्या मुदतीत पैसे भरल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क लागत नाही.
    • मुदतीनंतर पैसे भरल्यास फक्त ३.५% सेवा शुल्क आकारले जाते, त्यामुळे मोठा आर्थिक बोजा पडत नाही.

  • कधी टॉयलेट साफ केला, कधी वडापाव विकला: जाणून घ्या ‘छावा’ दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा संघर्षमय प्रवास

    कधी टॉयलेट साफ केला, कधी वडापाव विकला: जाणून घ्या ‘छावा’ दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा संघर्षमय प्रवास

    सध्या देशभरात “छावा” (Chhaava) या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या संघर्षमयी जीवन प्रवासावर आधारित आहे, ज्यात महाराजांची भूमिका अभिनेता विकी कौशल (vicky kaushal) यांनी साकारली आहे, तर महाराणी येसूबाईंची भूमिका अभिनेत्री रश्मीका मंदाना हिने साकारली आहे, तसेच अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता आणि संतोष जुवेकर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी सुद्धा आपली भूमिका चोख निभावली आहे. या सर्व कलाकारांच्या अभिनयाचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.

    मात्र, या चित्रपटाच्या यशामध्ये सर्वाधिक कौतुक कोणाचं होत असेल, तर ते म्हणजे चित्रपटाचे मराठमोळे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांचं. कारण पहिल्यांदाच संभाजी महाराजांचा इतिहास मोठ्या पडद्यावर इतक्या ताकदीने साकारण्यात आला आहे. उतेकर यांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण दिग्दर्शन शैलीत हा चित्रपट वास्तवाशी जुळवून प्रभावीपणे सादर केला आहे, ज्यामुळे या चित्रपटाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

    लक्ष्मण उतेकर हे आज हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक आहेत, पण त्यांचा प्रवास अत्यंत कठीण आणि संघर्षमय होता. एक काळ असा होता की, त्यांना दोन वेळच्या जेवणासाठीही संघर्ष करावा लागला. उदरनिर्वाहासाठी त्यांनी टॉयलेट साफ करण्यापासून ते वडापाव विकण्यापर्यंत अनेक कामे केली. पण त्यांनी कधीही हार मानली नाही. कठोर मेहनत, चिकाटी आणि आपल्या कलेवरील निष्ठेमुळे ते आज यशस्वी दिग्दर्शक बनले आहेत. आजच्या लेखात आपण त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाची सविस्तर माहिती घेऊया.

    प्रारंभिक जीवन आणि संघर्ष

    लक्ष्मण उतेकर यांचा जन्म एका साधारण कुटुंबात झाला. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. शिक्षणासाठी आवश्यक सुविधा मिळाल्या नाहीत, पण त्यांच्या मनात मोठी स्वप्नं होती. काहीतरी वेगळं करण्याची जिद्द घेऊन त्यांनी लहान वयातच मुंबई गाठली. तिथे ना कुणी ओळखीचं होतं, ना कुठे राहायची सोय. हातात काहीच नव्हतं, पण मेहनतीवर आणि जिद्दीवर त्यांचा पूर्ण विश्वास होता.

    पोट भरण्यासाठी त्यांनी एका वडापाव विक्रेत्याकडे लहानसं काम मिळवलं. दिवस-रात्र मेहनत करत असताना त्यांची नजर सतत मोठ्या संधीच्या शोधात होती. त्यांना सिनेसृष्टीत काम करायचं होतं, पण त्यासाठी कुठून सुरुवात करावी, हे माहीत नव्हतं. त्यांनी हार मानली नाही. ते मुंबईत स्टुडिओच्या बाहेर तासन्‌तास उभे राहत, लोकांशी ओळख वाढवायचा प्रयत्न करत आणि योग्य संधी मिळण्याची वाट पाहत होते.

    एके दिवशी अचानक महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांची वडापावची हातगाडी जप्त केली आणि त्यांचं उपजीविकेचे एकमेव साधन हिरावलं गेलं. हा त्यांच्या आयुष्यातला मोठा टर्निंग पॉइंट ठरला. त्या क्षणी त्यांनी ठरवलं की आता मागे फिरायचं नाही. परिस्थिती कितीही कठीण आली तरी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करायचं आणि आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवायचं. उपजीविकेसाठी त्यांनी वेळप्रसंगी सफाईचं काम केलं, पण हार मानली नाही. 

    सिनेमॅटोग्राफीची पहिली पायरी

    या कठीण परिस्थितीतून मार्ग काढत असताना, त्यांना एक दिवस एका वृत्तपत्रात पियूनच्या नोकरीची जाहिरात दिसली. स्टुडिओत काम करण्याची संधी पाहून त्यांनी अर्ज केला आणि त्यांना तिथे नोकरी मिळाली. हीच त्यांची सिनेसृष्टीत पहिली पायरी होती.

    स्टुडिओत काम करत असताना त्यांना चित्रपट निर्मितीविषयी अधिक जाणून घेण्याची संधी मिळाली. तिथेच क्रूची गरज असल्याने त्यांना कॅमेरा अटेंडंट म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी हळूहळू सिनेमॅटोग्राफी शिकण्यास सुरुवात केली. छोट्या जबाबदाऱ्या स्वीकारत, सातत्याने मेहनत घेत आणि शिकत ते पुढे जात राहिले.

    काळाच्या ओघात त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांसाठी सिनेमॅटोग्राफी केली. इंग्लिश विंग्लिश, हिंदी मीडियम, डीअर जिंदगी आणि 102 नॉट आऊट यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये त्यांच्या उत्कृष्ट कार्याची झलक दिसली. त्यांच्या मेहनतीमुळे आणि कुशलतेमुळे त्यांना बॉलिवूडमध्ये ओळख मिळू लागली आणि सिनेमॅटोग्राफीच्या क्षेत्रात त्यांचं नाव लौकिकास आलं .

    दिग्दर्शनाची सुरुवात आणि ब्रेकथ्रू

    लक्ष्मण उतेकर यांनी सिनेमॅटोग्राफर म्हणून चांगलं नाव कमावलं होतं, पण त्यांना दिग्दर्शक होण्याचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. त्यांनी मराठीत पहिला चित्रपट दिग्दर्शित केला तो म्हणजे “टपाल”. हा चित्रपट प्रेक्षकांना चांगला आवडला आणि त्यांना दिग्दर्शक म्हणून ओळख मिळाली.

    यानंतर त्यांनी “लालबागची राणी” हा दुसरा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटामुळे त्यांच्या दिग्दर्शन कौशल्यावर शिक्कामोर्तब झालं. त्यांच्या कथा सांगण्याच्या अनोख्या शैलीला आणि भावनिक दृश्यांवरील पकडीला प्रेक्षकांची दाद मिळाली.

    बॉलिवूडमध्ये संधी मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील होते आणि अखेर २०१९ मध्ये त्यांना मोठा ब्रेक मिळाला. त्यांनी “लुका छुपी” हा चित्रपट दिग्दर्शित केला. हा चित्रपट लिव्ह-इन रिलेशनशिप या विषयावर हलकाफुलका विनोदी सिनेमा होता. प्रेक्षकांनी तो उचलून धरला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर १२८ कोटींची कमाई केली.

    यानंतर, आता लक्ष्मण उतेकर यांनी “छावा” हा छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडणारा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. भव्य निर्मितीमूल्य, दमदार अभिनय, आणि सुंदर दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय ठरतो आहे.मित्रांनो, लक्ष्मण उतेकर यांचा जीवनप्रवास आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक अडचण, संघर्ष, आणि अपयशाला संधी म्हणून स्वीकारलं आणि त्या सर्वांचा योग्य उपयोग करत, आपली स्वप्नं सत्यात उतरवली. त्यांची मेहनत, चिकाटी आणि अथक परिश्रम यामुळेच ते आज एक प्रतिष्ठित दिग्दर्शक बनले आहेत. त्यांची ही यशोगाथा आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी, आपल्याला दिलेल्या संधीचा योग्य उपयोग आणि प्रयत्नांमुळे सर्व गोष्टी शक्य होतात.

    आणखी वाचा :

  • 3 वर्षे शेती करून उभी केली 1200 कोटींची कंपनी जाणून घ्या या “ॲग्री स्टार्टअप” ची कहाणी

    3 वर्षे शेती करून उभी केली 1200 कोटींची कंपनी जाणून घ्या या “ॲग्री स्टार्टअप” ची कहाणी

    अलिकडच्या काळात शेती क्षेत्रात सातत्यानं बदल होत आहेत. अनेक तरुण करिअर म्हणून देखील शेतीकडे पाहू लागले आहेत. बरेचसे शिक्षित तरुण आधुनिक शेतीची माहिती घेऊन शेतीकडे वळत आहेत व पारंपरिक शेतीपेक्षा कित्येक पटींनी अधिक उत्पन्न घेत आहेत. राजस्थानच्या जयपूरमध्ये राहणाऱ्या ऋतुराज शर्मा या 33 वर्षाच्या तरुणाने देखील शेतीत नवनवीन प्रयोग केले आहेत. शेतीच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधत या तरुणाने करोडो रुपयांची Zettafarms नावाची कंपनी स्थापन केली आहे.  

    गुडगावमध्ये ही कंपनी असून कॉर्पोरेट शेतीमध्ये कार्यरत आहे. कंपनी भाडेतत्त्वावर जमीन घेते आणि त्यात धान्य, फळं आणि भाजीपाला पिकवते. या कंपनीचे संस्थापक ऋतुराज शर्मा यांनी B.Tech आणि MBA केल्यानंतर नोकरीऐवजी स्वत:चं Startup सुरू केलं.  कंपनीचा उद्देश शेती अधिक फायदेशीर बनवणे आणि शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे आहे. शेतकऱ्यांच्या तांत्रिक आणि आर्थिक समस्या कमी करून आधुनिक शेती पद्धतीचा वापर करून शेतीचे उत्पादन अधिक वाढवणे हा कंपनीचा मुख्य उद्देश आहे

    Zettafarms चे काम कसे चालते? 

    Zetta Farms शेतीला एका व्यावसायिक कंपनी प्रमाणे चालवते. एका कॉर्पोरेट कंपनीप्रमाणे  फायनान्स, ऑपरेशन्स, IT अशी सर्व खाती या कंपनीत देखील आहेत. मोठ्या प्रमाणावर शेतजमीन भाडेतत्वावर घेऊन सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्यावर शेती केली जाते. कुठले पीक किती प्रमाणात घ्यावे. कुठल्या पिकाला अधिक भाव मिळेल या सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच पिके घेतली जातात. शेती करण्यासाठी कंपनीने शेतकऱ्यांनाच नोकरीवर ठेवले आहे, ज्याच्या बदल्यात त्यांना प्रत्येक महिन्याला ठराविक पगार मिळतो. कंपनी कायदेशीर असल्यामुळे शेतकऱ्यांचा PF देखील जमा होतो. याशिवाय कंपनी शेतकऱ्यांना मोफत इन्शुरन्स देखील देते. आज रोजी कंपनीमध्ये जवळपास २९०० कर्मचारी काम करतात.

    Zettafarms चा 15 राज्यांमध्ये विस्तार 

    Zettafarms ही कंपनी करारावर किंवा भाडेतत्त्वावर शेती करते. ज्यामध्ये ते किमान 50 एकर जमीन एका व्यक्तीकडून आणि 100 एकर जमीन एका गटाकडून भाडेतत्त्वावर घेतात. त्यानंतर त्या जमिनीवर ते शेती करतात. झेटाफार्म्स सध्या 15 राज्यांमध्ये 20 हजार एकर जमिनीवर शेती करत असून ६० पेक्षा जास्त पिकांचे उत्पादन घेते. पिकांमध्ये ते गहू, हरभरा, धान, कडधान्ये, भाजीपाला, फळे, चहा आणि कॉफीच्या मळ्यासह सर्व प्रकारची शेती केली जाते.

    ऋतुराजने शेती हा यशस्वी व्यवसाय कसा बनवला?

    ऋतुराज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतीमध्ये व्यवसाय, अर्थशास्त्र, गणित आणि विज्ञान यांचा समावेश केला, तर तो कोणत्याही परिस्थितीत फायदेशीर व्यवसाय आहे. या विचाराने ऋतुराजने शेतीमध्ये पाऊल टाकले. सुरुवातीला ऋतुराजने फक्त 2 एकर शेती करायला सुरूवात केली. हळूहळू भाडेतत्त्वावर आणि करारावर जमीन घेऊन व्यवसाय वाढवायला सुरुवात केली. ऋतुराजच्या कंपनीला पहिल्या वर्षी फक्त 1 लाख रुपयांचा नफा झाला, पण नंतर त्यांनी झपाट्याने काम वाढवले. 

    Zettafarms

    Zettafarms चे यशाचे रहस्य काय?

    एका ठिकाणी केवळ एकाच पिकाची शेती हानीकारक असू शकते. या विचारसरणीवर काम करत Zettafarms हे पीक विविधतेवर काम करते. ते वेगवेगळ्या भागात विविध प्रकारची शेती करतात. शेतीसाठी ते नवीन तंत्रज्ञान वापरतात ज्यामध्ये ते माती परीक्षणापासून इतर गोष्टींपर्यंत आवश्यक माहिती गोळा करतात. तंत्रज्ञानामध्ये, ते हवामान apps आणि क्रॉप मॉनिटरिंगसह विविध प्रकारच्या माहितीचे विश्लेषण वापरतात. झेटाफार्म्स गरजेनुसार सिंचन तंत्रज्ञानाचा वापर करतात, कुठे ठिबक सिंचनाची गरज भासल्यास तिथेही तेच काम केले जाते. याशिवाय कुठे पाणी कमी असल्यास कमी पाण्यात पिके घेण्याच्या नियोजनावर काम केलं जातं 

    ते संसाधनांचा योग्य वापर करतात. ज्यामुळं उत्पादन वाढते आणि नफाही वाढतो. पीक विविधीकरणाव्यतिरिक्त ते Risk Management वर देखील काम करतात.

    औषधे, खते किंवा किटकनाशके वापरताना ते कीटक व्यवस्थापनाच्या पद्धती देखील अवलंबतात. ज्यामुळं खर्च कमी होतो आणि शेतीमध्ये कमी रसायने वापरली जातात. 

    भविष्यातील वाटचाल : 

    ऋतुराज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतीला ते एक यशस्वी व्यवसाय म्हणून समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या व्यवसाय मॉडेलद्वारे ते लोकांना सांगू इच्छित आहेत की, शेतीतूनही करोडोंची कमाई केली जाऊ शकते. आयटी, फायनान्स आणि इतर क्षेत्रात काम करणे ज्याप्रमाणे लोक अभिमानाची गोष्ट मानतात, त्याचप्रमाणे लोकांना शेती आणि शेतकऱ्यांबद्दल आदराची भावना निर्माण झाली पाहिजे. 2030 पर्यंत 50 हजार एकरांवर शेती करण्याचे ऋतुराज शर्मा यांचे ध्येय आहे. शेतकरी, जमीनीचे मालक, स्टार्टअप्स, शेती पूरक व्यवसाय आणि शेती उपकरणे पुरवठादार यांना जोडणारे कृषी अर्थव्यवस्थेचे केंद्र बनून झेट्टा फार्म्स कृषी क्षेत्रात स्वतःच्या कार्याने बहुमूल्य योगदान देत आहेत. 

    आणखी वाचा

  • अशोक लेलँड : भारतीय वाहतूक क्षेत्राचा कणा | The Ashok Leyland Story

    अशोक लेलँड : भारतीय वाहतूक क्षेत्राचा कणा | The Ashok Leyland Story

    भारतात व्यावसायिक वाहने म्हटली की, पहिल्यांदा आठवण होते अशोक लेलँडची. मग ते ट्रक असू दे किंवा बस, अशोक लेलँड ही एक अशी कंपनी आहे जी भारतीय वाहतूक क्षेत्राचा कणा बनली आहे. टाटानंतर भारतातील दुसरी सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी असलेल्या अशोक लेलँडने आज केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावरही आपला ठसा उमटवला आहे. बस आणि ट्रक निर्मितीमध्ये जगातील अव्वल कंपन्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या अशोक लेलँडने तिच्या प्रवासात अनेक ऐतिहासिक टप्पे पार केले आहेत.

    भारतात स्वातंत्र्यानंतरच्या काळात देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी विविध उद्योगांची स्थापना करण्यात आली. यामध्ये उद्योग, तंत्रज्ञान आणि परिवहन क्षेत्रात विशेष प्रगती झाली. याच महत्त्वाच्या विकासपर्वात “अशोक लेलँड”ने भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रात क्रांती घडवली. 1948 साली आजच्या दिवशी या कंपनीची स्थापना झाली होती. त्याचं अनुषंगाने आज या लेखात आपण अशोक लेलँडच्या आतापर्यंच्या प्रवासाचा आढावा घेऊ. 

    स्थापना आणि प्रारंभिक काळ

    7 सप्टेंबर 1948 रोजी, चेन्नई येथे रघुनंदन सरन यांनी अशोक मोटर्सची स्थापना केली. ‘अशोक’ हे नाव त्यांचा मुलगा अशोक सरन यांच्या नावावरून ठेवण्यात आले, सुरुवातीला या कंपनीत ऑस्टिन मोटर्सच्या गाड्यांचे उत्पादन केले जायचे. 

    1950 साली अशोक मोटरने ब्रिटिश लेलँड कंपनीशी करार केला, ज्यामुळे कंपनीचे नाव ‘अशोक लेलँड’ झाले. हा करार फक्त नावापुरता नव्हता, तर दोन्ही कंपन्यांच्या तंत्रज्ञानाचा संगम होता. ब्रिटिश तंत्रज्ञान आणि भारतीय बाजारपेठेची गरज यांचा समन्वय अशोक लेलँडने साधला आणि भारतीय व्यावसायिक वाहन क्षेत्रात नवा अध्याय सुरू झाला. 

    Ashok Leyland Logo history

    स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारताला वाहतूक व्यवस्थेची अत्यंत गरज होती, कारण देशाची अर्थव्यवस्था विकासाच्या टप्प्यावर होती आणि औद्योगिक क्रांतीच्या दिशेने वाटचाल करत होती. अशोक लेलँडने या गरजेची जाणीव ठेवून व्यावसायिक वाहतूक साधनांची निर्मिती सुरू केली. सुरुवातीला त्यांनी मालवाहतूक ट्रक्स आणि प्रवासी बस यांचे उत्पादन केले. यातील एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे कंपनीने 6-सिलेंडर इंजिनयुक्त ट्रकची निर्मिती करून भारतीय रस्त्यांवर विश्वासार्हता निर्माण केली. यामुळे अशोक लेलँडने स्वदेशी ऑटोमोबाइल क्षेत्रात आपली नवी ओळख निर्माण केली.

    उत्पादनातील नाविन्य आणि विकासाचा प्रवास

    1950 आणि 60 च्या दशकात अशोक लेलँडने आपल्या उत्पादनात नाविन्य आणण्यास सुरुवात केली. 1954 साली अशोक लेलँडने आपल्या एन्नोर प्लांटमध्ये पहिला ट्रक तयार केला. ‘कॉमेट 350’ नावाचा हा ट्रक, मंगळूरच्या एका टाइल फॅक्टरीला विकला गेला होता. या क्षणापासून भारतात व्यावसायिक ट्रक निर्मितीची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यावेळी भारतात फक्त परदेशी कंपन्यांचे ट्रक उपलब्ध होते, पण अशोक लेलँडने स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित ट्रक निर्माण करून भारतीय ग्राहकांना एक नवीन पर्याय दिला.

    अशोक लेलँड : भारतीय वाहतूक क्षेत्राचा कणा | The Ashok Leyland Story

    त्यानंतर भारत सरकारने अशोक लेलँडला दरवर्षी 1000 ट्रक तयार करण्याचा परवाना दिला आणि या उत्पादनाने भारतीय बाजारपेठेत कंपनीचे स्थान अधिकच मजबूत केले. कंपनीचे ट्रक केवळ भारतीय बाजारातच नव्हे, तर इतर काही देशांमध्येही निर्यात होऊ लागले. अशोक लेलँडच्या यशस्वी प्रवासात भारतीय सुरक्षादलांसाठी वाहनांची निर्मिती हे महत्त्वाचे योगदान होते. 1960 च्या दशकात BSF (सीमा सुरक्षा बल) आणि इतर सुरक्षा दलांसाठी वाहनं तयार करून कंपनीने देशाच्या संरक्षण यंत्रणेतील आपला वाटा उचलला.

    1960 च्या दशकात अशोक लेलँडने भारतीय बस क्षेत्रातही क्रांती घडवून आणली. 1967 साली कंपनीने पहिली ‘डबल डेकर बस‘ बाजारात आणली. यापूर्वी, डबल डेकर बस केवळ युरोप, आशिया आणि उत्तर अमेरिकेतील काही ठराविक शहरांमध्येच पाहायला मिळायच्या. भारतात ही संकल्पना नवीन होती, पण अशोक लेलँडने स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित ही बस तयार करून भारताच्या मोठ्या शहरांमध्ये चालू केली.

    3a1c1fad2f77622a8cbc369571778e8b

    मुंबई, चेन्नई आणि कोलकात्यासारख्या शहरांमध्ये डबल डेकर बसने लोकांची प्रवाशांच्या प्रवासाचे व्यवस्थापन सुलभ झाले. आजही या शहरांमध्ये डबल डेकर बसची सेवा दिसून येते. 

    तंत्रज्ञानात सुधारणा आणि आंतरराष्ट्रीय विस्तार

    1969 साली अशोक लेलँडने आपली आणखी एक महत्त्वाची कामगिरी केली. कंपनीने आपल्या ट्रक आणि बसमध्ये ‘पॉवर स्टीअरिंग‘ तंत्रज्ञानाचा वापर केला. त्या काळात हे तंत्रज्ञान खूपच आधुनिक आणि नवीन मानले जायचे. पॉवर स्टीअरिंगमुळे वाहन चालवणे खूप सोपे झाले, विशेषतः जड वाहने चालवताना ड्रायव्हर्सला अधिक आराम मिळाला. या तंत्रज्ञानामुळे अशोक लेलँडने भारतीय व्यावसायिक वाहन निर्मितीच्या तंत्रज्ञानात नवा मापदंड प्रस्थापित केला.

    1970 आणि 80 च्या दशकात अशोक लेलँडने तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या. 1980 च्या दशकात त्यांनी BS-II इंधन मानकांनुसार ट्रक्स तयार करण्यास सुरुवात केली. तंत्रज्ञानात सतत सुधारणा करण्याची कंपनीची भूमिकाही या काळात दिसून आली. याच काळात कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश केला आणि मध्य पूर्व, आफ्रिका, आशिया आदी देशांमध्ये आपल्या वाहनांची निर्यात सुरू केली.

    1980 साली कंपनीने आपला दुसरा प्लांट होसूर, तमिळनाडूमध्ये सुरू केला. या प्लांटमुळे मोठ्या प्रमाणात वाहने तयार करण्याची क्षमता वाढली. यामुळे कंपनीने मोठ्या आणि जड वाहनांच्या निर्मितीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. त्याचवेळी कंपनीने मल्टी-एक्सेल ट्रक आणि मोठ्या बस तयार करण्यास सुरुवात केली.

    ashok leyland new truck launch 3 1200x675 1

    कंपनीने तामिळनाडूमधील नामक्कल येथे देशातील पहिल्या व्यावसायिक वाहन ड्रायव्हर ट्रेनिंग सेंटरची स्थापना केली. यामुळे व्यावसायिक वाहन चालवणाऱ्या ड्रायव्हर्सना उत्तम प्रशिक्षण मिळाले आणि भारतीय बाजारपेठेत कंपनीची प्रतिष्ठा वाढली. 

    1990 च्या दशकात भारताच्या उदारीकरणाच्या धोरणामुळे देशातील ऑटोमोबाइल क्षेत्रात स्पर्धा वाढली. परंतु अशोक लेलँडने आपल्या उत्पादनांची गुणवत्ता आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन कायम ठेवला, ज्यामुळे स्पर्धेचा सामना करण्यास ते सक्षम झाले. याच काळात त्यांनी ‘स्टारलाइन’ बस सादर केली, जी भारतीय बस निर्मिती क्षेत्रातील एक मोठी क्रांती ठरली.

    2007 पासून हिंदुजा समूहाची मालकी 

    2007 मध्ये, हिंदुजा समूहाने अशोक लेलँडमधील इवेकोचा (इंडस्ट्रियल व्हेईकल्स कॉर्पोरेशन) अप्रत्यक्ष हिस्सा विकत घेतला, इवेको ही इटालियन कंपनी आहे जिची स्थापना 1975 मध्ये झाली होती. हिंदुजा समूहाने याच कंपनीचा हिस्सा विका घेतला. आणि त्यांचा हिस्सा  51% वर पोहोचला आणि आज अशोक लेलँड ही हिंदुजा समूहाची एक प्रमुख कंपनी बनली आहे.

    1558880826 2422

    भविष्यात अशोक लेलँड उत्तर प्रदेशात इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांचे उत्पादन करणारा एक प्लांट उभारणार आहे. या प्लांटची  उत्पादन क्षमता प्रत्येक वर्षी 2,500 वाहने एवढी असेल आणि पुढील दशकात ती 5,000 पर्यंत वाढवण्याची योजना आहे. या प्लांटमध्ये मुख्यतः इलेक्ट्रिक बस चे  उत्पादन होईल आणि ते 2025 मध्ये सुरू होईल

    आजची स्थिती आणि रोजगार निर्मिती

    आज कंपनी विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे, ज्यामध्ये ऑटोमोबाईल्स, व्यावसायिक वाहने, इंजिन, सेवा आणि वाहन वित्तपुरवठा यांचा समावेश आहे. २०२४ मध्ये कंपनीने ₹ ४५,९३१ कोटी (US$५.५ अब्ज) महसूल मिळवला. कंपनीच्या एकूण मालमत्तेची किंमत ₹ ६७,६६० कोटी (US$८.१ अब्ज) आहे. २०२० पर्यंत कंपनीत ११,४६३ कर्मचारी कार्यरत होते, आज हा आकडा वाढला आहे.

    अशोक लेलँड आज फक्त भारतापुरती मर्यादित नाही. आफ्रिका, युरोप, आशिया आणि मध्य-पूर्वेतही कंपनी आपली उत्पादने निर्यात करत आहे. या देशांमध्ये अशोक लेलँडच्या वाहनांना प्रचंड मागणी आहे. 

    01

    अशोक लेलँडचा प्रवास म्हणजे भारतीय औद्योगिक प्रगतीचे प्रतीक आहे. स्वातंत्र्यानंतर सुरू झालेली एक छोटीशी कंपनी आज जागतिक व्यावसायिक वाहन क्षेत्रात एक महत्त्वाचे नाव बनली आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीपासून ते उत्पादन क्षमतेपर्यंत अशोक लेलँडने भारतीय वाहन निर्मिती क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे. 

    आणखी वाचा :

  • दक्षिण भारतात देखील बोलली जाते मराठी. ‘दक्षिणी मराठी’ मागील मराठा साम्राजाचा गौरवशाली इतिहास

    दक्षिण भारतात देखील बोलली जाते मराठी. ‘दक्षिणी मराठी’ मागील मराठा साम्राजाचा गौरवशाली इतिहास

    पुढे मुघल आणि ब्रिटिशांचे झालेले आक्रमण यामुळे भाषेची लिपी बदलली तरीही प्रामुख्याने भारतीय भाषांचा पाया हा बऱ्यापैकी देवनागरी लिपीतच आढळतो. हिंदी जरी आपली राष्ट्रभाषा असली तरीही सर्व राज्य भाषा या-ना-त्या प्रकारे हिंदीसोबत जोडल्या गेल्या आहेत, तरीही दक्षिणी भाषा जसं की तामिळ, तेलगू, मल्याळम यांची लिपी देवनागरीपेक्षा वेगळी मात्र परस्परांशी संबंधित आढळते. आज आपण या विविध भाषांबद्दल नाही, तर केवळ आपल्या मराठी भाषेबद्दल बोलणार आहोत.

    जर का आम्ही तुम्हाला विचारलं मराठी भाषा कोणत्या राज्यात बोलली जाते? तर तुम्ही साहजिकपणे महाराष्ट्र असंच म्हणाल. बरोबर? किंवा अधिकाधिक त्यात शेजारील राज्य गोव्याचं नाव जोडलं जाईल. पण जर का आम्ही म्हणालो की महाराष्ट्र आणि गोव्याव्यतिरिक्त मराठी भाषा आणखी एका राज्यात देखील बोलली जाते तर? आणि आश्चर्याची बाब म्हणजे हे राज्य भारताच्या दक्षिणी भागात वसलेलं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीत मराठी साम्राज्याने विस्तार करायला सुरुवात केली होती, पुढे छत्रपती संभाजीराजे, ताराराणी आणि पेशव्यांच्या कारकिर्दीत मराठी साम्राज्य बहरलं, खुललं आणि वाढलं. इतिहासकार असंही सांगतात की नानासाहेब पेशवे राज्य सांभाळत असताना रघुनाथराव पेशव्यांनी थेट अटकेपार मराठी पताका फडकावली होती.

    Maratha palace Tanjore
    तंजावर मराठा पॅलेस

    मराठी भाषा दक्षिणेत कशी?

    दक्षिणेतील प्रसिद्ध राज्य म्हणजेच तामिळनाडूमध्ये तंजावर नावाच्या शहरात आजही लोकं मराठी बोलताना आढळतात. तुम्ही जर का या भाषिकांशी संवाद साधला तर लक्ष्यात येईल की या तंजावरच्या मराठी भाषेचे उच्चार हे तामिळ भाषेशी जुळणारे आहेत. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झालाच असेल की दक्षिण भागात मराठीचा उगम झाला तरी कुठून? तर इ.स. १६४० च्या आसपास छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे महाराष्ट्रातून कर्नाटकातील बेंगळुरू येथे स्थायिक झाले. ते इ.स. १६६४ मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत तेथेच राहिले. त्यांच्या आगमनामुळे तुंगभद्रेच्या दक्षिणेकडील कन्नड आणि तमिळ भाषिक प्रदेशात मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा प्रसार होऊ लागला. अनेक मराठी घराणी कर्नाटकात स्थायिक झाली आणि तेथील समाजात मिसळली. त्यामुळे या प्रदेशात मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा प्रभाव वाढू लागला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे सावत्र बंधू म्हणजेच व्यंकोजी राजे भोसले यांनी दक्षिणेत मराठी राज्याचा विस्तार केला. कर्नाटक राज्यापासून सुरु झालेली ही मोहीम दक्षिणेत चांगलीच रंगली. वर्ष १६७४ मध्ये व्यंकोजी राजे भोसले यांनी तंजावरचा राजा अळगिरी नायक याचा पराभव करून दक्षिणेत मराठी राज्याचा झेंडा रोवला.

    WhatsApp Image 2024 07 20 at 4.08.55 PM

    तामिळनाडूमध्ये व्यंकोजी राजांचं राज्य सुरु झाल्यानंतर मराठी लोकांना महाराष्ट्राच्या भूमीमधून दक्षिणेत आणून वसवण्यात आलं, यामागचा केवळ उद्देश मराठीचा विस्तार असाच होता. व्यंकोजीराजांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र शहाजीराजे यांनी तब्बल अठ्ठावीस वर्षे राज्यकारभार सांभाळला आणि दक्षिणेत दबदबा निर्माण केला. असं म्हणतात दक्षिणेत मराठ्यांनी वर्ष १८५५ पर्यंत राज्य केलं आणि या संपूर्ण कार्यकाळात दक्षिण भारतात १२ विविध राजांनी कारभाराची धुरा सांभाळली होती. इतिहासातून मिळालेली माहिती असेही दर्शवते की या कैक दशकांच्या कालावधीत इथं अठरा पगड जातींमधली पाच लाख कुटुंबं वसवण्यात आली होती, या कुटुंबांच्या मराठी भाषेवर आजूबाजूच्या वातावरणाचा आणि दक्षिणी बोलीभाषेचा प्रभाव पडल्याने तंजावर मराठी भाषा उदयास आली.

    काही वर्षानंतर या कुटुंबांनी शिक्षण, काम आणि व्यवसायानिमित्त आजूबाजूच्या ठिकाणी ये जा सुरु केली आणि इतर भाषांचा देखील तंजावरच्या मराठीवर प्रभाव दिसून येऊ लागला. दक्षिणेतील मराठी राज्य जरी वर्ष १८५५ मध्ये संपलं असलं तरी आजही येथे मराठी संस्कृती जपली आणि जगली जाते. महाराष्ट्रातील खास सण जसे की गुढीपाडवा, गणेश चतुर्थी, संक्रांत असे विविध सण-उत्सव आजच्या घडीला देखील तंजावरमध्ये साजरे केलेले दिसतात. कदाचित हे वाचून तुम्ही आश्चर्याने थक्क व्हाल, पण तंजावरच्या या भागात स्थानिकांकडून अंबाबाईचा गोंधळ घातला जातो. यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की तंजावरच्या या भागात आजही मराठी भाषाच नाही, तर मराठी संस्कृती आणि मराठीचा संपन्न वारसा देखील जपला जातोय.

    दक्षिण भारतात पसरलेल्या मराठी भाषिकांनी आपल्या बोलीचे वेगळेपण आणि समृद्धी जपण्यासाठी आणि महाराष्ट्रासह इतरत्र राहणाऱ्या मराठी भाषिकांमध्ये त्याची ओळख करून देण्यासाठी दक्षिणी मराठी नावाचे नवीन YouTube चॅनेल सुरू केले आहे. हे चॅनेल दक्षिणी मराठी बोलीचे वैशिष्ट्ये, त्यातील शब्दसंग्रह, व्याकरण आणि संस्कृती यांच्यावर प्रकाश टाकण्यासाठी समर्पित आहे.

    असं म्हणतात आपल्याकडे अवघ्या काही किलोमीटर्सवर भाषा बदलत जाते आणि म्हणूनच उत्तर, दक्षिण आणि मध्य महाराष्ट्राच्या मराठी भाषेत बऱ्यापैकी तफावत दिसून येते. इथे बोलले जाणारे शब्द आणि आणि त्यांचे उच्चर यांमध्ये विविधता आढळते. महाराष्ट्रात बोलली जाणारी मराठी आणि कोकणपट्टी तसेच गोव्यात बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेवर कोकणी आणि मालवणी भाषेचा प्रभाव दिसून येतो. ही विविधता आपली ओळख आहे, मात्र तरीही आपण बोलत असलेलीच भाषा शुद्ध हे इतरांच्या मनावर बिंबवणायचा आपला प्रयत्न काही सुटत नाहीये.

    कळत-नकळतपणे आपण गावातील मराठी भाषिकांना अशुद्ध उच्चार करणारी लोकं म्हणून हिणवतो, त्यांची भाषा सुधारण्याचा प्रयत्न करतो. पुस्तकी भाषा आणि बोलीभाषा यांमधील फरकच आपल्याला समजून घ्यायचा नाही, कार्यालयीन किंवा पुस्तकी भाषा ही बऱ्यापैकी व्याकरणावर अवलंबून असते, मात्र बोलीभाषेला खरोखर अशी बंधनं असतात का? कदाचित ती भाषा ज्या चौकटीत जन्माला येते आणि वावरते त्याच वातावरणाचे संस्कार झाल्यामुळे शब्दोच्चार बदलत असावेत. आपल्या घराघरांमध्ये बोलली जाणारी ही आपली बोलीभाषा आहे आणि त्याला व्याकरणाचं बंधन लावलं जाऊ शकत नाही म्हणूनच आपल्यासारख्या सुशिक्षित माणसांना ही जाणीव असली पाहिजे की कोणतीही भाषा शुद्ध किंवा अशुद्ध नसते. भाषेचा गोडवा हा ती भाषा जपण्यात आणि जगण्यात आहे. महाराष्ट्र राज्यापासून कैक दूर असलेल्या तंजावरकडून हीच गोष्ट शिकण्यासारखी आहे. तंजावरमध्ये मराठी साम्राज्य नसताना आजही जपला जाणारा हाच भाषेचा गोडवा मराठी माणसाचे मराठी भाषेप्रती प्रेम म्हणावे लागेल.

    तंजावरची विशेषता

    तंजावरच्या मध्यभागी शिवगंगा दुर्ग पाहायला मिळतो आणि त्याच्या मध्यभागी चोल राज्यकर्त्यांनी बांधलेलं बृहदेश्वर मंदिर स्थित आहे. इतिहासकार असेही सांगतात की या बृहदेश्वर मंदिराच्या उभारणीत मराठ्यांचे महत्वाचे योगदान राहिले आहे. कदाचित म्हणूनच आवारात असलेल्या गणपती मंदिरामध्ये शहाजीराजे, शिवाजीराजे, व्यंकोजीराजे आणि इतर मराठी शूर राजांच्या आयुष्यातील महत्वाचे क्षण आणि तारखा यांचा ठासून उल्लेख करणारा शिलालेख आढळतो.

    आणखी वाचा:

  • स्टार्टअप वाढीचे टप्पे…

    स्टार्टअप वाढीचे टप्पे…

    पहिला टप्पा : स्टार्टअप! (शून्य – ५० हजार डॉलर्स)

    जगभरात दरवर्षी सुमारे १० कोटी नवीन व्यवसाय सुरु होतात. दुर्दैवाने त्यातील ८० टक्के व्यवसाय ३ वर्षांपेक्षा जास्त काळ टिकत नाहीत.

    दुसरा टप्पा : लघुउद्योग (५० हजार ते ३ लाख डॉलर्स)

    तुम्ही व्यवसाय सुरु केला आणि तो चांगला चालू लागला, तुम्हाला ग्राहक मिळू लागले, नवी उत्पादने तुम्ही बाजारात आणू लागलात. हा तुमचा संघर्षाचा काळ असतो. काहीजण आपला व्यवसाय स्वतःपुरता मर्यादित करून घेतात., तर काहीजण यातून पुढे जाऊन स्वतःची एक टीम बनवतात.

    तिसरा टप्पा :  यशस्वी व्यवसाय (३ लाख – २० लाख डॉलर्स)

    आजवरचा तुमचा संघर्ष, तुमची मेहनत फळाला आली. आता तुमचा व्यवसाय एका शाश्वत गतीने चालू लागला आहे. आता तुम्ही तुमचे लक्ष तुमची टीम वाढवण्यावर द्यायला हवे. स्वतःसाठी पुरेसा वेळ द्यायला हवा. तुमचा व्यवसाय आता तुमच्याशिवाय चालू लागला आहे. हे तुमच्या मेहनतीचे फळ आहे. आता आराम करायचा, फिरायचं, मौजमजा करायची, की आपला व्यवसाय पुढच्या टप्प्यावर न्यायचा?

    जगातील पंधरा कोटी व्यवसायांपैकी ४ टक्क्यांहून कमी व्यवसाय ५ कोटी रुपयांपर्यंत आपला महसूल वाढवतात, तसेच ४ टक्क्यांहून कमी व्यवसाय १० वर्षांपेक्षा जास्त काळ टिकतात. 

    चौथा टप्पा : लघु व मध्यम उद्योग (२० लाख – १ कोटी डॉलर्स)

    तुम्ही जसजसा व्यवसायाचा पसारा वाढवत जाता, नवनवीन आव्हाने तुमच्यासमोर उभी राहतात. या टप्प्यावर व्यवसायाचे नियोजन, व्यवस्था, बुद्धिमत्ता आणि प्रशिक्षण या गोष्टींसाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज भासते आणि तुम्ही पुन्हा एकदा संघर्षमय अशा दुसऱ्या टप्प्यात जाता.

    पाचवा टप्पा : मध्यम आणि मोठे उद्योग (१ कोटी – ५ कोटी डॉलर्स)

    आता तुमचा व्यवसाय एवढा मोठा झालेला आहे, की तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रावर आणि जगावर प्रभाव पाडत आहात. तुमच्या व्यवसायाची एक वेगळी ओळख जगभर निर्माण झालेली आहे.

    ‘जुगार आणि विचार करून घेतलेली जोखीम यात फरक असतो.’ – एडमंड एच. नॉर्थ

    हजारातील एक-दोन व्यवसाय ५ कोटी डॉलर्सचा टप्पा पार करून पुढे जातात. पण आजच्या जमान्यात तुम्ही भविष्यातील योग्य संधी ओळखल्या आणि नियोजनबद्ध पद्धतीने त्यावर काम केले, तर तुम्ही पूर्वी कधी नव्हे त्यापेक्षा जास्त वेगाने बाजारपेठ काबीज करू शकता. त्यामुळे आपले कामाची दिशा ठरवा, ध्येय निश्चिती करा आणि प्रवासाचा आनंद घ्या!!! आणि जर तुमचा व्यवसाय अयशस्वी ठरला तर? काळजी करू नका, पुन्हा सुरुवात करा…

  • उद्योजक म्हणून यशस्वी होण्यासाठी

    उद्योजक म्हणून यशस्वी होण्यासाठी

    उद्योजक म्हणून यशस्वी होण्यासाठी खालील १० गोष्टी लक्षात ठेवा.

    १. आर्थिक सुरक्षिततेची योजना तयार करा.

    २. पुढे कोणती पावले उचलायची आहेत याची माहिती मिळवा.

    ३. अशी बिझनेस आयडिया शोधून काढा जी यशस्वी होईल.

    ४. चांगल्या मार्गदर्शक किंवा सल्लागाराची मदत घ्या

    ५. यशस्वी होण्यासाठी ध्येयधोरणे आखा.

    ६. आत्मविश्वास वाढवा.

    ७. चांगले सहकारी तयार करा.

    ८. भविष्यातील ध्येय स्पष्ट असू द्या.

    ९. मोठी स्वप्नं बघा.

    १०. संपूर्ण प्रवासाची ब्लूप्रिंट (आराखडा) बनवा.

    या सर्व गोष्टींची गरज तुम्हाला सुरुवातीलाच पडणार नाही, पण उद्योजकतेचा प्रवास जसजसा पुढे सरकेल, यातील प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देणे तुम्हाला गरजेचे आहे.

    तथापि हा प्रवास तितकासा सोपा असणार नाही. तुम्हाला एकटं वाटू शकतं. तुम्ही रात्रंदिवस मेहनत करून छोट्या छोट्या गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न करत असता, पण वारंवार येणाऱ्या अपयशामुळे मध्येच सोडून देण्याचा विचार तुमच्या मनात येऊ शकतो.

    Tips for Successful Entrepreneurship

    बरेच उद्योजक व्यवसायाच्या सुरुवातीलाच जोखीम घेतात. थोडेफार यशस्वी होतात, परंतु त्यानंतर व्यवसाय विकासासाठी जोखीम घेणं थांबवतात. नवीन संधींचा शोध घेत नाहीत. फक्त आहे तो व्यवसाय टिकवण्यावर भर देतात. कल्पना करा तुम्ही एखाद्या डोंगरावर गिर्यारोहणासाठी जात आहात. सुरुवातीला तुम्ही खूप आनंदात असता. आपण काहीतरी नवीन करतोय याची वेगळीच मजा आणि उत्सुकता तुमच्या मनात असते, पण चढण जशी अधिक कठीण होत जाते, तुम्ही चालताना मध्येच अडखळू लागता (बहुतांशी लोकांच्या बाबतीत हेच होतं). तुम्हाला पुढे जायचं असतं, पण जाता येत नाही आणि एवढ्या लांब जाऊन रिकाम्या हाताने परत आला म्हणून लोकं नावं ठेवतील या भीतीने माघारी जाऊ शकत नाही, अशा द्विधा मनस्थितीत तुम्ही अडकलेले असता.  

    या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आणि तुमच्या मदतीसाठी आणि तुम्हाला नवीन संधीचं दार उघडून देण्यासाठी एखादा चांगला मार्गदर्शक/प्रशिक्षक उपयुक्त ठरू शकतो.