प्रत्येक व्यक्तीची काही स्वप्नं असतात. ती आज ना उद्या पूर्ण करायची त्यांची इच्छाही असते. स्वत:साठी, कुटुंबासाठी बचत करून त्या बचतीचा पुढे भविष्यात योग्य वापर त्यांनाही करायचा असतो आणि इथेच गुंतवणूक ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची ठरते.
गुंतवणूक ही आर्थिक साक्षरतेमधील अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. गुंतवणूक म्हणजेच कोणत्याही संसाधनाच्या किंवा मालमत्तेच्या वाढीसाठी वापरलेली नियोजनबद्ध पद्धत होय. गुंतवणूक ही आर्थिक विकासासाठी महत्त्वाची असते, कारण ती अर्थव्यवस्थेच्या सकारात्मक वाढीसाठी तसेच भविष्यातील विविध गरजांसाठी निधी तयार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, गुंतवणुकीचा अर्थ एखाद्या गोष्टीत थोडा वेळ किंवा पैसा घालणे आणि कालांतराने मोठी रक्कम परत मिळवणे होय.
गुंतवणुकीचे चार मुख्य प्रकार आहेत जे गुंतवणूकदाराच्या गरजा किंवा उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी विभागण्यात आले आहेत ते प्रकार खालीलप्रमाणे :
वाढ गुंतवणूक
बचावात्मक गुंतवणूक
रोख गुंतवणूक
निश्चित व्याज गुंतवणूक
१. वाढ गुंतवणूक
वाढ गुंतवणूक ही गुंतवणुकीची अशी पद्धत आहे ज्यामध्ये वाढीच्या संभाव्यतेवर लक्ष केंद्रित करून गुंतवणूकदाराची संपत्ती किंवा भांडवल वाढविले जाते.
२. बचावात्मक गुंतवणूक
बचावात्मक गुंतवणूक ही एक अशी रणनीती आहे, जिथे तुम्ही शक्य तितकी कमी जोखीम घेता आणि अशी गुंतवणूक उत्पादनं निवडता. ज्यांचा मागील काही वर्षांचा परतावा चांगला आहे किंवा त्यात सातत्य दिसून येत आहे. सामान्यतः, यामध्ये बलाढ्य कंपन्यांचे स्टॉक यात समाविष्ट असतात, जे प्रत्येक वर्षी निश्चित लाभांश देतात.
३. रोख गुंतवणूक
रोख गुंतवणूक म्हणजे अल्प-मुदतीची साधने किंवा बचत खात्यांमध्ये साधारणपणे ९० दिवस किंवा त्यापेक्षा कमी कालावधीची गुंतवणूक ज्यामध्ये सामान्यतः कमी व्याजदर असतो किंवा गुंतवणुकीच्या दुसऱ्या पद्धतीच्या तुलनेत तुलनेने कमी जोखीम दरासह परतावा असतो.
४. निश्चित व्याज गुंतवणूक :
ज्या गुंतवणूक पद्धतीमध्ये निश्चित व्याज परताव्याची हमी असते ती गुंतवणूक पद्धती निश्चित व्याज गुंतवणूक म्हणून ओळखली जाते. विशिष्ट निश्चित उत्पन्नाच्या आधारे गुंतवणूकदाराला व्याज म्हणून परतावा दिला जातो.
११) सरकारने किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी बाजारात विक्रीसाठी आणलेले कर्जरोखे
गुंतवणूकीचे काही प्रमुख फायदे पुढीलप्रमाणे आहेत :
1. भविष्याची सुरक्षितता :
गुंतवणूक केल्यामुळे भविष्यासाठी आर्थिक सुरक्षितता मिळते. वयाच्या वाढीसोबत किंवा निवृत्तीच्या वेळी एक नियमित उत्पन्न स्रोत यामुळे निर्माण होतो.
2. आर्थिक स्वातंत्र्य :
गुंतवणूक केल्यामुळे संबंधित व्यक्तीला आणि तिच्या कुटुंबियांना आर्थिक स्वातंत्र्य मिळते. गरजेप्रमाणे पैसे वापरण्याची मुभा मिळते आणि इतरांवर अवलंबून राहावे लागत नाही.
3. महागाईशी लढा :
महागाई वाढत असताना, गुंतवणूक केलेले पैसे जास्त परतावा देऊन महागाईशी सामना करण्यासाठी मदत करतात.
4. कर बचत :
काही गुंतवणूक साधने कर सवलत देतात, ज्यामुळे आपण आपल्या उत्पन्नावरील कर कमी करू शकतो.
5. धनवृद्धी :
गुंतवणूक केल्यामुळे आपल्याला पैसे अधिक वाढवता येतात, ज्यामुळे आपल्याला भविष्यात मोठ्या योजना आखता येतात.
6. आपत्कालीन परिस्थितीत मदत :
गुंतवणूक केल्याने त्या निधीचा वापर आपण आपत्कालीन परिस्थितीत करू शकतो, ज्यामुळे आपल्याला अनपेक्षित संकटांचा सामना करण्यात सोपे जाते.
गुंतवणूक ही दीर्घकालीन दृष्टीकोनातून केल्यास अधिक फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या उत्पन्नाच्या रकमेतील काही प्रमाणात रक्कम चांगला परतावा देणाऱ्या गोष्टींमध्ये गुंतवली पाहिजे.
तुमचे उत्पन्न किती आहे यापेक्षा अधिक मिळवलेल्या पैशाचा विनियोग तुम्ही कसा करावा, योग्य आर्थिक नियोजन करून विविध ध्येय कशी साध्य करावी, तुमच्यावर असलेल्या कर्जाचे, तुम्ही काढलेल्या विम्याचे व्यवस्थापन कसे करावे, सुयोग्य गुंतवणूक करून तुमच्या बचतीच्या पैशाला कसे कामाला लावावे, ही आर्थिक साक्षरता आत्ताच्या काळासाठी नितांत गरजेची आहे.
भविष्यात अधिकचा नफा मिळविण्याच्या उद्देशाने वर्तमानात केलेले पैशांचे सुयोग्य व्यवस्थापन म्हणजे गुंतवणूक म्हणता येईल.
जेव्हा एखादी वस्तू किंवा मालमत्ता कमी किमतीत खरेदी करून ठराविक कालावधीनंतर जास्त किमतीला विकून त्यावर मिळणारा भांडवली नफा हा त्या गुंतवणुकीचा सर्वात महत्त्वाचा फायदा होय.
अल्पकालीन गुंतवणूक आणि दीर्घकालीन गुंतवणूक अशा दोन प्रकारात आपल्याला गुंतवणूक करता येते.
गुंतवणूक ही आपले आर्थिक भवितव्य अधिक आणि लवकर सुरक्षित करण्याचा सर्वांत प्रभावी मार्ग असूनही अनेकजण गुंतवणूक उशिरा सुरु करतात. पहिल्यांदाच नोकरीला लागलेले तरुण भविष्याचे नियोजन करण्याऐवजी आधी आपल्या जीवनशैलीत सुधारणा करताना जास्त आढळून येतात. गुंतवणूक सुरु करण्यास खरंतर उशीर कधीच होत नसतो, पण तरीसुद्धा लवकर गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे असतात. याशिवाय आयुष्यात लवकर गुंतवणूक केल्याने तरुण गुंतवणूकदारांना जास्त बचत करता येते, कारण त्यांच्या Professional Life च्या सुरुवातीला त्यांच्याकडे खूप कमी जबाबदाऱ्या असतात.
आपल्या संस्कृतीमध्ये असं म्हणतात की माणसाने जर १ रुपया कमावला तर त्यातले २५ पैसे खर्च करावेत, २५ पैसे दान करावेत, २५ पैसे मुलांसाठी आणि उरलेले २५ पैसे गुंतवणूक करण्यासाठी वापरावेत. म्हणजेच थोडक्यात आपल्या कमाईचा २५% हिस्सा आपण गुंतवणुकीसाठी वापरायला हवा. गुंतवणूक म्हणजे आपल्या भविष्यकाळाची तरतूद असते. बहुतांश लोक लवकर गुंतवणूक करत नाहीत, कारण आयुष्यात लवकर गुंतवणूक करण्याचे महत्त्व त्यांना ठाऊक नसते ; परंतु लवकर गुंतवणूक करणे नेहमीच आपल्या हिताचे ठरते.
लवकर म्हणजे नक्की कधी?
वॉरन बफे म्हणतात की ‘मी वयाच्या ११ व्या वर्षापासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. मी तोपर्यंत माझे आयुष्य वाया घालवत होतो.’
आपण आपल्या पहिल्या पगारापासून आपली गुंतवणूक सुरू करावी याचा अर्थ कमाई सुरू झाल्यावर साधारणतः २२ ते २५ वयोगटाच्या आसपास आपण गुंतवणूक सुरु करायला हरकत नाही.
तरुण वयात चांगली कमाई होत असताना योग्य बचत न करता खर्चाची सवय लागल्यास पुढील आयुष्यातील आर्थिक जबाबदाऱ्या निभावणे कठीण होते. त्यापेक्षा शुभस्य शीघ्रम् ! आता गुंतवणूक सुरु करा. आपल्याकडे अजूनही वेळ आहे. त्या वेळेचा कसा वापर करायचा हे आपल्या हातात आहे. लवकर गुंतवणूक केल्यास तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. जर आपण लवकर प्रारंभ केला नसेल तर त्याचे दुःख करत बसण्यापेक्षा आता गुंतवणूक सुरू करा.
म्हातारपणातही ज्यांच्याकडे पैसा आहे, ते तरुण राहतात. याउलट, आर्थिकदृष्ट्या कमकुवत व्यक्ती मात्र तरुणपणातच वृद्ध होतात.
थोडक्यात काय तर जेव्हा आपण कमवायला सुरुवात करू तेव्हा आपल्या उत्पन्नाचा काही भाग हा आपल्याला झेपेल त्या प्रकारात आपण गुंतवलाच पाहिजे, ज्या गुंतवणूक प्रकाराचा आपल्याला भविष्यात लाभ होईल.
लवकर गुंतवणूक सुरू करण्याचे विविध फायदे :
1. संपत्ती :
लवकर गुंतवणूक केल्याने तुम्हाला तुमच्या संपत्तीला वेळ देऊन ती वाढवता येते. त्यामुळे तुम्ही भविष्यात मोठ्या रकमेचा स्वतःसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी फायदा मिळवू शकता. भविष्यातील ध्येयनिश्चिती करू शकता. काय योग्य ? काय अयोग्य? हे ओळखून कुठं गुंतवणूक करायची ? कशी आणि किती करायची हे आर्थिक शहाणपण कमी जबाबदारी असलेल्या वयातच येतं.
2. कम्पाउंड इंटरेस्ट :
गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम तुमच्या मूळ गुंतवणुकीच्या व्याजावर व्याज म्हणून वाढते, ज्यामुळे तुम्हाला त्याचा अधिक फायदा होतो.
3. सहनशीलता :
लवकर गुंतवणूक केल्यामुळे तुम्हाला बाजारातील उतार-चढावांशी सामना करण्यासाठी अधिक वेळ मिळतो आणि तुम्ही अधिक शांतपणे गुंतवणूक करु शकता. संयम ठेवायला शिकता येतं. एक गुंतवणूकदार म्हणून आपली Risk Taking Capacity वाढते. त्या तणावाचं योग्य व्यवस्थापन देखील आपल्याला करता येतं.
4. आर्थिक स्वातंत्र्य :
जेव्हा तुम्ही तुमच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी गुंतवणूक, बचत, आणि इतर आर्थिक योजना आखता, आर्थिक ध्येयनिश्चिती करता, तेव्हा अप्रत्यक्षपणे तुम्ही तुमच्या जीवनात भविष्यातील आर्थिक संकटांची चिंता कमी करत असता.
सुरुवातीला कमी गुंतवणूक केल्याने तुम्ही भविष्यात आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकता आणि तुमची दिर्घकालीन उद्दिष्टे साध्य करू शकता.
5. सातत्यपूर्ण बचत :
लवकर गुंतवणूक सुरू केल्याने तुम्हाला आर्थिक नियोजनाची आणि बचतीची सवय लागते. आपल्या उत्पन्नाच्या काही रकमेची आपल्याला बचत करायचीच आहे ही सवय लागून जाते.
यामुळे लवकर गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत, जे तुम्हाला भविष्यात मोठ्या लाभाची, मोठ्या परताव्याची संधी देतात.
खेळण्याच्या वयात कोकच्या ६ बाटल्यांचा संच विकून ५ सेंट्सचा स्वकष्टाने नफा मिळवणाऱ्या वॉरन बफे यांनी पुढे गुंतवणूक क्षेत्राद्वारे अफाट संपत्ती कमावली. तुम्ही म्हणाल, प्रचंड संपत्ती तर जगातील अनेक लोकांनी कमावली आहे. मग बफेंनी यात जगावेगळं असं केलं तरी काय?
कुठलाही कायदा न मोडता, करचुकवेगिरी न करता, नैतिकतेच्या मार्गाने यशाचं शिखर सर करणाऱ्या फार कमी व्यक्ती असतात. त्यांपैकी एक व्यक्ती असणं आणि त्याच्याही पुढे जाऊन, मिळवलेल्या संपत्तीपैकी ९० टक्के संपत्ती फारसा गाजावाजा न करता समाजाला परत देणं, हेच बफेंच्या यशाचं वेगळेपण आहे.
‘समभागधारक हेच कंपनीचे मालक’ अशी सर्वस्वी वेगळी समीकरणं प्रमाण मानून, यशाच्या वाटेवरून एकटं चालत न जाता आपल्या सहकारी आणि कर्मचाऱ्यांनाही यशाचं क्षितिज दाखवणाऱ्या बफेंकडून आपल्याला शिकण्यासारख्या असंख्य बाबी आहेत.
जगभरात गुंतवणूक गुरू म्हणून प्रसिद्ध असलेले वॉरन बफे यांचा आज जन्मदिवस. जगातील कोट्यवधी लोक शेअर बाजारातून पैसे कमविण्यासाठी त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा अवलंब करतात. गुंतवणुकीबाबत त्यांनी केलेले मार्गदर्शन आजही अतिशय प्रभावी ठरते. वॉरन बफे हे शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांपैकी एक मोठे नाव आहे. त्यांच्या गुंतवणुकीचा जगभरातील शेअर बाजारावर परिणाम होतो. जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत ते आजही सातव्या स्थानावर आहेत.
बफे यांना आपल्या युवा अवस्थेतच Business आणि Investing विषयी आवड निर्माण झाली आणि त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षापासूनच गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. कोलंबिया बिजनेस स्कूलमधून ते पदवीधर झाले जिथे ते बेंझामिन ग्रॅहम यांच्याकडून गुंतवणुकीचे तत्त्वज्ञान आणि व्हॅल्यू इन्वेस्टिंगच्या कन्सेप्टविषयी बरेच काही शिकले. ओरॅकल ऑफ ओमाहा म्हणून ओळखले जाणारे वॉरन बफे आत्तापर्यंतच्या सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक समजले जातात.
वॉरन बफे यांचे 5 गुंतवणूक मंत्र :
1. गुंतवणुकीकडे दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा :
शेअर्स विकत घेतल्यानंतर एका दिवसात किंवा फार कमी वेळात विकण्यापेक्षा चांगल्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करून त्यामध्ये तुमची गुंतवणूक दीर्घकाळ टिकवून ठेवणे चांगले. शेअर मार्केटमधील दीर्घकालीन गुंतवणूक शेवटी जास्त परतावा देते, परंतु त्यासाठी तुम्ही योग्य शेअर्समध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
2. रातोरात श्रीमंत होण्याचा विचार करू नका :
बाजारात लवकरात लवकर श्रीमंत होण्याची हाव तुम्हाला चुकीच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. चांगला Portfolio तयार करणे ही एक मोठी प्रक्रिया आहे. यासाठी खूप संयम लागतो. बाजारातून चांगल्या परताव्यासाठी तुम्ही अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी ज्यांचे Business Model तसेच त्यांचे व्यवस्थापन चांगले आहे.
3. ध्येय ठेवून गुंतवणूक करा :
ध्येयाशिवाय केलेली गुंतवणूक अनेकदा फायदेशीर नसते. तुम्ही तुमच्या कष्टाने कमावलेला पैसा हुशारीने गुंतवा. त्या गुंतवणुकीत पैसा कसा वाढणार आहे हे समजत नसेल, तर त्यापासून दूर राहणेच बरे.
4. वैविध्य समजून घ्या :
‘जवळची सर्व अंडी एका टोपलीत ठेवू नये’ हे सूत्र गुंतवणुकीलाही लागू केले पाहिजे. तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी असलेली रक्कम वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वितरित करावी. संपूर्ण पैसा एकाच ठिकाणी गुंतवू नका, सर्वांमध्ये समतोल ठेवा.
5. रास्त भावाने करा शेअर्सची खरेदी :
एखादी कंपनी उत्तम दर्जाची उत्पादने बनवत आहे किंवा ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देत आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही त्यात गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. वॉरन बफे असे सांगतात, एखाद्या मोठ्या कंपनीचे शेअर्स मोठ्या किंमतीला खरेदी करण्यापेक्षा चांगल्या कंपनीचे शेअर्स वाजवी किंमतीला विकत घेणे कधीही चांगले.
वॉरन बफे यांचा हा प्रसिद्ध विचार प्रत्येक गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीने कायम लक्षात ठेवला पाहिजे.
“खर्च केल्यानंतर जे वाचते, त्याची बचत करु नये,
तर बचत केल्यानंतर जे राहते, त्यातून खर्च केला पाहिजे.”
बँकेमध्ये खाते उघडल्यानंतर बँक आपल्याला बँक अकाउंट, ए टी एम सुविधा , मुदत ठेव योजना, लाॅकर सेवा, कर्ज, इ. सेवा-सुविधा देते.
चेक (धनादेश) ही सुविधादेखील त्यापैकी एक. बँकेने निर्धारित केलेली रक्कम तुमच्या खात्यावर असल्यास बँक तुम्हाला चेकबुक सुविधा देते. वैयक्तिक व्यवहार,कंपनीचे व्यवहार हे चेकद्वारे सोप्या आणि सहज पद्धतीने होतात. चेकद्वारे केलेला व्यवहार हा सुरक्षित असतो.
चेकचे दोन प्रकार असतात.
बेअरर चेक
क्रॉस चेक
बेअरर चेक – बेअरर चेकद्वारे आपण निर्धारित केलेली रक्कम संबंधित बँकेतून काढू शकतो. उदारणार्थ, तुम्हाला अक्षयने ५,000/- रुपयांचा एखाद्या बँकेचा बेअरर चेक दिला. तर तुम्ही ती रक्कम त्या बँकेच्या शाखेत जाऊन काढू शकता.
क्रॉस चेक – क्रॉस चेक हा आपल्या बँक अकाउंटवर जमा करून निर्धारित रक्कम आपण मिळवू शकतो. उदारणार्थ, तुमचे नाव सागर गोते या नावाने कंपनीने तुम्हाला क्रॉस चेक दिला, तर तो चेक तुमच्या बँक अकाउंटवर जमा करावा लागतो, त्यानंतर २ ते ३ दिवसात चेकवरील रक्कम तुमच्या बँक अकाउंटवर जमा होते.
चेक बाउंस म्हणजे काय?
चेक बाउंस झाला म्हणजे नेमके काय ? सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, एखाद्या व्यक्तीने तुम्हाला ५,000/- रुपयांचा चेक दिला आणि ती रक्कम तुमच्या बँक खात्यावर जमा झाली नाही. म्हणजे तो चेक बाउंस झाला असे समजावे. चेक बाउंस होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. कधी कधी बँक अकाउंटवर रक्कम नसली, तरी खातेदार चेक देऊन फसवतात. अशावेळी तुम्ही न्यायालयात जाऊ शकता. तुम्हाला दिलेला चेक बाउंस झाला, तर तुम्ही कलम १३८,निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कायदा, १८८१ द्वारे तुम्ही न्यायालयीन कारवाई करू शकता.
चेक बाउंसची कारणे?
बँक खात्यामध्ये निर्धारित रक्कम नसणे – चेकवर लिहिलेली रक्कम संबधित बँक अकाउंटवर नसल्यास चेक बाउंस होतो. उदाहरणार्थ, अक्षयने संग्रामला ५,000/- रुपयांचा चेक दिला. परंतू अक्षयच्या बँक अकाउंटवर फक्त ४800/- रुपयेच आहेत. चेकवर लिहिलेली रक्कम अक्षयच्या बँक अकाउंटवर नसल्यामुळे संग्रामला दिलेला चेक हा बाउंस होतो.
सहीमधील फरक – चेकवरील सही तपासून बँकेकडून संबंधित व्यक्तीला चेकची रक्कम दिली जाते. खातेदाराच्या चेकवरील सहीमध्ये फरक असेल किंवा चुकीची सही असेल, तर चेक बँकेकडून बाउंस होतो.
चेकवरील ओव्हर रायटिंग – चेकवर ओव्हर रायटिंग किंवा खाडाखोड केली आणि त्या ठिकाणी सही नसली, तर चेक बाउंस होतो.
चेक बाउंस झाल्यावर काय करावे?
चेक बाउंस झाल्यावर पहिल्यांदा ज्या व्यक्तीने आपल्याला चेक दिला आहे, त्या व्यक्तीशी संपर्क साधावा. त्या व्यक्तीला त्यासंदर्भात कल्पना द्यावी. त्या व्यक्ती कडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला किंवा त्याने कबूल केले की चेक चुकून बाउंस झाला आहे. तर त्याला रक्कम देण्यासाठी थोडा वेळ द्यावा. जर चेक देणार्या व्यक्ती काही प्रतिसाद दिला नाही, तर त्यावर तक्रार किंवा कायदेशीर कारवाई करता येवू शकते.
कायदेशीर नोटीस – चेक बाउंस झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत चेक देणार्या व्यक्तीस किंवा कंपनीस कायदेशीर नोटीस द्यावी. ही नोटीस स्वतरू किंवा वकिलामार्फत आपण पाठवू शकतो. कायदेशीर नोटीसपाठवताना आपले नाव, ज्या व्यक्ती किंवा कंपनीने चेक दिला आहे त्याचे नाव, पत्ता, बँकेचे नाव पत्ता, चेक बाउंसचे कारण, इत्यादी बाबी अर्जात नमूद कराव्या. अर्ज स्वतरू संबधित व्यक्तीध्संस्थेला देऊन त्यांना अर्ज मिळाल्याची प्रत (Received Copy) घ्यावी किंवा रजिस्ट्रर पोस्टाने अर्ज पाठवून त्याचा पुरावा स्वतरूकडे ठेवावा. पुढील कारवाईसाठी त्या कागदपत्रांचा उपयोग होतो.
👍 चेक बाबतच्या टिप्स
चेक वटण्याची मुदत सहा महिन्यापेक्षा कमी करता येते.
चेकवर लिहिलेली अक्षरी रक्कमच गृहीत धरली जाते.
चेक क्लिअरिंग प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून चुंबकीय शाई (MICR) वापरण्याची आधुनिक समाशोधन पद्धती अस्तित्वात आली.
खाते बंद असताना धनादेश देणे हा फौजदारी गुन्हा आहे.
भारतामध्ये शेअर बाजार ही संकल्पना युरोपमधून आयात केलेली आहे. इ.स. १८७५ मध्ये याची मुहूर्तमेढ भारताची आर्थिक राजधानी ‘मुंबई’ने रोवली. मुंबई शेअर बाजाराची भव्य इमारत पाहून विश्वास बसणार नाही की, या बाजाराची सुरुवात याच ठिकाणी एका झाडाखाली झाली. जणू एका छोटय़ा रोपाचा हा फोफावलेला वटवृक्ष आहे. झाडाजवळ एक सभागृह बांधण्यात आले. तेथे ‘नेटिव्ह शेअर अॅण्ड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन’ या नावाने ही संस्था नावारूपाला आली. त्यानंतर तब्बल एकशेतीस वर्षांनी मुंबई शेअर बाजाराचे ‘मुंबई शेअर बाजार लिमिटेड’मध्ये रूपांतर झाले. सुरुवातीच्या काळात हे काम फक्त दुपारी बारा ते दोन या वेळात चालत असे. सकाळच्या वेळात खरेदी-विक्रीच्या नोंदी होत असत.
भारत सरकारने १९८९ मध्ये सेबीची स्थापना केली. शेअर बाजाराच्या कार्यपद्धतीवर अंकुश ठेवण्यासाठी १९९२च्या कायद्यान्वये सेबीला अधिकार प्राप्त झाले. भांडवल बाजारात हर्षद मेहतासारखे जे घोटाळे होत होते ते होऊ नयेत म्हणून केंद्रीय अर्थ मंत्रालयाने १९९४ मध्ये राष्ट्रीय शेअर बाजाराच्या कामकाजास प्रारंभ केला. यामुळे मुंबई शेअर बाजाराची मक्तेदारी संपुष्टात आली.
१९९५ पासून संगणक या माध्यमातून बोल्ट (बी. एस. ई. ऑन लाईन ट्रेडिंग) या पद्धतीद्वारे सौदे होण्यास सुरुवात झाली. राष्ट्रीय शेअर बाजारातील सौदे नीट (एन. ई. ए. टी.) या पद्धतीद्वारे करण्यास सुरुवात झाली. ४ जानेवारी १९९९ पासून एन. एस. डी. एल. व १५ जुलै १९९९ पासून सी. डी. एस. एल.मध्ये सर्टिफिकेटच्या स्वरूपातील शेअर्सचे डीमॅटमध्ये रूपांतर होण्यास सुरुवात झाली. पूर्वी समभागांची खरेदी-विक्री झाल्यानंतर सर्टिफिकेट रूपात ताबा मिळायला सुमारे तीन महिने लागत असत. याउलट आजच्या संगणक युगात व्यवहार झाल्यावर तिसऱ्या दिवशी समभागांचा ताबा मिळतो. यामुळे घोटाळे होण्यास पायबंद बसलेला आहे. शेअर बाजाराच्या पारंपरिक कार्यपद्धतीला छेद देऊन आजची नवीन कार्यपद्धती अस्तित्वात आलेली आहे. यामध्ये संगणकाचे स्थान लक्षवेधी आहे. कार्यालयात बसून सौदे होऊ लागले. आता तर जणू काही गुंतवणूकदाराने शेअर बाजाराला घरातील पडद्यावर आणले आहे. तंत्रज्ञानातील या क्रांतीमुळे शेअर बाजारातील उलाढालींचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले.
पूर्वी शेअर्स सर्टिफिकेट रूपात असत; परंतु आता इलेक्ट्रॉनिक रूपात केवळ नोंद केली जाते. त्यामुळे याला आता पेपरलेस ट्रेडिंग म्हटले जाते. या पद्धतीला डीमॅट पद्धती असे म्हणतात. नव्या उद्योगाची उभारणी करताना किंवा जुन्या उद्योगाचा विस्तार करताना मोठय़ा भांडवलाची आवश्यकता असते. हे भांडवल प्रायमरी मार्केटद्वारे उभारले जाते. शेअर बाजार म्हणजे सेकंडरी मार्केट. सेकंडरी मार्केट प्रायमरी मार्केटवर अलंबून असते.
शेअर बाजाराचे कामकाज सकाळी ९.५५ ते दुपारी ३.४५ पर्यंत चालू असते. कार्यालयीन कामकाजाची पूर्वतयारी सामान्यत: सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू होते. सर्वप्रथम बोल्टला पासवर्डच्या सहाय्याने शेअर बाजाराच्या केंद्रस्थानाला जोडून घेतले जाते. शासनाच्या उद्योगधंदेविषयक बदलणाऱ्या धोरणांचा शेअर बाजाराच्या वधघटीवर परिणाम होतो. याशिवाय विशिष्ट कंपनीच्या व्यवस्थापनातील बदल, त्यांचे कंपनीसंबंधीचे विविध निर्णय शेअरच्या भावांवर परिणाम करतात. शेअर बाजाराची दृष्टी नेहमी पुढे गेलेली असते. सतत भविष्याचा वेध घेताना मागे वळून पाहायला कुणालाही फुरसत नसते. समभागांचा हा बाजार अत्यंत संवेदनाक्षम असतो. येथील व्यावसायिकाला चोवीस तास जागे राहावे लागते. नजर चौफेर ठेवावी लागते. राजकारण, उद्योगधंदे यावर त्याचे बारीक लक्ष असते.
निर्देशांक हा शब्द आपण नेहमीच ऐकतो. शेअर बाजारात जास्तीत जास्त उलाढाल करणाऱ्या प्रमुख कंपन्यांवर शेअर बाजाराचा निर्देशांक आधारित असतो. निर्देशांक हे राष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीचे मोजमाप आहे. प्रसारमाध्यमांद्वारे नेहमी शेअर बाजाराचे माहितीपूर्ण चित्र रंगविलेले असते. अशा वेळी व्यक्ती व संस्थांना तज्ज्ञांची मदत घेणे उचित ठरते. या परिस्थितीने शेअर बाजारातील अनेक करिअरना जन्म दिलेला आहे.
अविकसित भारत आता विकसनशील देश आहे. त्यामुळे अनेक विदेशी गुंतवणूकदार विविध भारतीय उद्योगधंद्यांमध्ये गुंतवणूक करण्यात रस घेत आहेत. हे प्रमाण सतत वाढते आहे. आता त्यांना आठ टक्क्यांपासून साठ टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करण्यास मुभा मिळालेली आहे. या अत्याधुनिक उद्योग जगतात उगवती पिढी काम करण्यास अधिक योग्य ठरते. उगवत्या पिढीला ही उत्तम संधी आहे. शेअर बाजाराच्या उद्योगांना उज्ज्वल भवितव्याची खात्री आहे.
आता आपण शेअर बाजारामध्ये येणाऱ्या घटकांची थोडक्यात ओळख करून घेऊया.
१) दलाल : शेअर बाजारात दलाल म्हणून काम करणे हा एक स्वतंत्र व्यवसाय आहे. मुंबई शेअर बाजार लिमिटेडमध्ये दलाल होण्यासाठी किमान बारावी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता आहे. त्यासाठी वय एकवीस वर्षे पूर्ण असणे जरुरीचे आहे. राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये दलाल होण्यासाठी किमान पदवीधर असणे ही शैक्षणिक पात्रता आहे.
२) उपदलाल : कोणतीही गुंतवणूक न करता उपदलाल हा व्यवसाय सुरू करता येतो. यासाठी बारावीची परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. यासाठी किमान वय २१ असावे लागते. मुंबई शेअर बाजारात सबब्रोकरशिप न स्वीकारता रेमिशनरी म्हणूनदेखील काम करता येते. त्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता बारावी असून स्वतंत्र व्यावसायिक असण्यास उपदलाल व रेमिशनरी यांना मनाई आहे.
३) पोर्टफोलिओ मॅनेजर : Port- Folio चा अर्थ खाते विभाग आहे. गुंतवणुकीत खूप विभाग असून प्रत्येक विभागाचे उपविभाग आहेत. गुंतवणूक कुठे, कशी, कितपत व केव्हा करावी, असे बरेच प्रश्न गुंतवणूकदारांना भेडसावत असतात. प्रत्येक गुंतवणूकदार हा गुंतवणूक बाजाराचा एक्सपर्ट असतो, असे नाही. त्यामुळे त्याला एक्सपर्टीजची जरुरी असते. पोर्टफोलिओ मॅनेजर होण्यासाठी सेबीकडे रजिस्ट्रेशन करणे आवश्यक असते. हा स्वतंत्र व्यवसाय असून काही आर्थिक संस्थांमध्ये नोकरीचे पददेखील आहे. यातून मिळणारे कमिशन हे आकर्षक असते. वार्षिक वेतन किमान आठ लाख रुपये असते.
४) गुंतवणूक सल्लागार : इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट होण्यासाठी रजिस्ट्रेशनची आवश्यकता नसते. इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटला करविषयक ज्ञान असल्यास त्याचे काम दर्जेदार होते. थोडक्यात, इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट गुंतवणूकदाराला माहिती पुरविण्याचे काम करतो.
५) अकाऊंटंट : अकाऊंटंटला अकाऊंट्स रिलेटेड सॉफ्टवेअरचे ज्ञान असणे अगत्याचे असते. कॉमर्समधील पदवीधर व सी.ए.ना इथे प्राधान्य असते. अकाऊंटंटला एक लाख ते पाच लाख रुपयांपर्यंत वार्षिक वेतन मिळते.
६) मुख्य कारकून : मुख्य कारकुनाला बाजाराची परिभाषा, बाजाराविषयी ज्ञान, किमान एक वर्षांचा अनुभव असल्यास सोयीचे होते. याला परीक्षा किंवा वयाचे बंधन नसते. अनुभव व बाजाराचे ज्ञान हे महत्त्वाचे आहे. दलालाच्या कामाच्या पसाऱ्याप्रमाणे त्याचे वार्षिक वेतन शहाण्णव हजार ते चार लाख रुपयांपर्यंत असते.
७) फंडामेंटल अॅनालिस्ट : रिसर्च कंपनीत म्युच्युअल फंड कंपनीज, प्रायव्हेट बँकिंग फंड मॅनेजमेंट कंपनीज या सर्व ठिकाणी सिक्युरिटी अॅनालिस्टला काम करण्याची संधी असते. एम.बी.ए. (फायनान्स), एम.बी.ए. (अकाऊंटसी) सी.ए. यांना प्राधान्य असते. शिवाय बी.टी.आय.चा फंडामेंटल अॅनालिसिसचा कोर्स करणे उपयुक्त ठरते.
८) टेक्निकल अॅनालिस्ट : दलाल डे ट्रेडर्स, ऑपरेटर्स, हाय नेटवर्दी इंडिव्हिजवल्स टेक्निकल अॅनालिसिसचा उपयोग करतात. यासाठी पदवीधर असणे पुरेसे आहे. शिवाय बी.टी.आय.चा टेक्निकल अॅनालिस्टचा स्पेशल कोर्स आहे. ९) फंड मॅनेजर : सुरुवातीला तीन वर्षे अनुभव घेण्यासाठी फंड मॅनेजरचा सहाय्यक म्हणून काम करावे लागते. त्यानंतर फंड मॅनेजर म्हणून काम मिळते. एम.बी.ए. (फायनान्स), सी.ए. अर्थतज्ज्ञ यांना प्राधान्य दिले आहे. फंड मॅनेजरला किमान वार्षिक वेतन दहा लाख रुपये असते.
१०) अॅसेट मॅनेजर : एम.बी.ए. (फायनान्स), अर्थतज्ज्ञ, सी.ए., शेअर बाजारातील अनुभवसंपन्न व्यक्ती, शेअर तज्ज्ञ यांची अॅसेट मॅनेजरच्या पदासाठी निवड केली जाते. शिवाय या कामासाठी बी.टी.आय.मधील विविध कोर्स उपयुक्त ठरतात.
११) आर्थिक गुन्हे अन्वेषक : या करिअरसाठी प्राधान्याने सी.ए., आय.एस.ए. यांना संधी असते. आयकर हिशेबाची साधने व तंत्रे माहीत असणाऱ्यास संगणकाच्या जाळ्याविषयी ज्ञान असणाऱ्यांना देखील संधी असते. कायद्याच्या चौकटीच्या आधारे योग्य मार्ग सुचविण्याएवढी क्षमता असणे आवश्यक आहे. नोकरीच्या पदांना वार्षिक वेतन किमान बारा लाख रुपये असते.
शेअर बाजाराच्या प्रशिक्षण देणाऱ्या संस्था :
अ) बी.एस.ई. ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज लि. मुंबई, १८ व १९ वा मजला, पी. जे. टॉवर्स, दलाल पथ, फोर्ट, मुंबई- ४००००१, दूरध्वनी- २२७२१२३३/३४, २२७२११२६/२७. web site:http://www.bseindia.com
ब) नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लि. बांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स बांद्रे (पूर्व), मुंबई- ४०००५१. दूरध्वनी- २६५९८१००, २६५९८२५२/१६ web site:www.nseindia.com
क) इंडियन इन्स्टिय़ूट ऑफ कॅपिटल मार्केट, प्लॉट क्र. ८२, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई- ४००७०५ इंडिया,web site:www.utiicm.com दूरध्वनी- ९१-२२-२७८९२८१५/१६.
ड) सेंटर फॉर फायनान्शियस मॅनेजमेंट बंगलोर, १ ला ए क्रॉस, १७ वा ए मेन, जे. पी. नगर, फेज क्र. २, बंगलोर- ५६००७८.
इ) दी इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट ऑफ इंडिया, खोली क्र. ३, बंजारा हिल, हैदराबाद- ५०००३४.
ई) इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फायनान्स, अशोक विहार, २, दिल्ली- ११००५२, इंडिया.
Warren Buffett Investment Rules: जगभरात एकापेक्षा एक श्रीमंत व्यक्ती आहेत. मात्र, त्या सर्वांमध्ये उजवे ठरणारे महान व्यक्तिमत्त्व म्हणजे वॉरेन बफे होय. बफे यांचा जन्म अमेरिकेतील नेब्रास्का येथे ३० ऑगस्ट, १९३० रोजी झाला. दिग्गज गुंंतवणूकदार आणि उद्योगपती असलेले बफे यांची गणना जगातील सर्वोत्तम गुंतवणूकदारांमध्ये होते. त्यांची एकूण संपत्ती ही तब्बल १२६ बिलियन डॉलर्सपेक्षाही जास्त आहे. विशेष म्हणजे, त्यांच्याकडे आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट आणि प्रदीर्घ गुंतवणुकीचा ट्रॅक रेकॉर्डही आहे.
असे महान गुंतवणूकदार बफेंनी गुंतवणुकीशी संबंधित काही नियम सांगितले आहेत, ते जर प्रत्येक यशस्वी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने पाळले, तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल. कारण, बफेंनी सांगितलेले हे नियम मार्केटची कंडीशन बदलली तरी तितकेच शक्तिशाली राहतात. कोणते आहेत ते नियम जाणून घेऊयात…
नियम १- पैसे गमावू नका
वॉरन बफे (Warren Buffett) यांचा ‘पैसे गमावू नका’ हा नियम खूपच महत्त्वाचा आहे. खरं तर, बफे हे जोखीम न घेणारे गुंतवणूकदार आहेत. जगातील इतक्या मोठ्या गुंतवणूकदाराविषयी असं म्हणणे कदाचित विचित्र वाटू शकते. मात्र, पोर्टफोलियो सुरक्षा ही संपत्ती कमावण्याच्या मार्गाने टाकलेले पहिले पाऊल आहे.
नियम २- पहिला नियम विसरू नका
बफेंनी सांगितलेला दुसरा नियम हाच आहे की, कुठल्याही गुंतवणूकदाराने पहिला नियम विसरायचा नाही. हे कसे करायचे, हेदेखील बफे स्पष्ट करतात. ते असे की, शक्यतो बड्या कंपन्या जेव्हा जास्त सवलतीत ट्रेडिंग करतात, तेव्हा या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. ते असाही इशारा देतात की, तुमच्या भांडवलासोबत कधीही अनावश्यक जोखीम घेऊ नका.
नियम ३- नेहमी सुरक्षा मार्जिन ठेवा
एका कंपनीची फेअर व्हॅल्यू आणि बाजारातील व्हॅल्यूमध्ये अंतर आहे. जर फेअर व्हॅल्यूपेक्षा बाजार मूल्य कमी असले, तर सुरक्षा मार्जिन हे जास्त असते. हा नियम असे सांगतो की, तुम्हाला मार्केटविषयी कमी समज असेल तर, तुमचं सुरक्षा मार्जिन जास्त असावं.
नियम ४- चांगल्या वित्तीय कंपन्यांचा शोध घ्या
कंपनीच्या मूलभूत गोष्टी दाखवताना स्टॉकची किंमत थोडी कमी असू शकते. त्यामुळे बॅलेन्स शीट, कॅश फ्लो स्टेटमेंट तसेच नफा आणि तोट्याचे स्टेटमेंट यांसारख्या वित्तीय स्टेटमेंटच्या आधारे कमी मूल्यमापन केलेल्या कंपन्या शोधणे शक्य आहे.
नियम ५- चांगली कमाई करणाऱ्या कंपन्या शोधा
वॉरन बफे 5 ते 10 वर्षांच्या कालावधीतील कमाईचा मजबूत इतिहास असलेल्या कंपन्यांचा शोध घेतात. त्यांना तिमाहीत होणाऱ्या कमाईशी काहीही चिंता नाहीये. कारण त्यांचा असा विश्वास आहे की, हा अल्पकालीन दृष्टीकोन एक वाईट वृत्ती आहे. कमी नफा आणि थोडीफार कमाई असलेली कंपनी, जी फक्त दोन वर्षांची आहे, ती बफेट यांच्या पोर्टफोलिओमध्ये येऊ शकणार नाही.
या लेखाचा शेवट करताना तुम्हाला आणखी एक बोनस नियम सांगू की, बफेंच्या गुंतवणूक तत्त्वांतील मुख्य तत्व हे दीर्घकालीन गुंतवणूक आहे. तुम्ही जितका जास्त काळ चांगले स्टॉक्स होल्ड करून ठेवाल, तितके तुमचे रिटर्न्स चांगले असतील. हे अल्प-मुदतीच्या अस्थिरतेच्या समस्या दूर करते ज्यामुळे अनेक गुंतवणूकदार उच्च पातळीवर खरेदी करतात आणि कमी विक्री करतात.
अशाप्रकारे, तुम्ही जर हे नियम वापरून योग्य गुंतवणूक केली, तर तुम्हाला नक्कीच यश मिळाल्याशिवाय राहणार नाही.
प्रत्येकालाच आपल्या भविष्याची चिंता असते. पण, ही चिंता तुम्ही दूर करू शकता. यासाठी आर्थिक सुरक्षा म्हणजे काय हे लक्षात घ्यावे लागेल. याचा अर्थ असा की, तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या स्थिर आहे याची खात्री करण्यासाठी तुमच्या पैशांचे प्रभावीपणे व्यवस्थापन करणे होय. चला तर, आर्थिक सुरक्षा मिळवण्याच्या पुढील ५ सवयी पाहूयात…
१. काटकसरीने जगा
कर्ज काढून दिवाळी साजरी केल्यासारखे जीवन जगण्याऐवजी काटकसर करा. एका महिन्यात खर्च केलेली प्रत्येक गोष्ट लिहून ठेवल्यास, तुम्हाला अनेक मार्ग सापडतील, ज्यामध्ये तुम्ही बचत करू शकता.
२. बजेट
बजेटिंग हे एक महत्त्वाचे कौशल्य आहे. तुमची कमाई आणि खर्च यावर आधारित बजेट कसे तयार करायचे ते शिका. तुमच्या प्लॅनला चिकटून राहण्यासाठी आवश्यक असलेल्या स्वयं-शिस्तीचा सराव करा. वर्षभराच्या खर्चाची यादी तयार करा.
३. अनावश्यक कर्ज टाळा
कर्ज ही अशी गोष्ट आहे ज्याबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे. तुम्हाला परवडत नसलेल्या जीवनशैलीसाठी उधार घेतलेले पैसे वापरणे मूर्खपणाचे आहे. त्यावरच खर्च करा, ज्याने तुमची स्वतःची प्रगती होईल.
४. स्वत:मध्ये गुंतवणूक करा
तुमची मिळकत ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. तुमचे मूल्य वाढवण्यासाठी तुम्ही जे काही करू शकता, त्यासाठी ते पैसे खर्च करा. अभ्यासक्रमांना जा, तुमच्या उद्योगाशी संबंधित विषयांवरील पुस्तके खरेदी करा, वाचा आणि सेमिनार तसेच कार्यशाळांमध्ये सहभागी व्हा.
५. भविष्यासाठी बचत करा
तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी बचतीला आजपासूनच सुरुवात करा. परंतु मुलांच्या शिक्षणाच्या बचतीचा परिणाम तुमच्या निवृत्तीनंतरच्या बचतीवर होणार नाही याचीही तुम्हाला खात्री करावी लागेल. मुलांचे भविष्य प्राधान्य असले तरी, निवृत्तीनंतर तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्थिर असल्याची खात्री करणेही अधिक महत्त्वाचे आहे.
तुम्हाला आजचा लेख कसा वाटला हे कंमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा लेख आवडला असेल तर लाईक कराआणि शेअर करा
1 जानेवारी 2024 ला नवे कॅलेंडर वर्ष सुरू होईल. सध्या चालू असलेल्या वर्षात कदाचित काही आर्थिक चुका अनवधानाने आपण केल्या असतील. आर्थिक चूक म्हणजे पर्यायाने आपले आर्थिक नुकसानच. मागे केलेल्या चुका हा इतिहास झाला. त्यांची पुनरावृत्ती आपण या वर्षात करणार नाही असा संकल्प करूया. या वर्षातील काही लक्ष ठेवण्यासारख्या तारखा किंवा कालावधी खालीलप्रमाणे-
आपल्याला सहज हाताशी येईल अशा ठिकाणी ही माहिती जपून ठेवा. यात एखादी अंतिम तारीख दिली असली तरी त्यासंबंधित गोष्टीची पूर्तता मुदतीपूर्वीच करावी म्हणजे गोंधळ उडणार नाही, दंड पडणार नाही, आपले आर्थिक नुकसान होणार नाही.
31 जानेवारी 2024 /15 फेब्रुवारी 2024/29 फेब्रुवारी 2024
★ आर्थिक वर्ष 2023-2024 येत्या काही दिवसात संपेल. हीच वेळ आहे आपल्या अंदाजित उत्पन्नचा आढावा घेऊन पुरेशी गुंतवणूक करण्याची. आपण कर मोजण्याची जुनी पद्धत स्वीकारली असेल तर काही गुंतवणूक /खर्च याची वजावट घेतल्याने आपला आयकर कमी होऊ शकतो पगार पत्रकाव्यतिरिक्त आपण काही गुंतवणूक/ खर्च केले असल्यास त्याची विहित नमुन्यात सूचना द्यावी लागते. आपल्या अस्थापनेकडून अशा सूचना देण्यासाठी वरील तीन पैकी कोणतीही अथवा एक वेगळीच अंतिम तारीख असू शकते. ती माहीती करून घेऊन आपली पगाराव्यतिरिक्त वैयक्तिक गुंतवणूक /खर्च केले असल्यास पुराव्यासह सदर तारखेच्या आत केल्यास सादर केल्यास त्याचा विचार करून अंतिम आयकर आकारणी होईल. हा फॉर्म आणि त्याचे पुरावे देण्यापूर्वी जर आपला कर अतिरिक्त कापला असल्यास समायोजित केला जाईल तरीही अतिरिक्त कर कापला असल्यास तो आपणास मालकाकडून परत मिळणार नाही तर विहित मुदतीत विवरणपत्र सादर करून आयकर खात्याकडून परत मिळवावा लागेल.
1 फेब्रुवारी 2024
★ खरंतर सन 2023-2024 चा अर्थसंकल्प सादर करण्याचा दिवस. येत्या वर्षात विद्यमान सरकारची मुदत संपते त्यामुळे कदाचित पूर्ण अर्थसंकल्प सादर न करता तात्पुरत्या खर्चासाठी लेखानुदान घेतले जाऊ शकते. अशा परिस्थितीत अर्थसंकल्प सादर करण्याचे, न करण्याचे कोणतेही कायदेशीर बंधन सरकारवर नसल्याने पूर्ण अर्थसंकल्प सुद्धा सादर केला जाऊ शकतो. त्यात कर संदर्भात काय बदल होतात ते पाहून आपल्या गुंतवणूक धोरणात बदल करावा लागेल.
15 मार्च 2024/ 31 मार्च 2024
★ ज्या लोकांना अग्रीम कर (Advance Tax) भरावा लागतो त्यांनी 15 मार्च पर्यंत 100% आणि त्यानंतरच्या व्यवहारांवरील पूर्ण आयकर 31 मार्चपर्यंत भरणे आवश्यक असून याप्रमाणे अग्रीम कर न भरल्यास 1% प्रतिमाह दंड होऊ शकतो. त्यामुळे अग्रीम कर भरणाऱ्या करदात्यांनी या तारखा लक्षात ठेवाव्यात.
31 मार्च 2024
★ चालू आर्थिक वर्षात आयकर सूट मिळावी म्हणून गुंतवणूक/खर्च करण्याचा हा शेवटचा दिवस. (80 C, 80 D, 80TTA यानुसार मिळणाऱ्या सवलती) या दिवशी गुंतवणूक किंवा खर्च करून तो आयकर विवरणपत्रात दाखवून कर सवलत मिळवता येईल जुन्या पद्धतीने कर आकारणी मान्य असलेल्या लोकांना याचा अधिक फायदा होऊ शकतो.
★ अनिवासी भारतीयांना विविध देशाशी असलेल्या करारानुसार ते रहात असलेल्या देशात कर बसत असल्यास त्या देशांशी असलेल्या दुहेरी कर आकारणी धोरणानुसार तेवढ्या कराची सूट भारतात मिळते अशी सूट मिळवण्यासाठी 10 F फॉर्म आयकर विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन भरावा लागतो, यासाठी पॅन आवश्यक आहे त्याशिवाय ऑनलाइन फॉर्म प्रोसेस होऊ शकत नाही. ज्या अनिवासी भारतीयांकडे पॅन नाही अशा व्यक्ती करात सूट मिळवण्यासाठी फॉर्म ऑफलाईन पद्धतीने या तारखेपूर्वी भरू शकतील.
01 एप्रिल 2024
★ नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात (सन 2024- 2025) नवीन वर्षात आपले उत्पन्न किती होईल, आयकर किती भरावा लागेल, आयकर वाचवण्यासाठी काय करता येईल. आयकर मोजणीसाठी कोणती पद्धत स्वीकारावी याबाबत प्राथमिक विचार करू शकता. त्याप्रमाणे आपण मागील वर्षाचे सन 2023-2024 चे आयकर विवरणपत्र भरू शकता त्यासाठी आवश्यक माहितीची जमावजमाव करायला सुरूवात करा म्हणजे शेवटच्या क्षणी होणारी दमछाक थांबेल. जिथे जिथे आपली मुळातून कर कपात होऊ नये असे वाटत असल्यास आवश्यक तेथे 15 G/H फॉर्म भरून द्यावेत म्हणजे कर कापला जाणार नाही.
15 जून 2024
★ सन 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या उत्पन्नाचा अंदाज करून 30% अग्रीम कराचा पहिला हप्ता भरण्याची अंतिम तारीख.
★ मालकाकडून कर्मचाऱ्यांना त्यांचे मागील आर्थिक वर्षातील उत्पन्न आणि करकपात यांची सविस्तर माहिती देणारे फॉर्म 16 प्रकारातील प्रमाणपत्र देण्याची अंतिम तारीख. या मुदतीत प्रमाणपत्र मिळाल्यास योग्य मुदतीत विवरणपत्र आपणास भरता येईल.
30 जून 2024
★ डी मॅट खाते आणि म्युच्युअल फंड योजनांसाठी नामनिर्देशन करण्याची सक्ती भांडवलबाजार नियंत्रक सेबीने केली आहे. ज्यांच्या पूर्वीच्या खात्यांना/ योजनांना नामनिर्देशन केलेले नाही त्यांना ते करण्याची मुदत वारंवार वाढवून दिली, ही वाढलेली मुदत 30 जून 2024 ला संपेल. ज्यांनी नामनिर्देशन केले नसेल त्यांचे खाते गोठवल्याने कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत.
31 जुलै 2024
★ ज्या करदात्यांना आर्थिक व्यवहारांचे लेखापरीक्षण करावे लागत नाही त्यांना मागील आर्थिक वर्षाचे म्हणजेच सन 2023- 2024 चे आयकर विवरणपत्र दंडाशिवाय दाखल करण्याची अंतिम तारीख. ही तारीख मागील दोन वर्षांत बदलली नसल्याने योग्य मुदतीत विवरणपत्र दाखल करावे.
15 सप्टेंबर 2024
★ सन 2024-2025 या आर्थिक वर्षासाठी अग्रीम कर भरण्याचा दुसरा हप्ता भरण्याची शेवटची तारीख. यात अंदाजित कराच्या पहिल्या हप्त्यासह 45% एकूण आयकर भरला जावा अशी अपेक्षा आहे.
30 सप्टेंबर 2024
★ ज्या करदात्यांना आपल्या व्यवहारांचे लेखापरीक्षण करून घ्यावे लागते त्याच्यासाठी आयकर विवरणपत्र दंडाशिवाय दाखल करण्याची शेवटची तारीख. ही तारीख अनेकांचे लेखापरीक्षण पूर्ण होत नसल्याने वाढवली जाते पण भविष्यात ती वाढवली जाईलच याची खात्री देता येत नाही तेव्हा अशा सर्वच करदात्यांनी याच मुदतीत विवरणपत्र दाखल करावे.
30 नोव्हेंबर 2024
★ पेन्शन अँथोरिटीस हयात असल्याचा दाखला देण्याची अंतिम तारीख. आता हा दाखला आपल्या जन्म ज्या महिन्यात झाला त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी दिला तरी चालतो. विहित मुदतीत हयातीचा दाखला न दिल्यास निवृत्तीवेतन स्थगित केले जाते.
15 डिसेंबर 2024
★ सन 2024-2025 या आर्थिक वर्षासाठी अग्रीम कर तिसरा हप्ता भरण्याची अंतिम तारीख. या आर्थिक वर्षाच्या अपेक्षित कराच्या पहिल्या दुसऱ्या हप्त्यासह एकूण 60% कर भरावा अशी अपेक्षा आहे.
31 डिसेंबर 2024
★ आर्थिक वर्ष 2023-2024 चे आयकर विवरणपत्र दंडासाहित भरण्याची शेवटची तारीख.
★ 31 जुलै 2024 अथवा 30 सप्टेंबर 2924 किंवा आयकर खात्याने दंडाशिवाय विवरणपत्र भरण्याच्या जाहीर केलेल्या तारखेपूर्वी किंवा तारखेनंतर विवरणपत्र दाखल केले असल्यास सुधारीत विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख. या मधील काळात विभागाकडून विवरणपत्र मंजूर झाले असले तरीही सुधारित विवरणपत्र दाखल करता येईल.
वरील तारखांबाबत काही शंका असल्यास जाणकार व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. याशिवाय अर्थसंकल्पातील तरतुदींनुसार किंवा आयकर खात्याने घेतलेल्या निर्णयांमुळे किरकोळ बदल होऊ शकतात, त्यांची पूर्वसूचना देण्यात येते.
पैसा बहुत कुछ है लेकीन सबकुछ नही है, बहुत कुछ पाने के लिए सबकुछ करना मत, खरीददार चाहे कितना भी बडा क्यो न हो, बिकाऊ बनना मत, दिमाग चाहे दिल न चाहे वह चीज करना मत |
ही उद्योगमहर्षी विठ्ठल कामत यांची अतिशय लाडकी चारोळी पैशाचे महत्त्व सांगून जाते. त्याचबरोबर पैशाबद्दल अजून एक अतिशय उत्तम असे वाक्य आहे. ते असे आहे,
पैसा खुदा तो नही, लेकिन खुदा से कम भी तो नही |
तुमच्याकडे कोणत्याही स्वरुपातले पैसेच नसतील तर…? अशी कल्पना करुन बघा. खिशात पैसे नाहीत. बँकेत पैसे नाहीत. घरात पैसे नाहीत. तुम्ही कुणाला उसने पैसे दिलेले नाहीत किंवा तुम्ही कुणाकडे उसने पैसे मागू सुध्दा शकत नाही. अशा प्रसंगी तुम्ही काय कराल? पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. घरात आहेत त्या जगण्यायोग्य वस्तूंचा साठा संपत चाललाय. एके दिवशी तो संपून गेला. आता काय करणार? पैशाविना जीवन म्हणजे जिवंतपणी मृत्यू अनुभवण्यासारखी अवस्था होय.
बऱ्याचवेळा पैशाबाबत अनेक गैरसमज पाळले जातात. पैसा हा आध्यात्मिक मार्गातील अडथळा आहे हा एक त्यातला मुख्य गैरसमज आहे. मात्र ज्यांनी संपूर्ण जगाला आपल्या आध्यात्माची ओळख करुन देऊन प्रभावीत केले ते विवेकानंद सांगतात की, उपाशीपोटी धर्म शिकवला जाऊ शकत नाही. त्यांनी पैशाचे महत्त्व नमूद केले आहे. पैसा आध्यात्मातील अडथळा आहे असे म्हणणाऱ्या लोकांच्या मनावर ताबा नसतो. त्यामुळे ते पैशाला बदनाम करतात. पैशाने अनेक चांगली कामे केली जाऊ शकतात. उत्तम शिक्षणासाठी शिक्षणसंस्था सुरु करण्यासाठी, चांगले रस्ते तयार करण्यासाठी, पुस्तके विकत घेण्यासाठी, आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी, चांगले व उबदार कपडे खरेदी करण्यासाठी, आपली स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी, लोकांना सुखसोयी चांगल्या मिळवण्यासाठी, दवाखाने व आरोग्य केंद्रांसाठी, व्यायामशाळा उभारण्यासाठी, चांगली शेती पीकवण्यासाठी, संशोधनासाठी, खेळाडूंसाठी, मैदानांसाठी, सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी अगदी कशाचेही नाव घ्या. ती प्रत्येक गोष्ट साकारण्यासाठी पैसा लागतो. पैशाविना काहीच करता येत नाही.
मग आपल्याला बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की, जे लोक पैशाने अमुक गोष्टी खरेदी करता येतील मात्र तमुक गोष्ट खरेदी करता येणार नाहीत याची मोठी यादी सांगत असतात त्यांचे काय? उदाहरण द्यायचे झाल्यास पैशाने पुस्तके खरेदी करता येतील ज्ञान नाही. पैशाने चांगले अंथरुन खरेदी करता येईल, झोप नाही. अशा वाक्यांचा भडीमार करणाऱ्या व्यक्तींनी हे समजून घेणे गरजेचे आहे की, पुस्तके खरेदी करणे ही पैशाने साध्य होणारी कृती आहे ते पैशाचे काम आहे. ती पुस्तके वाचणे हे तुमचे काम आहे, पैशाचे नाही. त्यासाठी पैशाला कशाला दोष देता? तो दोष तुमचा आहे. अंथरुन विकत घेणे ही पैशाने साध्य होणारी कृती आहे. झोप लागणे न लागणे ही तुमच्या कर्मावर किंवा मानसिक शांतीवर अवलंबवून आहे. पैशावर नाही.
पैशाने माणूस बिघडतो वगैरे या गोष्टीत काहीही तथ्य नाही. तसे असते तर सगळी गरीब माणसे चांगली असती किंवा सगळी श्रीमंत माणसे वाईट असली असती. ज्याची वृत्ती वाईट आहे ती माणसे वाईट वागणार. मग त्यांच्याकडे पैसे आहेत किंवा नाहीत याने काही फरक पडत नाही. ज्यांची वृत्ती विधायक आहे ती माणसे चांगलीच वागणार. तो संस्काराचा भाग आहे. त्यांच्याकडे पैसा असला किंवा नसला तरी काही फरक पडत नाही. काहीवेळा पैशामुळे आपापली वृत्ती प्रकट करायला वाव मिळतो. चांगल्या माणसांकडे मोठ्या प्रमाणात पैसा आला तर त्या समाजाची भरभराट होते. कारण चांगली माणसे पैसा आल्यावर शिक्षणसंस्था, दवाखाने, चांगले रस्ते, संस्कार केंद्रे अशा विधायक गोष्टी सुरु करतील. याउलट वाईट माणसांकडे पैसा आला तर त्या समाजाची अधोगती होते. कारण विध्वंसक माणसे जुगार, दारुचे अड्डे सुरु करतील.
म्हणून पैशाचा संबंध चांगल्या वाईट कामाशी जोडू नये. पैसा प्रत्येकाला हवा आहे. तो कसा मिळवायचा? कसा वाढवायचा? याचा अभ्यास करु या. श्रीमंतीकडे वाटचाल झालीच पाहिजे.