Tag: inspiration

  • यश तुमच्या हातात

    यश तुमच्या हातात 

    अर्ल नाईटिंगेल यांच्या मते,

     “एखाद्या उचित ध्येयाच्या दिशेने उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजे यश होय”

     उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा याचा अर्थ – यशाच्या कोणत्याच टप्प्यावर आपण थांबून राहत नाही. म्हणजे हा एक न संपणारा प्रवास आहे, एक उद्दिष्ट पूर्ण केल्यानंतर पुढच्या उद्दिष्टाकडे चालायला लागणं. असं करत करत आपण निश्चित केलेल्या आपल्या ध्येयनिश्चितीच्या मार्गावर पुढे पुढे चालत राहतो. यशप्राप्तीच्या या प्रवासात चालत राहणं फक्त खूप महत्वाचं आहे, कारण इथं थांबणाऱ्याचा अंत निश्चित आहे. 

    यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारे काही महत्त्वाचे गुण खालीलप्रमाणे आहेत :

    1. कर्तव्यनिष्ठा : 

    कोणतेही काम वेळेवर आणि प्रामाणिकपणे पूर्ण करण्याची वृत्ती असणे गरजेचे आहे. ती सवय स्वतःला लावून घेणं गरजेचं आहे. एखादी गोष्ट फक्त करायची म्हणून करणं आणि ती जबाबदारी समजून करणं यात खूप फरक आहे. 

    यश मिळवायचं असेल तर आपली जबाबदारी तितक्याच जबाबदारपणे पार पाडणं आवश्यक असतं. प्रवासात अनेक अडचणीचे, अडथळ्याचे आणि कसोटीचे प्रसंग येतात पण तीच खरी परीक्षा असते त्यावर मात करण्याची आणि पुन्हा उभं राहण्याची.

    2. कठोर परिश्रम : 

    मित्रांनो यश कोणालाही सहज मिळत नाही. त्यासाठी आवश्यक मेहनत घ्यावी लागते आणि त्यात सातत्य ठेवणे अपेक्षित असते.

    सर्वांनाच यशस्वी व्हावं असं वाटतं पण त्यासाठी लागणारे कष्ट उपसण्याची वेळ देण्याची तयारी किती जणांची असते ? यशासाठी अपार त्यागाची आणि स्वयंशस्तीची गरज असते. कठोर परिश्रमाला दुसरा पर्याय नाही. कोणत्याही गोष्टीतील परिपूर्णता ही काही नशिबाने मिळत नाही त्यासाठी भरपूर कष्ट आणि निरंतर सराव करावा लागतो. 

    3. सकारात्मक विचारसरणी :

     प्रत्येक अडचणीतून काहीतरी शिकण्याची वृत्ती आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास यश मिळवणं सोपं होऊ शकतं. प्रत्येक गोष्टीकडे आपण जर नकारात्मक नजरेने बघितलं तर आपलं इच्छित कधीच साध्य होणार नाही.

    4. आत्मविश्वास : 

    स्वतःवर आणि आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवणे ही यशस्वी होण्याची अगदी प्राथमिक पायरी आहे. जोपर्यंत आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत आपल्यावरही कोणी विश्वास ठेवणार नाही.

    5. धैर्य आणि चिकाटी : 

    अडथळ्यांना सामोरे जाताना कधीही हार न मानता पुढे जाणे आवश्यक आहे. यशप्राप्तीच्या वाटेत येणाऱ्या अडचणी, अडथळे आणि निरुत्साह यावर मात करत ध्येय गाठण्यासाठी सतत, कसून प्रयत्न करण्याची क्षमता म्हणजे चिकाटी. चिकाटी हे तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडण्याची आणि तुमच्या प्रयत्नांवर अधिक काळजीपूर्वक लक्ष देण्याचे लक्षण आहे. हे लक्षण धैर्याने आत्मसात करून पुढं जाणं हाच काय तो यशाचा राजमार्ग.

    6. वेळेचे व्यवस्थापन : 

    वेळेचे योग्य नियोजन आणि त्या प्रमाणे काम करणे यश मिळवण्यासाठी आवश्यक असते. कोणते वेळी आपल्याला काय करायचं हे ती गोष्ट करण्याच्या आधी आपल्या मनाला माहीत असलं पाहिजे. हे वेळेचं नियोजन अनेक अडचणी येण्याआधीच त्यांना दूर करतं.

    7. नवीन शिकण्याची इच्छा : 

    आपल्या ज्ञानात सातत्याने भर घालण्याची इच्छा आणि नवीन गोष्टी शिकण्याची तयारी आपली असली पाहिजे. दररोज स्वतःच्या ज्ञानात व्यक्तिमत्त्वात 1 % भर घालणं ही कायमची सवय आपण आत्मसात केली पाहिजे.

    8. चांगले संबंध : 

    लोकांशी चांगले संबंध ठेवणे, सहयोगी वृत्तीने काम करणे, सहकार्याची भावना ठेवणं  हेदेखील यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचे आहे. एक चांगलं Network केवळ यशाच्याच नाही तर आयुष्याच्या प्रवासात कामाला येतं हे मात्र नक्की !

    9. इच्छाशक्ती :

    आपल्या मनात असलेलं कोणतही ध्येय साध्य करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते करण्याची प्रबळ इच्छाशक्ती आपलं अपेक्षित साध्य करण्याची प्रचंड तळमळ हीच आपल्याला यशाकडे नेणारे सर्वात प्रबळ प्रेरणा ठरते. ईच्छा असल्याशिवाय मार्ग कधीच सापडणार नाही. 

    हे गुण कौशल्य आत्मसात केल्यास यशाच्या मार्गावर निश्चितपणे यशस्वीपणे वाटचाल करता येईल.

    आपल्याला जीवनात काय मिळवायचं आहे हे लवकर ठरवलं पाहिजे. आपलं उद्दिष्ट आपल्याला जितक्या लवकर सापडेल तेवढं जगणं अर्थपूर्ण ठरेल हे मात्र नक्की. आपल्याला का जगायचय याच ठोस कारण आपल्याला शोधता आलं पाहिजे. दररोज आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की मी माझ्या जीवनाच्या उद्दिष्टपूर्तीकडे योग्य दिशेने जात आहे का ? आणि या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. 

    आणखी वाचा :

  • राष्ट्रीय अभियंता दिवस आणि सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

    राष्ट्रीय अभियंता दिवस आणि सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

    आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे विश्वेश्वरय्या हे केवळ एक अभियंता नव्हते, तर त्यांनी भारताच्या औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात देखील भरीव योगदान दिले. त्यांची दूरदृष्टी आणि उत्तम तांत्रिक कौशल्य आजही अभियंते आणि तंत्रज्ञांसाठी आदर्श आहे.

    विश्वेश्वरय्या यांचा जन्म कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील चिक्कबल्लापूर तालुक्यात १५ सप्टेंबर १८६१ रोजी झाला. त्यांचे पूर्वज आंध्र प्रदेशातील मोक्षगुंडम या गावचे रहिवासी होते, म्हणून त्यांचे आडनाव ‘मोक्षगुंडम’ असे पडले. त्यांचे वडील पंडित श्रीनिवास शास्त्री हे प्रकांड पंडित होते. त्यांना वेद, उपनिषद यांचा गाढा अभ्यास होता. विश्वेश्वरय्या लहानपणापासूनच अतिशय हुशार व कुशाग्र बुद्धीचे होते.

    सुरुवातीचे शिक्षण त्यांनी बंगळुरू येथील सेन्ट्रल कॉलेजमध्ये झाले. घरची आर्थिक परिस्थिती अस्थिर होती, त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं. मात्र, त्यांनी त्यांच्या अभ्यासातील सातत्य राखत बी. ए. च्या परीक्षेत संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्यांच्या या यशाने प्रभावित  होऊन तत्कालीन म्हैसूर सरकारने त्यांना पुढील अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर केली. त्या शिष्यवृत्तीच्या बळावर विश्वेश्वरय्या यांनी पुण्याच्या सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेथे त्यांनी तीन वर्षांचा अभ्यासक्रम अवघ्या अडीच वर्षांत पूर्ण करून, नोव्हेंबर 1883 मध्ये एल. सी. ई. (लायसेन्सिएट सिव्हिल इंजिनिअरिंग)  म्हणजेच आजची बी.ई. सिव्हिल पदवी वयाच्या बाविसाव्या वर्षी प्रथम श्रेणीत आणि प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली. शिक्षण पूर्ण होताच, 1884 मध्ये त्यांची तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या वतीने  मुंबई राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात (पी.डब्ल्यू.डी.) असिस्टंट इंजिनिअर म्हणून पुण्यात सरळ नियुक्ती करण्यात आली. 

    पुढे मुंबई सरकारच्या नोकरीत असताना विश्वेश्वरय्या यांनी अनेक उल्लेखनीय कामगिरी केली. 1893 मध्ये त्यांनी सिंध प्रांतातील सक्कर शहराला भेडसावणारा पाण्याचा प्रश्न सोडवला. त्या काळात सिंधू नदीपासून पाणी पुरवण्याची कोणतीही ठोस व्यवस्था नव्हती, त्यामुळे शहरात पाण्याची टंचाई होती. विश्वेश्वरय्या यांनी एक अभिनव योजना आखली, ज्याद्वारे सिंधू नदीपासून सक्करला पाणी मिळू लागले आणि हा प्रश्न कायमचा सुटला. याशिवाय, त्यांनी ब्रिटिश सैन्याच्या एडनमधील छावणीसाठी मोठं काम केलं. एडन हा येमेन या देशातील एक वाळवंटी प्रदेश होता, जिथे पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या होती. ब्रिटिश सरकारने या समस्येचे निराकरण करण्यासाठी एका कुशल अभियंत्याची मागणी केली होती आणि सरकारने विश्वेश्वरय्या यांची निवड केली. त्यांनी एडनपासून ६० मैलांवर असलेल्या ठिकाणाहून पावसाचे पाणी पुरवण्याची योजना तयार केली. या योजनेमुळे एडनमधील पाण्याची समस्या कायमची सुटली आणि ब्रिटिश सैन्याला दिलासा मिळाला.

    त्यानंतर, त्यांनी शेतीसाठी एक क्रांतिकारक पद्धत विकसित केली. त्याकाळात शेतकरी कालव्याच्या पाण्याचा प्रमाणाच्या बाहेर मनमानी वापर करत होते, त्यावर कोणतेही नियंत्रण नव्हतं. तेव्हा विश्वेश्वरय्या यांनी या प्रश्नावर अभ्यास करून ब्लॉक सिस्टिम नावाची नवी पद्धत शोधली. सुरुवातीला शेतकऱ्यांनी या पद्धतीला विरोध केला, पण जसजशी त्यांना या योजनेची उपयुक्तता समजली, तसतसा विरोध मावळला. ब्लॉक सिस्टिममुळे शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर अधिक नियोजनबद्ध पद्धतीने सुरू केला आणि शेती व्यवसायात त्यांच्यामुळे विश्वास निर्माण झाला.

    विश्वेश्वरय्या यांचे पुण्यात सुमारे चौदा-पंधरा वर्षे वास्तव्य होतं . पुण्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासात त्यांचे योगदान महत्त्वाचे होतं. 1901-03 दरम्यान त्यांनी पुण्याजवळील खडकवासला धरणावर एक ऑटोमॅटिक गेट डिझाइन केलं. हे दरवाजे जलाशयातील पाणी विशिष्ट उंचीवर पोहोचले की, आपोआप उघडत आणि पाणी कमी झाले की बंद होत. त्याकाळात हे अत्याधुनिक तंत्रज्ञान एक आश्चर्य मानलं  जात होतं. तसेच पुणे शहराच्या भूमिगत सांडपाण्याची योजना सुद्धा त्यांनीच तयार केली. या योजनेमुळे शहरात सांडपाण्याचे व्यवस्थापन अधिक सुलभ झाले. त्यांच्या या योजनेला त्याकाळी एक अद्भुत यश मानले गेले.

    पुण्याच्या जवळपास असलेल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचे महत्त्व पटवून देण्याचे कामही विश्वेश्वरय्या यांनी केलं. त्यांनी ब्लॉक सिस्टिमचा प्रचार करून शेतकऱ्यांना या पद्धतीची महत्ता समजावली, ज्यामुळे पाणी वाचले आणि शेतीत अधिक उत्पादकता आली. त्यांनी पुण्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासात मोठे योगदान दिलं, ज्यामुळे शहराच्या विकासाची दिशा ठरवली गेली.

    मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी सरकारी नोकरीत असताना असाधारण कामगिरी केली होती. त्यांच्या कर्तृत्वाचा दर्जा आणि त्यांनी दाखवलेली कार्यक्षमता या गोष्टी सर्वत्र चर्चेचा विषय होत्या. परंतु, त्या काळात भारतीयांना इंग्रज सरकारने ठराविक मोठ्या  पदांवर जाण्याची परवानगी दिली नव्हती. जेव्हा विश्वेश्वरय्या यांनी चीफ इंजिनिअर पदासाठी पात्रता दाखवूनही त्यांना ते पद देण्यात आलं नाही, तेव्हा त्यांना एकप्रकारचा अपमान वाटला. कारण ते एकटे भारतीय होते आणि इंग्रज सरकारने हे पद केवळ गोऱ्या अधिकाऱ्यांसाठी राखून ठेवलेले होतं. त्याचं वेळी विश्वेश्वरय्या यांची पेन्शनसाठी आवश्यक असलेली नोकरीची सेवा मुदत पूर्ण होण्यासाठी काहीच महिने शिल्लक होते. मात्र, त्यांच्या स्वाभिमानी आणि तत्त्वनिष्ठ स्वभावाला हा अन्याय सहन होईना. त्यांना मुदत वाढवून मिळणार नाही याची कल्पना होती आणि पेन्शनसाठी आवश्यक कालावधी कमी राहिला होता, तरीही त्यांनी 1908 मध्ये सुपरिंटेंडेंट इंजिनिअर म्हणून नोकरीचा तातडीने राजीनामा दिला. हा निर्णय त्यांनी आपल्या मूल्यांवर ठाम राहून घेतला होता.

    या निर्णयानंतर सर्वत्र मोठी चर्चा रंगली. त्यांच्या नोकरी सोडण्याच्या निर्णयाने अनेकांना धक्का बसला. ब्रिटिश सरकारलाही विश्वेश्वरय्या यांच्या या निर्णयामुळे स्वतःचीच  लाज वाटली आणि त्यांनी इंग्लंडमधून खास परवानगी मिळवून पेन्शनचा नियम शिथिल केला, जेणेकरून विश्वेश्वरय्या यांना पेन्शन मिळू शकेल. विश्वेश्वरय्या यांचा राजीनामा आणि नोकरी सोडल्याची बातमी देशभरात पसरली होती. त्याचवेळी, हैदराबाद संस्थानकडून एक विशेष निमंत्रक विश्वेश्वरय्या यांना भेटण्यासाठी आला. त्या निमंत्रकाने त्यांना चीफ इंजिनिअर म्हणून त्याच पगारावर नोकरीसाठी नियुक्त करण्याचं पत्र दिलं. हे पत्र मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी, म्हैसूर संस्थानातूनही त्यांना एक पत्र मिळाले.

    या पत्रात विश्वेश्वरय्या यांना चीफ इंजिनिअर म्हणून म्हैसूरमध्ये रुजू होण्याचं आमंत्रण देण्यात आलं होतं. या दोन मोठ्या संस्थानांमधून आलेल्या प्रतिष्ठित प्रस्तावांमुळे विश्वेश्वरय्या मोठ्या पेचात सापडले होते. त्यांना कोणालाही दुखवायचं नव्हतं, परंतु त्यांना त्यांच्या मूळ राज्यात परतण्याची इच्छा होती. त्यांच्या मनात म्हैसूरकडे परतण्याची ओढ होती. मात्र, त्याचवेळी हैदराबादमधील नद्यांच्या पूर समस्या गंभीर होत्या आणि त्या समस्येवर तातडीने उपाययोजना करणं आवश्यक होतं. म्हणूनच, विश्वेश्वरय्या यांनी एक समंजस निर्णय घेतला त्यांनी प्रथम हैदराबादमधील पूर समस्येवर उपाय काढण्याचं ठरवलं आणि त्यानंतर म्हैसूरला जाण्याचा विचार केला.

    त्या काळात हैदराबाद शहरातील मूसी आणि ईसी या नद्यांना दरवर्षी येणाऱ्या महापुरांमुळे मोठी हानी होत होती. पुरामध्ये घरं, जनावरं वाहून जात होती. हा प्रश्न सोडवण्यासाठी एम. विश्वेश्वरय्या यांनी या नद्यांवर धरणे बांधण्याची योजना आखली, ज्यामुळे महापुरांवर नियंत्रण मिळवता आलं. या योजनेची यशस्वी अंमलबजावणी केल्यानंतर, 1909 साली त्यांनी म्हैसूर संस्थानात (आताचे कर्नाटक) मुख्य अभियंता म्हणून पदभार स्वीकारला.

    म्हैसूरच्या महाराजांना विश्वेश्वरय्या यांची शिस्तबद्ध कामाची पद्धत खूप आवडली, म्हणून त्यांनी 1912 साली त्यांनी विश्वेश्वरय्या यांना  म्हैसूर संस्थानाचे दिवाण म्हणून नेमले. आपल्या कार्यकाळात विश्वेश्वरय्यांनी उद्योगधंद्यांमध्ये आधुनिक साधनांचा वापर करून सुधारणा घडवून आणल्या. भद्रावती आयर्न अँड स्टील वर्क्स सारख्या मोठ्या कारखान्याची स्थापना केली, तसेच म्हैसूर राज्याच्या नियंत्रणाखाली रेल्वे व्यवस्थापन आणले. बँक ऑफ म्हैसूर सुरू केली आणि पर्यटन क्षेत्रात उत्तम दर्जाची हॉटेल्स उभारली.

    त्यांनी कृष्णराजसागर धरणाचे बांधकाम पूर्ण केलं, ज्यामुळे म्हैसूर  राज्याला पुरेशी वीज आणि पाणी उपलब्ध झालं. याशिवाय, त्यांनी वृंदावन उद्यानाची निर्मिती करून राज्याला एक आकर्षक पर्यटनस्थळ दिलं. शिक्षणाची महती ओळखून, त्यांनी अनेक शाळा आणि महाविद्यालयांची स्थापना केली. मुलींसाठी स्वतंत्र महाविद्यालये आणि वसतिगृहे उभारली. शेती, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रात महत्त्वपूर्ण शिक्षण संस्था सुरू केल्या आणि म्हैसूरसाठी स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना केली. त्यांच्या दूरदृष्टीने म्हैसूर संस्थानाची सर्वांगीण प्रगती घडून आली. विश्वेश्वरय्या  यांनी  आपल्या कष्ट, बुद्धिमत्ता आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे यशाचा कळस गाठला.

    पंडित जवाहरलाल नेहरू डॉ. विश्वेश्वरय्यांबद्दल म्हणाले होते, “He is an engineer of integrity, character, and broad national outlook.” 1 सप्टेंबर 1961 रोजी त्यांच्या जन्मशताब्दी उत्सवाच्या वेळी, पंडित नेहरूंनी आपल्या अतिशय व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून दिल्लीहून बंगलोरला जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. विशेष म्हणजे, त्यांना आलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पत्रांवर त्यांच्या स्वतःची पोस्टाची तिकिटे चिकटवण्यात आली होती. 

    मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे भारताचे एक महान अभियंता, द्रष्टे आणि विकासाचे प्रणेते होते. त्यांच्या अतुलनीय कार्यामुळे आणि भारताच्या औद्योगिक क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानामुळे त्यांना भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले. वयाच्या १०१ व्या वर्षी १४ एप्रिल १९६२ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला, परंतु त्यांचं कार्य आजही आपल्या सर्वांना प्रेरणा देतं. भारत सरकारने त्यांच्या जयंतीदिनी, म्हणजे १५ सप्टेंबरला अभियंता दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला, ज्याद्वारे प्रत्येक अभियंत्याला त्यांच्या कार्याची ओळख पटते. विश्वेश्वरय्या हे शतायुषी होऊन निरामय जीवन जगले. इंग्रज सरकारने त्यांना सर, कैसर-ए-हिंद, के.सी.आय.ई. इत्यादी बहुमानांनी सन्मानित केलं.

    आणखी वाचा

  • भारतीय फुटबॉलचा नायक : सुनील छेत्री Real Life Story of Football Legend Sunil Chhetri

    भारतीय फुटबॉलचा नायक : सुनील छेत्री Real Life Story of Football Legend Sunil Chhetri

    यानंतर, जेव्हा भारताचा केनिया सोबत सामना होतो, तेव्हा मैदान हजारो प्रेक्षकांनी गच्च भरलेलं असतं आणि ‘इंडिया इंडियाचा’ जयघोष देत असतं.ते ट्विट होतं नुकत्याच निवृत्ती घेतलेल्या भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीचं. 

    आज आपण याच  “कॅप्टन फॅनटेस्टीक” चा  प्रेरणादायी प्रवास जाणून घेणार आहोत. सुनील छेत्रीचा जन्म ३ ऑगस्ट १९८४ रोजी सिकंदराबाद येथे झाला. लहानपणापासूनच मैदानी खेळांकडे आकर्षण असलेल्या सुनीलने  सुरुवातीला स्पोर्ट कोट्यातून चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा म्हणून हौसेखातर फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली, परंतु फुटबॉलने त्याच्या हृदयात घर केलं आणि मग पुढे त्यानेही स्वतःला या खेळात झोकून घेतलं.

    त्याने आपल्या करिअरची सुरुवात २००२ मध्ये कोलकत्याच्या मोहन  बागान क्लबपासून  केली आणि पुढे आपल्या मेहनतीच्या बळावर 2005 साली पाकिस्तानविरुद्ध सामन्यात भारतीय संघात पदार्पण केलं. त्याच्या खेळातील कौशल्यांमध्ये कमालीची स्पष्टता होती. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे लवकरच तो  संघातील एक प्रमुख खेळाडू बनला. सुनीलच्या प्रतिभेने भारताला नेहरू कप, SAFF चॅम्पियनशिप, AFC चॅलेंज कपसह अनेक विजय मिळवून दिले. सातत्याने गोल करण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे तो जगातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय गोल स्कोररपैकी एक ठरला.