Tag: India

  • जागतिक महासत्तांच्या चक्रव्यूहात भारत: २०२६ मधील भू-राजकीय ‘मास्टरस्ट्रोक’!

    जागतिक महासत्तांच्या चक्रव्यूहात भारत: २०२६ मधील भू-राजकीय ‘मास्टरस्ट्रोक’!

    १९९० च्या दशकातील अमेरिकन वर्चस्वाचे ‘एकध्रुवीय’ जग आता पूर्णपणे इतिहासजमा झाले आहे. २०२६ मध्ये आपण अशा एका वळणावर उभे आहोत जिथे जागतिक सत्ता एका केंद्राकडून निसटून अनेक नवीन केंद्रांमध्ये विभागली गेली आहे. या बदलत्या समीकरणात भारत हा केवळ एक ‘प्रेक्षक’ राहिलेला नसून, तो जगाचा ‘किंगमेकर’ आणि ‘शांती निर्माता’ (Peace Architect) म्हणून प्रबळपणे समोर येत आहे. भारताचे परराष्ट्र धोरण आता केवळ ‘तटस्थ’ राहिले नसून ते ‘निर्णायक आणि स्वायत्त’ झाले आहे.

    एकध्रुवीयतेकडून बहुध्रुवीयतेकडे: सत्तेचे नवे केंद्र

    गेल्या तीन दशकांपासून असलेल्या अमेरिकेच्या एकहाती वर्चस्वाला आता पूर्णविराम मिळत असून २०२६ मध्ये जग ‘बहुध्रुवीय’ (Multipolar) झाले आहे. चीनची वाढती आर्थिक शक्ती आणि रशियाची लष्करी चिकाटी यामुळे जागतिक शक्तीचे केंद्र विस्तारले आहे.

    हे सर्व घडत असताना भारत आता जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या उंबरठ्यावर असून जागतिक पुरवठा साखळीतील (Supply Chain) एक प्रमुख केंद्र बनला आहे. शिवाय जागतिक संकटांच्या निवारणात भारताची भूमिका आता निर्णायक ठरत असून, भारताच्या सहभागाशिवाय कोणतेही आंतरराष्ट्रीय प्रश्न सुटणे कठीण झाले आहे.

    आंतरराष्ट्रीय संघटना: भारताचे ‘मल्टी-अलाईनमेंट’ धोरण

    भारत आज जगातील अशा दुर्मिळ देशांपैकी एक आहे, जो एकाच वेळी परस्परविरोधी वाटणाऱ्या संघटनांमध्ये आपले वजन राखून आहे. हे भारताचे ‘स्वतंत्र परराष्ट्र धोरण’ अधोरेखित करते.

    BRICS+ (भारताचे अध्यक्षपद २०२६): १ जानेवारी २०२६ पासून भारताने ब्रिक्सचे अध्यक्षपद स्वीकारले. आता या गटात सौदी अरेबिया, इराण आणि UAE सारखे १० नवीन शक्तिशाली देश आहेत. भारत येथे ‘डी-डॉलररायझेशन’ (De-dollarization) ऐवाजी ‘रुपया’ आणि इतर स्थानिक चलनात व्यापाराला प्रोत्साहन देऊन पाश्चात्य आर्थिक व्यवस्थेला एक सक्षम आणि स्वावलंबी पर्याय उभा करत आहे. भारताने २०२६ मध्ये ‘BRICS Pay’ या डिजिटल पेमेंट सिस्टिमला नवी दिशा दिली आहे, ज्यामुळे डॉलरवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत झाली आहे.

    संयुक्त राष्ट्र (UN): युएनची सध्याची रचना २०२६ च्या जागतिक आव्हानांना तोंड देण्यात अपयशी ठरली आहे. सुरक्षा परिषदेतील ‘व्हेटो’ अधिकारामुळे मोठे संघर्ष थांबवता आलेले नाहीत. भारताने आता ‘N.O.R.M.S’ धोरणांतर्गत युएनमध्ये कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी आक्रमक पवित्रा घेतला असून, जगातील १४० हून अधिक देशांचा भारताला अधिकृत पाठिंबा मिळाला आहे. भारताची भूमिका आता “युएनमध्ये सुधारणा करा किंवा पर्यायी व्यवस्था स्वीकारा” अशी स्पष्ट झाली आहे.

    नाटो (NATO) आणि युरेशिया संघर्ष: भारत नाटोचा सदस्य नाही, पण अमेरिकेचा ‘महत्त्वाचा संरक्षण भागीदार’ आहे. नाटो सध्या युक्रेनसाठी ‘PURL’ रणनीती राबवत असताना, भारत रशियासोबत थेट संवाद साधणारा एकमेव मोठा लोकशाही देश ठरला आहे. नाटो देशांनाही आता जाणीव झाली आहे की, इंडो-पॅसिफिकमध्ये भारताशिवाय स्थिरता शक्य नाही.

    आखाती सहकार्य परिषद (GCC): मध्य-पूर्वेतील इस्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारताने GCC देशांसोबतची आपली ऊर्जा सुरक्षा अधिक मजबूत केली आहे. २०२४-२५ मध्ये भारत-जीसीसी व्यापार जवळपास $१७८.६ अब्ज इतका गेला आहे. यामुळे तेलाचा पुरवठा आणि परदेशातील १ कोटी भारतीयांचे हित जोपासले जाणार आहे.

    शांघाय सहकार्य संघटना (SCO): चीन आणि रशियाचे वर्चस्व असलेल्या या गटात राहूनही भारत दहशतवादाच्या मुद्द्यावर कोणाचीही गय करत नाही. ही भारताची ‘डिसायसिव्ह न्यूट्रालिटी’ (Decisive Neutrality) आहे, जिथे भारत आपल्या सीमावादावर तडजोड न करता प्रादेशिक सुरक्षेसाठी प्रयत्नशील आहे.

    २०२६ मधील युद्धकालीन (War-time) वास्तविकता आणि भारताची चाल

    युद्धकालीन परिस्थिती म्हणजे केवळ प्रत्यक्ष रणभूमीवरील युद्ध नाही, तर ते ‘आर्थिक, तांत्रिक आणि माहितीचे युद्ध’ देखील आहे. २०२६ मध्ये जगाने भारताची ‘ऑईल आर्बिट्रेज’ रणनीती पाहिली आहे. भारत रशियाकडून कच्चे तेल घेतो, ते आपल्या आधुनिक रिफायनरीजमध्ये शुद्ध करतो आणि त्याच तेलाची युरोपला निर्यात करतो. यामुळे भारताचे परकीय चलन वाचले असून जागतिक स्तरावर तेलाच्या किमतीत स्थिरता राखण्यास मोठी मदत झाली आहे.

    पश्चिम आशियात इस्रायल-गाझा आणि इराणचा वाढता सहभाग यामुळे लाल समुद्रातील (Red Sea) व्यापार धोक्यात आला आहे. अशा वेळी भारत आणि UAE मधील ‘अन्न सुरक्षा प्रकल्प’ (I2U2) आणि IMEC कॉरिडोर (भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडोर) हे चीनच्या ‘बेल्ट अँड रोड’ला दिलेले सर्वात मोठे धोरणात्मक उत्तर ठरत आहे. जरी या प्रकल्पाला युद्धाने थोडा विलंब झाला असला, तरी २०२६ मध्ये सौदी अरेबियाने यात १०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक जाहीर करून भारतावरील विश्वास व्यक्त केला आहे.

    इंडो-पॅसिफिक आणि QUAD: सागरी सुरक्षेचा कणा

    भविष्यातील संघर्षाचा केंद्रबिंदू ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र आणि तैवान हा असणार आहे. चीनच्या वाढत्या नौदल शक्तीला रोखण्यासाठी भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाने (QUAD) २०२६ मध्ये ‘सॅटेलाइट डेटा शेअरिंग’ करार अधिक घट्ट केला आहे. यामुळे हिंदी महासागरात भारताची नजर आता प्रत्येक संशयास्पद हालचालीवर आहे. भारत येथे केवळ स्वतःचे रक्षण करत नाही, तर ‘नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर’ म्हणून हिंदी महासागरातील लहान देशांनाही सुरक्षा पुरवत आहे. भारतीय नौदल आता ‘ब्ल्यू वॉटर नेव्ही’ म्हणून स्वतःची जागतिक ओळख निर्माण करत आहे.

    तंत्रज्ञान आणि लष्करी आधुनिकता: भविष्यातील शक्ती

    आजची स्पर्धा जमिनीपेक्षा कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सेमीकंडक्टर आणि डेटा मध्ये जास्त आहे. २०२६ च्या अर्थसंकल्पात भारताने संरक्षणासाठी ₹७.८५ लाख कोटी जाहीर केले आहेत. सायबर वॉरफेअर आणि ड्रोन तंत्रज्ञानामध्ये भारत आता जगात आघाडीवर जाण्याच्या तयारीला लागला आहे. १ फेब्रुवारी २०२६ च्या ताज्या संरक्षण अपडेट्सनुसार, भारताने स्वदेशी बनावटीच्या ‘प्रलय’ आणि ‘अग्नी’ क्षेपणास्त्रांची तैनात वाढवली आहे. ‘गगनयान’ मोहिमेच्या यशानंतर अंतराळ क्षेत्रातही भारताने अमेरिकेच्या ‘आर्टेमिस’ करारांतर्गत आपले स्थान पक्के केले असून, इस्रो (ISRO) आता जगासाठी सर्वात स्वस्त आणि विश्वासार्ह अंतराळ पर्याय बनली आहे.

    आव्हाने आणि भारताची ताकद

    इतकी ताकद असूनही आव्हाने कमी नाहीत. चीनसोबतचा लडाखमधील सीमावाद (LAC) २०२६ मध्येही पूर्णपणे सुटलेला नाही, ज्यामुळे भारताला सीमेवर सतत दक्ष राहावे लागते. तसेच, ऊर्जा आयातीवर असलेले अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत वेगाने ‘ग्रीन हायड्रोजन’ आणि ‘सौर ऊर्जे’कडे वळत आहे. अंतर्गत आर्थिक असमानता आणि बेरोजगारी हे देखील भारताच्या महासत्ता होण्याच्या मार्गातील महत्त्वाचे अडथळे आहेत, ज्यावर सरकारला भविष्यात तातडीने लक्ष द्यावे लागणार आहे.

    विश्वमित्र’ भारताचा उदय

    २०२६ मध्ये भारत कोणाचेही अंधानुकरण करत नाही किंवा कोणाशी विनाकारण संघर्षही ओढवून घेत नाही. भारत स्वतःचा मार्ग स्वतः निवडतो. “हे युद्धाचे युग नाही” हा पंतप्रधान मोदींचा २०२६ मधील जागतिक मंत्र शांततेचा आधार बनला आहे. भारत आज एका बाजूला अमेरिकेचे तंत्रज्ञान घेतोय आणि दुसऱ्या बाजूला रशियाशी जुने लष्करी संबंध टिकवून आहे. हे संतुलनच भारताला जगाचा खरा ‘विश्वमित्र’ बनवते.

    तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा! जागतिक घडामोडींच्या अशाच सखोल विश्लेषणाकरीता पुन्हा नक्की भेट द्या.

  • स्वतःमध्ये बदल घडवून मग हक्काने म्हणा ‘मेरा भारत महान’

    स्वतःमध्ये बदल घडवून मग हक्काने म्हणा ‘मेरा भारत महान’

    देश परकीय राजवटीतून मुक्त होऊन आज 77 वर्ष पूर्ण झाली, त्यामुळे भारतमातेच्या जयघोषात आजचा संपूर्ण दिवस भरून जाईल यात शंका नाही. मात्र उद्याचं काय? आजच्या रॅलीमध्ये हातात झेंडा घेऊन गेल्यानंतर उद्या तोच झेंडा रस्त्यावर पडलेला तर दिसणार नाही ना? दरवर्षीप्रमाणे आजही भाषण ऐकताना “अनेकांनी प्राणांची आहुती दिली आणि म्हणून आपल्याला आजचा सूर्य स्वतंत्रतेत अनुभवायला मिळतोय” हे वाक्य आपल्याला  रटाळ वाटेल, कारण “स्वातंत्र्य” या शब्दाची खरी ओळख गेल्या 77 वर्षात आपल्याला पटलेलीच नाही. आपण केवळ परकीयांच्या गुलामगिरीतूनच मोकळे झालेलो नाही, तर लोकशाहीमध्ये वावरणारे सर्वात भाग्यवान देशवासी आहोत. आपल्यावर कोणीही कसल्याही प्रकारची सक्ती करू शकत नाही याचे महत्त्व काय हे जो पिंजऱ्यात जखडलेला आहे त्यालाच कळेल. मात्र मिळालेलं स्वातंत्र्य उपभोगताना आपण मानसिकदृष्टया अजूनही मागासलेले आहोत याची जाणीव काही केल्या होत नाहीये.

    गेल्या 77 वर्षांत नक्कीच आपण अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. भारताचा इतिहास हा एकेकाळी वैभवशाली होता. असं म्हणतात, इथून सोन्याचा धूर निघायचा मात्र केवळ इंग्रजच नाही, तर अनेक परकीय आक्रमकांनी अनेकवेळा भारताला लुबाडलं, लुटून नेलं आणि तरीही आज भारत स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभा आहे. आज आपल्या देशातून सोन्याचा धूर निघत नसला तरीही भारताच्या अंतराळवीरांनी चंद्राला गवसणी घातली आहे, इथे अनेक राज्यांमध्ये आज मेट्रोच्या वेगवान गतीने प्रवास केला जातो, भारताच्या सीमेवर उभ्या असलेल्या सेनेच्या वाकड्यात जाण्याची हिंमत जगभरातील कोणतीही ताकद करत नाही किंवा करणार नाही, आपली अर्थव्यवस्था दरदिवशी सकारात्मक प्रगती करतेय, दूरसंचार क्रांती विविध क्षेत्रांना एका धाग्यात जोडून ठेवण्यात यशस्वी झाली आहे. हे आणि असे अनेक बदल पाहिले की सोन्याचा धूर पुन्हा निघायला जास्ती वेळ जाणार नाही यावर विश्वास बसतो. 

    मात्र चौफेर नजर फिरवल्यास प्रश्न पडतो की भारतात वावरणारा प्रत्येक माणूस सामान स्वातंत्र्य अनुभवत आहे का? पूरग्रस्त भागांमध्ये लोकं तेवढ्याच आनंदाने आजचा दिवस साजरा करत असतील का? सोशल मीडियाने जरी संपूर्ण देशाला एकत्र जोडलेलं असलं तरीही तुटलेल्या तारा आणि भंग झालेल्या कनेक्शनमुळे किती लोकं कोपऱ्यांमध्ये अडकून पडलेली असतील? धरतीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरच्या भागात आजही कोणीतरी जीव मुठीत धरून तर बसलेलं नसेल ना? लोकशाहीच्या राज्यात कुणावर धर्म बदलण्याची सक्ती केली जात नसेल ना? सरकारने अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्या तरीही भारतात आजही अनेक गावांमध्ये शिक्षणाचा अभाव आणि वैद्यकीय सुविधांची कमतरता यांमुळे स्वतःच्या घरात प्रसूतीची पीडा सोसणारी बाई आढळतेच. भारताच्या कितीतरी गावांची नावं देखील आपल्याला माहिती नाही, त्यांचा उल्लेख नकाशात नाही स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर देखील जिथे बालविवाह, स्त्रीभ्रूणहत्या, बलात्कार, बालमजुरी असे कितीतरी माणुसकीला काळिमा फासणारे प्रकार घडतात. शिक्षणाची इच्छा मनात बाळगून स्वतःच्या आई-वडिलांची नजर चोरून पावसाचं पाणी अंगावर सोसत जाणाऱ्या लहानग्यांच्या आणि अनेक पीडितांच्या डोक्यावर खरंच स्वातंत्र्याचा सूर्य उगवला आहे का असा प्रश्न पडतो. 

    म्हटलं तर भारतात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. येणाऱ्या काळात भारतातील तरुणांच्या मेहनतीवर इतर जगभरातील देश चालणार आहेत मग याच हुशारीचा उपयोग भारतालाच करवून दिला तर? तरुणपिढी देशाच्या भक्कम पाया आहे, मात्र हीच वयातील मुलं सोशल मीडियाचा गैरवारपर करताना किंवा संध्याकाळच्यावेळी मित्रांसोबत गप्पाष्टके करताना आढळतात.शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इथे कामाच्या संधी नाही म्हणत परदेशात जाणारे अनेक असतील पण मी माझ्या देशात राहून स्वतःसाठी तसेच इतरांसाठी देखील नोकरीच्या संधी तयार करेन असं देशाचा तरुण का म्हणत नाही? गावातील लोकं अशिक्षित आहेत, त्यांना स्वच्छतेचं महत्त्व माहिती नाही, कामाच्या शोधात शहरात येऊन ते शहराला मळवून टाकतायत असं म्हणत आपणच सुशिक्षित लोकं भारत सोडून परदेशी जातो. अशावेळी प्रश्न उभा राहतो की ज्या देशाला नावं ठेऊन, अशिक्षित म्हणत आपण अर्ध्यावर सोडून आलो त्याच भारताच्या स्वातंत्र्यदिनादिवशी “भारत माता की जय” म्हणावं तरी का? परदेशात ट्रॅफिकचे नियम किती कडक आहे हे सांगताना आपण थकत नाही, मात्र उठायला उशीर झाल्याने वाया गेलेला वेळ भरून काढताना ट्रॅफिक नियम मोडणारे देखील आपणच असतो. गावाकडून आलेली लोकं बेशिस्त आहेत, त्यांना स्वच्छतेचं महत्त्व माहिती नाही असं म्हणत स्वतःचं घर नीटनेटकं ठेऊन तोच कचरा बाहेर नेऊन टाकणारे देखील आपणच असतो. रस्त्याने चालताना खाल्लं जाणाऱ्या केळ्याची साल कचरापेटीत टाकणं आपल्याला शक्य होत नाही आणि दिवसभर उन्हात भूक आणि तहान विसरून केवळ दोन वेळचं जेवण मिळावं म्हणून तडफडणारा कचरा कर्मचारी आपल्याला मळकट वाटतो. 

    5f08f15d37ca4712ba08448f1cf0ed04
  • भारताला अंतराळात घेऊन जाणारे शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. विक्रम साराभाई…

    भारताला अंतराळात घेऊन जाणारे शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. विक्रम साराभाई…

    आनंदाची बाब म्हणजे भारताने पुन्हा एकदा प्रगतीचा मार्ग पकडला आहे. वर्ष १९६३ मध्ये भारताकडून पाहिलं रॉकेट लॉंच करण्यात आलं होतं. तेव्हापासून ते आत्तापर्यंतच्या प्रवासात अनेक चढ-उतार सर करत आपण चांद्रयान-२ ची मोहीम यशस्वी करून दाखवली. प्रत्येक भारतीयासाठी चांद्रयानाची मोहीम श्वास रोखून धरणारीच होती. भारताच्या अंतराळ प्रवासात अनेक बुद्धिवंतांनी योगदान दिलं आणि यातीलच म्हत्त्वाचे नाव म्हणजे विक्रम साराभाई. एवढं महत्त्वाचं का? जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. 

    विक्रम साराभाई कोण आहेत?

    विक्रम साराभाई यांना भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे (Indian Space Research Programme) जनक म्हणून ओळखलं जातं आणि आज विक्रम साराभाई यांची १०५वी जयंती आहे. वर्ष १९१९ मध्ये विक्रम साराभाई यांचा जन्म गुजरातमधील एका श्रीमंत कुटुंबात झाला. त्यांचे वडील अंबालाल साराभाई हे एक प्रसिद्ध उद्योगपती होते, तर आई सरला देवी मॉंटेसरी शिक्षण पद्धतीवर आधारित द रिट्रीट नावाची शाळा चालवायच्या. 

    विक्रम साराभाई यांच्या जन्माचा काळ पारतंत्र्याचा असल्याने त्यांच्या घरी सतत स्वातंत्र्यसैनिकांची ये-जा असायची, परिणामी महात्मा गांधी, रवीन्द्रनाथ टागोर, सरोजिनी नायडू, मौलाना आझाद यांच्याशी साराभाईंनी बालपणीच संवाद साधला होता. विक्रम साराभाई यांचं प्राथमिक शिक्षण घरीच झालं, सोबत अशा दिग्गजांचा सहवास लाभला म्हणूनच लहानग्या विक्रम यांच्यात देशभक्तीचं बाळकडू तेव्हाच रुजलं होतं.  

    कळत्या वयात अहमदाबादच्या गुजरात कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्चशिक्षणासाठी त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश मिळवला आणि  १९३९ साली रसायन आणि भौतिकशास्त्रात पदवी मिळवल्यानंतर बी.ए. आणि एम.ए.च्या पदव्या देखील पदरात पडून घेतल्या. विक्रम साराभाई यांचा शैक्षणिक प्रवास मात्र इथेच थांबत नाही, दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी भारतात परतलेल्या विक्रम साराभाई यांनी वर्ष १९४० मध्ये पीएच. डी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून डॉक्टरेट मिळवली आणि महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी ही पदवी डॉ. सी. व्ही. रमन यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली होती. 

    विक्रम साराभाई यांचा वैज्ञानिक प्रवास:

    वर्ष १९४७ रोजी भारत देश इंग्रजांच्या जुलुमी राजवटीतून मुक्त झाला आणि त्यानंतर विक्रम साराभाई यांच्या वैज्ञानिक प्रवासाची खरी सुरुवात देखील झाली. स्वतःच्या राहत्या घरातील एका खोलीमधून विक्रम साराभाई यांनी भौतिक संशोधन प्रयोगशाळेचा श्रीगणेशा केला होता. या जागेचे ऐतिहासिक महत्त्व देखील अपार आहे, कारण इथूनच अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे काम सुरु झाले होते. विक्रम साराभाई भौतिक प्रयोगशाळेची गरज जाणून होते, म्हणूनच मित्रांच्या आणि पालकांच्या साहाय्याने त्यांनी अहमदाबाद एज्युकेशन सोसायटीच्या एम्. जी. सायन्स इन्स्टिट्यूटमधे भौतिकशास्त्राची प्रयोगशाळा उभारली, हीच अहमदाबादची फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी होय. विक्रम साराभाई काही काळ इथे प्राध्यापक म्हणून जबाबदारी सांभाळत होते आणि त्यानंतर संचालक म्हणून देखील कार्यरत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रयोगशाळेमध्ये किरणविज्ञान, अवकाशविज्ञान आदींवर संशोधन केलं जायचं. 

    इस्रोची सुरुवात:

    कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण आज जगभरात नाव गाजवणाऱ्या ISRO ची सुरुवात विक्रम साराभाई यांनी वयाच्या २८व्या वर्षी केली होती. आपल्याला ज्या वयात नेमकं काय करिअर निवडावं याची खात्री नसते किंवा आपण तारुण्याच्या ओघात वहावत जात असतो. त्याच वयात साराभाईंनी ISROची निर्मिती केली होती. सरकार दरबारी पायऱ्या झिजवून, सरकारला भौतिकशास्त्राचे महत्त्व पटवून देत साराभाई यांनी भारतीय अंतराळ संशोधन समितीची (INCOSPA) निर्मिती केली, ज्याचे नाव पुढे बदलून भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच  ISRO असे करण्यात आले. 

    भारताकडून आर्यभट्ट नावाचा पहिला अंतरिक्ष उपग्रह अवकाशात सोडण्यात आला होता, ज्याची रचना अहमदाबाद रिसर्च सेंटरमध्ये करण्यात आली होती. आर्यभट्टच्या यशस्वी उड्डाणानंतर अनेक उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आणि या सर्वांमध्ये विक्रम साराभाई यांचा वाटा महत्वाचा होता. 

    vs photo 167 759 1

    पहिले रॉकेट लॉंच:

    वर्ष १९६३ मध्ये केरळमधील थुंबा नावाच्या गावातून चर्चची जमीन विकत घेण्यात आली, जिथे नंतर थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशनची (TERLS) स्थापना करण्यात आली. याच ठिकाणी भारताचं पहिलं रॉकेट लाँच करण्यात आलं होतं. आज याच लॉंचिंग स्टेशनला विक्रम साराभाई अंतराळ केंद्र म्हणून ओळखलं जातं. डॉ. अब्दुल कलाम देखील त्यांच्या यशाचे श्रेय डॉ. विक्रम साराभाई यांनाच देतात, डॉ. अब्दुल कलाम म्हणतात की, “मी शिक्षणात कधीच गुणवान नव्हतो. केवळ माझी मेहनत बघून डॉ. साराभाई यांनी मला पुढे जाण्याची प्रेरणा दिली.”

    विविध संस्थांची स्थापना:

    डॉ. विक्रम साराभाई यांनी विविध संस्थांच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट असो किंवा टेक्स्टाइल रिसर्च असोसिएशन साराभाई यांनी नेहमीच देशाला नवीन दिशा  दाखवण्याचा प्रयत्न केला. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) व्यतिरिक्त ऑपरेशन रिसर्च ग्रुप, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन आणि पत्नी मृणालिनी साराभाई यांच्या सहकार्याने त्यांनी दर्पण ॲकॅडमी फॉर परफॉर्मिंग आर्ट्सची स्थापना केली.

  • स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर क्रांतिदिनाचे महत्त्व काय?

    स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर क्रांतिदिनाचे महत्त्व काय?

    भारत आणि भारताचा  स्वतंत्रता संग्राम येणाऱ्या अनेक वर्षांसाठी प्रत्येकाच्या मनात घर करून राहील असा दैदिप्यमान आहे. भारताला परकीयांच्या जाळातून मोकळं करण्यासाठी कित्येक आहुती स्वातंत्र्य देवतेच्या यज्ञ कुंडात अर्पण झाल्या आणि त्यानंतर मिळालं ते आज आपण उपभोग घेत असलेलं स्वातंत्र्य. भारताच्या इतिहासातील या पर्वाचे अनेक टप्पे आणि कोपरे आहेत आणि आज आपण यातीलच क्रांती दिवसाचं पान उलघडणार आहोत… 

    आपण क्रांती दिवस का साजरा करतो?

    भारताच्या स्वातंत्र्य इतिहासात डोकावण्याआधी आपण इतिहास म्हणजे काय हे जाणून घेऊया. इतिहास या शब्दाची संस्कृत भाषेत अतिशय उत्तम फोड करण्यात आली आहे, इति-ह-आस इति इतिहास शब्दः म्हणजेच काय तर जे घडलं, जसं घडलं त्याची मांडणी म्हणजे इतिहास होय. भारताचा इतिहास खूपच जुना आहे, प्रत्येक टप्प्यावर हा इतिहास बदलत जातो आणि प्रत्येकाचं स्वतःचं असं एक महत्व आहे. पैकी एक म्हणजे भारताचा स्वातंत्र्यसंग्राम. परकीयांच्या आक्रमणानंतर स्वतःच्याच भूमीत माणसं दबली जात होती आणि हीच राजवट दूर करण्यासाठी भारतीयांनी स्वतंत्रता मोहीम सुरु केली, यात अनेक ज्ञात-अज्ञात कुटुंब पणाला लागली, कितीतरी चुली कायमच्या विझल्या गेल्या. 

    भारत स्वतंत्रता संग्रामाचे दोन विभाग पडतात, एक म्हणजे अहिंसावादी आणि दुसरा हिंसावादी. वेगळ्या शब्दांत मांडायचं तर सशस्त्र क्रांती आणि विनाशस्त्र क्रांती. दोन वेगळ्या विचारांची ही माणसं जरी त्या-त्या विचारसरणीला धरून लढत असली तरीही त्यांचा उद्देश मात्र एकच होता. अहिंसावादी गटाचे नेतृत्व महात्मा गांधी करायचे. गांधीजींच्या मते हातात शस्त्र घेऊन केलेल्या युद्धात अनेक निष्पाप बळी जात असत. ते नेहमी म्हणायचे की अस्त्र-शस्त्राविना देखील क्रांती घडवता येते आणि म्हणून त्यांनी मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन असे कैक मार्ग देखील स्वीकारले होते. यापैकी भारत छोडो आंदोलन हे महात्मा गांधींकडून उचलण्यात आलेलं सगळ्यात शेवटचं पाऊल होतं. 

    आजच्या दिवशीच म्हणजे 8 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींनी काँग्रेसच्या मुंबई अधिवेशनात सदर आंदोलनाची घोषणा केली होती. गांधीजींकडून इंग्रजांना हद्दपार करण्यासाठी केलेला हा सर्वात मोठा प्रयत्न म्हटला जातो, कारण यावेळी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकासाठी हा क्षण ‘करो या मरो’ असाच होता. देशभरातून महात्मा गांधींना प्रचंड प्रतिसाद मिळाला. भारतीय लोकं त्याकाळी महात्मा गांधींना एका नेत्याच्या रूपात पाहायचे, गांधीजी एखादी गोष्ट सांगतायत म्हणजे ती बरोबरच असेल याची त्यांना खात्री वाटायची. एकार्थी काय तर गांधीजी भारतीयांसाठी अंधारात दिसणाऱ्या दिव्याप्रमाणे होते आणि म्हणून लोकांनी दरवेळीप्रमाणे या वेळी देखील गांधीजींना सोबत केली.

    भारत छोडो आंदोलनात अरुणा असफ अली यांची भूमिका फारच महत्वाची ठरते. त्याकाळी अरुणाबाई भूमिगत होऊन वावरत होत्या आणि सदर आंदोलनात त्यांनी देशातील तरुणांना एकत्र करत आंदोलनाचा भाग बनवलं होतं. एवढंच नाही तर अरुणाबाईंनी या आंदोलनात गोवालिया टँक मैदानावर भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्याचे धाडस केलं होतं. अरुणा असफ अली यांच्या धाडसी स्वभावामुळे आजही ग्रँड ओल्ड लेडी म्हणत त्याच्या कार्याचा गौरव केला जातो. 

    193957 rgergerg

    भारतमातेला परकीयांच्या जुलुमापासून मुक्त करण्यासाठी उठलेल्या लाटेला रोखणं इंग्रजांसाठी कठीण झालं होतं आणि म्हणूनच चळवळीस सुरुवात झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने 9 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींसह काँग्रेसच्या इतर मोठ्या नेत्यांना अटक करुन चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला. हा ऐतिहासिक दिवस लक्षात ठेवण्यासाठी ‘9 ऑगस्ट’ हा ‘ क्रांती दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

  • अवघ्या पाच हजार रुपये भांडवलातून सुरू केलेल्या उद्योगातून जगप्रसिद्ध ल्युपिन फार्मा कंपनी साकारणारे देशबंधू गुप्ता यांचा जन्मदिन

    अवघ्या पाच हजार रुपये भांडवलातून सुरू केलेल्या उद्योगातून जगप्रसिद्ध ल्युपिन फार्मा कंपनी साकारणारे देशबंधू गुप्ता यांचा जन्मदिन

    desh bandu lupin

    २६ जून २०१७ रोजी त्यांचे निधन झाले. प्रकृती बरी नसल्याने त्यांनी पाच वर्षांपूर्वीच ल्युपिनची सूत्रे कन्या विनिता गुप्ता व पुत्र नीलेश गुप्ता यांच्याकडे सोपवली होती. ल्युपिनने गेल्या दशकात किमान १२ कंपन्या अधिग्रहित केल्या, त्यातील सहा कंपन्यांचे अधिग्रहण गेल्या दोन वर्षांत पूर्ण झाले.‘गॅव्हिस’ या ८८ कोटी डॉलर्सच्या अमेरिकी जेनरिक औषध कंपनीचे अधिग्रहण ल्युपिनने केले; ते कुठल्याही भारतीय औषध कंपनीने केलेले सर्वात मोठे अधिग्रहण.

    ‘डीबी’यांचा जन्म राजस्थानातील राजगडचा. रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर ते पिलानीच्या बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्राध्यापक होते. कालांतराने त्यांनी औषध उद्योगात उतरून मानवाला सतावणाऱ्या रोगांशी लढण्याचे ठरवले, त्यातूनच मुंबईत येऊन ‘ल्युपिन लिमिटेड’या कंपनीची स्थापना १९६८ मध्ये केली. पत्नीने वाचवलेल्या पैशातून त्यांनी पहिल्यांदा जीवनसत्त्व निर्मितीचा उद्योग सुरू केला. अवघ्या पाच हजार रुपये भांडवलातून सुरू केलेल्या या छोट्या उद्योगातून पुढे ४.८ अब्ज डॉलर्सची कंपनी साकारली. २००३ पर्यंत ते कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष होते. पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात औषध निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकणे हे तसे धाडसाचे; पण‘डीबीं’नी ल्युपिनमुळे औषधनिर्मितीत एक गतिशील वातावरण तयार केले.

    How Deshbandhu Gupta Turned Rs. 5000 into a Global Pharma Company

    त्याचबरोबर काही मूल्यांचा वारसा तयार केला. ही देशी औषध कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली. बीएसई सेन्सेक्स ३० कंपनी म्हणून ओळखली जाणारी ल्युपिन ही जेनरिक (प्रजातीय) औषध निर्मिती क्षेत्रातील बाजारपेठ भांडवलीकरणात जगातील दहाव्या क्रमांकाची कंपनी आहे. जागतिक महसुलाचा विचार करता ती भारतातील चौथ्या क्रमांकाची औषध कंपनी आहे. जपान व दक्षिण आफ्रिका या देशात ल्युपिन अनुक्रमे सहाव्या व चौथ्या क्रमांकावर आहे. सध्या कंपनीची उलाढाल ४.८ अब्ज डॉलर्सहून अधिक असून ५० हजारांपेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. अलीकडेच अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने त्यांच्या मध्य प्रदेशातील पिथमपूर येथील उत्पादन प्रकल्पाबाबत काही निरीक्षणे मांडली होती.

    डॉ. गुप्ता यांनी १९८८ मध्ये ग्रामीण भागातील दारिद्रय़ दूर करण्यासाठी ल्युपिन ह्य़ूमन वेल्फेअर अ‍ॅण्ड रीसर्च फाउंडेशन ही संस्था स्थापन केली. त्यामुळे ३४६३ खेडय़ांतील २८ लाख लोकांना लाभ झाला. विपश्यनेचे ते साधक होते व त्यांनी ग्लोबल विपश्यना फाउंडेशनचे विश्वस्त, तसेच जुहूच्या इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. २०१५ मध्ये फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत त्यांचा २५४ वा क्रमांक होता. क्षयरोगावरील औषधांसाठी ल्युपिन कंपनी प्रसिद्ध आहे. पाच वर्षांपूर्वी कंपनीने या औषधांची निर्मिती सुरू केली, कालांतराने त्यातील नफा कमी झाला, तेव्हा नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या पत्नी मंजू यांचा सल्ला घेतला. त्यावर त्या म्हणाल्या की, ‘हमारी रोटी तो हमें मिल रही हैं ना’ त्यानंतर क्षयाच्या औषधांचे उत्पादन बंद करण्याचा विचार त्यांच्या मनाला शिवलाही नाही.

    The Life and Legacy of Deshbandhu Gupta, Founder of Lupin Pharma

    सौ. लोकसत्ता, व्यक्तिवेध

    आणखी वाचा