Tag: businessmarathi

  • जगातील शेवटचा रस्ता – नॉर्वेतील अद्भुत E-69 महामार्ग – E-69 Highway

    जगातील शेवटचा रस्ता – नॉर्वेतील अद्भुत E-69 महामार्ग – E-69 Highway

    नॉर्वेतील E-69: समुद्र, बर्फ आणि ग्लेशियरांच्या कुशीतला अद्भुत प्रवास

    जगभरात अनेक पर्यटनस्थळे आहेत. कुठे उंच डोंगर दिसतात, कुठे सुंदर आणि शांत समुद्रकिनारे, तर कुठे दाट हिरवीगार जंगलं किंवा मोठमोठी शहरे पाहायला मिळतात. प्रत्येक प्रदेशाची स्वतःची खास ओळख आणि आकर्षण असते. प्रवाशांना नवीन अनुभव मिळतात, निसर्गाची विविधता जाणवते आणि काही ठिकाणे तर पूर्णपणे अद्भुत आणि विस्मयकारक असतात. जगातील प्रत्येक कोपऱ्यात काहीतरी वेगळं आहे, जे प्रवाशांना नेहमीच वेगळ्या अनुभवासाठी ओढतं.

    पण तुम्ही कधी विचार केला आहे का, जगात असा रस्ता आहे जो एका टोकाला पोहोचल्यावर थेट संपतो? असा रस्ता खरोखर अस्तित्वात आहे आणि तो पाहून प्रत्येकाला थोडासा आश्चर्य आणि कुतूहल वाटतं. या रस्त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, तो कुठे आहे आणि त्याचा इतिहास काय आहे, हे जाणून घेणं खूपच रोचक आहे. आज आपण या लेखात “जगातील शेवटच्या रस्त्याबद्दल” जाणून घेऊया . 

    जगातील शेवटचा रस्ता कुठे आहे?

    जगातील शेवटचा रस्ता आहे युरोपातील नॉर्वे या देशात. या रस्त्याचे नाव E-69 Highway आहे. हा रस्ता जगातील सर्वात उत्तरेकडील रस्ता मानला जातो, म्हणून त्याला ‘जगाचा शेवटचा रस्ता’ असेही म्हटले जाते. प्रवाशांसाठी हा रस्ता खूपच आकर्षक आहे कारण तो उंच पर्वत, निळसर समुद्रकिनारे आणि निसर्गाची अप्रतिम सुंदरता दाखवतो.

    या रस्त्याचा शेवट Nordkapp (नॉर्डकॅप) येथे होतो, जे युरोपचा सर्वात टोकाचा भाग मानला जातो. हे ठिकाण पाहताना तुम्हाला असं वाटतं की तुम्ही खरोखर जगाच्या एका टोकावर पोहोचलात. E-69 Highway आणि Nordkapp हे ठिकाण निसर्गप्रेमी आणि साहसप्रेमी प्रवाशांसाठी खूप खास अनुभव देणारे आहे, आणि या रस्त्यावरून प्रवास केल्यास नॉर्वेच्या अप्रतिम सौंदर्याचा आनंद घेता येतो. 

    रस्त्याचा शेवट कसा दिसतो?

    E-69 रस्त्याचा शेवट जवळ येताच, तुम्हाला एका अनोख्या आणि विस्मयकारक दृश्याचा अनुभव होतो. रस्त्याचा शेवट झाल्यावर समोर फक्त अथांग समुद्र, उंच हिमनदी (ग्लेशियर) आणि निळसर आकाश दिसतं. प्रवास करताना जाणवलेली गर्दी, रस्त्याची गती, आणि आसपासची निसर्गरम्यता अचानक थांबते आणि जणू काही तुम्ही एका शांत, वेगळ्या जागेत पोहचतात.

    या ठिकाणी उभं राहून तुम्हाला असं वाटतं की पुढे काहीच मार्ग नाही,जणू जगाचं शेवटचं टोक येथे आहे. समोर पसरलेली विशालता आणि निसर्गाची अप्रतिम सुंदरता पाहून प्रत्येकाला एक अनोखी भावना निर्माण होते. कितीही प्रवास केले तरी, काही गोष्टींना आपल्याला थेट अनुभवायला मिळतात आणि हा रस्ता त्यातील एक अप्रतिम उदाहरण आहे.

    E-69 महामार्गाची खास वैशिष्ट्यं

    जगातील शेवटचा रस्ता – नॉर्वेतील अद्भुत E-69 महामार्ग


    E-69 महामार्ग सुमारे १२९ किलोमीटर लांब आहे. जरी रस्ता मोठा नसला तरी, त्यावरचा प्रवास अत्यंत साहसी आणि रोमांचक मानला जातो. हा रस्ता युरोपच्या उत्तरेकडे असल्यामुळे हवामान खूप थंड असते. हिवाळ्यात रस्ता पूर्ण बर्फाने झाकला जातो, जोरदार बर्फवृष्टी होते आणि दृष्टीक्षेपही कमी होतो. अशा कठीण परिस्थितीत प्रशासन नेहमीच सुरक्षिततेची काळजी घेतं, त्यामुळे काही वेळा एकट्याने वाहन चालवण्यावर बंदी घालतात.

    E-69 महामार्गाची आणखी एक अद्भुत गोष्ट म्हणजे येथे सूर्यप्रकाशाचे  विचित्र वेळापत्रक. वर्षाच्या अर्ध्या काळात सूर्य उगवत नाही आणि संपूर्ण प्रदेश पूर्ण काळोखात बुडतो. उरलेल्या अर्ध्या काळात मात्र सूर्य २४ तास आकाशात असतो आणि रात्रीचं अस्तित्वच राहत नाही. म्हणजे या रस्त्यावर प्रवास करताना तुम्ही सहा महिने अंधारात आणि सहा महिने उजेडात जगण्याचा अनोखा अनुभव घेता. हा अनुभव जगात कुठेही सहज मिळत नाही आणि प्रवाशांसाठी खरोखरच अविस्मरणीय ठरतो.

    नॉर्वेचा हा रस्ता का खास?



    E-69 रस्ता पाहताना तुम्हाला अनेक अद्भुत अनुभव मिळतात. आर्क्टिक सरहद्दीजवळून प्रवास करताना हवामान कठीण आणि साहसी असते, तर दिवस-अंधाराचे अनोखे चक्र पाहायला मिळते. रस्त्याजवळ पसरलेला अथांग समुद्र, चमकणारा बर्फ आणि उंच ग्लेशियर यांचे निसर्गसौंदर्य या प्रवासाला अविस्मरणीय बनवते. हे सर्व घटक मिळून E-69 रस्ता जगातील सर्वात वेगळे आणि रोमांचक ठिकाण बनवतात.

    मित्रांनो, जगाचा शेवटचा रस्ता पाहण्याचा अनुभव प्रत्येक प्रवाशासाठी खूप खास आहे. नॉर्वेतील E-69 Highway फक्त एक रस्ता नाही, तर पृथ्वीच्या शेवटच्या टोकापर्यंतचा रोमांचक प्रवास आहे. जर तुम्हाला निसर्गाची मोहकता, साहसी प्रवास आणि जगातील अनोख्या ठिकाणांचा अनुभव घेण्याची आवड असेल, तर हा रस्ता नक्कीच तुमच्या ‘बकेट लिस्ट’मध्ये असायला हवा.

    आणखी वाचा:

  • Referrush Success Story: लकवा झाला… पण आज कमवतो रोज दीड लाख रुपये!

    Referrush Success Story: लकवा झाला… पण आज कमवतो रोज दीड लाख रुपये!

    यशाचा मार्ग कधीच सोपा नसतो. त्यात मेहनत, संघर्ष आणि जिद्द असते. प्रत्येकजण या मार्गावर यशस्वी होतोच असं नाही, पण काही जण अपयशाला न जुमानता पुढे जातात आणि स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करतात. विक्रम पै हे या गोष्टीचं उत्तम उदाहरण आहे.

    बंगळुरूमधील हा तरुण उद्योजक आज ReferRush या प्रसिद्ध ई-कॉमर्स रेफरल सेल्स प्लॅटफॉर्मचा संस्थापक आणि सीईओ आहे. पण त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. गेल्या सहा वर्षांत त्याने पाच व्यवसाय सुरू केले, पण त्यातला एकही यशस्वी झाला नाही. त्यामुळे त्याला तब्बल दोन कोटी रुपयांचे नुकसान सहन करावं लागलं. तरीही त्याने हार मानली नाही. प्रत्येक अपयशातून शिकत, जिद्दीने पुढे जात अखेर ReferRush हा यशस्वी व्यवसाय उभारला. आज तो केवळ एक यशस्वी उद्योजक नाही, तर चिकाटी आणि मेहनतीचं उत्तम उदाहरण आहे. या लेखात आपण त्याच्या संघर्षमय प्रवासावर एक नजर टाकूया.  

    सुरुवातीचा संघर्ष आणि सलग अपयश

    बंगळुरूमध्ये जन्मलेल्या विक्रमने शिक्षण पूर्ण केल्यानंतर मोठ्या आत्मविश्वासाने आणि उत्साहाने उद्योजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्याची स्वप्नं मोठी होती, यशस्वी होण्याची जिद्दही होती. मात्र, व्यवसायाच्या वाटचालीत अनेक अडथळे आले. अनुभव आणि योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे त्याने सुरू केलेले एक-दोन नव्हे, तर तब्बल पाच व्यवसाय अपयशी ठरले. सततच्या अपयशामुळे मोठं आर्थिक संकट कोसळलं. त्याला जवळपास दोन कोटी रुपयांचं नुकसान झालं. परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत गेली. मित्रांनी दुरावा निर्माण केला, नातेवाईक टीका करू लागले आणि आईचाही त्याच्यावरचा विश्वास कमी झाला. एका क्षणाला परिस्थिती अशी आली की, खिशात फक्त ४,००० रुपये उरले. कर्मचाऱ्यांना पगार देणेही शक्य नव्हते. काही जणांनी त्याची थट्टा केली. “एलन मस्क बनायचा प्रयत्न करतोय का?” असे टोमणे मारले.

    सततच्या तणावाचा परिणाम त्याच्या प्रकृतीवर झाला. मानसिक तणावामुळे शरीर साथ सोडू लागलं. अखेर त्याला लकवा झाला आणि त्याचे चालणे, बोलणेही कठीण झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्यासारखी वाटू लागली. तो खचला, रडला, पण हार मानली नाही. डोळ्यांतले स्वप्न जिवंत ठेवत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. या कठीण काळात स्वतःशीच लढण्याचा निर्धार केला आणि नव्या उर्जेने पुन्हा उभं राहण्याचा निश्चय केला.

    ReferRush ची स्थापना आणि पहिलं यश

    अनेक अपयशांनंतरही विक्रमने हार मानली नाही. नव्या उमेदीनं त्याने ReferRush या रेफरल मार्केटिंग प्लॅटफॉर्मची सुरुवात केली. सुरुवातीला हा व्यवसायही अपयशी ठरेल, असं अनेकांना वाटत होतं. पण यावेळी विक्रम मागे हटणार नव्हता. ReferRush व्यवसायांना त्यांच्या ग्राहकांच्या माध्यमातून नवीन ग्राहक मिळवण्यासाठी मदत करतं. ग्राहक कंपनीच्या उत्पादनांची माहिती इतरांना सांगतात आणि त्याबदल्यात त्यांना कमिशन मिळतं. त्यामुळे कंपन्यांना विश्वासार्ह ग्राहक मिळतात, तर ग्राहकांनाही घरबसल्या कमाईचा पर्याय उपलब्ध होतो. हळूहळू हा व्यवसाय स्थिरावत गेला आणि ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला.

    सुरुवातीला पहिल्या एक लाख रुपयांसाठी तब्बल चार महिने लागले. पण विक्रमने मेहनत आणि जिद्द कायम ठेवली. त्याच्या प्रयत्नांचा परिणाम दिसू लागला आणि आज ReferRush दररोज १.५ लाख रुपये कमवतो. अपयशाच्या काळात खचून न जाता ज्या चिकाटीने विक्रमने प्रयत्न सुरू ठेवले, त्याच जिद्दीमुळे त्याला यशाचा हा टप्पा गाठता आला.

    निखील कामतकडून ReferRush ला फंडिंग – यशाच्या नव्या पर्वाची सुरुवात

    विक्रमच्या अथक मेहनतीला अखेर मोठं यश मिळालं. त्याच्या ReferRush या रेफरल मार्केटिंग स्टार्टअपने उद्योगविश्वात ठसा उमटवायला सुरुवात केली होती. याच प्रवासात, भारतातील नामवंत उद्योजक निखील कामत यांच्या कंपनीने ReferRush ला इनिशिएटिव्ह फंडिंगसाठी निवडलं. तब्बल २,४०० कंपन्यांमधून ReferRush ची निवड होणं हे विक्रमसाठी एका मोठ्या यशाचं प्रतीक होतं. यामुळे केवळ आर्थिक पाठबळच नाही, तर या प्लॅटफॉर्मच्या भविष्यासाठीही एक मजबूत दिशा मिळाली. आता त्याला ठाम विश्वास आहे की, लवकरच प्रत्येक ई-कॉमर्स ब्रँड आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी ReferRush चा वापर करेल.

    2

    विक्रमच्या मते, त्याचा संपूर्ण प्रवास हा शिकण्याचा होता. सुरुवातीची पाच वर्षं त्याने प्रयोग आणि चुका यातून शिकण्यात घालवली. अपयश आलं तरीही आत्मविश्वास कधीही गमावला नाही. व्यवसायात संकटं आली, आर्थिक तोटा सहन करावा लागला, शारीरिक आणि मानसिक त्रासही सोसावा लागला. पण तरीही तो जिद्दीने लढत राहिला. त्याच्या मते, “जर तुमच्या मूलभूत गरजा पूर्ण होत असतील, तर तुम्ही तुमचं स्वप्न नक्कीच साकार करू शकता.”

    आज विक्रमच्या संघर्षाची कहाणी हजारो तरुण उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अपयशाला घाबरून थांबण्यापेक्षा त्यातून शिकून पुढे जाणं हेच यशाचं खरं रहस्य आहे. विक्रमने ते करून दाखवलं. 

    आणखी वाचा:

  • Railways Book Now Pay Later Scheme | अचानक रेल्वेने प्रवास करायचा आहे, पण तिकीटासाठी पैसे नाहीत? भारतीय रेल्वेची ‘बुक नाऊ, पे लेटर’ योजना मदतीसाठी तयार!

    Railways Book Now Pay Later Scheme | अचानक रेल्वेने प्रवास करायचा आहे, पण तिकीटासाठी पैसे नाहीत? भारतीय रेल्वेची ‘बुक नाऊ, पे लेटर’ योजना मदतीसाठी तयार!

    भारतीय रेल्वे कोट्यवधी प्रवाशांसाठी स्वस्त, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा उत्तम पर्याय आहे. आपण घरापासून लांब राहत असू किंवा अचानक कुठे प्रवास करण्याची गरज भासली, तर रेल्वेचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. मात्र, काही वेळा तिकीट बुक करताना आपल्याकडे पुरेसे पैसे नसतात आणि त्यामुळे अडचण निर्माण होते.

    पण आता काळजी करण्याची गरज नाही! भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी ‘बुक नाऊ, पे लेटर’ ही नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे आपण तिकीट त्वरित बुक करू शकतो आणि त्यासाठीचे पेमेंट प्रवासानंतर १४ दिवसांच्या आत करू शकतो. म्हणजेच, अचानक प्रवास करावा लागला आणि तिकीटासाठी पुरेसे पैसे हाताशी नसले, तरीही ही योजना मदतीला येते.

    या लेखात जाणून घेऊया की ही योजना नेमकी कशी कार्य करते, कोणाला याचा लाभ मिळू शकतो आणि त्याचे फायदे काय आहेत.

    ‘बुक नाऊ, पे लेटर’ योजनेचा लाभ कसा घ्यावा?

    भारतीय रेल्वेने ही योजना फक्त ऑनलाईन तिकीट बुकिंगसाठी लागू केली आहे. याचा फायदा घेण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा 

    1. रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी सर्वप्रथम IRCTC वेबसाइट किंवा मोबाईल अ‍ॅपवर लॉगिन करा.

    2. आपल्या प्रवासासाठी योग्य ट्रेन, प्रवाशांची संख्या आणि प्रवासाची तारीख निवडा. त्यानंतर उपलब्ध तिकिटे तपासा आणि तुमच्या सोयीच्या गाडीसाठी तिकीट निवडा.

    3. तिकीट बुक करताना पेमेंट करण्यासाठी वेगवेगळे पर्याय दिसतील. त्यापैकी ‘पे लेटर’ हा पर्याय निवडा, ज्यामुळे तुम्हाला तिकीट शुल्क त्वरित न भरता प्रवासानंतर १४ दिवसांच्या आत पैसे भरण्याची सुविधा मिळते.

    4. जर तुम्ही पहिल्यांदाच या सुविधेचा वापर करत असाल, तर EpayLater या प्लॅटफॉर्मवर जाऊन तुमची नोंदणी करा. यासाठी तुमचा मोबाईल नंबर, ई-मेल आणि KYC संबंधित आवश्यक माहिती द्यावी लागेल.

    5. EpayLater वर नोंदणी झाल्यानंतर, तुमच्या IRCTC खात्यातून तिकीट बुकिंग प्रक्रिया पूर्ण करा. तिकीट यशस्वीपणे बुक झाल्यावर तुम्हाला ई-मेल आणि SMS द्वारे त्याचा तपशील मिळेल.

    6. तिकीट बुक केल्यानंतर तुमच्या प्रवासानंतर १४ दिवसांच्या आत EpayLater च्या माध्यमातून पेमेंट करणे आवश्यक आहे. जर दिलेल्या वेळेत पैसे भरले, तर कोणतेही अतिरिक्त शुल्क लागणार नाही. मात्र, उशीर झाल्यास व्याज किंवा दंड आकारला  जातो.

    ‘बुक नाऊ, पे लेटर’ योजना का उपयुक्त आहे?

    रेल्वे प्रवास करताना अनेकदा अचानक प्रवास करण्याची गरज भासते, पण तिकीट बुक करताना तत्काळ पैसे उपलब्ध नसतात. अशा वेळी ‘बुक नाऊ, पे लेटर’ ही योजना अत्यंत फायदेशीर ठरते. या सुविधेमुळे तिकीट त्वरित बुक करता येते, पण त्याचे पैसे नंतर भरता येतात. त्यामुळे अचानक प्रवासाची वेळ आली तरीही कोणतीही अडचण न येता तुम्ही सहज प्रवास करू शकता.

    प्रवाशांना पैशांची व्यवस्था करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. शिवाय, ही प्रक्रिया अगदी सोपी असून जास्त कागदपत्र लागत नाहीत. फक्त IRCTC च्या EpayLater च्या मदतीने काही मिनिटांत तिकीट बुक करता येते.

    ही योजना वारंवार रेल्वे प्रवास करणारे प्रवासी, विद्यार्थी, नोकरीसाठी प्रवास करणारे नोकरदार आणि व्यावसायिक यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तिकीट बुकिंगच्या वेळी पैशांची कमतरता जाणवत असेल, तर ही सुविधा नक्कीच दिलासा देणारी ठरेल.

    योजनेचे फायदे 

    • तिकीट बुक करताना लगेच पैसे द्यावे लागत नाहीत, त्यामुळे अचानक प्रवास करायचा असल्यास आर्थिक ताण येत नाही.
    • ही सुविधा फक्त ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी उपलब्ध असल्याने तिकीट सहज आणि झटपट मिळते.
    • ठरवलेल्या मुदतीत पैसे भरल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क लागत नाही.
    • मुदतीनंतर पैसे भरल्यास फक्त ३.५% सेवा शुल्क आकारले जाते, त्यामुळे मोठा आर्थिक बोजा पडत नाही.

  • यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो: There is no shortcut to success.

    यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो: There is no shortcut to success.

    घरबसल्या लाखो-करोडो कमवा, तुमचे पैसे दुप्पट करा, नेटवर्क मार्केटिंग मधून करोडपती व्हा अशा अनेक फसव्या जाहिराती दररोज वर्तमानपत्रांमध्ये झळकत असतात. अशा झटपट आणि क्षणात श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी तरुण वर्ग फसतो आणि बळी पडतो. शेवटी अपयश आणि निराशा वाट्याला येते. मला कोणीतरी गॉडफादर भेटेल, श्रीमंत बनण्याची एखादी मोठी संधी चालून येईल किंवा देवाचा साक्षात्कार होईल अशी आपण अपेक्षा धरुन बसतो. अचानक राजयोग येऊन माझ्या आयुष्याला एका दिवसात कलाटणी मिळेल, माझं आयुष्य बदलून जाईल असं बहुतेकांना वाटत असतं. प्रयत्न, चिकाटी, परिश्रम, कष्ट, संघर्ष करण्याऐवजी सगळं सहज व्हावं, सहज मिळावं असं वाटत असतं. मात्र यशाला शॉर्टकट नसतो आणि शॉर्टकटने मिळालेलं यश हे शाश्वत देखील नसतं. अचानक एखादी संधी चालून येईल किंवा कोणीतरी आपल्या मदतीला येईल अशी आशा वाटणे हे स्वतःच्याच नाकर्तेपणाचे सर्वात मोठे लक्षण आहे. 

    जेव्हा आपला स्वतःचा स्वतःच्याच सामर्थ्यावर विश्वास नसतो तेव्हा अशा प्रकारच्या निरर्थक अपेक्षा आपण धरून राहतो. मित्रांनो तुम्हाला आयुष्यात जे काही मिळवायचे आहे, जे कोणते ध्येय साध्य करायचे आहे ते मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःला रणांगणात उतरावं लागेल, स्वतः झगडावं लागेल. आपल्या प्रत्येकाच्या अस्तित्वाचं काही ना काही कारण आहे, ते कारण आपल्याला शोधायचंय आणि त्या कारणाच्या पूर्ततेसाठी काम करायचंय. यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो त्यासाठी मेहनतीचा यज्ञ प्रत्येकाला पेटवावाच लागतो. शॉर्टकटने मिळालेल्या यशानं तुम्ही जितके लवकर वर जाता, तितक्याच लवकर तुम्ही खाली देखील येता. थ्री इडीयट्स मध्ये आमिर खानने म्हटल्याप्रमाणे “सक्सेस के पीछे मत भागो, मेहनत इतनी करो की सक्सेस खुद आपके पीछे आयेगी.

    Shortcut आणि Smartwork मध्ये काय फरक आहे?

    1. Shortcut :

    •    हे काम जलद पूर्ण करण्यासाठी वापरलेले छोटे मार्ग किंवा तात्काळ उपाय असतात.
    •    शॉर्टकट कधी कधी गुणवत्ता किंवा दीर्घकालीन परिणामांवर परिणाम करू शकतो.
    •   शॉर्टकटमध्ये फक्त काम पटकन संपवणे हे उद्दिष्ट असते, त्यामागे ठराविक उद्दिष्ट किंवा हेतू नसतो.

       उदाहरण: प्रोजेक्टमध्ये आवश्यक माहिती न वाचता थेट निष्कर्ष लिहिणे.

    2. Smart Work :

    •    हे काम चांगल्या पद्धतीने आणि नियोजनबद्ध मार्गाने कमी वेळात पूर्ण करण्याचे तंत्र आहे.
    •    स्मार्ट वर्कमध्ये तंत्रज्ञान आणि कौशल्य वापरून कामाचे नियोजन केले जाते.
    •    दीर्घकालीन यश आणि गुणवत्तेला प्राधान्य दिले जाते.

    Shortcut वापरल्याने फक्त तात्पुरते फायदे मिळतात, तर Smart Work दीर्घकालीन आणि शाश्वत यशाकडे नेते.

    There is no shortcut to success.

    Smart Work म्हणजे काय?

    Smart Work म्हणजे कमी वेळेत अधिक परिणाम साधणे. मेहनत कमी पण ती मेहनत योग्य दिशेने करणे महत्त्वाचे आहे. शॉर्टकट घेताना विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. 

    Smart Work कसे करावे?

    कामाचे प्राधान्य ठरवा: सर्वात महत्त्वाचे काम आधी पूर्ण करा, त्याला सुरुवातीला प्राधान्य द्या.

    तंत्रज्ञानाचा वापर करा: तंत्रज्ञानाचा वापर करून कामे सोपी करा. उदा. ऑटोमेशन साधने.

    वेळेचे नियोजन: कामाचे छोटे भाग करा आणि त्यासाठी वेळेची मर्यादा ठरवा.

    काम सोपवा: आवश्यकतेनुसार इतरांना काम सोपवा.

    नवीन कौशल्ये शिकत रहा: नवीन तंत्र आणि पद्धती शिकून स्वतःला कायम अपडेट ठेवा

    यामुळे तुम्ही शॉर्टकट घेत असतानाही अधिक परिणामकारकपणे आणि हुशारीने काम करू शकाल.

    यश मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी :

    धैर्य आणि सातत्य: प्रत्येक टप्प्यावर मेहनत आणि सातत्य ठेवणे.

    योग्य नियोजन: कोणतेही काम व्यवस्थित योजना बनवून करणे.

    समर्पण: यशासाठी तुमच्याकडे ठाम ध्येय असणे आणि त्यासाठी निरंतर प्रयत्न करणे.

    शिकण्याची तयारी: चुका झाल्यावर त्यातून शिकणे आणि स्वतःला सुधारण्याची तयारी ठेवणे.

    आणखी वाचा :

  • 3 वर्षे शेती करून उभी केली 1200 कोटींची कंपनी जाणून घ्या या “ॲग्री स्टार्टअप” ची कहाणी

    3 वर्षे शेती करून उभी केली 1200 कोटींची कंपनी जाणून घ्या या “ॲग्री स्टार्टअप” ची कहाणी

    अलिकडच्या काळात शेती क्षेत्रात सातत्यानं बदल होत आहेत. अनेक तरुण करिअर म्हणून देखील शेतीकडे पाहू लागले आहेत. बरेचसे शिक्षित तरुण आधुनिक शेतीची माहिती घेऊन शेतीकडे वळत आहेत व पारंपरिक शेतीपेक्षा कित्येक पटींनी अधिक उत्पन्न घेत आहेत. राजस्थानच्या जयपूरमध्ये राहणाऱ्या ऋतुराज शर्मा या 33 वर्षाच्या तरुणाने देखील शेतीत नवनवीन प्रयोग केले आहेत. शेतीच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधत या तरुणाने करोडो रुपयांची Zettafarms नावाची कंपनी स्थापन केली आहे.  

    गुडगावमध्ये ही कंपनी असून कॉर्पोरेट शेतीमध्ये कार्यरत आहे. कंपनी भाडेतत्त्वावर जमीन घेते आणि त्यात धान्य, फळं आणि भाजीपाला पिकवते. या कंपनीचे संस्थापक ऋतुराज शर्मा यांनी B.Tech आणि MBA केल्यानंतर नोकरीऐवजी स्वत:चं Startup सुरू केलं.  कंपनीचा उद्देश शेती अधिक फायदेशीर बनवणे आणि शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे आहे. शेतकऱ्यांच्या तांत्रिक आणि आर्थिक समस्या कमी करून आधुनिक शेती पद्धतीचा वापर करून शेतीचे उत्पादन अधिक वाढवणे हा कंपनीचा मुख्य उद्देश आहे

    Zettafarms चे काम कसे चालते? 

    Zetta Farms शेतीला एका व्यावसायिक कंपनी प्रमाणे चालवते. एका कॉर्पोरेट कंपनीप्रमाणे  फायनान्स, ऑपरेशन्स, IT अशी सर्व खाती या कंपनीत देखील आहेत. मोठ्या प्रमाणावर शेतजमीन भाडेतत्वावर घेऊन सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्यावर शेती केली जाते. कुठले पीक किती प्रमाणात घ्यावे. कुठल्या पिकाला अधिक भाव मिळेल या सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच पिके घेतली जातात. शेती करण्यासाठी कंपनीने शेतकऱ्यांनाच नोकरीवर ठेवले आहे, ज्याच्या बदल्यात त्यांना प्रत्येक महिन्याला ठराविक पगार मिळतो. कंपनी कायदेशीर असल्यामुळे शेतकऱ्यांचा PF देखील जमा होतो. याशिवाय कंपनी शेतकऱ्यांना मोफत इन्शुरन्स देखील देते. आज रोजी कंपनीमध्ये जवळपास २९०० कर्मचारी काम करतात.

    Zettafarms चा 15 राज्यांमध्ये विस्तार 

    Zettafarms ही कंपनी करारावर किंवा भाडेतत्त्वावर शेती करते. ज्यामध्ये ते किमान 50 एकर जमीन एका व्यक्तीकडून आणि 100 एकर जमीन एका गटाकडून भाडेतत्त्वावर घेतात. त्यानंतर त्या जमिनीवर ते शेती करतात. झेटाफार्म्स सध्या 15 राज्यांमध्ये 20 हजार एकर जमिनीवर शेती करत असून ६० पेक्षा जास्त पिकांचे उत्पादन घेते. पिकांमध्ये ते गहू, हरभरा, धान, कडधान्ये, भाजीपाला, फळे, चहा आणि कॉफीच्या मळ्यासह सर्व प्रकारची शेती केली जाते.

    ऋतुराजने शेती हा यशस्वी व्यवसाय कसा बनवला?

    ऋतुराज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतीमध्ये व्यवसाय, अर्थशास्त्र, गणित आणि विज्ञान यांचा समावेश केला, तर तो कोणत्याही परिस्थितीत फायदेशीर व्यवसाय आहे. या विचाराने ऋतुराजने शेतीमध्ये पाऊल टाकले. सुरुवातीला ऋतुराजने फक्त 2 एकर शेती करायला सुरूवात केली. हळूहळू भाडेतत्त्वावर आणि करारावर जमीन घेऊन व्यवसाय वाढवायला सुरुवात केली. ऋतुराजच्या कंपनीला पहिल्या वर्षी फक्त 1 लाख रुपयांचा नफा झाला, पण नंतर त्यांनी झपाट्याने काम वाढवले. 

    Zettafarms

    Zettafarms चे यशाचे रहस्य काय?

    एका ठिकाणी केवळ एकाच पिकाची शेती हानीकारक असू शकते. या विचारसरणीवर काम करत Zettafarms हे पीक विविधतेवर काम करते. ते वेगवेगळ्या भागात विविध प्रकारची शेती करतात. शेतीसाठी ते नवीन तंत्रज्ञान वापरतात ज्यामध्ये ते माती परीक्षणापासून इतर गोष्टींपर्यंत आवश्यक माहिती गोळा करतात. तंत्रज्ञानामध्ये, ते हवामान apps आणि क्रॉप मॉनिटरिंगसह विविध प्रकारच्या माहितीचे विश्लेषण वापरतात. झेटाफार्म्स गरजेनुसार सिंचन तंत्रज्ञानाचा वापर करतात, कुठे ठिबक सिंचनाची गरज भासल्यास तिथेही तेच काम केले जाते. याशिवाय कुठे पाणी कमी असल्यास कमी पाण्यात पिके घेण्याच्या नियोजनावर काम केलं जातं 

    ते संसाधनांचा योग्य वापर करतात. ज्यामुळं उत्पादन वाढते आणि नफाही वाढतो. पीक विविधीकरणाव्यतिरिक्त ते Risk Management वर देखील काम करतात.

    औषधे, खते किंवा किटकनाशके वापरताना ते कीटक व्यवस्थापनाच्या पद्धती देखील अवलंबतात. ज्यामुळं खर्च कमी होतो आणि शेतीमध्ये कमी रसायने वापरली जातात. 

    भविष्यातील वाटचाल : 

    ऋतुराज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतीला ते एक यशस्वी व्यवसाय म्हणून समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या व्यवसाय मॉडेलद्वारे ते लोकांना सांगू इच्छित आहेत की, शेतीतूनही करोडोंची कमाई केली जाऊ शकते. आयटी, फायनान्स आणि इतर क्षेत्रात काम करणे ज्याप्रमाणे लोक अभिमानाची गोष्ट मानतात, त्याचप्रमाणे लोकांना शेती आणि शेतकऱ्यांबद्दल आदराची भावना निर्माण झाली पाहिजे. 2030 पर्यंत 50 हजार एकरांवर शेती करण्याचे ऋतुराज शर्मा यांचे ध्येय आहे. शेतकरी, जमीनीचे मालक, स्टार्टअप्स, शेती पूरक व्यवसाय आणि शेती उपकरणे पुरवठादार यांना जोडणारे कृषी अर्थव्यवस्थेचे केंद्र बनून झेट्टा फार्म्स कृषी क्षेत्रात स्वतःच्या कार्याने बहुमूल्य योगदान देत आहेत. 

    आणखी वाचा

  • How to start your own blog? : स्वत:चा ब्लॉग कसा सुरू करावा?

    How to start your own blog? : स्वत:चा ब्लॉग कसा सुरू करावा?

    ब्लॉग म्हणजे काय ? 

    साध्या सरळ भाषेत सांगायचे झाले, तर ब्लॉग म्हणजे आपले ज्ञान (विचार, कला) इंटरनेटद्वारे इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्याचा वापर केला जातो. त्यालाच ब्लॉग असे म्हणतात. 

    आपल्याला विशिष्ट प्रकारची माहिती शोधायची असेल, तर इंटरनेट हे सर्वात जलद माध्यम आहे. त्याचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटेदेखील आहेत. यात एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे वेळ. आपणही वेळेसाठी बांधील असतो आणि प्रत्येकाला फक्त आणि फक्त २४ तास आहेत. मग त्या वेळेचं योग्य व्यवस्थापन व्हावं असं प्रत्येकाला वाटतं ना. मग जिथे जिथे वेळ वाचवता येईल तिथे आपण नक्कीच प्रयत्न करतो. 

    अशा वेळी बऱ्यापैकी वाचक वर्ग कमी वेळात हवी असणारी माहिती एका ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करतो. या वाचक वर्गाचा विचार करून आपण निश्चितपणे स्वत:चा ब्लॉग लिहिण्याचा विचार करु शकतो. ब्लॉग लिहायला सुरुवात करण्यासाठी काही प्राथमिक गोष्टींचा अभ्यास करणं सुरुवातीला अपेक्षित असतं. यात सर्वात आधीची आणि महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आवड. आपल्याला लिहिण्याची आवड आहे का ?

    स्वतःचा ब्लॉग सुरु करण्याची अनेक कारणे असू शकतात जसे की, आपल्याजवळ एखादे कौशल्य असेल किंवा आपल्याला एखादी गोष्ट उत्तमरित्या जमत असेल तर किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल लोकांना सांगायचे असेल तर आपण मायक्रो ब्लॉगच्या मदतीने ब्लॉग सुरु करू शकतो आणि सहज लोकांपर्यंत माहिती देखील पोहोचवू देखील शकतो. ब्लॉग सुरू करण्यासाठी ब्लॉगर.कॉम किंवा वर्डप्रेस.कॉम या वेबसाईटचा वापर करता येतो.

    How to start your own blog? : स्वत:चा ब्लॉग कसा सुरू करावा?

    स्वत:चा ब्लॉग सुरू करण्याच्या प्राथमिक पायऱ्या : 

    1.  ब्लॉगचा विषय निवडणे

    ब्लॉग तयार करण्यासाठी सर्वात आपल्याला नक्की कोणत्या विषयावर व्यक्त व्हायचं आहे हे आधी ठरवणं अत्यावश्यक ठरतं. ब्लॉगचा विषय निवडणे महत्वाचे आहे, आपल्याला एखाद्या विषयाची आवड असेल, तर आपण ब्लॉगचा विषय निवडून लेखन केले, तर नक्कीच आपल्या ब्लॉगवर वाचक आकर्षित होतील यात शंका नाही. आपल्या आवडीसंदर्भात, कृती संदर्भात किंवा एखाद्या ठिकाणा संदर्भात ब्लॉगचा विषय निवडावा.

    2.  वेबसाईट डिझाईन

    वेबसाईट डिझाईन हे ब्लॉगचे स्वरूप ठरविते, ब्लॉग किती Professional आहे ते Web Design वरुन कळते. जेवढी आकर्षक वेबसाईट डिझाईन असेल तेवढी लोक जास्त प्रतिसाद देतील, म्हणून वेब डिझाइन सुंदर व आकर्षक असायला हवी. 

    3. डोमेनचे नाव निवडणे

    डोमेन नेम हा वेबसाईटचा पत्ता (Address) आहे, जो लोक आपल्या वेबसाइटला भेट देण्यासाठी Browser च्या URL मध्ये टाईप करतात. डोमेन निवडताना आपला ब्लॉग कशा संदर्भात आहे, त्या संदर्भात डोमेन निवडावेत. डोमेन नाव निवडताना ते लांबलचक नसावे, आणि उच्चार करण्यास सोपे असावे.

    4. Unique Content 

    स्वतःचा ब्लॉग कसा सुरु करत असताना कंटेंट अतिशय महत्वाचा भाग आहे. आपला ब्लॉग समजायला सोपा असावा, जास्त किचकट लिहू नये. आपण जेवढा विस्तृत ब्लॉग लिहणार तेवढाच जास्त वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळणार आहे. 

    ब्लॉग सुरू करण्यासाठी पैसे लागतात का?

    नाही, ब्लॉग सुरु करायचा असेल, तर आपण मोफत आणि सशुल्क या दोन्ही माध्यमातून ब्लॉग सुरु करू शकतो. जर आपल्याला मोफत म्हणजेच विनामूल्य ब्लॉग सुरु करायचा असेल, तर आपण ब्लॉगर किंवा वर्डप्रेस या साईटच्या साहाय्याने मोफत ब्लॉग बनवू शकतो. जर सशुल्क ब्लॉग सुरु करायचा असल्यास आपल्याला डोमेन आणि वेब होस्टिंग खरेदी करावी लागेल.  

    आणखी वाचा :

  • शिक्षक दिन 5 सप्टेंबरला का साजरा करतात? | Why Teachers Day Celebrated On 5th September

    शिक्षक दिन 5 सप्टेंबरला का साजरा करतात? | Why Teachers Day Celebrated On 5th September

    प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकाची भूमिका ही अनन्यसाधारण महत्त्वाची असते. एखादी व्यक्ती जेव्हा यशस्वी होते, तेव्हा तिच्या मागे नेहमी कोणत्या-न-कोणत्या मार्गदर्शकाचा हात असतो, भूमिका असते. हा मार्गदर्शक म्हणजे त्या व्यक्तीच्या आयुष्याला वळण देणारा, चांगल्यातलं वाईट आणि वाईटातलं चांगलं ओळखायला शिकवणारा शिक्षक.

     भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. हा स्मरणोत्सव आपल्या देशाचे पहिले उपराष्ट्रपती (दुसरे राष्ट्रपती), भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी झाला. शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक विकास घडून यावा यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले. देशाच्या शिक्षणाला आकार देण्यात त्यांनी कायम मोलाचा वाटा उचलला. त्यांच्या योगदानामुळे अनेकांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली आणि म्हणूनच ५ सप्टेंबर रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन सबंध देशभरात उत्साहाने साजरा केला जातो. 

    खरंतर चांगल्या शिक्षकाचा सन्मान हा त्या संस्कृतीचा आणि त्यांच्याकडे असलेल्या अगाध ज्ञानाचा सन्मान असतो. कोणत्याही समाजाचा विकास होण्यासाठी शिक्षकाची भूमिका देवदूतासारखी असते. एक चांगला शिक्षक हजारो चांगले विद्यार्थी घडवू शकतो. हेच चांगले विद्यार्थी पुढे देशाचे सुजान नागरिक बनतात आणि प्रतिनिधित्व करतात. एक चांगला माणूस घडण्यासाठी त्यामागे एक चांगला शिक्षक कायम उभा असतो. 

    image 20

    शिक्षकांचा सन्मान करण्याची शिक्षक दिनाची ही परंपरा तशी जुनीच. 

    शिक्षक म्हणजे काय? 

    शि म्हणजे शील 
    क्ष म्हणजे क्षमा
    क म्हणजे कला

    ज्याच्याकडे शील, क्षमा आणि कला यांचा त्रिवेणी संगम आहे तो म्हणजे शिक्षक. शिक्षक हे एका अर्थाने भावी पिढीला घडविणारे शिल्पकारच आहेत. आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने जीवनातील अंधार दूर करणारे मार्गदर्शकच. चुकल्यावर रागावणारेही शिक्षकच आणि पाठीवर कौतुकाची थाप मारणारेदेखील तेच. आपल्यापेक्षाही जास्त आपल्याला ओळखणारे आपले शिक्षक. आपल्यातील चांगल्या गुणांची पारख करून आपल्याला योग्य दिशा दाखविणारे आणि आपल्या जीवनाला ज्ञानाच्या प्रकाशाने तेजोमय करणारे हे आपले शिक्षक. 

    तुम्हाला अजून कोणत्या विषयाची माहिती वाचायला आवडेल कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

  • घरच्या जबाबदारीसह यशस्वी व्यवसाय: महिलांच्या प्रेरणादायी यशोगाथा | Women Entrepreneurs

    घरच्या जबाबदारीसह यशस्वी व्यवसाय: महिलांच्या प्रेरणादायी यशोगाथा | Women Entrepreneurs

    “नारी समाजस्य कुशलवास्तुकारा” या उक्तीप्रमाणे नारी ही समाजाची कुशल वास्तुकार आहे आणि आपली संस्कृती स्त्रीला देवी मानणारी आहे, आपल्या महिला आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. यातीलच एक क्षेत्र आहे व्यवसाय क्षेत्र.

    आज आम्ही तुम्हाला अशा 5 महिलांचा व्यवसाय प्रवास सांगणार आहोत, ज्यांनी घर-परिवार सांभाळत, छोटे व्यवसाय सुरू केले आणि त्यांना यशस्वी करून दाखवलं. या प्रेरणादायी कहाण्या तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील आणि तुम्हालाही  काहीतरी मोठं करण्याची प्रेरणा देतील.

    १) निर्मला हेगडे 

    निर्मला हेगडे यांचा जीवनप्रवास अनेक भारतीय स्त्रियांच्या प्रवासासारखाच आहे. २२ व्या वर्षी त्यांचे  लग्न झाले आणि त्या कर्नाटकातून मुंबईत आल्या. दोन वर्षांत त्यांनी एका मुलाला जन्म दिला आणि २४ व्या वर्षी त्या आई झाल्या. त्यानंतर घर आणि मुलाची जबाबदारी त्यांच्यावर आली आणि या जबाबदारी सांभाळण्यातच त्याचं वय झालं असं त्या सांगत असतात.

    Untitled 1

    निर्मला यांचं वय ६४ वर्षे आहे, त्या  एक शेफ आहेत आणि त्यांनी या वयात आपल्या स्टार्टअपची सुरुवात केली आहे, आणि त्याचं नाव ठेवलं “आई’ज किचन”’. मुंबईत, निर्मला हेगडे आपल्या मुलासोबत एक फूड किचन चालवतात, जिथून आपण घरच्या स्वादिष्ट जेवणाची ऑर्डर देऊ शकता.

    निर्मला हेगडे यांच्या किचनची सुरुवात लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या बिल्डिंगमधील सुरक्षारक्षकांना जेवण देण्यापासून झाली. कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत गार्ड ड्यूटीवरून बाहेर जाऊ शकत नव्हते. निर्मला यांनी स्वतः त्यांच्या जेवणाची जबाबदारी घेतली आणि त्यांना घरगुती चवीचे जेवण देण्यास सुरुवात केली, जेणेकरून गार्ड यांची गैरसोय होऊ नये आणि त्यांना उत्तम जेवण मिळावे.

    आई’ज  किचनमध्ये तुम्ही महाराष्ट्रीयन, गोवा आणि कर्नाटकी जेवण ऑर्डर करू शकता. ऑर्डर घेणे, पॅकिंग करणे आणि डिलिव्हरीचे काम गौतमच्या (मुलगा) समर्थनामुळे सुरळीत पार पडते.

    शेवटी, इतरांसाठी त्यांचे काही प्रेरणादायक शब्द आहेत: “तुम्हाला ज्या गोष्टींची आवड आहे, त्या गोष्टींच्या संपर्कात राहण्याचे मार्ग नेहमी शोधा. व्यवसाय करण्यासाठी तुमचे वय कधीही तुम्हाला थांबवत नाही.”

    २) उर्वशी  पाटील 

    नाशिकच्या उर्वशी पाटील यांनी MBA केलं असून, सध्या त्या “MBA दाबेली” नावाने एक लोकप्रिय फूड वॅन चालवतात. लग्नानंतर उर्वशी यांच्याकडे चांगल्या पगाराची नोकरी होती, परंतु गरोदरपणात  त्यांनी ती सोडली. त्यांच्या पतीचा व्यवसाय सुरळीत चालू होता, परंतु अचानक त्यात मोठं नुकसान होऊन तो व्यवसाय बंद पडला. उर्वशी यांना लहान बाळ सांभाळायचं असल्याने नोकरी करणं शक्य नव्हतं. घरात आर्थिक अस्थिरता वाढत होती, त्यामुळे त्यांनी या संकटातून मार्ग काढण्याचा निर्णय घेतला.

    एकदा रस्त्यावरून जाताना उर्वशी यांना एक फूड वॅन दिसली आणि त्यातून त्यांना व्यवसायाची कल्पना सुचली. त्यांनी आधी दाबेली कशी बनवायची हे शिकून घेतलं आणि “MBA दाबेली” या नावाने व्यवसायाची सुरुवात केली. हळूहळू त्यांच्या मेहनतीचं फळ मिळू लागलं आणि व्यवसायाने भरभराट घेतली.

    आज उर्वशी पाटील या नोकरीपेक्षा कित्येक पटीने अधिक उत्पन्न मिळवत आहेत. त्यांची दाबेली खाण्यासाठी ग्राहक दूरवरून येतात आणि त्यांच्या वॅनवर नेहमीच गर्दी असते.

    मित्रांनो, ही कहाणी आपल्याला शिकवते की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार मानता कामा नये. उर्वशी पाटील यांची संघर्षमय वाटचाल आणि जिद्द आपल्याला खूप काही शिकवते. संकटं आणि परिस्थिती आपल्याला कितीही खचवण्याचा प्रयत्न करत असली, तरी त्यावर मात करून यश मिळवणं हेच खऱ्या आयुष्याचं यश आहे.

    ३) चंद्रप्रभा परिहार 

    वयाच्या अशा  टप्प्यावर, जेव्हा बहुतांश लोक निवृत्तीचा विचार करतात, 70 वर्षीय चंद्रप्रभा परिहार आज आपल्या व्यवसायात यशस्वीपणे पुढे वाटचाल करत आहेत. चंद्रप्रभा यांना प्रेमाने ‘आबा’ म्हटलं जातं. मुंबईत राहणाऱ्या आबांनी दीड वर्षांपूर्वी क्रोशिया कलेचा वापर करून बॅग्स, टोप्या, घरातील सजावटीच्या वस्तू आणि राख्या बनवायला सुरुवात केली आणि ‘नेहर’ या नावाने आपल्या ब्रँडची ओळख निर्माण केली.

    आबांनी आपल्या आयुष्यातील 70 वर्षे कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यात घालवली. त्यांना लहानपणापासूनच विणकामाची आवड होती, पण त्या कलेला व्यवसायात रूपांतर करण्याचा विचार त्यांनी कधीच केला नव्हता. त्यांनी 20 वर्षांपूर्वी या कलेत डिप्लोमा घेतला होता, पण कुटुंबाच्या गरजांमध्ये स्वतःचे स्वप्न साकार करण्याची संधी त्यांना कधी मिळाली नाही. मात्र, त्यांच्या सून स्वाती यांनी पाठिंबा दिल्यामुळे हे स्वप्न प्रत्यक्षात आणता आले.

    सुरुवातीला, सासु-सुनेच्या जोडीने हे फक्त छंद म्हणून हे सगळं सुरु सुरू केलं. स्वाती नवीन डिझाइन्स शोधून आबांना द्यायची आणि आबा त्या डिझाइन्स बनवून ओळखीच्या लोकांमध्ये वाटायच्या. व्यवसायाचा विचार तेव्हा सुरू झाला जेव्हा आबांच्या भाचीने त्यांच्या बनवलेल्या बॅग्स ऑफिसमध्ये नेल्या आणि सहकाऱ्यांनी अशाच बॅग्स बनवण्याची मागणी केली.

    या मागणीने त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि लवकरच त्यांना ऑस्ट्रेलियातून मोठं ऑर्डर मिळाली. यानंतर स्वातीने कंपनीची अधिकृत नोंदणी केली आणि वेबसाइट व इंस्टाग्राम पेज सुरू केले.

    आज आबा स्वतः प्रत्येक ऑर्डरवर काम करतात आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून पुढे येत आहेत. तुम्हाला देखील आबांच्या या वस्तू  खरेदी करायच्या असतील , तर त्यांच्या वेबसाइट www.nayher.com वर जाऊन त्यांच्या हातांनी बनवलेल्या वस्तू खरेदी करू शकता.

    ४) सायली कासले 

    Untitled 2

    जर एखाद्या व्यक्तीनं  काही करायचं ठरवलं, तर तिला कोणीही थांबवू शकत नाही, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सायली कासले. घरातूनच व्यवसाय सुरू करणाऱ्या सायली आज जवळजवळ 100 हून अधिक प्रकारचं उत्पादनं विकतात आणि दरमहा 2 लाख रुपयांपर्यंत नफा कमावतात.

    सायली यांचं वय 31 वर्ष  आहे आणि त्या वसई येथे राहतात. त्या आपल्या पतीसोबत ‘स्पृहा घरगुती’ या नावाने स्टार्टअप चालवतात. लॉकडाऊनच्या काळात, जेव्हा सगळं काम घरातून चालू होतं, तेव्हा त्यांनी आपल्या स्पेशल ‘ऑल इन वन’ मसाल्याची निर्मिती करून सोसायटीत विक्री सुरू केली. बघता बघता हा मसाला एकदम हिट प्रॉडक्ट बनला.

    यानंतर केवळ 25 हजार रुपये गुंतवून मोठी चक्की आणि मिक्सर खरेदी केला. त्यानंतर त्यांनी आटा (पीठ), तूप, लाडू अशी उत्पादनं बनवायला सुरुवात केली. आपल्या मेहनत आणि चवीच्या जोरावर त्यांची उत्पादनं लवकरच प्रसिद्ध झाली. आज त्यांची  स्वतःची एक फॅक्टरी आहे आणि अनेक महिला त्यांच्या बनवलेल्या उत्पादनांची विक्री करून आत्मनिर्भर बनल्या आहेत.

    त्यांचा एक सामान्य स्त्री ते बिझनेसवूमन हा प्रवास कित्येक महिलांसाठी प्रेरणादायी आहे.

    ५) कमलजीत कौर

    Untitled 3

    कमलजीत कौर या मूळच्या पंजाबच्या आहेत, पण आता त्या मुंबईत राहतात. 51 वर्षीय कमलजीत यांनी आपल्या घरातूनच व्यवसायाची सुरुवात केली. कोविड काळात त्यांना संक्रमण झाले होते आणि परिस्थिती गंभीर होती. डॉक्टरांनी जवळजवळ आशा सोडली होती, पण त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. या प्रसंगानंतर त्यांना आपल्या लहानपणीच्या काळाची आठवण झाली, जेव्हा त्या ताजं दूध, घी, आणि मक्खन यांचं नियमित सेवन करत होत्या, ज्यामुळे त्यांची इम्युनिटी मजबूत होती. त्यांना मुंबईत या गोष्टींची कमतरता जाणवली.

    कमलजीत सांगतात की लग्नाआधी लुधियानामध्ये राहात असताना त्या कधीच इतक्या आजारी पडल्या नव्हत्या. पण लग्नानंतर मुंबईत आल्यावर ताजं दूध आणि शुद्ध घी मिळणं थांबलं आणि त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली. या गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी शुद्ध देशी घी बनवण्याचा निर्णय घेतला. तीन महिन्यांच्या संशोधनानंतर 2020 मध्ये त्यांनी  ‘किम्मू किचन’ची स्थापना केली .

    सुरुवातीला त्यांनी मुंब्रा (ठाणे) येथेच घी बनवण्यास सुरुवात केली होती, पण दूधाच्या गुणवत्तेची समस्या असल्याने त्यांनी लुधियानामध्ये यासाठी एक युनिट सुरू केलं आणि तिथून मुंबईत घी पाठवण्याचं ठरवलं. आता हे घी लुधियानामधील युनिटमध्ये बनवलं जातं आणि तिथून मुंबईत पाठवलं जातं. कमलजीत सांगतात की कधी त्यांना 100 ऑर्डर मिळतात, तर कधी एकही नाही; पण हे काम करताना त्यांना समाधान मिळतं.

    त्यांचा मुलगा हरप्रीत याने लुधियानामध्ये आधीच असलेल्या सेटअपमध्ये थोडेफार बदल करून त्याचा उपयोग केला गेला. या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी 8 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आणि पहिल्याच वर्षात या व्यवसायातून 20 लाख रुपयांपर्यंतची कमाई झाली. कमलजीत यांची कंपनी 220, 500 आणि 1000 एमएलच्या बाटल्यांमध्ये घी विकते, ज्याची किंमत 399 रुपयांपासून सुरू होते.

    तर, या सर्व महिलांच्या कहाण्या आपल्याला हेच शिकवतात की, ठरवलं तर काहीच अशक्य नाही. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, आव्हानं कितीही कठीण असली, तरी जिद्द, मेहनत आणि समर्पणाच्या बळावर कोणत्याही स्वप्नाला साकार करता येतं.

    आणखी वाचा

  • भारताचा इलोन मस्क: भाविश अग्रवाल यांचा प्रेरणादायी प्रवास | Bhavish Aggarwal: The Inspiring Story of Ola Founder

    भारताचा इलोन मस्क: भाविश अग्रवाल यांचा प्रेरणादायी प्रवास | Bhavish Aggarwal: The Inspiring Story of Ola Founder

    Bhavishaggarwal

    भाविश अग्रवाल यांचा जन्म 28 ऑगस्ट 1985 रोजी पंजाबमधील लुधियाना येथे झाला. बालपणापासूनच ते अतिशय बुद्धिमान आणि मेहनती होते. त्यांचे आई वडील हे दोघेही पेशाने डॉक्टर आहेत. वडील हे ऑर्थोपेडिक सर्जन तर आई ह्या पॅथोलॉजिस्ट आहेत. आयआयटी मुंबई येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी. टेक. पूर्ण केल्यानंतर भाविश यांनी  2007 मध्ये मायक्रोसॉफ्ट रिसर्च इंडिया येथे रिसर्च इंटर्न म्हणून आपल्या कॉर्पोरेट प्रवासाची सुरुवात केली. येथे त्यांनी टेक्नॉलॉजीवर आधारित विविध प्रकल्पांमध्ये काम केले. 

    मायक्रोसॉफ्ट रिसर्चमध्ये ते विविध टेक्नॉलॉजीवर संशोधन करत होते आणि या शोधाच्या प्रक्रियेतच त्यांना दोन पेटंट्स मिळाले, परंतु 9 ते 5 च्या सुरक्षित नोकरीत त्यांना समाधान मिळत नव्हतं. त्यांच्या मनात स्वतःच्या व्यवसायाची तळमळ निर्माण झाली होती. उद्योजक होण्याची त्यांची तीव्र इच्छा होती, पण सुरक्षित नोकरीमुळे ते अडकले होते. 

    त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे 2008 मध्ये मायक्रोसॉफ्टने त्यांना सहाय्यक संशोधक म्हणून नियुक्त केले. दोन वर्षांहून अधिक काळ मायक्रोसॉफ्टमध्ये काम करताना भाविशला एक उद्योजक म्हणून काहीतरी नवीन करण्याची ओढ लागली होती.

    मनात कसा आला ‘ओला’ सुरु करण्याचा विचार?

    भाविश अग्रवाल  सांगतात की ओला (Ola) ची सुरुवात त्यांच्या एका प्रवासाच्या वैयक्तिक वाईट अनुभवातून झाली. एकदा त्यांनी बेंगळुरूहून बंदीपूरला जाण्यासाठी एक कार बुक केली होती. मात्र, त्या प्रवासाचा अनुभव खूपच निराशाजनक होता. प्रवासाच्या दरम्यान अर्ध्या रस्त्यातच ड्रायव्हरने अतिरिक्त पैसे मागायला सुरुवात केली, शिवाय त्याचं वागणं आणि बोलणं अत्यंत उद्धट होतं. या गैरवर्तणुकीमुळे त्रासून भाविश यांना रस्त्यातच गाडी सोडावी लागली आणि उर्वरित प्रवास बसने करावा लागला.

    बसमधून प्रवास करताना भाविश यांच्या मनात वारंवार विचार येत होता की, अशा वाईट सेवेमुळे प्रवाशांचे  किती हाल होत असतील. त्यांना जाणवलं की त्यांच्या सारखे अनेक लोक असतील, ज्यांना दर्जेदार कॅब सेवा मिळत नाहीये. आणि त्याच वेळी त्यांच्या मनात एक कल्पना आली की, एक आपण अशी सेवा सुरू करावी जी लोकांना गुणवत्तापूर्ण, विश्वासार्ह आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा देईल.

    ओलाची सुरुवात आणि सुरुवातीचा संघर्ष

    कल्पकता आणि कौशल्य यांचा व्यवस्थित समन्वय साधला, तर नवनिर्मितीचा चमत्कार घडतोच! भाविश अग्रवाल यांनी हेच सिद्ध करून दाखवलं आहे. त्यांनी आपल्या दूरदृष्टी आणि धडपडीच्या जोरावर ओला कॅब्सची कल्पना प्रत्यक्षात आणली. व्यवसायात येणाऱ्या अडथळ्यांना त्यांनी संधीमध्ये बदललं आणि आपल्या जिद्दीने एक नवीन यशस्वी प्रवासाला सुरुवात केली.

    कॅब सेवा क्षेत्रातील सर्व कमतरता समजून घेतल्यानंतर, भाविश यांनी उत्तम ग्राहकांना उत्तम अनुभव आणि परवडणाऱ्या किमतींसह एक कॅब एग्रीगेटर कंपनी सुरू करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी जोधपूरमधील आणखी एक आयआयटीयन मित्र अंकित भाटी यांना सोबत घेतले. 3 डिसेंबर 2010 रोजी मुंबईत त्यांनी एकत्रितपणे ‘ओलाट्रिप्स डॉट कॉम’ वेबसाइट लॉन्च केली, ज्यामध्ये ग्राहक बाह्य प्रवासासाठी कार बुक करू शकत होते.

    सुरुवातीला, भाविश आणि अंकित यांच्याकडे या कल्पनेत गुंतवणूक करण्यासाठी फारशी आर्थिक क्षमता नव्हती आणि कोणत्याही गुंतवणूकदाराकडून आधारही मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी आपल्या बचतीमधूनच ऑनलाइन ऍप्लिकेशन विकसित करण्यास सुरुवात केली. जून 2012 मध्ये, Olacabs ने एक मोबाईल ॲप लाँच केले. ओला ऍप लाँच झाल्यानंतर त्यांना ‘टायगर ग्लोबल मॅनेजमेंट’ कडून 5 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक मिळाली, तसेच अनुपम मित्तल आणि स्नॅपडीलचे कुणाल बहल यांच्याकडूनही निधी उभारला. सुरुवातीच्या वर्षांत, कॅब बुकिंग फर्मचे वापरकर्ते फोन कॉलद्वारे कॅब बुक करत होते. नंतर ॲप आल्यानंतर त्याचा वापर वाढण्यास सुरुवात झाली.

    पण प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता, भाविश अग्रवाल यांना भारतीय बाजारपेठेत ओला सादर करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. एकदा नाही, तर प्रत्येक वेळी जेव्हा त्यांनी काहीतरी नवीन आणले किंवा नवीन बाजारपेठेकडे पाऊल टाकले, तेव्हा त्यांना संघर्ष करावा लागला.

    प्रारंभीच्या काळात, रेडिओ ट्रॅफिक सर्व्हिसेस आणि फास्टट्रॅकसारख्या स्थानिक मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करणे ओलासाठी अवघड होते, परंतु यामुळे भाविश थांबले नाहीत. या अडचणींनी त्यांना वेगळ्या पद्धतीने विचार करण्यास आणि अनोख्या, पण समस्येचे निराकरण करणाऱ्या उपायांकडे पाहण्यास प्रवृत्त केले. याच वेळी ओलाने ऑल इंडिया परमिट असलेल्या ड्रायव्हर्सना कामावर घेण्यास सुरुवात केली आणि इंटरसिटी प्रवास सुविधा सुरू केली.

    ओलाचा यशस्वी प्रवास

    भाविश अग्रवाल यांच्या नेतृत्वात ओला आज भारतातील एक अग्रगण्य स्टार्टअप म्हणून उभी राहिली आहे. त्यांनी स्वतः नवीन कार विकत न घेता ड्रायव्हर्सना जोडण्यावर भर दिला, ज्यामुळे अनेक ड्रायव्हर्सना रोजगार मिळाला. त्यांनी ओला सेवेला एका अ‍ॅपद्वारे इंटरनेटशी जोडले, ज्यामुळे लोकांना राईड बुकिंगची सुविधा मिळाली. भाविश यांनी काही प्रसंगी स्वतः ओला ड्रायव्हर बनूनही सेवा दिली आहे.

    ओला कॅब सर्व्हिसची खासियत म्हणजे तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर. हे अ‍ॅप लोकांना त्यांच्या राईडसाठी सर्व आवश्यक माहिती देते, ज्यात रेटिंग्स, रिव्ह्यूज आणि क्वालिटी चेकिंगसाठी सुविधा आहेत. यामुळे ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवरूनच सर्व काही नियंत्रित करता येते.

    भाविश यांची दूरदृष्टी आणि सेवा गुणवत्ता यामुळे ओलाचा व्यवसाय झपाट्याने वाढला. त्यांनी कमी दरात उत्कृष्ट सेवा देण्याचा विचार केला आणि 2013-14 मध्ये ओलाचा टर्नओव्हर सुमारे 418.25 कोटी रुपयांचा होता. आज, 75 हून अधिक शहरांमध्ये 1.75 लाखांपेक्षा अधिक लोक रोज ओला वापरतात. भाविश यांच्याकडे ओलामध्ये 6.7% हिस्सेदारी आहे, ज्यामुळे त्यांची नेट वर्थ महत्त्वाची ठरते. ओलाचे सध्याचे मूल्यांकन $4.8 बिलियन डॉलर्सपेक्षा (40000 कोटी रुपये) जास्त आहे, जे तिच्या यशाची साक्ष देते.

    2017 मध्ये, भाविश यांनी ओला इलेक्ट्रिकची स्थापना केली, जी इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि बाईक्स तयार करते. या व्यवसायाची वाढही लक्षणीय आहे.

    ऑक्टोबर 2023 मध्ये, ओला इलेक्ट्रिकने टेमासेक आणि भारतीय स्टेट बँकेकडून 3,200 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवली. यामुळे त्यांच्या इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील विस्ताराला गती मिळाली. भाविश अग्रवाल यांनी दोन कंपन्या उभारल्या, ज्यांचे मूल्यांकन 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे आणि यामुळे त्यांच्या दूरदृष्टीची आणि नेतृत्वाच्या कौशल्याची झलक दिसते.

    cf70dda1 1e47 401d bb65 1f9b2b90affb Aggarwal

    भारतातील पहिले स्वदेशी  AI-प्लॅटफॉर्मकृत्रिम’ केलं लॉन्च 

    भाविश अग्रवाल यांनी 15 डिसेंबर 2023 रोजी भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) प्लॅटफॉर्म ‘कृत्रिम’ लाँच केले. हे प्लॅटफॉर्म सुमारे 22 भारतीय भाषा समजू शकते आणि सध्या ओपन एआयच्या चॅट जीपीटी तसेच गुगलच्या जेमिनीशी स्पर्धा करत आहे .

    लाँचिंग कार्यक्रमादरम्यान, अग्रवाल यांनी AI चॅटबॉटचे प्रात्यक्षिक दाखवले, जो चॅट जीपीटी आणि जेमिनीसारखचं प्रश्नांची उत्तरे देण्यास सक्षम आहे. हा चॅटबॉट कवितांपासून कथांपर्यंत विविध प्रकारची सामग्री तयार करू शकतो. ‘कृत्रिम’ हे प्लॅटफॉर्म 22 भारतीय भाषा समजू शकते आणि 10 भाषांमध्ये मजकूर तयार करण्याची क्षमता ठेवते. कंपनीच्या मते, हे भारताचे पहिले पूर्ण-स्टॅक AI आहे, जे स्थानिक भारतीय ज्ञान, भाषा आणि डेटावर आधारित आहे. अग्रवाल यांनी हे साधन सर्वांसाठी उपयुक्त असल्याचे म्हटले आहे.

    मानसन्मान आणि पुरस्कार  

    भाविश हे भारतातील सर्वात तरुण आणि श्रीमंत उद्योजकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. कठोर कॉर्पोरेट जीवनशैलीच्या पलीकडे, त्यांना सायकलिंग, स्क्वॅश खेळणे, आणि फोटोग्राफीची आवड आहे. ते एक लोकप्रिय फोटोब्लॉग देखील चालवतात, जिथे ते त्यांच्या छायाचित्रांद्वारे स्वतःचे विचार मांडतात.

    2013 मध्ये भाविश आणि Ola ला दक्षिण आशियाच्या mBillionth पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, हा पुरुस्कार तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उत्कृष्टता दर्शवणाऱ्या स्टार्टअप्सना दिला जातो, त्याच वर्षी, Internet and Mobile Association of India (IAMAI) द्वारे Ola ला वर्षातील सर्वोत्कृष्ट स्टार्टअप म्हणून गौरवण्यात आले. 2017 मध्ये, द इकॉनॉमिक टाइम्सने भाविश अग्रवाल यांना त्यांच्या नेतृत्वाच्या कौशल्यासाठी ET सर्वोत्कृष्ट आणि तेजस्वी पुरस्काराने सन्मानित केले.

    या व्यतिरिक्त भाविश उत्तम गुंतवणूकदार, व्याख्याते आणि उत्तम छायाचित्रकार सुद्धा आहेत. ते नवीन उद्योजकांना नेहमीच प्रोत्साहन देत असतात. त्यांनी बऱ्याच नवीन स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. ज्यात ओव्हा, कार्किनोस ऑफ बिझनेस, सुपरसूट, टॉर्क मोटर्स, हॅशलर्न अशी काही उदाहरणं देता येतील. उद्योगात  आणि समाजसेवेतील त्यांच्या यशाव्यतिरिक्त, भाविश एक वक्ते आणि लेखक म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी अनेक मंचांवर आपल्या विचारांचे आदानप्रदान केले आहे आणि उद्योजकतेबद्दल अगणित लेख लिहिले आहेत.

    आज, भाविश आपल्या नवीन उपक्रमाच्या दिशेने लक्ष केंद्रित करत आहेत. आपल्या साहसी मनासह, त्यांनी अक्षय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. हवामान बदल आणि वाढत्या ऊर्जेच्या गरजा या जगासमोरील सर्वांत महत्त्वाच्या आव्हानांपैकी आहेत आणि भाविश या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाय विकसित करण्याबद्दल वचनबद्ध आहेत. भाविश म्हणतात, “मला विश्वास आहे की अक्षयऊर्जा ही भविष्याची गरज आहे आणि या क्षेत्रात भरीव योगदान देणे हे माझे ध्येय आहे. 

    आणखी वाचा