Tag: Business Ideas

  • अविरत उद्योग वाढीसाठी समाज माध्यमांचा उपयोग सोशल मिडिया फॉर बिझनेस ग्रोथ

    अविरत उद्योग वाढीसाठी समाज माध्यमांचा उपयोग सोशल मिडिया फॉर बिझनेस ग्रोथ

    अश्मयुगीन मानवाला आगीचा शोध लागला आणि त्यांच्या जीवनात परिवर्तन आले. चाकाचा शोध लागल्यानंतर जीवन अधिक गतिमान झाले. त्यानंतर जवळजवळ हजार वर्षांनतर मुद्रणकलेचा शोध लागला व ज्ञानाचे, माहितीचे संकलन मोठ्या प्रमाणावर केले गेले आणि जगभर ज्ञानाचा प्रसार झाला. ज्ञानाची देवाणघेवाण सहज व सुलभ झाली.

    युरोपमध्ये औद्योगिक क्रांतीनंतर यंत्रांची निर्मिती व वापर सर्वत्र सुरु झाला. त्यांनतर अलिकडच्या काळात आईनस्टाईनने सापेक्षतावादाचा सिद्धांत शोधून काढला तेव्हा विज्ञान आणि तंत्रज्ञानात क्रांती झाली. संगणकाचा शोध हा माहिती तंत्रज्ञानाची पायाभरणी होती. आज माहिती तंत्रज्ञानाने संपूर्ण जगावर मोहिनी घातली आहे. कोणतेही क्षेत्र घ्या. माहिती तंत्रज्ञान वगळल्यास त्यातील जीवनदायी तत्त्वच नष्ट होऊन जाईल. आर्थिक, उद्योग, कृषी, शिक्षण, राजकारण, व्यापार, उद्योग अशा प्रत्येक क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान हा आत्माच मानला जातो.

    social-media-marketing-for-business-growth

    निवडणुका जिंकण्यासाठी, राजकीय कारभार सुरळीत चालवण्यासाठी, बँकिंग व्यवहारासाठी, प्रवासासाठी रस्ते शोधताना, घरपोच वस्तू व सेवा प्राप्त करण्यासाठी व अगदी काहीही करण्यासाठी आयटी क्षेत्राला महत्त्व प्राप्त झाले आहे.

    जगभरातील करोडो तरुण Social Media वर उपलब्ध आहेत. त्यांच्यापर्यंत आपला उद्योग पोहोचवणे सर्वात कमी किमतीत व कमी वेळेत सहजसाध्य झाले आहे. फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, गुगल प्लस, हाईक, टेलिग्राम असे अगणित मोबाईल ॲप्स सर्वांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेली पाहायला मिळतात. तुमच्या आमच्या सर्वाच्या मोबाईलमध्ये या social media उपकरणांचा समावेश हमखास असतो. जो कोणी समाज माध्यमाचा वापर करत नाही त्याला खचितच काही कळत नाही असा समज इतर लोकांचा होऊ शकतो.

    social-media-marketing-for-business-growth

    दिवसेंदिवस स्वस्त होणारे नेटपॅक खिशाला परवडत असल्याने तरुणाई मोबाईलची बॅटरी संपेपर्यंत मोबाईल हातातून सोडत नाही. अवघे जग आभासी जगाला (Virtual World) वास्तव मानू लागले आहे. दिवसभरातला अधिकाधिक वेळ मोबाईलवर व्यस्त असलेल्या व्यक्ती सर्व काही गुगलला विचारतात. आजकाल रस्ता विचारावा लागत नाही. वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानात जावे लागत नाही. पैशाचे व्यवहार करण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. मोबाईल व टीव्हीचे रिचार्ज घरबसल्या होऊ लागले. कुठेही जाताना खिशात रोख मोठ्या प्रमाणावर ठेवण्याची पध्दत आता इतिहासजमा झाली आहे. प्रियजनांना वाढदिवस व इतर प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी आठवण करुन देणारे सहाय्यक (Reminder) तर साध्या मोबाईलमध्ये सुध्दा उपलब्ध आहेत. नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज करता येतात. Video conferencing च्या माध्यमातून घरबसल्या मुलाखती देता येऊ लागल्या आहेत. परिक्षा व कितीतरी प्रशिक्षण क्रम घरबसल्या व्यक्ती शिकू लागला आहे. कर्जापासून अगदी आरोग्याचा सल्ला गुगल देऊ लागले आहे. स्वयंपाकघरातून बेडरुममध्ये व्हॉट्सॲपद्वारे संभाषण केले जाऊ लागले आहे. विनाचालक कार लवकरच बाजारात येतील. तुमचा पगार व इतर देणी-घेणी थेट तुमच्या खात्यात जमा होत आहेत. अशी न संपणारी उदाहरणांची यादी आहे. या सगळ्या गोष्टी आपले जीवन सुलभ व सोपे करण्यासाठी खूप सोयीस्कर झाल्या आहेत. ग्राहक म्हणून विचार केल्यास फायदेशीर ठरतातच.

    social-media-marketing-for-business-growth

    जेव्हा आपण व्यावसायिक म्हणून किंवा उद्योजक म्हणून विचार करतो तेव्हा आपल्या दृष्टीने सोयीस्कर झालेल्या काही गोष्टींची यादी पाहू या. ज्याप्रमाणे ग्राहक घरबसल्या ऑर्डर देऊ लागला आहे, त्याप्रमाणे आपल्याला ग्राहकांकडून त्या ऑर्डरचे पैसे थेट खात्यात जमा होण्याची प्रक्रिया निर्माण झाली आहे. दुकानात येऊन ग्राहक वस्तूंची निवड करताना दाखवावे लागणाऱ्या varieties नुसार होणारा पसारा होत नाही. त्याशिवाय वेळ वाचतो तसेच ग्राहकाची मानसिकता जाणून घेण्याची गरज उरत नाही. ग्राहक स्वतःच्या आवडी निवडी, पाहिजे तेवढ्या varieties, त्याच्या गरजेनुसार व आर्थिक क्षमतेनुसार ऑर्डर करतो त्यामुळे ग्राहकाला झेलायची वेळ विक्रेत्यावर येत नाही. दरामध्ये घासाघीस करावी लागत नाही. आपल्याला परवडणारी सूट (Discount) देऊन ग्राहकाला आकर्षित करता येते. जगभरातल्या कोणत्याही ठिकाणाहून आपल्याला ग्राहक मिळू शकतात. वेगवेगळ्या परवानग्या काढण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत नाहीत. कंपनी नोंदणी (Company Registration) पासून कर भरणा (Tax Filing) करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी स्वतःहून बसल्या ठिकाणी करु शकतो. व्हर्च्युअल ऑफिसच्या माध्यमातून व्यवसायाच्या कक्षा रुंदावतात. २४ * ७ म्हणजे आठवड्याचे सातही दिवस दररोज २४ तास आपला व्यवसाय आपल्या प्रत्यक्ष सहभागाविना चालू राहतो. तुम्ही झोपलेले असताना, जेवताना, चहा पिताना, गप्पा मारताना, व्यायाम करताना तसेच अगदी सहलीला गेल्यावर सुध्दा व्यवसाय चालूच राहतो. असे कितीतरी चमत्कार होत असतात.

    social-media-marketing-for-business-growth

    मात्र हे सगळं एवढं सोपं असूनही आपल्याला हे सर्व कसं साध्य करुन घेता येईल. आपल्या व्यवसायाची वेबसाईट असावी. त्या वेबसाईटला ऑनलाईन पध्दतीने ग्राहकांकडून पैसे येण्यासाठी पेमेंट गेटवे जोडलेला असावा. ग्राहकाला ऑर्डर करण्याची व्यवस्था असावी. व्यवसायाचे फेसबुक पेज असावे. सर्च इंजिन ऑप्टीमायझेशनच्या माध्यमातून आपली वेबसाईट गुगल शोधात पहिल्या क्रमांकावर कशी आणायची? बल्क मेसेज व बल्क Email काय आहे? त्याचा उपयोग करायचा कसा? फेसबुक पेज कसे तयार करावे? त्याचा प्रसार, प्रचार व प्रसिध्दी कशी करावी? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे साध्या भाषेत जाणून घेण्यासाठी एक महिनाभर आपण दररोज सकाळी दहा वाजता एक विषय घेऊन भेटू या.

  • सोशल मीडिया फॉर बिझनेस ग्रोथ

    सोशल मीडिया फॉर बिझनेस ग्रोथ

    डिजिटल मार्केटिंगच्या विश्वात

    सोशल मीडिया, वेबसाईट, डिजिटल प्रोग्रॅमिंग हे रोजच्या जीवनाचे भाग बनले आहेत. अशा काळात प्रत्येक उद्योजकाच्या पोटात भीतीचा गोळा आणणारी गोष्ट म्हणजे ज्याला डिजीटल जगाशी जोडता येणार नाही त्या उद्योजकाचा व्यवसाय कालबाह्य ठरणार आहे. पानपट्टी, टॅक्सी, रिक्षा, किराणा दुकाने सुध्दा ऑनलाईन व्हायला लागली आहेत.

    डिजीटल उपकरणांमुळे जग एकदम जवळ आले. त्यात प्रचंड बदल झाले. या आभासी जगाशी आपल्याला जुळवून घेण्यासाठी तयार राहणे गरजेचे आहे. या नव्या डिजीटल जगात हौस – नवसे – गवसे यांची संख्या सुध्दा प्रचंड प्रमाणात वाढली आहे. म्हणून आपला व्यवसाय डिजीटल करण्याआधी आपल्याला डिजीटल मार्केटिंगची पायाभूत माहिती असणे गरजेचे आहे. आपण जर या क्षेत्राशी संपूर्णपणे अनभिज्ञ असू तर भरल्या बाजारात आपल्याला ठगवणाऱ्यांची संख्या कमी नाही. तेव्हा जाणकार बनण्यासाठी आपल्याला डिजीटल मार्केटिंग कळणे, त्याच्या सेवा कुणाकडून घ्यायच्या कोणावर विश्वास ठेवायचा हे शिकणे सुध्दा गरजेचे आहे.

    गेल्या पाच वर्षात जेवढे बदल आपण पाहिलेले आहेत. तेवढे बदल संपूर्ण मानवजातीच्या इतिहासात घडून आलेले नाहीत. गेल्या काही वर्षात आपल्याला वस्तू खरेदी करण्यासाठी किराणा दुकान, सुपर मार्केट व मॉलमध्ये जाणे भाग होते. आता मात्र घरबसल्या फ्लिककार्ट, स्नॅपडील सारख्या कंपन्यांना हव्या त्या वस्तूची ऑर्डर द्या. दुसऱ्या दिवशी ती वस्तू आपल्या दारात येऊन उभी असते. त्याचे पैसेसुध्दा वस्तू हातात मिळाल्यावरच द्यायचे आहेत. पैशासाठी नोटा किंवा रोख रक्कमेचे निम्याहून अधिक व्यवहार इतिहासजमा झाले आहेत. मोबाईलचा रिचार्ज करणारी दुकाने बंद व्हायला लागली आहेत. कारण प्रत्येकजण आपल्या मोबाईल मधून रिचार्ज करु लागला आहे.

    सायबर कॅफेत बसण्यासाठी तरुणाई रांग लागलेली असायची त्या ठिकाणी आता सायबर कॅफे औषधाला सुध्दा सापडणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. डाटा सेवेवर पैसे कमावणाऱ्या टेलिकॉम कंपन्यामध्ये जास्तीत जास्त डाटा व इंटरनेट स्पीड देण्याची जणू काही स्पर्धाच चालू झालेली आहे. प्रत्येकाच्या हातात डिजीटल उपकरणे आलेली आहेत. ती कमालीची स्वस्त व खिशाला परवडणाऱ्या दरात तसेच मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. बातम्या वाचण्यासाठी वर्तमान पत्र किंवा टीव्ही वर अवलंबवून राहावे लागत नाही.

    अशा परिस्थितीत जगाची विभागणी एका न दिसणाऱ्या रेषेने दोन भागात झाली आहे. त्यातील पहिल्या भागाला वास्तव जग (Real World) म्हणतात. तर दुसऱ्या भागाला आभासी जग (Virtual World) म्हणतात. खऱ्याखुऱ्या जगात जगण्यासाठी या आभासी जगाचा आधार घेणे अपरिहार्य आहे. म्हणून या नव्या जगाशी जोडून राहण्यासाठी डिजीटल मार्केटिंगची माहिती व त्याचा वापर करुन आपला व्यवसाय वाढवणे ही प्रत्येक लहान मोठ्या उद्योजकाची गरज बनली आहे. तेव्हा आपण या डिजीटल दुनियेत प्रवेश करण्यासाठी तयार होऊया.

  • तुम्ही धंदा कोणता करता याला महत्त्व नाही, तो कसा करता याला महत्त्व आहे!

    तुम्ही धंदा कोणता करता याला महत्त्व नाही, तो कसा करता याला महत्त्व आहे!

    बाकीचे लोक रडतखडत किंवा अगदी नुकसानीत देखील व्यवसाय करीत असतात. धंदा तोच असतो, प्रॉडक्‍ट तेच असते, मार्केट तेच असते, तितकाच वेळ सर्वांकडे असतो. काही वेळेला तर भांडवल देखील कमी असते, तरी पण मोजके लोक चांगला धंदा करतात व बाकीचे रडतखडत किंवा कसा तरी धंदा चालवत असतात. मग दोघांमध्ये फरक काय आहे ? फरक आहे तो ऍटिट्यूडचा म्हणजे वृत्तीचा. एकाचे धंद्यावर प्रेम असते, तर दुसरा करावा लागतो म्हणून किंवा आता दुसरे काय करू म्हणून धंदा करीत असतो.

    याच वृत्तीवर – “ऍटिट्यूड‘वर एक तत्त्व लागू होते. त्याला “पॅरेटोज लॉ‘ म्हणतात किंवा “80/20‘ म्हणतात. एकाच मार्केटमध्ये 20 टक्के उद्योजक मिळून 80 टक्के धंदा करतात. उदा. शंभरातील वीस व्यापारी. एकूण धंदा समजा शंभर कोटींचा असेल, तर ऐंशी कोटींचा धंदा ते करतात. उरलेले ऐंशी, वीस कोटींच्या धंद्यात मारामारी करतात, हे तत्त्व सगळीकडे लागू होते, कारखानदारीत, व्यापारात, पेठेत, रोडवर, डॉक्‍टर, वकील व इतर व्यवसायात. त्याचे प्रमाण कमी-अधिक असू शकते. अगदी नोकऱ्या मिळण्यामध्ये देखील म्हणजे काहींना अजीर्ण होईल इतके मिळते व काहींना उपाशी राहावे लागते. असे का होते, तर त्याला वृत्तीच कारणीभूत असते.

    तुमचे जर तुमच्या व्यवसायावर प्रेम असेल, तर निश्‍चितच तुम्ही चांगला धंदा करू शकता. प्रेम कशाला म्हणतात, तर ज्याला कधी एकदा सकाळ होते व मी माझ्या उद्योगात जाऊन रमतो असे वाटते. जो कधीही आपल्या धंद्याबद्दल रडत बसत नाही, आपला धंदा वाईट आहे असे म्हणत नाही. धंद्यावर प्रेम असले की त्याला उत्साह असतो, जोश असतो, नवे विचार मनात येतात. अडचणी जरूर येतात; पण त्याला न घाबरता तो तोंड देतो, खचून तर निश्‍चितच जात नाही. उलट जोमाने कामाला लागतो.

    ज्यांचे धंद्यावर प्रेम असते, ती संस्था-कंपनी अगदी नोकरापासून मालकापर्यंत उत्तम काम करते व अर्थातच भरपूर नफा कमविते. एकदा का आपल्याला आपला धंदा मनापासून आवडतो म्हटले, की आपोआपच त्याला लागणाऱ्या योग्य गोष्टी घडतात. तुमचा स्टाफ, कामगार, ग्राहक, बॅंका, शेअरहोल्डर, आजूबाजूचा समाज सर्व जण खूष राहतात. कित्येक वेळेला, धंद्यामध्ये मागून आलेले लोक पुढे जातात, मोठे होतात. कारण अगोदरपासून त्या व्यवसायात असलेले लोक गाफील राहतात. धंदा ज्याप्रमाणे करायला पाहिजे, त्याप्रमाणे ते करीत नाहीत, योग्य बदल करीत नाहीत. निश्‍चितच कोठे तरी धंद्यावरचे प्रेम कमी झालेले असते. अलीकडे तर हे फार पाहायला मिळते.

    प्रत्येकाला दुसऱ्याचा धंदा चांगला वाटतो. तिथूनच गडबड सुरू होते. अनेक वेळेला मालकाचे वय झालेले असते, उत्साह कमी झालेला असतो, नवीन पिढी व्यवसायात येणार नसते; मग प्रेम कमी व्हायला लागते. धंदा तोच, पण आवड कमी झाल्यावर निश्‍चितच धंदा कमी व्हायला सुरू होतो. त्यामुळे जो उत्साही आहे, ज्याला आपला धंदा आवडतो, त्यालाच संधी दिसते. त्याच्या मनाची दारे कायम उघडी असतात व तेथेच लक्ष्मी येते.

    आज हवाच खराब आहे‘, “खूप कॉम्पिटीशन वाढली आहे‘, “पूर्वीसारखे मार्जिन राहिलेले नाही‘, “धंद्यात दम नाही‘, “सरकारची पॉलिसी बरोबर नाही‘, “जागतिक मंदी आहे‘, “पाऊसच पडलेला नाही‘.. अशी कारणे बऱ्याचदा ऐकू येतात. ते अगदी खरेही असेल; पण नुसती चर्चा करून काय होते, बोलून काय होते? अशी वाक्‍ये रोज पावलो-पावली ऐकायला मिळतात. एकतर आपल्याला आपला व्यवसाय चिकाटीने करायचा असेल, तर अशी वाक्‍ये बोलूच नाहीत व तसे बोलणाऱ्यांपासून चार हात लांब राहावे. कारण त्यांना फक्त रडायला खांदा हवा असतो.

    – अनामिक

  • १. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा – यवतमाळ

    १. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा – यवतमाळ

    आपण प्रत्येक जिल्ह्याचे उद्योग पाहण्याआधी त्यातील रस्ते, नैसर्गिक साधनसंपत्ती, नद्या, पाणीपुरवठा, वीज निर्मिती, दळणवळणाच्या इतर सोयी सुविधा यांचा बारकाईने अभ्यास करणार आहोत. कारण या प्रत्येक गोष्टींचा व्यवसायात अत्यंत महत्त्वाचा वाटा असतो. त्यानंतर त्या-त्या जिल्ह्यात चालणारे उद्योग व नवीन उद्योग निर्मितीला असणारा scope याविषयी आपण चर्चा करणार आहोत. व शेवटी त्या जिल्ह्यातील आता सध्याच्या घडीला असणारे यशस्वी उद्योजक कोण आहेत. याबद्दल चर्चा करणार आहोत.

    नॉर्थ-साऊथ कॉरिडोर हा राष्ट्रीय महामार्ग (National Highway -07) या जिल्ह्यातून जातो. त्यामुळे भारताच्या उत्तरेकडील राज्यांपासून ते थेट दक्षिणेकडील राज्यांना यवतमाळ जिल्हा जोडला गेला आहे. या मार्गावर पांढरकवडा हे महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे व्यवसायाच्या दृष्टीने इतर जिल्ह्याच्या तुलनेत यवतमाळ मधून रस्ते वाहतूक ही अतिशय सोपी झालेली आहे. पूर्ण भारताला दक्षिणोत्तर जोडणारा नॉर्थ-साऊथ कॉरिडोर महाराष्ट्राच्या नागपूर-वर्धा-यवतमाळ या तीन जिल्ह्यातून जातो. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर-नागपूर (National Highway – NH204) उमरखेड-आर्णी-यवतमाळ-कळंब या महत्त्वाच्या ठिकाणांना जोडतो. या मार्गामुळे पश्चिम महाराष्ट्र-मराठवाडा व विदर्भ एकमेकांशी जोडले गेले आहेत. त्यामुळे जवळजवळ अर्ध्याहून अधिक महाराष्ट्र राज्यात रस्त्याने व्यवसायजोडणी शक्य आहे.

    पैनगंगा नदी ही यवतमाळ जिल्ह्याची जीवनवाहिनी आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पैनगंगा नदी यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरुन वाहते. पैनगंगा नदीच्या उपनद्या या जिल्ह्याच्या अंतर्गत भागातून वाहत येऊन पैनगंगा नदीला मिळतात. पैनगंगा व तिच्या उपनद्यातून होणारा पाणीपुरवठा हा या जिल्ह्यातील पाण्याचा स्रोत आहे. पावसाचे प्रमाण हे कमी असून परतीचा मान्सून यवतमाळ जिल्ह्यात जोरदार बरसतो. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. येथील जास्तीत जास्त लोकजीवन हे शेतीवर अवलंबवून आहे. पाणीपुरवठ्याच्या तशा कोणत्याही ठळक योजना या जिल्ह्यासाठी उपलब्ध नाहीत.

    नेर, बाभूळगाव, कळंब, राळेगाव, दिग्रस, दारव्हा, पुसद, महागाव, उमरखेड, घाटंजी, पांढरकवडा, मारेगाव, झरी जामणी हे यवतमाळ जिल्ह्यातील तालुके आहेत. लघुद्योगाच्या मोठ्या प्रमाणावर वाढीसाठी यवतमाळ जिल्ह्यात पोषक वातावरण आहे. या जिल्ह्यात अकुशल कामगार मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र या जिल्ह्यातील लोकांची शिकण्याची वृत्ती ही फार चांगली आहे. शिक्षणासाठी मोठमोठ्या शैक्षणिक संस्था (काही तुरळक संस्था वगळून) या जिल्ह्यात नाहीत. गुणग्रहणाची उत्तम क्षमता या जिल्ह्यातील लोकांजवळ आहे. याशिवाय येथील तरुण शारीरिक क्षमतेने चांगले असल्याने त्यांच्यातील कलागुण ओळखून त्याच्या वाढीसाठी वाव मिळाला तर देशासाठी सर्वोत्कृष्ट खेळाडू या जिल्ह्यातून निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. आजवर क्षमता असून ही त्या गुणांना पैलू न पाडल्यामुळे आपला ठसा उमटवण्यात अपयशी ठरल्याचे पाहून खंत वाटते.

    आर्थिक उत्पन्नाचे स्रोत सुध्दा कमी आहेत. त्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची हुनर इथल्या माणसांमध्ये आहे. आयटी, manufacturing हे उद्योग वाढण्याच्या आधी शेतीपूरक उद्योग वाढीस लावण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील मोठे खाद्यान्नाचे ब्रँड तयार करण्याची क्षमता यवतमाळ जिल्ह्याची आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन करत असल्याने या जिल्ह्याला पांढरे सोने पिकवणारा जिल्हा ही ओळख प्राप्त झाली आहे. मात्र कापसावर प्रक्रिया करणारी मोठी केंद्रे या जिल्ह्यात नाहीत. त्यामुळे जिल्ह्याची आर्थिक बाजू तशी फार भक्कम होताना दिसत नाही. उत्तरेकडे आता कापसावर प्रक्रिया करणारा एक मोठा प्रकल्प अमरावती मध्ये निर्माण होत आहे. त्याचा फायदा यवतमाळला होऊ शकतो. शेती, सेवा, शेतीपूरक उद्योग, हातमाग, यंत्रमाग, आयटी, शिक्षण, बँकिंग व manufacturing उद्योग येणाऱ्या काळात या जिल्ह्यात वाढणार आहेत. तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत स्वतःची ओळख जपत हा जिल्हा लवकरच समृध्दीचे उद्दिष्ट साध्य करेल याची खात्री वाटते. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व मुंबई याठिकाणी व्यवसाय करण्याऐवजी यवतमाळ नवीन व्यवसाय उभारणे ही सोपी प्रक्रिया आहे. निर्माण होणारी उत्पादने नागपूरच्या बाजारपेठेत विकण्यासाठी सोयीस्कर आहे. विज्ञानाच्या प्रगतीने जग जवळ आले आहे. त्यामुळे जगभरात सर्वत्र ही उत्पादने विकली जाऊ शकतात.

    पुढील जिल्हा – वाशिम