Blog

  • Top 5 Business – गृहिणींसाठी टॉप 5 व्यवसाय

    Top 5 Business – गृहिणींसाठी टॉप 5 व्यवसाय

    पूर्वीच्या काळात फक्त चूल आणि मूल आणि वंश विस्तारासाठी वापरलं जाणारं साधन, एवढीच स्त्रियांची ओळख होती. कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत, अर्थार्जनात सहसा स्त्रियांचा वाटा नसायचा. त्यांचं काम फक्त घर आणि मुलं सांभाळणं इथपर्यंतच मर्यादित.

    पण काळ बदलला तसे लोकांचे विचारही बदलले. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या सारख्या काही स्त्रिया मुलींसाठी लढल्या आणि चित्र बदलत गेलं. समाज साक्षर होत गेला आणि मुलींनीही स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी सोडल्या नाहीत. 

    पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रियाही व्यवसायात उतरू लागल्या..आणि यशस्वी देखील झाल्या… 

    आजही अनेक गृहिणींना स्वतःचं काहीतरी करावं, व्यवसाय सुरू करावा, अशी इच्छा असते पण योग्य मार्गदर्शनाची कमतरता भासते..

    घरातील खर्चाला आपल्या परीने हातभार लावावा आणि स्वतःही आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हावे, अशी अनेक गृहिणींची इच्छा असते. अश्यावेळी आपल्या छंदाचे, आवडीचे रुपांतर आपण घरगुती म्हणजेच घरबसल्या करता येणाऱ्या व्यवसायात करू शकतो. यामुळे आवड जपल्याचे, छंद पूर्ण करण्याचे समाधान मिळेल, शिवाय यातून अर्थार्जन सुद्धा होईल.

    आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण असे 5 व्यवसाय पाहणार आहोत ..जे कोणतीही गृहिणी अगदी कमी भांडवलात आणि घरबसल्या सुरू करू शकते.

    1. फूड डिलिव्हरी व्यवसाय : 

    आजच्या धावपळीच्या युगात घरगुती जेवणाचे महत्त्व वाढले आहे. तुम्ही स्थानिक ग्राहकांसाठी घरगुती जेवण तयार करून ते डिलिव्हरी करू शकता. बऱ्यापैकी मुलं – मुली शिक्षणासाठी, नोकरीसाठी आपलं घर सोडून बाहेर राहत असतात. अशा वेळी त्यांना रोजचं बाहेर खाणं खिशाला आणि आरोग्याच्या दृष्टीनेही परवडत नाही, ही गरज ओळखून तुम्ही घरगुती मेस किंवा टिफिन सर्विस सुरू करू शकता, यासाठी तुम्हाला तुमच्या पाककृतींचा एक मेन्यू तयार करावा लागेल आणि  सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून तसेच Mouth Publicity करून त्याची जाहिरात करावी लागेल.

    आवश्यकता :

    • स्वच्छता आणि सुरक्षिततेचा विचार
    • चविष्ट आणि रुचकर जेवण 
    • सर्वसामान्यांना परवडणारे दर 

    2. हँडमेड प्रोडक्ट्स : 

    घरगुती आणि हाताने बनवलेल्या वस्तूंकडे लोकांचा कल वाढत आहे. जर तुम्हाला हस्तकला आवडत असेल किंवा तुमच्यात ते कौशल्य असेल तर तुम्ही हँडमेड प्रोडक्ट्स तयार करून त्याची विक्री करू शकता. सोप्या दागिन्यांपासून ते सजावटीच्या वस्तूंपर्यंत, या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. तुम्ही विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्म उदा. Etsy, Instagram, Meesho  वर तुमच्या उत्पादनाची विक्री करू शकता.

    आवश्यकता :

    •  कलात्मकता
    • चांगल्या मार्केटिंग कौशल्यांचा वापर
    • वेळेवर सेवा

    3. टयूशन्स : 

    जर तुम्ही शिकलेले असाल आणि  तुम्हाला एखादी संकल्पना दुसऱ्याला सोप्या पद्धतीने आणि समजेल अश्या भाषेत समजावून सांगता येत असेल, तर तुम्ही तुमच्या ज्ञानाचा वापर करून ऑनलाइन ट्यूटर म्हणून काम करू शकता. विविध विषयांमध्ये तुम्हाला शिकवण्याची आवड असेल, तर तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरू शकता. तसेच घरगुती शिकवणी देखील घेऊ शकता. 

    आवश्यकता :

    • विषयाची योग्य माहिती
    • शिकवण्याची हातोटी 
    • ऑनलाईन टयूशन्स साठी मोबाईल किंवा लॅपटॉप, इंटरनेट कनेक्शन 

    4. डे केअर सेवा :

    शहरी भागात डे केअर सेंटर किंवा पाळणाघरे ही आजच्या काळाची गरज बनली आहे. ज्या महिलांना लहान मुलांची आवड आहे, त्यांच्यासाठी पाळणाघर किंवा डे केअर हा एक उत्तम  व्यवसाय ठरू शकतो. नोकरदार महिला आपल्या मुलांना घरासारखे वातावरण मिळावे आणि प्रेमाने तसेच आवश्यक ती  काळजी घेऊन त्यांची  मुले सांभाळली जातील अश्या पाळणाघरांना प्राधान्य देताना दिसतात. त्यामुळे घरच्या घरी करता येणारा हा व्यवसाय फायदेशीर आहे.

    घरातच थोडी रिकामी, मोकळी हवा येणारी जागा असेल तर तेथेच हा व्यवसाय सुरु करता येतो. महिलांमध्ये मुळातच वात्सल्य हा गुण असतो. त्यामुळे तुमच्याकडे येणाऱ्या मुलांचा तुम्ही प्रेमाने सांभाळ करता असे एकदा दिसून आले की तुमच्या डे केअर ची जाहिरात या मुलांच्या पालकांकडूनच मोठ्या प्रमाणावर केली जाते. 

    आवश्यकता : 

    • जास्त संख्येने मुले असतील तर कुटुंबियांची मदत लागेल किंवा मदतनीस ठेवावी लागते. 
    • तसेच जेथे मुले आहेत तेथील जागेची स्वच्छता, शांतता, मुलांच्या खाण्यापिण्याची चोख व्यवस्था ठेवणे आवश्यक असते. 
    • मुलांना खेळण्यासाठी पुरेशी खेळणी, त्यांना झोपाविण्यासाठी योग्य व्यवस्था हवी. थोडे भांडवल घालून अशी व्यवस्था करता येते.

    5. Freelance लिखाण :

    जर तुम्हाला लिखाणाची आवड असेल, तुमच्यात लेखन कौशल्य असेल आणि एखाद्या विषयाची मांडणी आकर्षकपणे करण्याची हातोटी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही Freelance लेखक म्हणून काम करू शकता. तुम्ही ब्लॉग पोस्ट, लेख किंवा कॉपीराइटिंगसारख्या विविध प्रकारचे लिखाण करू शकता. अनेक कंपन्या आणि वेबसाईट्स‌ त्यांच्यासाठी Freelance लेखक शोधत असतात. 

    आजकाल  ई कॉमर्स व्यवसाय प्रचंड वेगाने वाढतो आहे. त्यासाठी थोडक्यात, आकर्षक स्वरुपात, सहज सोपा, व्यवसायाची माहिती करून देणारा मजकूर लिहून देणे असे या कामाचे स्वरूप आहे. व्यवसायात स्पर्धा वाढल्याने स्पर्धकापेक्षा आपली उत्पादने अधिक चांगली कशी हे ग्राहकांवर ठसविण्यासाठी अश्या मजकुराची आवश्यकता असते.

    याशिवाय स्वतःची Blogging Website सुरू करून देखील तुम्ही त्यावर लिखाण करू शकता.

     आवश्यकता :

    • आवड 
    • उत्कृष्ट लिखाण कौशल्य
    • मार्केटिंगच्या साधनांची माहिती
    • वेळेचं व्यवस्थापन
    • असे अनेक व्यवसाय गृहिणींना करता येऊ शकतात. ठरवलं तर सर्व शक्य आहे. 
    • इच्छाशक्ती, योग्य व्यक्तींचे सल्ले आणि कुटुंबाला विश्वासात घेऊन  तुम्हीही तुमच्या पायावर खंबीरपणे उभे राहू शकता…..
    • आता वेळ आली आहे एका गृहिणीची ताकद समाजाला दाखवून देण्याची..

  • Magicpin Success Story: लाखोंची नोकरी सोडून उभारली भारतातील तिसऱ्या क्रमांकाची फूड डिलिव्हरी कंपनी

    Magicpin Success Story: लाखोंची नोकरी सोडून उभारली भारतातील तिसऱ्या क्रमांकाची फूड डिलिव्हरी कंपनी

    झोमॅटो आणि स्विग्गी या दोन प्रमुख फूड डिलिव्हरी अ‍ॅप्सनंतर, भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे फूड डिलिव्हरी अ‍ॅप म्हणजे मॅजिकपिन. प्रचंड स्पर्धा असलेल्या या क्षेत्रात मॅजिकपिनने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, तुम्हाला मॅजिकपिनच्या यशामागे असलेल्या व्यक्तीविषयी माहिती आहे का? ती व्यक्ती म्हणजे अंशू शर्मा. त्यांची दूरदृष्टी, धडाडी, आणि कठोर परिश्रम यांनी मॅजिकपिनला यशाच्या शिखरावर पोहोचवले आहे.

    अतिशय साध्या सुरुवातीपासून त्यांनी आपल्या यशाचा मार्ग स्वतः घडवला. त्यांना माहित होते की चिकाटी, मेहनत आणि जिद्दीशिवाय यश मिळत नाही. त्यांच्या धाडसाने आणि अथक मेहनतीने मॅजिकपिनला आज या प्रतिष्ठित स्थानी पोहोचवले आहे.

    या लेखात आपण अंशू शर्मा यांचा जीवनप्रवास, त्यांचे संघर्ष, आणि मॅजिकपिनची स्थापना कशी झाली याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

    प्रारंभिक जीवन 

    अंशू शर्मा यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांची विशेष खासियत म्हणजे नव्या गोष्टी शोधण्याचा ध्यास आणि त्यातून मोठा परिणाम साधण्याची जिद्द. आयआयटी दिल्लीमधून संगणक विज्ञानाची पदवी, आयआयएम अहमदाबादमधून एमबीए, आणि Bain & Company सारख्या जगप्रसिद्ध कन्सल्टिंग फर्ममध्ये नोकरी मिळवणे ही अनेकांसाठी यशस्वी कारकीर्दीची परिसीमा असते. मात्र, अंशू यांची महत्त्वाकांक्षा यापेक्षा वेगळी होती. त्यांना स्वतःचे अस्तित्व निर्माण करून नवनवीन समस्यांचे समाधान शोधायचे होते आणि स्टार्टअप्सच्या माध्यमातून मोठा प्रभाव पाडायचा होता.

    २००९  साली त्यांनी Lightspeed Venture Partners या प्रसिद्ध व्हेंचर कॅपिटल फर्ममध्ये काम करण्याची संधी मिळवली, जिथे ते भारतातील दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या रूपात सहभागी झाले. येथे त्यांनी नऊ वेगवेगळ्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणुकीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि त्यांचा स्टार्टअप्सशी निगडित यशस्वी प्रवास सुरू झाला.

    याच काळात त्यांना भारतीय रिटेल क्षेत्रातील स्थानिक व्यापाऱ्यांसमोरील एका मोठ्या समस्येची जाणीव झाली.  ग्राहकांना आकर्षित करून त्यांना दीर्घकाळ टिकवून ठेवणे ही व्यापाऱ्यांसाठी अत्यंत आव्हानात्मक बाब होती.या समस्येवर उपाय शोधण्याचा दृढ निश्चय अंशू यांनी केला. त्यांनी आपल्या अनुभवाचा, कौशल्याचा आणि दूरदृष्टीचा उपयग करून रिटेल क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपाययोजना राबवण्यासाठी पावले उचलली. त्यांच्या या प्रयत्नांमुळे भारतीय स्टार्टअप्सच्या क्षेत्राला नवी दिशा मिळाली, आणि स्थानिक व्यवसायांसाठी प्रगतीचा मार्ग खुला झाला.

    मॅजिकपिनची स्थापना 

    सर्व काही सुरळीत चालले असतानाही अंशू यांच्या मनात एक मोठं स्वप्न होतं. सामान्यतः जेव्हा लोक सुरक्षित नोकरीचा विचार करतात, तेव्हा अंशू यांनी २०१५ मध्ये नोकरीचा  त्याग करून आपल्या कल्पनांना आकार देण्यासाठी मॅजिकपिन या फूड आणि फॅशन डिलिव्हरी कंपनीची स्थापना केली. अंशू यांना दृढ विश्वास होता की ग्राहकांच्या अनुभवावर आधारित स्मार्ट तंत्रज्ञानाच्या मदतीने फूड डिलिव्हरीच्या संकल्पनेस एक नवीन पातळीवर घेऊन जाता येऊ शकतं . मॅजिकपिन लवकरच एक अत्याधुनिक आणि लोकप्रिय फूड डिलिव्हरी अ‍ॅप बनलं.

    अंशू यांच्या नेतृत्वाखाली मॅजिकपिनने एक वेगळं व्यवसाय मॉडेल विकसित केलं, ज्यात ग्राहकांना त्यांच्या खरेदी बिलांचे फोटो अपलोड करून पॉइंट्स कमावण्याची संधी मिळते. या पॉइंट्सला नंतर विविध ऑफर्स आणि आकर्षक डिस्काउंट्समध्ये बदलता येतं. हे त्याचं खास वैशिष्ट्य होतं, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या खरेदी अनुभव अधिक फायदेशीर आणि मजेशीर बनवता आले.

    मॅजिकपिनने फूड डिलिव्हरीच्या पारंपरिक मॉडेलला एक वेगळा आणि नवीन आकार दिला. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ग्राहकांना स्थानिक रेस्टॉरंट्स, स्टोअर्स आणि फॅशन आउटलेट्सवर आकर्षक डील्स मिळतात . यामुळे ग्राहकांना त्यांच्या आवडत्या रेस्टॉरंट्स किंवा ब्रँड्स अधिक सोयीस्कर, किफायतशीर आणि फायदेशीर पद्धतीने शोधता येतात. मॅजिकपिन हे असे एक ठिकाण बनलं आहे,जिथं ग्राहकांना त्यांच्या खरेदीसाठी सर्वोत्तम ऑफर्स आणि डील्स उपलब्ध होतात, ज्यामुळे त्यांचा अनुभव अधिक समाधानकारक होतो.

    याशिवाय, अ‍ॅपवर सहज नेव्हिगेशन आणि  आंतरिक डिझाइनमुळे ग्राहकांना कोणत्याही अडचणीशिवाय ऑर्डर प्लेस करणं शक्य होतं. मॅजिकपिनचे वापरकर्ते ते सहज वापरू शकतात आणि त्यांना उपलब्ध असलेल्या अनेक प्रकारच्या ऑफर्स आणि डिस्काउंट्सचा लाभ घेता येतो. 

    संघर्ष ते विस्तार

    सुरुवातीला मॅजिकपिनला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. तांत्रिक समस्यांपासून ते खोट्या बिलांच्या समस्यांपर्यंत, तसेच व्यापाऱ्यांना  पैसे देण्यास तयार करणे यासारख्या अनेक अडचणी होत्या. या सर्व समस्यांचा सामना करत मॅजिकपिनने मेहनतीने उपाय शोधले आणि ग्राहकांच्या खरेदीची माहिती व्यापाऱ्यांना दिली, ज्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये विश्वास निर्माण झाला. यामुळे, मॅजिकपिनने आपला व्यवसाय मजबूत केला आणि एक सामाजिक मीडिया प्लॅटफॉर्म तयार केला, ज्यावर स्थानिक इव्हेंट्स, ब्रँड्स, आणि ऑफर्स शोधता येऊ लागल्या. यामुळे कंपनीला एका वर्षातच ७  पट वाढ साधता आली. २०१६ पर्यंत मॅजिकपिनकडे ३०,००० व्यापारी, १ दशलक्ष ग्राहक, आणि २५६  कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते.

    मॅजिकपिनने दिग्गज गुंतवणूकदारांकडून जसे की Lightspeed आणि Vy Capital यांच्याकडून निधी उभारला आणि आपली सेवा विविध क्षेत्रांमध्ये वाढवली. सलून्स, रेस्टॉरंट्स, आणि स्पा यांसारख्या व्यवसायांसोबत, त्यांनी McDonald’s आणि Taco Bell यांसारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सशी भागीदारी केली, ज्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांचा चांगलाच जम बसला . कोविड-१९ च्या काळातही, मॅजिकपिनने आपला धोरणात्मक दृष्टिकोन कायम ठेवला आणि व्यवसाय वाढवला. त्यांनी ५० शहरांमध्ये ४५ मिनिटांत फार्मसी डिलिव्हरी सेवा सुरू केली आणि दररोज ३ लाखांहून अधिक व्यवहार पूर्ण केले, ज्यामुळे त्यांचा बाजारात अधिक प्रभाव वाढला.

    यशाच्या शिखरावर 

    नोव्हेंबर २०२१ मध्ये झोमॅटोने मॅजिकपिनमध्ये ४४६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली, ज्यामुळे कंपनीचे मूल्य २४२३ कोटी रुपयांवर पोहोचले. हे कंपनीसाठी एक  मोठे टर्निंग पॉइंट ठरले आणि मॅजिकपिनचा प्रवास पुढे वेगाने सुरू झाला. आज, मॅजिकपिन ८००० कोटी रुपयांहून अधिक व्यवहार हाताळत आहे, आणि त्यांच्या प्रभावी कार्यप्रणालीमुळे ते भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे फूड डिलिव्हरी अ‍ॅप बनले आहे.

    अंशू शर्मा यांची कहाणी म्हणजे केवळ एक व्यवसायिक यशोगाथा  नाही, तर एक प्रेरणादायी प्रवास आहे. त्यांनी लाखोंची नोकरी सोडून भारतीय रिटेल क्षेत्राला नवी दिशा दिली. त्यांच्या दूरदृष्टी आणि कष्टामुळे मॅजिकपिन हे भारतीय स्टार्टअप्समधील एक यशस्वी आणि प्रभावशाली नाव बनले आहे. २५०० कोटी रुपयांची कंपनी उभारणे हि छोटी गोष्ट नाही, आणि त्यासाठी अंशु शर्मा यांचा  दृढ निश्चय, कष्ट आणि मानसिकता महत्त्वाची ठरली.

    मित्रांनो अंशू शर्मांच्या या प्रवासावरून  हे सिद्ध होतं की, दूरदृष्टी, मेहनत आणि नाविन्यामुळे कोणत्याही अडचणीवर मात करून काहीही साधता येऊ शकते. अंशू शर्मा यांचे नेतृत्व, धाडस आणि परिश्रम हेच मॅजिकपिनच्या यशाचे मुख्य कारण ठरले. खरंच, अंशू यांच्या “मॅजिक-पिन”ने इतिहास घडवला आहे!

    आणखीन वाचा:

  • मेरी ई-शॉप मीशो भारताच्या प्रमुख रीसेलिंग ॲपचा प्रवास

    मेरी ई-शॉप मीशो भारताच्या प्रमुख रीसेलिंग ॲपचा प्रवास

    वर्ष २०१५. दोन तरुण आयआयटी दिल्लीचे विद्यार्थी, विदित आत्रे आणि संजीव बर्नवाल, यांच्या मनात एक विचार घोळत होता काहीतरी असामान्य करायचं, जे फक्त त्यांच्यासाठी नाही, तर असंख्य लोकांच्या जीवनात बदल घडवू शकेल. मोठ्या मल्टी-नॅशनल कंपन्यांमध्ये आकर्षक नोकऱ्या असतानाही, या दोघांनी स्वतःच्या ध्येयाने प्रेरित होऊन त्या नोकऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एक असा प्लॅटफॉर्म उभारायचा ठरवलं ज्यामुळे लहान व्यापाऱ्यांना, विशेषत: महिलांना, आर्थिक स्वावलंबन आणि व्यवसायिक यश मिळवता येईल. त्या वेळी डिजिटल इंडिया आणि सोशल मीडिया हळूहळू लोकांच्या जीवनाचा भाग बनत होते, पण ई-कॉमर्सची कल्पना अजूनही अनेकांच्या आवाक्याबाहेर होती

    अशा वेळेला या दोन मित्रांनी या क्षेत्रातील संधी ओळखून तिचं   सोनं करतं   ‘मीशो (Meesho)’ची स्थापना केली,जिथे प्रत्येक व्यक्ती अगदी शून्य खर्चात आपला व्यवसाय सुरू करू शकतो. ‘मीशो (Meesho)’ म्हणजेच  ‘मेरी ई-शॉप’ हे अल्पावधीतच  प्रसिद्ध झालं, आणि आपल्या अनोख्या मॉडेलमुळे लोकांना घरबसल्या आपली उत्पादने विकण्याची संधी दिली. आज नवी अर्थंक्रांतीच्या माध्यमातून आपण मिशो च्या या प्रवासावर एक नजर फिरवूया

     सुरुवात आणि यशस्वी प्रवास

    सुरूवातीला , विदित आणि संजीव यांनी ‘फॅशनियर’ नावाच्या कंपनीची सुरुवात केली होती,  ज्या प्रमाणे झोमॅटो आणि स्विगी फूड इंडस्ट्री मध्ये सेवा देत होते अगदी त्याचप्रमाणे  ते फॅशन उद्योगासाठी सेवा देत होते. पण हा प्रयोग तितकासा यशस्वी ठरला नाही. तेव्हा त्यांनी आपले विचार  बदलून ‘मीशो (Meesho)’ची संकल्पना मांडली. ‘फॅशनियर’च्या अपयशामुळे ते  शिकले की, बाजारपेठेच्या वास्तविक गरजांचा सखोल अभ्यास करूनच काहीतरी प्रभावी तयार करायला हवे.

    एकदा विदित आणि संजीव कोरमंगला(बंगळूर) येथील स्थानिक बाजारपेठेतील एका दुकानदाराकडे गेले. तिथे त्या दुकानदाराने त्याच्या व्यवसायात वापरत असलेल्या एका खास ट्रिकची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, तो 

    आधीपासूनच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, जसे की फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सवर, आपली उत्पादने ‘ऑनलाइन’ विकत आहे. त्या ठिकाणी तो वारंवार आपल्या उत्पादनांचे फोटो ‘अपलोड’ करतो. या प्रक्रियेत, दुकानदार ऑर्डर घेतो, त्याचा एक कामगार वस्तू डिलिव्हरी करतो आणि ग्राहकांकडून रोख रक्कम घेतो.

    इतक्या साध्या आणि प्रभावी कल्पनेने विदित आणि संजीव खूप प्रेरित झाले. या कल्पनेवर विचार करून त्यांनी आपल्या ‘सॉफ्टवेअर’मध्ये आवश्यक ते बदल केले आणि त्यानंतर त्यांच्या व्यवसायाला एक नवीन दिशा मिळाली. अशाप्रकारे ‘मीशो (Meesho)’ची स्थापना झाली ‘मीशो (Meesho)’ची सुरुवात अशा वेळी झाली होती, जेव्हा सोशल ई-कॉमर्सची संकल्पना नुकतीच रुजत होती. विदित आणि संजीव यांनी त्यांच्या अनुभवांमधून शिकत, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून पुनर्विक्री मॉडेल तयार केले, ज्याने लाखो लोकांना आपला व्यापार सुरू करण्याची आणि वाढवण्याची संधी दिली.

    २०१६ मध्ये, ‘वाय कॉम्बिनेटर’ या स्टार्टअप्सना सहाय्य देणाऱ्या प्रसिद्ध संस्थेने ‘मीशो (Meesho)’ची निवड केली, ज्यामुळे ‘मीशो (Meesho)’ला जागतिक स्तरावर ओळख मिळाली. यानंतर ‘मीशो (Meesho)’ने आपला विस्तार केला आणि केवळ पाच वर्षांत ‘युनिकॉर्न क्लब’मध्ये सामील होऊन साडेसात हजार कोटी रुपये मुल्यांकनाचा टप्पा गाठला. ‘मीशो (Meesho)’ने जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले, आणि ‘सॉफ्ट बँक व्हिजन फंड’, ‘फेसबुक’, ‘शुनवेई कॅपिटल’ यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांकडून निधी उभारला. 

     विस्तार आणि भविष्याच्या  संधी

    मीशो (Meesho) च्या पुनर्विक्री मॉडेलमुळे लोकांना सहजपणे उत्पादनांचे विक्री आणि वितरण करण्याची संधी मिळाली. येथे कोणत्याही विक्रेत्याला त्याचा  उत्पादन ‘फेसबुक’, ‘व्हॉट्सअ‍ॅप’, आणि ‘इन्स्टाग्राम’वर शेअर करता येतं, मीशो (Meesho)’ थेट उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचवते, ज्यामुळे प्रत्येकाला नफा होतो,पुरवठादाराचा  माल विकला जातो, पुनर्विक्रेत्याला नफा मिळतो, आणि ‘मीशो (Meesho)’ला त्याचे कमिशन मिळते.

    आज, ‘मीशो (Meesho)’कडे १.७ कोटींहून अधिक पुनर्विक्रेते आहेत. ‘मीशो (Meesho)’ने लहान आणि मध्यम शहरांमध्ये विशेष लक्ष केंद्रित केले आहे, ज्यामुळे ई-कॉमर्सच्या क्षेत्रात एक मोठी क्रांती घडली आहे. ‘मीशो (Meesho)’ने दोन हजारांपेक्षा जास्त छोट्या-मध्यम शहरांना सेवा दिलेली आहे, ज्यामुळे भारतातील छोट्या व्यापारांना एक नवा मंच मिळाला आहे.

    भविष्यात मीशो (Meesho) आपल्या ‘यूजर फर्स्ट’ नीतीतून  ‘मीशो (Meesho) मॉल’ ची सुरुवात करून एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकणार आहे. हा  त्यांचा विस्तार भारतीय जनतेच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम असेल . ‘मीशो (Meesho) मॉल’ ब्रँडेड वस्तूंसह उत्पादनांचे मुबलक प्रमाण  सादर करेल, त्यांचा  उद्देश भारतीय ग्राहकांसाठी खरेदीचा अनुभव अधिक उत्तम बनवणे आहे.

    विदित आत्रे यांचे मत आहे की, भारतातील स्मार्टफोन वापरणाऱ्या ५० कोटी लोकसंख्येपैकी केवळ १ कोटी लोक ऑनलाइन खरेदी करतात, याचा अर्थ अजूनही एक मोठी संधी उपलब्ध आहे. ‘मीशो (Meesho)’ने या संधीचा लाभ घेत, अनेक छोटे व्यापारी, विशेषत: महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळवून दिले आहे

    मीशो (Meesho)’ची कहाणी केवळ दोन तरुण उद्योजकांच्या यशाची नाही, तर ती हजारो, लाखो लहान व्यापारी आणि महिलांच्या सक्षमीकरणाची गोष्ट आहे. विदित आत्रे आणि संजीव बर्नवाल यांनी त्यांच्या धाडसाने आणि नवनिर्माणाच्या इच्छाशक्तीने ‘मीशो (Meesho)’सारख्या सोशल ई-कॉमर्स  प्लॅटफॉर्मची स्थापना केली. ‘मीशो (Meesho)’ने हे सिद्ध केले आहे की, योग्य संधी उपलब्ध करून दिल्यास, कोणताही व्यक्ती किंवा व्यवसाय मोठं यश मिळवू शकतो. त्यांच्या या यशस्वी प्रवासाने आणि ‘मीशो (Meesho)’च्या वाढत्या लोकप्रियतेने हे दाखवून दिलं आहे की, स्वप्न आणि ध्येयांच्या मागे धावणारे  माणसं , कितीही मोठ्या गोष्टी साध्य करू शकतात .

    मीशो (Meesho)ची कहाणी म्हणजे संधी ओळखणं, आव्हानं पेलणं, आणि जिद्दीने यशाच्या दिशेने वाटचाल करणं याचं प्रतीक आहे. ‘मीशो (Meesho)’ने केवळ ई-कॉमर्सच्या क्षेत्रात नाही तर आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेनेही एक नवा अध्याय लिहिला आहे. त्यामुळे, ‘मीशो (Meesho)’ ची प्रेरणादायी कहाणी  प्रत्येक उद्योजकाला आणि स्वप्नाळू व्यक्तीला पुढे जाण्यासाठी प्रेरित करते.

  • Work Life Balance: आपण जगण्यासाठी काम करतोय की कामासाठी जगतोय?

    Work Life Balance: आपण जगण्यासाठी काम करतोय की कामासाठी जगतोय?

    सध्या एल अँड टी कंपनीचे अध्यक्ष एस. एन. सुब्रमण्यन यांच्या कामाच्या तासांबाबत केलेल्या विधानाने सध्या खूप चर्चा रंगली आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून ९० तास काम करावं,असं म्हटलं आहे. तसेच, “रविवारीही कामावर या. तुम्ही घरी बसून काय करता? तुम्ही तुमच्या पत्नीकडे किती वेळ पाहू शकता? तुमची पत्नी तुमच्याकडे किती वेळ पाहू शकते? ऑफिसला जा आणि कामाला लागा,” असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं . या वक्तव्यानंतर विविध क्षेत्रांतून, बॉलिवूडपासून राजकारण आणि खेळ जगतातील दिग्गजांनी, तसेच सोशल मीडियावर लोकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

    याआधी इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनीही तरुणांनी आठवड्यातून ७० तास काम केलं पाहिजे, असं विधान केलं होतं. आता सुब्रमण्यन यांच्या विधानाने पुन्हा एकदा कामाच्या तासांवर चर्चा सुरु झाली आहे.

    या पार्श्वभूमीवर, आजच्या लेखात आपण प्रगत देशांतील वर्क कल्चरचा आढावा घेणार आहोत. जगभरात विविध देशांमध्ये कामाचे किती तास बंधनकारक असतात, वर्क-लाईफ बॅलन्स कसा सांभाळला जातो, किती तास अराम दिला जातो आणि तेथील कामगारांच्या हक्कांना कशी वागणूक दिली जाते, याचा सविस्तर आढावा घेणार आहोत. 

    वर्क-लाइफ बॅलन्स आणि जागतिक वर्क कल्चर

    अर्जेंटिना

    अर्जेंटिनामध्ये कामाचे तास कायदेशीररित्या ठरवले गेले आहेत. आठवड्याला कमीतकमी ४८ तास काम करण्याची परवानगी आहे. ओव्हरटाईम दररोज जास्तीत जास्त तीन तास आणि आठवड्यात ठराविक मर्यादेपर्यंत करता येतो. ओव्हरटाईमसाठी नियमित वेतनाच्या ५० % जास्त वेतन दिले जाते, तर सुट्टीच्या दिवशी काम करणाऱ्यांना १०० % अतिरिक्त वेतन मिळते.

    दक्षिण कोरिया

    दक्षिण कोरिया हा देश वर्क-लाइफ बॅलन्सकडे खूप लक्ष देतो. इथे सरकारने ठरवले आहे की एक व्यक्ती आठवड्यात फक्त ४० तास काम करेल. त्याचबरोबर ओव्हरटाईम काम करण्याचे काही नियम आहेत. ओव्हरटाईम कामाचे तास आठवड्यात जास्तीत जास्त ५२ तास असू शकतात. जर एखादी कंपनी कर्मचाऱ्याला यापेक्षा जास्त काम करायला सांगत असेल, तर त्या कंपनीवर कायदेशीर कारवाई केली जाते. ओव्हरटाईमसाठी कर्मचाऱ्यांना २००% अधिक वेतन दिले जाते. यामुळे कर्मचाऱ्यांना आपले वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य उत्तम प्रकारे समतोल राखता येते.

    मेक्सिको

    मेक्सिको या देशात सुद्धा  कामाचे कायदेशीर तास निश्चित केले आहेत. प्रत्येक आठवड्यात एक व्यक्ती जास्तीत जास्त ४८ तास काम करू शकतो. या 48 तासांमध्ये आठवड्यातील कामाचे वेळेचे विभाजन केले जाते, म्हणजे दररोज किती तास काम करावे हे ठरवले जाते.

    जर एक कर्मचारी त्याच्या नियमित कामाच्या वेळेपेक्षा अधिक वेळ काम करत असेल, तर त्याला ओव्हरटाईम मिळतो . मेक्सिकोमध्ये ओव्हरटाईमची मर्यादा आठवड्यात जास्तीत जास्त नऊ तास आहे. म्हणजे, नियमित 48 तासांनंतर एक कर्मचारी 9 तास अधिक काम करू शकतो.

    आणि या ओव्हरटाईमसाठी त्याला त्याच्या नियमित वेतनाच्या तीन पट वेतन दिले जाते. उदा , कार्मचाऱ्याला प्रत्येक तासाला 100 रुपये मिळत असतील, तर ओव्हरटाईमच्या तासांसाठी त्याला 300 रुपये प्रति तास मिळतील.

    जपान

    जपान हा देश त्याच्या जलद प्रगतीसाठी प्रसिद्ध असला तरी, इथे कामगारांच्या हक्कांना विशेष प्राधान्य दिलं जातं. जपानमध्ये कामाचे तास वाढवण्याऐवजी कामाचा दर्जा सुधारण्यावर अधिक लक्ष केंद्रित केलं जातं. कामाच्या वेळा कर्मचाऱ्यांच्या सोयीनुसार असतात, आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याला देखील तितकंच महत्त्व दिलं जातं. हे देश कामाच्या बाबतीत अत्यंत लवचिक असतो आणि कामकाजाची वेळ यथासंभव कर्मचाऱ्यांच्या गरजेनुसार निश्चित केली जाते.

    जपानमध्ये आठवड्यात ४० तास काम करण्याची मर्यादा आहे, ज्यामुळे कामाचा ताण आणि कामाच्या वेळेतील असमानता कमी केली जाते. ओव्हरटाईम कामासाठी काही अतिरिक्त फायदे देखील दिले जातात. सोमवारी ते शुक्रवार दरम्यान ओव्हरटाईम काम केल्यास २५ % अधिक वेतन मिळते. शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी ओव्हरटाईम काम केल्यास ३५ % अधिक वेतन दिलं जातं. यामुळे कर्मचारी नेहमी उत्साही आणि समाधानी असतात.  

    स्पेन

    स्पेनमध्ये कामाचे नियम खूप स्पष्ट आणि ठरलेले आहेत. येथे एका आठवड्यात ४८ तासांपर्यंत काम करण्याची परवानगी आहे, ज्याचा अर्थ एक व्यक्ती आठवड्यात जास्तीत जास्त ६ दिवस काम करू शकते, प्रत्येक दिवशी ८ तास. परंतु, एका दिवसात जास्तीत जास्त ९ तास काम करण्याची मर्यादा आहे. यामुळे कामाच्या वेळांची योग्य अशी आखणी केली जाते, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे आणि कल्याणाचे संरक्षण होते.

    अमेरिका आणि इंग्लंड

    अमेरिका आणि इंग्लंड हे दोन्ही अत्यंत प्रगत देश आहेत, जिथे काम आणि जीवन यामध्ये समतोल साधण्याला खूप महत्त्व दिलं जातं. या देशांमध्ये वर्क-लाइफ बॅलन्ससाठी अनेक नियम आणि धोरणे तयार केलेली आहेत. एक अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे, एका आठवड्यात ४० तासांपेक्षा जास्त काम करण्याची मर्यादा नाही. यामुळे, कर्मचारी आपल्या कामाशी संबंधित वेळेचा योग्य वापर करु शकतात, तसेच त्यांना वैयक्तिक जीवनासाठी पुरेसा वेळ मिळतो.

    याशिवाय, ओव्हरटाईमसाठी विशेष धोरण आहे. जर कोणत्याही कर्मचार्याला त्यांच्या नियमित कामाच्या वेळापेक्षा अधिक काम करावं लागलं, तर त्यांना त्याच्या नियमित वेतनाच्या १.५ पट वेतन दिलं जातं. यामुळे कामाचा ताण कमी होतो आणि कर्मचारी अधिक उत्पन्न मिळवू शकतात. याचे मुख्य कारण म्हणजे कर्मचाऱ्यांच्या जीवनाच्या गुणवत्तेला प्राथमिकता देणे आणि त्यांच्या कष्टाची योग्य फेड करणे.

    ब्राझील

    ब्राझीलमध्ये कामाचे तास कायदेशीरदृष्ट्या ठरवले गेले आहेत. प्रत्येक कामगारासाठी आठवड्यातील कामाची जास्तीत जास्त मर्यादा ४४ तास असते. याचा अर्थ असा की, आठवड्यात कामाच्या ६ दिवसांत, दिवसाला अधिकतम ८ तास काम करता येईल.

    त्याचबरोबर, जर कामगाराला ओव्हरटाईम (अतिरिक्त तास) काम करावयाचे असतील, तर त्याची मर्यादा प्रतिदिन दोन तास असते. यामध्ये, जर एखाद्या व्यक्तीने नियमित वेळेपेक्षा जास्त तास काम केले, तर त्यासाठी त्याला अतिरिक्त पैसे दिले जातात.

    भारत

    भारतामध्ये वर्क-लाइफ बॅलन्स प्रगत देशांच्या तुलनेत अजूनही मागे आहे.सामान्यपणे, कामाची वेळ सकाळी ९ वाजता सुरू होऊन संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चालते, ज्यामुळे आठवड्यात साधारणपणे अंदाजे  ४६.७ तास काम होते . काही नोकऱ्यांमध्ये या तासांची मर्यादा अधिक असू शकते, विशेषत: ज्या नोकऱ्यांमध्ये उच्च कार्यदबाव आहे.

    सुटीची संख्या देखील कमी आहे. भारतातील बहुतेक कंपन्यांमध्ये शनिवार आणि रविवार सुटी असते , पण काही ठिकाणी कामाच्या आवश्यकतेनुसार सुट्टीत  बदल  होत असतात. साधारणपणे, भारतीय कर्मचार्यांना १२ ते १६ सार्वजनिक सुट्ट्या मिळतात, आणि ही संख्या राज्यानुसार बदलते. काही राज्यांमध्ये सुट्ट्यांची संख्या अधिक किंवा कमी असू शकते.

    थोडक्यात सांगायचं तर, कामाचे जास्त तास  म्हणजे यश मिळवण्याचे कारण नाही, तर कामाची गुणवत्ता महत्त्वाची आहे. कर्मचारी तणावमुक्त आणि समाधानी असतील, तरच उत्पादकता वाढते.

  • बजेट तयार करण्याचा सोपा कानमंत्र; महिन्याच्या २० तारखेला पाकीट रिकामं होणार नाही!

    बजेट तयार करण्याचा सोपा कानमंत्र; महिन्याच्या २० तारखेला पाकीट रिकामं होणार नाही! 

    महिन्याची २० तारीख आली की पाकीट रिकामं होतंय….पगार कधी येतो आणि कधी संपतो, काही कळतच नाही….. महागाई इतकी वाढलीये की बचत करणं आता अशक्यच झालंय…. असे संभाषण आता प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला मिळत आहेत. वाढत्या महागाईमुळे आपल्यापैकी प्रत्येकाच्याच घरात, लोकल प्रवासात किंवा चहाच्या टपरीवर याच विषयावर चर्चा होतांना दिसत आहे. 

    दरमहा वस्तूंचे वाढणारे भाव आणि त्या तुलनेत स्थिर असणारे उत्पन्न यांमुळे आजचा सर्वसामान्य माणूस महागाईच्या चक्रव्यूहात अडकला आहे. पण या महागाईवर रडत बसण्यापेक्षा, तिच्याशी दोन हात करण्याचा एक अचूक मंत्र आपल्याच हातात आहे, तो म्हणजे ‘आर्थिक बजेट’ (Financial Budget). जर तुम्ही अजूनही स्वतःचे बजेट बनवले नसेल, तर तुमच्या मानसिक आणि आर्थिक तणावाचे मुख्य कारण हेच आहे. बजेट म्हणजे पैशांवर बंधनं घालणं किंवा स्वतःचे छंद मारणं नव्हे, तर आपल्या कष्टाच्या पैशांना योग्य दिशा दाखवणं आहे. अजूनही तुम्ही स्वतःचे बजेट प्लॅन केले नसेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की वाचा!

    बजेट म्हणजे नक्की काय? 

    सोप्या भाषेत सांगायचं तर बजेट म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य. बजेट तुम्हाला हे सांगत नाही की तुम्ही खर्च करू नका उलट ते तुम्हाला हे सांगते की तुम्ही तुमचा पैसा कुठे आणि कसा खर्च केला पाहिजे, जेणेकरून नंतर पश्चात्ताप करण्याची वेळ येणार नाही. तुमच्याकडे येणारा पैसा (Income) आणि जाणारा पैसा (Expenses) यांचा अचूक ताळेबंद म्हणजे बजेट. महागाईच्या काळातही तुमच्या गरजा आणि स्वप्नं पूर्ण करण्याचा हा सर्वात सोपा आणि शास्त्रीय मार्ग आहे.

    आजच्या काळात बजेट असणे का गरजेचे आहे?

    वाढती महागाई तुमच्या हातात नाही मात्र खिशातून जाणाऱ्या पैशांना नियंत्रित करणे तुमच्याच हातात आहे. त्यासाठी स्वतःचे बजेट आखणे गरजेचे आहे. आर्थिक बजेटमुळे तुमच्या आयुष्यात अनेक मोठे बदल होऊ शकतात. जसे की, दरमहा आपण नकळतपणे अशा अनेक गोष्टींवर खर्च करतो, ज्यांची खरोखर गरज नसते. वीकेंडला होणारे ऑनलाईन शॉपिंग, वारंवार हॉटेलिंग किंवा न वापरलेले सबस्क्रिप्शन्स यांमुळे पैसा कुठे जातो, हे समजत नाही. बजेटमुळे हा विनाकारण होणारा खर्च समोर येतो आणि पैशांची गळती थांबते. 

    दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा पेट्रोल, डिझेल किंवा भाजीपाल्याचे भाव वाढतात, तेव्हा बजेट आपल्याला काटकसर करायला शिकवते. अनावश्यक खर्च कमी करून, तो पैसा वाढलेल्या महागाईचा भार सोसण्यासाठी कसा वापरायचा, याचे नियोजन बजेटमुळे शक्य होते. कारण आयुष्यात संकट कधी सांगून येत नाही. अचानक आलेला वैद्यकीय खर्च किंवा नोकरीवरील संकट यामुळे अनेकांवर कर्ज घेण्याची वेळ येते. बजेटच्या सवयीमुळे दरमहा एक ठराविक रक्कम Emergency Fund म्हणून बाजूला राहते, जी संकटकाळात तुमची सर्वात मोठी सुरक्षा ढाल बनते. एवढेच काय तर मुलांचे उच्च शिक्षण, स्वतःचे हक्काचे घर किंवा सन्मानाने जगण्यासाठी लागणारे निवृत्तीवेतन (Retirement Planning) यांसारख्या मोठ्या उद्दिष्टांचा पाया म्हणजे आजचे बजेट. आज केलेली छोटी बचत उद्याचे मोठे भविष्य सुरक्षित करते.

    स्वतःचे बजेट तयार करण्याची सोपी पद्धत

    बजेट बनवणं खूप कठीण किंवा गणिताचे काम आहे असं वाटत असेल, तर जगातील सर्वात सोपा ५०:३०:२० चा नियम वापरून बजेट तयार करा. तुमच्या एकूण उत्पन्नाची विभागणी खाली दिल्याप्रमाणे तीन भागात करा:

    ५०% भाग: तुमच्या गरजा (Needs)

    तुमच्या पगारातील अर्धा भाग हा ज्या गोष्टींशिवाय तुम्ही जगू शकत नाही, त्यावर खर्च झाला पाहिजे. यामध्ये घरभाडे, होम लोनचा EMI, किराणा माल, वीज-पाणी बिल, मुलांची शाळा-कॉलेज फी आणि औषधोपचार यांचा समावेश होतो.

    ३०% भाग: तुमच्या इच्छा (Wants)

    तुमच्या एकूण उत्पन्नातील ३० टक्के भाग तुमच्या इच्छा आणि आनंदासाठी आहे. माणसाने फक्त गरजा पूर्ण करण्यासाठी जगू नये, तर आयुष्य जगण्याचा आनंदही घेतला पाहिजे. हॉटेलिंग, फिरायला जाणे, नवीन कपडे खरेदी करणे किंवा तुमचे छंद यांवर तुम्ही हा पैसा खर्च करू शकता. पण लक्षात ठेवा, हा खर्च ३० टक्क्यांच्या वर जाता कामा नये.

    २०% भाग: बचत आणि गुंतवणूक (Savings & Investment)

    प्रत्येक महिन्याचा पगार खात्यात जमा झाल्यावर सर्वात आधी २० टक्के भाग बाजूला काढा. कारण तुमच्या बजेटमधील २० टक्के हा भाग सर्वात महत्वाचा आहे. हा पैसा नुसता बँक खात्यात न ठेवता म्युच्युअल फंड (SIP), पीपीएफ (PPF), शेअर्स किंवा मुदत ठेव (FD) यांसारख्या चांगल्या ठिकाणी गुंतवा, जेणेकरून महागाईपेक्षा जास्त परतावा तुम्हाला मिळेल.

    बजेट कसे सुरू करावे?

    सुरुवातीला फक्त एक महिना तुमचा प्रत्येक रुपया कुठे खर्च होतोय, याची डायरीमध्ये किंवा मोबाईलमध्ये नोंद ठेवा. त्यानंतर खर्च करताना हा खर्च माझी गरज आहे की इच्छा? हा एकच प्रश्न स्वतःला विचारा आणि त्यानुसार बजेट प्लॅन करा. सुरुवातीला बजेट शंभर टक्के पाळता आले नाही तरी चालेल, पण सुरुवात करणे महत्त्वाचे आहे. एक गोष्ट मनाशी पक्की करून घ्या महागाई कधीच कमी होणार नाही, काळासोबत वाढतच राहणार आहे.

    अशा वेळी केवळ कमावणे आणि खर्च करणे या चक्रात अडकून पडलो, तर आर्थिक विवंचना कधीच संपणार नाही. या चक्रातून बाहेर पडून कमावणे म्हणजे आधी बचत करणे आणि मग उरलेले खर्च करणे हाच आर्थिक सुखाचा एकमेव कानमंत्र आहे. त्यामुळे आजच डायरी आणि पेन घ्या किंवा मोबाईल उघडा आणि तुमचे बजेट तयार करा. लक्षात ठेवा, स्वतःचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी बजेट बनवण्याची सर्वोत्तम वेळ आज आणि आत्ताच आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा!

  • भारतातील ‘हे’ राज्य आहे पूर्णपणे Tax Free! कारण माहितीय का?

    भारतातील ‘हे’ राज्य आहे पूर्णपणे Tax Free! कारण माहितीय का?

    मार्च महिना आला की सगळ्यांची एकच धाकधूक असते ITR (Income Tax Return) कसा भरायचा? आणि टॅक्स कसा वाचवायचा? पण मित्रांनो तुम्हाला माहिते का? आपल्या भारतातच एक असं राज्य आहे, जिथे लोकांना इन्कम टॅक्स काय असतो हेच माहीत नाही… होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत. तुम्ही वर्षाला ५ लाख कमवा किंवा ५० लाख, सरकारला एक रुपयाही टॅक्स द्यावा लागत नाही. हे राज्य आहे सिक्कीम!

    आता तुम्ही म्हणाल, असं कसं काय शक्य आहे? आपण तर चहाच्या कपापासून पेट्रोलपर्यंत सगळीकडे टॅक्स (Tax) भरतोय. मग सिक्कीममध्ये टॅक्स का नाही? तर यामागे एक ऐतिहासिक कारण आहे. १९७५ मध्ये जेव्हा सिक्कीम भारताचा २२ वा भाग बनला, तेव्हा एका करारा अंतर्गत भारतीय संविधानात कलम ३७१ (F) जोडण्यात आले. या विशेष कायद्यानुसार, सिक्कीमच्या मूळ रहिवाशांना भारताचा ‘इन्कम टॅक्स ॲक्ट १९६१’ लागू होत नाही. म्हणजेच, त्यांची १००% कमाई थेट त्यांच्याच बँक खात्यात राहते.

    पण इथे एक ट्विस्ट आहे, ही करसवलत फक्त आणि फक्त सिक्कीमच्या मूळ रहिवाशांनाच लागू होते. म्हणजेच जे १९७५ पूर्वीपासून सिक्कीममध्ये स्थायिक आहेत आणि ज्यांच्याकडे सिक्कीम सब्जेक्ट सर्टिफिकेट आहे अशांनाच या करसवलतीचा फायदा घेता येतो. जर तुम्ही महाराष्ट्रातून किंवा इतर राज्यातून तिथे जाऊन व्यापार किंवा नोकरी करत असाल, तर तुम्हाला मात्र नियमानुसार टॅक्स भरावाच लागेल.

    तसेच, ही सवलत फक्त तिथल्या स्थानिक उत्पन्नावर आणि शेअर्स किंवा सुरक्षित गुंतवणुकीवर मिळणाऱ्या नफ्यावर मिळते. निसर्गाचा अनमोल ठेवा, प्रदूषणमुक्त वातावरण, १००% सेंद्रिय शेती आणि वरून पैशांची होणारी ही मोठी बचत… यामुळेच सिक्कीम हे खऱ्या अर्थाने भारताचे ‘टॅक्स फ्री हेवन’ मानले जाते.

  • EPF म्हणजे काय? नोकरदार वर्गातील ५ मोठे गैरसमज आणि त्याचे सत्य!

    EPF म्हणजे काय? नोकरदार वर्गातील ५ मोठे गैरसमज आणि त्याचे सत्य!

    नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पगारातून दरमहा एक ठराविक रक्कम कट होते आणि ती एका विशिष्ट खात्यात जमा होते, त्याला आपण EPF (Employees Provident Fund) म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणतो. अनेक जण या कपातीकडे पगार कमी करणारी गोष्ट म्हणून पाहतात, तर काही जण याला फक्त एक सरकारी नियम समजून दुर्लक्ष करतात. पण तुम्हाला माहित आहे का? EPF हा केवळ तुमच्या पगारातून कापला जाणारा एक आकडा नाही, तर ते तुमच्या सुरक्षित भविष्याचं आणि सेवानिवृत्तीचं (retirement) सर्वात मोठं हत्यार आहे. पण आजही नोकरदार वर्गामध्ये EPF बद्दल अर्धवट माहिती आणि अनेक गैरसमज आहेत. आज आपण या लेखात EPF म्हणजे काय? आणि नोकरदार वर्गामध्ये याबद्दल असणारे ५ मोठे गैरसमज कोणते आहेत? अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.

    EPF विषयी थोडक्यात माहिती

    EPF ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी एक अत्यंत सुरक्षित आणि खात्रीशीर बचत योजना आहे. ‘कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना’ (EPFO) याद्वारे या संपूर्ण निधीचे नियंत्रण केले जाते. नियम असा आहे की, ज्या कंपनीत २० पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात, तिथे EPF कायदा लागू होतो. याचाच अर्थ तुमच्या मूळ पगाराच्या (Basic Salary + Dearness Allowance) १२% रक्कम दरमहा या फंडात जमा होते. त्याचबरोबर १२% रक्कम तुमची कंपनी (Employer) सुद्धा तुमच्या EPF खात्यात जमा करते. विशेष म्हणजे कंपनीच्या १२% पैकी ८.३३% रक्कम तुमच्या पेन्शन योजनेत (EPS) जाते आणि उर्वरित ३.६७% रक्कम EPF खात्यात जमा होते. सोप्या भाषेत सांगायचं तर, तुम्ही जेवढी बचत करता, तेवढीच बचत तुमची कंपनी तुमच्यासाठी करून देते आणि त्यावर सरकार दरवर्षी व्याज (Interest) सुद्धा देते. रिटायरमेंटच्या वेळी ही जमा झालेली मोठी रक्कम तुमच्या हातात मिळते. EPF बद्दल माहिती तर सर्वांना असते, पण अपुऱ्या माहितीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये अनेक गैरसमज पसरलेले असतात. चला तर मग, या ५ मुख्य गैरसमजांमागचं सत्य जाणून घेऊया…

    EPF बद्दलचे ५ मोठे गैरसमज!

    १) ईपीएफ (EPF) आणि पीपीएफ (PPF) दोन्ही एकच आहेत?

    कर्मचाऱ्यांमध्ये असलेला सर्वात मोठा गैरसमज म्हणजे EPF आणि PPF या दोन्ही एकच संज्ञा आहेत. अनेक जण या दोन्ही नावांमध्ये गल्लत करतात. पण या दोन्ही पूर्णपणे वेगवेगळ्या योजना आहेत. 

    EPF (Employees Provident Fund): कर्मचारी भविष्य निर्वाह निधी हा फक्त नोकरदार व्यक्तींसाठीच असतो. यामध्ये कंपनीचा वाटा असतो आणि पगारामधूनच रक्कम कापली जाते.

    PPF (Public Provident Fund): पब्लिक प्रोव्हिडंट फंड ही एक स्वतःच्या इच्छेने केलेली बचत योजना आहे. यामध्ये कोणताही सामान्य नागरिक, व्यावसायिक किंवा शेतकरी स्वतःचे खाते उघडून पैसे गुंतवू शकतो. यात कोणत्याही कंपनीचे योगदान नसते.

    २) EPF साठी निवृत्तीचे वय ६० वर्षे आहे?

    अनेक कर्मचाऱ्यांना वाटते की EPF मध्ये निवृत्तीचे वय ६० वर्षे आहे. पण हा एक गैरसमज आहे कारण नियमानुसार, अधिकृत निवृत्तीचे वय ५८ वर्षे आहे. ५८ वर्षांनंतर तुमची EPF मधील नवीन गुंतवणूक बंद होते, तुम्ही त्यानंतरही नोकरी सुरू ठेवली तरी ५८ हेच ‘कट-ऑफ’ वय मानले जाते. सर्वात महत्वाचे म्हणजे EPF मधील व्याजाचा कालावधी तुम्ही कोणत्या वयात नोकरी सोडता यावर अवलंबून असतो. जर तुम्ही वयाच्या ४५ व्या वर्षी नोकरी सोडली, तर तुम्हाला वयाच्या ५८ व्या वर्षापर्यंत व्याज मिळू शकते. जर ५७ व्या वर्षी नोकरी सोडली, तर ६० व्या वर्षापर्यंत व्याज मिळेल. थोडक्यात, तुम्ही जितक्या लवकर निवृत्त व्हाल, तितक्या जास्त काळासाठी (५८ वर्षांपर्यंत) तुम्हाला व्याज मिळू शकते. 

    ३) Retirement आधी EPF मधून पैसे काढता येत नाहीत?

    EPF हा प्रामुख्याने रिटायरमेंटसाठी फंड गोळा करण्याचा मार्ग आहे, परंतु कठीण काळात किंवा महत्त्वाच्या गरजांसाठी तुम्ही रिटायरमेंट पूर्वीही पैसे काढू शकता. याला ‘पीएफ ॲडव्हान्स’ (PF Advance) किंवा अंशतः पैसे काढणे म्हणतात. उदा. स्वतःच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या लग्नासाठी, घराच्या खरेदीसाठी किंवा बांधकामासाठी, गंभीर आजारपणाच्या उपचारासाठी, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, अचानक नोकरी गेल्यास (१ महिना बेरोजगार राहिल्यास ७५% पर्यंत रक्कम काढता येते). या सर्व कारणांच्या आधारे तुम्ही नोकरीत असतानाही पैसे काढू शकता. 

    ४) नोकरी बदलली की जुना EPF Fund बुडतो किंवा नवीन खाते काढावे लागते?

    पूर्वी नोकरी बदलल्यावर PF चे पैसे ट्रान्सफर करणे खूप कठीण असायचे आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बराच वेळ जायचा. पण आता सरकारने UAN (Universal Account Number) ची सोय केली आहे. तुम्ही आयुष्यात जितक्या कंपन्या बदलाल, तितक्या कंपन्यांसाठी तुमचा UAN नंबर एकच राहतो. नोकरी बदलली की फक्त नवीन कंपनीला तुमचा UAN नंबर द्यावा लागतो. तुमचा जुना PF नव्या खात्यात अगदी सहज ऑनलाईन ट्रान्सफर होतो. तुमचे पैसे कधीही बुडत नाहीत. 

    ५) EPF च्या पैशांच्या व्याजावर कोणताही TAX लागत नाही किंवा विमा, पेन्शन मिळत नाही?

    हा गैरसमज आधी खरा होता, पण आता सरकारने नियमात बदल केला आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याचे EPF खात्यातील वार्षिक योगदान २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर त्या २.५ लाखांच्या वर जमा होणाऱ्या रकमेवरील व्याजावर टॅक्स आकारला जातो. सर्वसामान्य कर्मचाऱ्यांसाठी ज्यांचा पगार मर्यादित आहे, त्यांना काळजी करण्याची गरज नाही. पण ज्यांचा पगार खूप जास्त आहे, त्यांनी या नियमाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

    तसेच ईपीएफ खात्यासोबत तुम्हाला दोन अत्यंत महत्त्वाचे फायदे मोफत मिळतात, ज्याबद्दल अनेकांना माहितीच नसते ते म्हणजे :

    १. EDLI (कर्मचारी ठेव लिंक विमा योजना): पीएफ खाते असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा ७ लाख रुपयांपर्यंतचा विमा (Life Insurance) मोफत उतरवला जातो. नोकरीत असताना कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला ही रक्कम मिळते.

    २. EPS (कर्मचारी पेन्शन योजना): आधी सांगितल्याप्रमाणे, कंपनीच्या योगदानाचा एक भाग पेन्शन फंडात जातो. जर तुम्ही सलग १० वर्षे नोकरी पूर्ण केली, तर वयाच्या ५८ वर्षांनंतर तुम्हाला सरकारकडून दरमहा पेन्शन मिळण्यास सुरुवात होते.

    EPF ही केवळ तुमच्या पगारातून होणारी कपात नाही, तर तो एका सुरक्षित भविष्याचा पाया आहे. चक्रवाढ व्याजाच्या (Compound Interest) ताकदीमुळे, नोकरीच्या सुरुवातीच्या काळापासून जमा झालेली छोटी छोटी रक्कम रिटायरमेंटपर्यंत करोडो रुपयांचा फंड बनू शकते.

    त्यामुळे तुमच्या सॅलरी स्लिपमधील PF कपातीकडे पाहून नाराज होऊ नका. तुमचा UAN नंबर नेहमी ॲक्टिव्ह ठेवा, वेळोवेळी तुमचे PF पासबुक ऑनलाईन तपासा आणि विनाकारण किंवा छोट्या-मोठ्या खर्चासाठी पीएफ खात्यातून पैसे काढणे टाळा. जेणेकरून भविष्यात जेव्हा तुम्ही काम करणे थांबवाल, तेव्हा तुमचे पैशांचे झाड तुम्हाला सावली देण्यास तयार असेल. या लेखाच्या माध्यमातून तुमच्या मनातील शंका किंवा गैरसमज दूर झाले असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा!

  • तुम्हीही चुकीच Credit Card वापरत असाल तर लवकरच कर्जबाजारी व्हाल?

    तुम्हीही चुकीच Credit Card वापरत असाल तर लवकरच कर्जबाजारी व्हाल?

    मित्रांनो तुम्हीही Credit Card वापरत असाल तर लवकरच कर्जबाजारी व्हाल? असे सल्ले तुम्हालाही तुमच्या मित्र-मैत्रिणींकडून मिळाले असतीलच. पण थांबा..! आजच्या काळात Credit Card हे केवळ पैसे खर्च करण्याचे साधन राहिले नसून, हुशारीने वापरल्यास पैशांची बचत आणि कमाई करून देणारे एक उत्तम Financial Tool बनले आहे.

    मार्केटमध्ये शेकडो प्रकारची Credit Cards उपलब्ध आहेत, काही Shopping साठी, काही Travelling साठी, तर काही Credit Card अगदी Fuel भरण्यासाठी सुद्धा उपलब्ध आहेत. पण तुमच्या पाकिटात नेमकं कोणतं Card आहे? जर तुम्हीही चुकीचं Card निवडलं असेल तर फक्त Annual Fee भरण्यात पैसे जातील, आणि योग्य Card निवडलं तर प्रत्येक खर्चावर कमाई होईल. पण कसं? चला सांगते…

    प्रामुख्याने Credit Cards चे वर्गीकरण त्यांच्या Benefits नुसार केले जाते. जर तुम्ही वारंवार प्रवास करत असाल, तर Travel Credit Card तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरेल, ज्यामध्ये Flight Ticket Booking वर Discount आणि Free Airport Lounge Access मिळतो. जर तुम्हाला Online Shopping ची आवड असेल, तर Shopping किंवा Cashback Credit Card निवडावे, जे Amazon, Flipkart सारख्या Platforms वर थेट ५% ते १०% पर्यंतची Saving करून देते. याशिवाय, दरमहा किराणा सामान आणि Fuel वर जास्त खर्च करणाऱ्यांसाठी Fuel आणि Grocery Cards फायदेशीर ठरतात, ज्यामुळे जास्तीत जास्त Reward Points मिळतात.

    Credit Card ची अचूक निवड करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या Bank Statement ची तपासणी करा आणि तुमचा सर्वाधिक खर्च कुठे होतोय हे समजून घ्या. त्यानंतर, Card निवडताना त्याचा Annual Fee आणि त्या बदल्यात मिळणारे Welcome Benefits यांची तुलना करा. अनेक Cards Lifetime Free असतात, तर काहींसाठी शुल्क द्यावे लागते. पण जर त्याचे फायदे शुल्कापेक्षा जास्त असतील, तर Paid Card घेणेही फायद्याचे ठरते.

    नेहमी लक्षात ठेवा, Credit Card चा वापर शिस्तीत आणि वेळेवर Bill Payment करून केल्यास तुमचा CIBIL Score सुधारतो. त्यामुळे कर्जाच्या चक्रव्यूहात न अडकता, आपल्या गरजा ओळखा, Offers ची तुलना करा आणि तुमच्या Lifestyle ला अगदी Perfect बसेल असेच Credit Card निवडा!

    आणखी वाचा :

  • सावधान! मोबाईलचा EMI नाही भरला तर फोन बंद होणार? जाणून घ्या काय आहे RBI चा नवा नियम…

    सावधान! मोबाईलचा EMI नाही भरला तर फोन बंद होणार? जाणून घ्या काय आहे RBI चा नवा नियम…

    मित्रांनो तुम्ही EMI वेळेवर भरला नाही तर बँक थेट तुमचा मोबाईल लॉक करणार? तुमचे व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम सगळं बंद होणार का? जर तुम्हीही नवीन स्मार्टफोन किंवा टॅबलेट EMI वर घेतला असेल, हि बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. सध्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चर्चांमागची सत्यता जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा!

    रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) डिजिटल कर्ज देणाऱ्या कंपन्या आणि बँकांसाठी एक नवा मसुदा तयार केला आहे. १ ऑक्टोबर २०२६ पासून हा नियम लागू करण्याचा प्रस्ताव आहे. विशेष म्हणजे, स्मार्टफोन फायनान्सच्या क्षेत्रात काही फिनटेक कंपन्या आधीपासूनच तंत्रज्ञानाचा वापर करून फोन लॉक करत होत्या, पण आता आरबीआयने यावर अधिकृत शिक्कामोर्तब करत ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी अतिशय कडक नियमावली आणली आहे.

    अनेकांना गैरसमज असेल कि एक EMI मिस झाला की फोन बंद पडेल, पण असं अजिबात नाही. आरबीआयच्या नियमांनुसार, कर्ज थकून जोपर्यंत ९० दिवस म्हणजेच ३ महिने पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत बँक कोणतेही ठोस पाउल उचलू शकत नाहीत. ६० दिवस उलटल्यावर बँक पहिली नोटीस देईल ज्यासाठी २१ दिवसांचा वेळ मिळेल. त्यानंतर ७ दिवसांची लास्ट वॉर्निंग नोटीस दिली जाईल. मात्र बँक तुमचा फोन पूर्णपणे लॉक करू शकत नाही. इनकमिंग कॉल्स, इंटरनेट, इमर्जन्सी SOS आणि सरकारी अलर्ट्स चालूच राहतील. फक्त काही अ‍ॅप्स किंवा फीचर्स ब्लॉक केले जाऊ शकतात. तसेच बँक तुमच्या फोनमधील गॅलरी, फोटो किंवा कॉन्टॅक्ट्स अजिबात पाहू किंवा स्टोअर करू शकत नाही.

    एवढंच नाही तर, जर ग्राहकाने थकीत रक्कम भरली, तर बँकांना अवघ्या १ तासाच्या आत मोबाईल अनलॉक करावा लागेल. जर बँकेने चुकीच्या पद्धतीने फोन लॉक केला किंवा पैसे भरूनही अनलॉक करण्यास उशीर केला, तर बँकेला ग्राहकाला दर तासाला २५० रुपये या दराने भरपाई द्यावी लागेल. थोडक्यात काय तर हा नियम ग्राहकांना त्रास देण्यासाठी नाही, तर रात्री-अपरात्री येणारे रिकव्हरी एजंट्सचे फोन आणि त्यांची अरेरावी थांबवण्यासाठी आहे. त्यामुळे वेळेवर EMI भरा आणि सुरक्षित राहा. तुम्हाला RBI चा हा नियम कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा!

  • स्मार्ट वुमनचा सिक्रेट फॉर्म्युला! जो तुम्हाला कधीच पैशांची चणचण भासू देणार नाही!

    स्मार्ट वुमनचा सिक्रेट फॉर्म्युला! जो तुम्हाला कधीच पैशांची चणचण भासू देणार नाही!

    स्मार्ट वुमन ती नाही जी फक्त पैसे खर्च करते, तर ती आहे जी पैशाने पैसा बनवायला शिकते! महिला मंडळींनो जर तुम्हालाही भविष्यात पैशांची चिंता न करता जगायचं असेल, तर आजच या फायनान्शियल टिप्स फॉलो करा.

    सर्वात पहिला आणि महत्त्वाचा नियम म्हणजे आधी बचत, मग खर्च. अनेकदा आपण महिनाभरातून उरलेले पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतो, पण नियम उलटा करायला हवा. पगार झाला किंवा हातात घर खर्चाचे पैसे आले की, आधी किमान २० ते ३० टक्के रक्कम बचतीसाठी बाजूला काढून उरलेल्या पैशातच महिन्याचे बजेट चालवायला शिकले पाहिजे. यासाठी ५०:३०:२० चा सुवर्ण नियम खूप फायदेशीर ठरतो. ज्यामध्ये ५०% रक्कम गरजांसाठी, ३०% इच्छांसाठी आणि २०% रक्कम भविष्यातील गुंतवणुकीसाठी वापरली जाते.

    पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसे फक्त कपाटात किंवा बँकेच्या साध्या खात्यात ठेवून वाढत नाहीत, कारण महागाईमुळे त्यांची किंमत कमी होत जाते. म्हणूनच त्या पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. तुम्ही दरमहा अगदी लहान रकमेपासून म्युच्युअल फंडामध्ये एसआयपी (SIP) सुरू करू शकता किंवा बँकेत आरडी (RD) चालू करू शकता. याशिवाय महिलांसाठी असलेल्या विशेष सरकारी योजना, जसे की ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ किंवा पीपीएफ (PPF) चा नक्की फायदा घ्या. महिलांनी शॉपिंग करतानाही थोडे स्मार्ट बनले पाहिजे. अनेकदा सेल लागलाय म्हणून आपण नको असलेल्या गोष्टी खरेदी करतो, ज्याला ‘इम्पल्स बाइंग’ म्हणतात. कोणतीही मोठी खरेदी करताना स्वतःला २४ तास द्या आणि विचार करा की ती वस्तू खरंच गरजेची आहे का? तसेच ऑनलाईन शॉपिंग करताना कूपन कोड्स आणि कॅशबॅकचा आवर्जून वापर करा.

    शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची टीप म्हणजे स्वतःचा Emergency Fund तयार ठेवा. संकट कधीही सांगून येत नाही, त्यामुळे किमान ६ महिन्यांच्या घर खर्चाइतकी रक्कम अशा ठिकाणी सुरक्षित ठेवा, ज्याला अत्यंत गरजेच्या वेळीच हात लावला जाईल. थोडक्यात सांगायचे तर, पैशाची बचत करणे म्हणजे कंजूषपणा नसून ते तुमच्या सुरक्षित भविष्याचे भांडवल आहे. आज केलेली हीच छोटीशी बचत आणि योग्य गुंतवणूक उद्या तुम्हाला खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवू शकते. काय मग महिला मंडळी यापैकी तुम्ही कोणती टिप्स फॉलो करणार आहात? कमेंट करून नक्की सांगा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा!

    आणखी वाचा: