Category: लेख

  • अवघ्या भारताचं भविष्य बदलणाऱ्या टाटा कंपनीची सुरुवात कशी झाली? जमशेदजी टाटा यांचा प्रवास…

    अवघ्या भारताचं भविष्य बदलणाऱ्या टाटा कंपनीची सुरुवात कशी झाली? जमशेदजी टाटा यांचा प्रवास…

    गुजरातमधल्या नवसारी या छोट्या गावात नुसेरवान यांचा जन्म झाला. वयाच्या ५व्या वर्षी जीवनबाई या चिमुरडीसोबत त्यांचा विवाह झाला. वयाच्या १७ व्या वर्षी म्हणजे ३ मार्च १८३९ रोजी नुसेरवानजी वडील झाले आणि जन्माला आले ते भारताच्या उद्योगविश्वाचे भीष्म पितामह म्हणून नावलौकिक मिळवलेले जमशेटजी टाटा.

    नवसारीतील पारशी परिवारासाठी आपल्या गावाची वेस ओलांडणं म्हणजे एक दिव्यच. हे दिव्य नुसेरवान यांनी पार केलं. सात पिढ्यांत व्यापार कशाशी खातात हेही कुणाला माहित नव्हतं. घरात पौरोहित्याची परंपरा असूनही व्यापाराचं खूळ त्यांच्या डोक्यात शिरलं आणि आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते आपल्या परिवारासहित मुंबईला आले. तेव्हा जमशेटजी ८ वर्षांचे होते. हा तोच काळ होता जेव्हा इंग्रजीचं शिक्षण भारतीयांना द्यायला सुरुवात झाली होती. हेच वाघिणीचं दूध प्यायला जमशेटजी तयार होत होते. त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते वडिलांना उद्योगधंद्यात मदत करू लागले.

    Jamsetji Tata in his childhood

    आपल्या मुलाच्या अंगचे व्यावसायिक गुण बघून नुसेरवान यांनी त्यांना थेट परदेशात व्यापारासाठी पाठवलं. अतिपूर्वेकडे असणाऱ्या हाँगकाँग या देशात गेलेले जमशेटजी पहिल्या परदेश दौऱ्यातच तिथं कंपनी स्थापन करुन आले, जमशेटजी आणि अर्देशीर या नावाने. औद्योगिक क्रांतीच्या दारात उभ्या असणाऱ्या जगामध्ये कापसाचं महत्व ओळखून त्यांची कंपनी कापसाचा व्यापार करत होती, तर चीनसाठी लागणाऱ्या अफूला देखील त्यांनी तितकंच महत्त्व दिलं. व्यवहार चातुर्य, संधी ओळखण्याचे कसब यामुळे जमशेटजींनी काही महिन्यांतच आपल्या पहिल्या कंपनीची शाखा शांघायमध्ये आणि दुसरी नंतर लगेच लंडनमध्ये उघडली. युरोपला कापड आणि चीनला अफू विकून तिथून चहा, वेलदोडे, सोनं, तयार कापड ते भारतात आणून विकत. यातून त्यांना भरपूर नफा मिळाला.

    याच दरम्यान चालू होतं ते अमेरिकेचं यादवी युद्ध. भारतातील अनेक व्यापाऱ्यांचं दिवाळं निघालं. याची झळ टाटा परिवारालासुद्धा बसली, पण नुसेरवान आणि जमशेट पिता-पुत्राने यातून देखील मार्ग काढला. राहतं घर विकून सर्वांची देणी चुकती केली. यामुळे लोकांचा टाटा नावाशी विश्वास जोडला गेला.

    १८६५ मध्ये यंत्रविद्येचे ज्ञान मिळविण्यासाठी जमशेटजी मँचेस्टरला गेले. इंग्लंडमध्ये ते चार वर्षे होते. स्वदेशी परतल्यावर कापडाची वाढती मागणी लक्षात घेता त्यांनी कापड गिरण्या सुरु करायचं ठरवलं. अंदाज घेण्यासाठी त्यांनी २१००० रुपयांत मुंबईच्या चिंचपोकळी भागातील दिवाळं निघालेली एक तेलगिरणी विकत घेऊन अलेक्झांड्रिया मिल असं तिचं नामकरण केलं. बऱ्यापैकी फायदा कमवून २ वर्षांनी ती विकून टाकली. त्यानंतर नागपूरला कापड मिल उभी करण्यासाठी जागा घेतली. त्याकाळी सगळ्या कापड गिरण्या मुंबईमध्ये होत्या. अशा वेळी नागपूरमध्ये मिल उभी करण्याला अनेकांचा विरोध असून देखील त्यांनी हीच जागा पक्की करत मोठ्या कष्टाने मिल उभी केली. कापसाचं मोठ्या प्रमाणावर उत्पन्न, वाहतुकीची सोय, पाण्याची उपलब्धता यामुळे जमशेटजी यांनी घेतलेला निर्णय अगदी योग्य ठरला. ब्रिटनची महाराणी व्हिक्टोरियाच्या गौरवार्थ आणि त्या काळाची गरज लक्षात घेता त्यांनी त्या मिलला एम्प्रेस मिल असं नाव दिलं. १८७७ मध्ये उभी राहिलेली ही गिरणी सप्टेंबर २००२मध्ये अखेर बंद पडली. या दोन गिरण्यांच्या अनुभवावरच कुर्ला येथील ‘धरमसी मिल’ ही जुनी गिरणी विकत घेऊन तिचे ‘स्वदेशी मिल’ असे नामकरण केले, तर अहमदाबादला ‘ॲडव्हान्स मिल’ सुरू केली गेली.

    B FfGz9WwAAUpNB
    Empress Mill, Nagpur
    tata svadeshi before swadeshi banner desktop 1920x1080
    Svadeshi Mill, Mumbai

    आपल्या कारखान्यात काम करणारा प्रत्येक व्यक्ती महत्वाचा आहे याची जमशेटजींना जाणीव होती. कर्मचाऱ्यांना अपघात विमा देणे, कामाचे तास कमी ठेवणे, त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे, कामाची जागा हवेशीर ठेवणे यांसारख्या गोष्टींमुळे त्यांच्या मिल या जगभरातील सर्वात सुनियोजित मिल म्हणून ओळखल्या जात होत्या. ज्या सुविधा पश्चिमी देशात देखील त्यांच्या कामगारांना मिळत नव्हत्या, त्या जमशेदजी त्याकाळी आपल्या कर्मचाऱ्यांना देत होते.

    आर्थिक स्वतंत्रता हीच राजनीतिक स्वतंत्रतेचा आधार आहे हे जमशेटजी जाणत होते. दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता यांच्या विचारांचा प्रभाव जमशेटजींवर होता. जमशेटजींची ४ मोठी स्वप्नं होती. स्टील उद्योग उभा करणं, जागतिक दर्जाचं शैक्षणिक केंद्र उभं करणं, हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट उभा करणं आणि जागतिक कीर्तीचं हॉटेल उभं करणं. दुर्दैवाने यातील हॉटेल सोडल्यास इतर तीन स्वप्नं त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकली नाहीत, पण त्याची बीजं मात्र त्यांनी रोवली होती. आणि ‘शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी’ या म्हणीप्रमाणे त्यांच्या येणाऱ्या पिढीने ही सगळी स्वप्नं पूर्ण केली.

    hydro power mob
    Tata Power hydro plant, Khopoli

    भारतात प्रगत विज्ञान संशोधन केंद्रासाठी जमशेटजींना ‘रॉयल सोसायटी ऑफ इंग्लंडसारखी’ एक संशोधन संस्था भारतात उभी करण्याची होती. यासाठी त्यांनी स्वामी विवेकानंदांचे मार्गदर्शन घेतले. या संस्थेसाठी जमशेटजींनी तेव्हा सव्वा लाख रु. दिले. अनेक दानशूर लोकांनी देणग्या दिल्या. पैसे कमी पडले म्हणून टाटांनी मुंबईतील आपल्या सतरा इमारती विकल्या. मंजुरीसाठी इंग्रज सरकारकडून उशीर झाला, तरी १९११ मध्ये बंगलोर येथे या संस्थेच्या इमारतीचा पाया घालण्यात आला आणि त्याच वर्षी २४ जुलैपासून संस्था कार्यान्वित झाली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अर्थात ‘भारतीय विज्ञान संस्था’ या नावाने ओळखली जाणारी ही ४४० एकरात पसरलेली संस्था आजही जगद्‌विख्यात आहे.

    About
    Indian Institute of Science (IISc), Bangalore

    अर्थव्यवस्थेची प्रगती सातत्याने चालू राहण्यात लोखंड व पोलाद उद्योगाचा फार मोठा वाटा असल्याने जमशेटजींच्या ध्यानात आले होते. अनेक वर्ष शोधाशोध करून आणि संशोधन करून शेवटी बिहारच्या सिंगभूम जिल्ह्यातील साक्ची या छोट्याशा गावात कारखाना उभारण्याचे ठरले. १९११ साली ‘द टाटा आयर्न अ‍ँड स्टील कंपनी’ (टिस्को) हा कारखाना सुरू झाला. बघता बघता त्या गावाचं एका मोठ्या शहरात रुपांतर झालं आणि तेथील रेल्वेस्टेशनला ‘टाटानगर’ नाव देण्यात आलं. सध्या झारखंडमध्ये असलेल्या या शहराचं नाव जमशेटजींच्या गौरवार्थ ‘जमशेदपूर’ असं देण्यात आलं. आज टाटा स्टील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कंपनीत खनिज लोखंडापासून उत्कृष्ट पोलादापर्यंतच्या सर्व प्रक्रिया या पार पाडल्या जातात. टाटा स्टील आज भारतातील दुसरी मोठी कंपनी आहे.

    प्रचंड अभ्यासू असणाऱ्या आणि जगभर फिरणाऱ्या जमशेटजींनी साताऱ्यातील पाचगणीचं महत्त्व त्या काळात ओळखलं होतं. तिथल्या हवामानात कॉफी आणि स्ट्रॉबेरी चांगली लागेल याची त्यांना खात्री होती. कॉफीत त्यांना यश मिळालं नाही, पण स्ट्रॉबेरी रुजली. फ्रान्समधून रेशमाचे किडे आणून बंगलोर, म्हैसूरमधील शेतकऱ्यांना त्यांनी रेशीम लागवडीचे धडे द्यायला सुरुवात केली. आज म्हैसूरच्या रेशमी साड्यांमुळे हा परिसर रेशीम उद्योगाचं केंद्र बनलाय, त्याच्या मुळाशी जमशेटजीच आहेत.

    कर्मचार्‍यांच्या हक्क आणि अधिकारांसाठीही टाटा सदैव जागरूक राहिले. कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरही ठीकठाक जगता यावं यासाठी भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ ही संकल्पना जमशेटजींनी जन्माला घातली. ही संकल्पना त्यावेळी पाश्चात्य देशांतसुद्धा सुरु झाली नव्हती. काम करताना काही अपघात झाल्यास त्यासाठी नुकसानभरपाईची सोय केली. जमशेटजी म्हणायचे, ‘आपण आपले भागधारक, कामगार यांच्या हिताचा विचार केला; तर प्रगतीचा मळा अधिक फुलतो.’

    जमशेटजींनी आपला उद्योग अशा काळात चालू केला जेव्हा उद्योग क्षेत्र फक्त युरोपियनांचीच मक्तेदारी होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर खऱ्या अर्थाने तो औद्योगिकदृष्ट्या तारला गेला तो जमशेटजींच्या दूरदृष्टीने. टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा पॉवर, टाटा केमिकल्स, टाटा टी, टायटन इंडस्ट्रीज, टाटा कम्युनिकेशन्स, ताज हॉटेल्स आणि अशाच अजून १०० कंपन्या आणि त्यात काम करणारे ८ लाखांहून अधिक कर्मचारी ही आहे टाटांची देन.

    foundersday23 banner desktop 1920x1080

    जमशेटजींनी त्यांच्या दूरदृष्टीने टाटा सन्स लि. ची स्थापना करून तिच्याकडे आपल्या सर्व कंपन्यांचे व्यवस्थापन सोपविले. या संस्थेचे ८५ टक्के भांडवल टाटा कुटुंबातील मंडळींनी उभारलेल्या धर्मादाय न्यासांच्या मालकीचे असल्याने टाटा समूहातील विविध उद्योगांना होणारा फायदा या न्यासांकडे म्हणजे पर्यायाने जनतेकडे पोहोचविला जातो. एका प्रसिद्ध संस्थेच्या रिपोर्टमध्ये गेल्या १०० वर्षातील जगातील सर्वात दानशूर व्यक्ती म्हणून जमशेटजी टाटांचं नाव जाहीर करण्यात आलं होतं.

    १९ मे १९०४ रोजी जर्मनीतील न्यूहॅम येथे वयाच्या पासष्टाव्या वर्षी या महान उद्योगपतीचे निधन झाले. ‘भारतीय व्यापार व उद्योग यांच्या भरभराटीसाठी कोणत्याही तत्कालीन भारतीयाने जमशेटजींइतके प्रयत्न केले नाहीत’, हे लॉर्ड कर्झनचे उद्‌गार यथार्थाने जमशेटजींची थोरवी व्यक्त करतात. त्यांच्या पश्चात दोराबजी व रतनजी या त्यांच्या दोन मुलांनी वडिलांची परंपरा यशस्वीपणे पुढे चालविली.

    शंभर सव्वाशे वर्षापूर्वी आपल्यातल्याच एका माणसाने एक स्वप्न पाहिलं. त्यासाठी त्याच्यासह पुढच्या कित्येक पिढ्यांनी जिवाचं रान केलं आणि आजचं हे नंदनवन उभं राहिलं. फक्त देशाची आर्थिक बाजू भक्कम करणारं हे स्वप्न मुळीच नव्हतं, तर देशाच्या सामान्य नागरिकाला सन्मानानं जगता यावं, त्याच्या सर्व गरजा त्याच्या आवाक्यातच पूर्ण व्हाव्यात असा त्यांचा दृष्टीकोन होता. संपत्ती निर्मिती हा टाटांचा उद्देश कधीच नव्हता, उलट समाजाकडून आलेले पैसे समाजालाच परत करावयाचे हे त्यांचे धोरण होते. कोणतीही पार्श्वभूमी नसताना उद्योग क्षेत्रातला ध्रुवतारा असणारे, भारतीय उद्योगाचे भीष्म पितामह म्हणजे जमशेदजी टाटा यांच्या चिरकाल टिकणाऱ्या कार्याला आणि प्रेरणेला आपल्यातही उतरवण्याचा प्रयत्न करूया.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • जगातील सर्वात मोठ्या बँकेचे संस्थापक जे. पी. मॉर्गन यांची कहाणी

    जगातील सर्वात मोठ्या बँकेचे संस्थापक जे. पी. मॉर्गन यांची कहाणी

    १७ एप्रिल १८३७मध्ये अमेरिकेतल्या एका श्रीमंत घरात जॉन पिअरपॉन्ट म्हणजेच जेपी मॉर्गन यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हे उद्योगपती आणि गुंतवणूकदार होते. लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि नेतृत्वगुण असणारे जेपी यांना, त्यांच्या वडिलांनी पहिल्यापासूनच व्यवहार ज्ञानाचे धडे द्यायला सुरुवात केली होती. स्वतःचा व्यवहार स्वतः करणे, एकट्याने प्रवास करणे यासारख्या अनेक गोष्टींमुळे मॉर्गन यांच्यामधील नेतृत्वगुण वाढत गेले.

    नंतर त्यांनी आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि डंकन, शेअरमन अँड कंपनी या वडिलांच्या कंपनीमध्ये ते क्लार्क म्हणून रुजू झाले. व्यवसायात येणाऱ्या प्रत्येक संधीचं सोनं करत मॉर्गन शिकत होते.

    DsDVp00XcAA Lok
    GE0

    मागील एका लेखामध्ये आपण अँड्र्यू कार्नेगी यांची माहिती पाहिली आहेच. याच कार्नेगी यांची सर्वात मोठी “कार्नेगी स्टील कंपनी” सुद्धा १९०१ मध्ये मॉर्गन यांनी खरेदी केली आणि “युनायटेड स्टील कार्पोरेशन” ही सर्वात मोठी स्टील कंपनी उभी केली.

    तो काळ असा होता जेव्हा अमेरिकेत कोणतीच सेंट्रल बँक नव्हती. त्यामुळं लोन घेणं, पैसे पुरवणं या गोष्टी होत नव्हत्या. यावेळी जेपी मॉर्गन यांनी मंदीच्या काळात केवळ उद्योगधंद्यांनाच नाही, तर अगदी अमेरिकन सरकारला देखील पैसे पुरवले आणि अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचे काम केलेलं होतं. पुढे एक वेळ अशी आली, की अमेरिकेची संपूर्ण बँकिंग व्यवस्था ही मॉर्गन यांच्या हातात गेली होती. तेव्हा १९१३ मध्ये अमेरिकन सरकारने पहिली सेंट्रल बँक म्हणजेच फेडरल रिझर्व्ह सिस्टीम सुरू केली.

    मॉर्गन यांच्या यशाची यादी केली लक्षात येईल की, अमेरिकेतील फायनान्स इंडस्ट्री, बँकिंग इंडस्ट्री, स्टील इंडस्ट्री, रेलरोड इंडस्ट्री, पॉवर इंडस्ट्री या सर्व मोठ्या उद्योगांवर फक्त मॉर्गन यांचच वर्चस्व होतं.

    १९१३ मध्ये वयाच्या ७५व्या वर्षी, जेपी मॉर्गन यांनी जगाचा निरोप घेतला. सन 2000मध्ये मॉर्गन यांची कंपनी, चेज या कंपनीसोबत जोडली गेली आणि “जेपी मॉर्गन अँड चेज कंपनी” म्हणून नावारूपाला आली. मार्केट कॅपिटलायझेशनचा विचार करता ही जगातील सर्वात मोठी बँक आहे. तेल कंपन्यांना कर्ज देण्याच्या बाबतीत ही बँक जगात आघाडीवर आहे.

    Why JP Morgan Chase is eyeing the exits from NYC

    त्यांच्या कारकिर्दीमध्ये ते 48 मोठ्या कंपन्यांच्या संचालक मंडळावर होते. असे नाही की त्यांना कधीच कोणते अपयश आले नाही, पण येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये संधी शोधत ते पुढे जात राहिले. मॉर्गन आजच्या तरुणाईला हाच संदेश देतात की, तुम्ही कितीही श्रीमंतीत जन्माला आला तरी, तुमचं कर्तृत्व आणि स्वबळावर उभं केलेलं तुमचं विश्व, हेच तुम्हाला कीर्ती मिळवून देतं.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • कापडाच्या मिलमधील मजूर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कसा बनला – अँड्र्यू कार्नेगी यांची कहाणी

    कापडाच्या मिलमधील मजूर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कसा बनला – अँड्र्यू कार्नेगी यांची कहाणी

    आज आपण अशाच एका दानशूर उद्योगपतीची जीवनकहाणी बघणार आहोत. ही गोष्ट आहे जगातील एकेकाळचे श्रीमंत, दानशूर आणि परोपकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि 100 वर्षे उलटूनसुद्धा आजही अनेकांचे प्रेरणास्थान असणाऱ्या उद्योगपती अँड्र्यू कार्नेगी यांची.

    अँड्र्यू कार्नेगी यांचा जन्म २५ नोव्हेंबर १८३५ रोजी स्कॉटलंडमध्ये डनफर्मलाइन नावाच्या छोट्या शहरामध्ये एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडील विल्यम कार्नेगी हातमाग कामगार होते, तर आई मार्गारेट शिवणकाम करून फाटक्या संसाराला ठिगळ लावायची. तो काळ होता औद्योगिक क्रांतीचा. या औद्योगिक क्रांतीमुळे हातमाग उद्योगावर परिणाम होऊन विल्यम कार्नेगी यांची नोकरी गेली. अशा परिस्थितीत कुटुंबाची उपजीविका भागवण्यासाठी घरदार विकून विल्यम कार्नेगी परिवारासहित अमेरिकेमधील पीटर्सबर्ग येथे येऊन स्थिरावले. तेव्हा अँड्र्यू बारा वर्षांचे होते.

    p02v3jg4 2

    त्यांना शिक्षणाची खूप आवड होती, पण इच्छा असून देखील त्याला शिक्षण घेता आलं नाही. त्याकाळी १०-१२ वर्षांची लहान मुलं सुद्धा काम करून कुटुंबाला हातभार लावायची. लहानग्या अँड्र्यूलाही कापड गिरणीत नोकरी मिळाली. काम भरपूर असायचं अन् पगार कमी. त्याच सुमारास अमेरिकेत टेलिग्राफ आणि रेल्वेच्या शोधामुळे अनेक नवीन संधी उपलब्ध झाल्या होत्या. पुढे अँड्र्यू टेलिग्राफ ऑफिसमध्ये मेसेंजर बॉय म्हणून कामाला लागले. हे काम करत असताना सवयीप्रमाणे प्रत्येक व्यक्ती सोबत ओळख करून ते बोलत असत. त्यामुळे पीटर्सबर्गसारख्या औद्योगिक शहरात अनेक व्यवसायिकांशी त्यांची चांगली ओळख झाली. कोणतीही गोष्ट लगेच आत्मसात करण्याच्या आपल्या कौशल्यामुळे अँड्रयू कार्नेगी टेलिग्राफ लिहिण्यात पारंगत झाले. त्यांच्या या कौशल्यावर थॉमस स्कॉट यांची नजर पडली.

    थॉमस स्कॉट हे पेनसिल्व्हिनिया रेलरोड कंपनीचे रिजनल मॅनेजर, ती त्याकाळी जगातील सर्वात मोठी रेल्वेमार्ग बनवणारी कंपनी होती. अँड्र्यू कार्नेगी यांच्यासाठी ही सर्वात मोठी संधी होती. १२ वर्ष त्या कंपनीसाठी काम केल्यानंतर कार्नेगी यांनी नोकरीचा राजीनामा दिला. थॉमस स्कॉट यांनी त्यांच्यातील क्षमता ओळखून त्यांना आर्थिक गुंतवणुकीत मार्गदर्शन केले. नोकरी करत असतानाच कार्नेगींनी रेल्वे डब्यात झोपून प्रवास करता येईल अशा सीट्स बनवणाऱ्या कंपनीत गुंवतणूक केली होती. त्या सीट्सना भविष्यात चांगली मागणी येईल आणि आपल्याला त्यातून भरपूर पैसे मिळतील असा त्यांचा अंदाज होता. तो खरा ठरला.

    यातून मिळालेला नफा त्यांनी इतर धंद्यात गुंतवायला सुरुवात केली. रेल्वेत नोकरीला असल्याने, रेल्वेचे लाकडी पूल आग लागल्यास जळून जातात किंवा पुराच्या पाण्यात वाहून जातात हे त्यांनी पाहिलं होतं. बाजारातली स्टीलची मागणी लक्षात घेता त्यांनी की-स्टोन ब्रिज ही कंपनी सुरु केली. की-स्टोन कंपनीने मिसिसिपी नदीवर जगातील पहिला स्टीलचा पूल बांधला. याआधी बांधले जाणारे सगळे पूल हे लाकडी होते, ज्याचं आयुष्य कमी असल्यामुळं, ते काही वर्षातच कोसळायचे. पण की-स्टोन कंपनीच्या स्टीलच्या पुलाने मात्र जादू केली. दीर्घकाळ टिकणारा हा पूल सर्वांच्या विश्वासास पात्र ठरला आणि अँड्र्यू कार्नेगी यांचा स्टील उद्योग जोमाने वाढू लागला.

    31890680 10211604950588614 7891263186693783552 o

    हळूहळू कच्च्या तेलाच्या विहिरीपासून ते स्टील उत्पादन करणाऱ्या कंपन्यांपर्यंतचे सगळे उद्योग कार्नेगी यांनी खरेदी केले. त्यामुळे त्यांना “स्टील किंग” म्हणून ओळखले जावू लागले. १८८९ मध्ये अँड्र्यू कार्नेगी यांनी आपण खरेदी केलेल्या सर्व स्टील कंपन्यांना एकत्र करून कार्नेगी स्टील कंपनी सुरू केली. त्यावेळी ती जगातली सगळ्यात मोठी स्टील कंपनी होती. या कंपनीमुळे अमेरिका, इंग्लंडपेक्षा जास्त स्टील उत्पादन करू लागली.

    dims.apnews

    पण श्रीमंत लोकांनी आपली कमाई स्वतःवर खर्च न करता चांगल्या कामांसाठी पैसे दान केले पाहिजेत असं त्यांचं मत होतं. त्यामुळे हा सगळा पैसा स्वतःजवळ किंवा परिवारासाठी न ठेवता, त्यांनी तो दान करायचं ठरवलं.

    त्यांच्या मते अपुरं शिक्षण हे जगातील अनेक समस्यांचं मूळ होतं. आपल्याला कॉलेजला जात आलं नाही याचं त्यांना आयुष्यभर वाईट वाटायचं. त्यामुळे त्यांनी अमेरिकेतील अनेक शाळा कॉलेजेसना भरघोस देणग्या दिल्या. शांततेसाठी काम करणाऱ्या संस्थांना आर्थिक मदत केली. अनेक असाध्य आजारांवरील संशोधनाचा खर्च त्यांनी उचलला. मृत्यूनंतर आपला पैसा योग्य मार्गी लावण्यासाठी त्यांनी कार्नेगी फाउंडेशनची स्थापना केली. या फाउंडेशनच्या माध्यमातून आजही अनेक सामाजिक कार्यांसाठी मदत केली जाते.

    एवढं सगळा दानधर्म करूनही कार्नेगी लोकांच्या जास्त लक्षात राहिले असतील, तर ते त्यांनी सुरु केलेल्या वाचनालयांमुळे. टेलिग्राफ कंपनीत नोकरीला असताना जेम्स अँडरसन नावाचे गृहस्थ लहान मुलांना त्यांच्याकडील पुस्तके मोफत वाचायला देत. त्यांच्यामुळे आपल्याला चांगले वाचायला आणि शिकायला मिळाले ही गोष्ट कार्नेगी कधीच विसरले नाहीत. त्यामुळे पैसे आल्यावर त्यांनी जगभरात जवळपास तीन हजारांपेक्षा जास्त लायब्ररी सुरु केल्या.

    carnegie1

    ११ ऑगस्ट १९१९ रोजी अँड्र्यू कार्नेगी यांचं निधन झालं. पण “मरावे परी कीर्ती रुपी उरावे” या उक्तीप्रमाणे आजही कार्नेगी त्यांच्या अफाट कार्याच्या रूपाने अमर आहेत आणि सदैव राहतील. भरपूर पैसे मिळवणे ही मोठी गोष्ट आहे, पण मिळवलेला पैसा दान करण्यासाठी तेवढंच विशाल मनही लागतं हेच कार्नेगी यांनी दाखवून दिलं.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी


    आणखी वाचा

  • चॉकलेट गोळ्या विकून सगळ्यात मोठा तेलाचा व्यापारी बनलेल्या ‘जगातील पहिला अब्जाधीश माणूस’

    चॉकलेट गोळ्या विकून सगळ्यात मोठा तेलाचा व्यापारी बनलेल्या ‘जगातील पहिला अब्जाधीश माणूस’

    जॉन डेव्हिसन रॉकफेलर यांचा जन्म १८३९ मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे झाला. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या रॉकफेलर यांना लहानपणापासूनच घर चालवण्यासाठी काम करावं लागत होतं. त्यांच्या वडिलांचा औषधं विकण्याचा व्यवसाय होता; पण त्यात त्यांचा जम बसत नव्हता. त्यामुळं त्यांना अनेक शहरात फिरावं लागत होतं.

    अखेरीस १८५४ मध्ये हे कुटुंब ओहिओ इथं येऊन स्थिरावले. जॉन यांना आपलं शालेय शिक्षण पूर्ण करायचं होत, पण परिस्थितीमुळं त्यांना ते करता आलं नाही. पोट भरण्यासाठी हाताला काम पाहिजे म्हणून त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी बुक किपिंगचा एक कोर्स केला आणि एका कंपनीमध्ये बुक किपर म्हणून रुजू झाले. लहानपानपासूनच त्यांना दानधर्म करायची भारी आवड होती. तेव्हाच त्यांनी ठरवलं होतं कि आपण जितक कमावू त्याच्यातील १०% उत्पन्न हे दान करायचं.

    download

    २६ सप्टेंबर या दिवशी त्यांना नोकरी मिळाली होती, म्हणून ते हा दिवस “जॉब डे” म्हणून साजरा करत. सुरुवातील प्रतिमहिना १६ डॉलर्स आणि नंतर ३१ डॉलर्स प्रतिमहिना पगारावर दोन वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करायच ठरवलं. त्यांनी बँकेतून लोन घेऊन, आपल्या सहकाऱ्यांसोबत स्वतःची कंपनी चालु केली. ही कंपनी धान्य खरेदी विक्री करायचं काम करत होती. अमेरिकेतील १८५७च्या मंदीच्या काळातसुद्धा रॉकफेलर यांचा व्यवसाय जोमात चालू होता.

    त्याच दरम्यान, म्हणजे १८५० ते १८६० मध्ये चालू झालं ते “पेनसिल्वनिया ऑईल रश”. पेनसिल्वनियामध्ये तेलाच्या खाणी सापडल्या. त्यामुळे सगळे व्यापारी तेल खणण्याच्या व्यवसायाकडे वळले. पण तेल खाणकाम व्यवसाय बऱ्यापैकी नशिबावर अवलंबून असल्याने त्या मार्गाने न जाता रॉकफेलर यांनी तेल शुद्धीकरणाचे कारखाने चालू केले. आणि यातूनच जन्म झाला तो “स्टँडर्ड ऑइल”चा. चोवीस वर्षीय रॉकफेलर यांच्यासाठी हा खरा टर्निंग पॉइंट होता आणि अमेरिकेसाठीसुद्धा.

    Pithole oil tanks AOGHS e1638111035588

    रॉकफेलर यांचा रिफायनरी व्यवसाय उत्तरोत्तर वाढत होता. यातून मिळणारा नफाही तितकाच मोठा होता, पण प्रश्न होता तो ट्रान्सपोर्टचा. या काळात रेल्वे इंडस्ट्री ही काही ठराविक लोकांच्या अधिपत्याखाली होती. त्यांच्या मर्जीशिवाय वाहतूक करणे शक्य नव्हते, यावेळी व्यवहार चातुर्य वापरून रॉकफेलर यांनी या लोकांसोबत बोलणी करून फक्त स्टॅंडर्ड ऑइल कंपनीसाठीच कमी दरात वाहतूक करण्याची परवानगी मिळवली. यामुळे स्टँडर्ड ऑइलचे केरोसीन हे सर्वात कमी किमतीला लोकांना उपलब्ध झालं.

    त्यानंतर त्यांनी ऑइल हे पाईपलाईनद्वारे कसं ट्रान्सपोर्ट केलं जाऊ शकतं हे पाहिलं. पाइपमधून ऑईल ट्रान्सपोर्ट करण्याचा हा जगातील पहिलाच प्रयोग होता. तेलाचं शुद्धीकरण करताना खूप तेल वाया जात होतं. यावेळी रॉकफेलर यांनी एक कमिटी बसवून वाया गेलेल्या तेलापासून पासून काय बनवता येईल हे पाहिलं आणि तेव्हा जन्माला आलं ते tar म्हणजेच डांबर, पेट्रोलियम जेली आणि पॅराफीन वॅक्स.

    Overview oil pipeline Standard Oil Company and
    Pipeline of Standard Oil, Img. Source : Britannica

    Horizontal Integration पद्धतीचा वापर करून छोट्या आणि डबघाईला जाणाऱ्या सगळ्या कंपन्या takeover करत रॉकफेलर आपला व्यापार वाढवत होते. त्यांचा टेकओव्हरचा वेग इतका होता की दर महिन्याला ३-४ कंपन्या विकत घ्यायचे. आलेला सगळा नफा पुन्हा व्यवसाय वाढवण्यासाठी वापरत होते. याचा परिणाम असा झाला की, १८९०च्या दशकात अमेरिकेतील ९०% ऑइल रिफायनरी या फक्त स्टँडर्ड ऑईल कंपनीच्या होत्या; तर अमेरिकेत पुरवठा होणाऱ्या एकूण केरोसीनपैकी ९८ टक्के केरोसीन हे स्टँडर्ड ऑइल विकत होतं.

    अशाप्रकारे स्टॅंडर्ड ऑइलची अमेरिकेत मक्तेदारी तयार होत होती. ती इतकी झाली की, स्टँडर्ड ऑइल अंतर्गत वीस हजार तेलाच्या विहिरी, ४००० ट्रान्सपोर्ट पाईपलाईन, तर जवळपास एक लाख कामगार काम करत होते.

    १९०२साली इडा डारबेल या महिलेने स्टॅंडर्ड ऑइलवर काही लेख लिहिले. त्याच पुढे पुस्तक सुद्धा प्रकाशित झालं. यात तिने असा आरोप केला होता की, स्टँडर्ड ऑइलने अनेक कंपन्या जबदस्तीने विकत घेतल्या आहेत. यानंतर काही पत्रकारांनी सुद्धा रॉकफेलर यांच्यावर अनेक आरोप केले.

    अखेरीस या मक्तेदारीला आळा घालण्यासाठी अमेरिका सरकारने “शेअरमन अँटी ट्रस्ट ऍक्ट” पारित केला. यामुळे स्टँडर्ड ऑइल ३४ वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये विभागली गेली. विभाजनानंतरही या कंपन्या प्रगती करत होत्या. पुढे या कंपन्या एकमेकात विलीन होत एकत्र येत गेल्या. या कंपन्या आजही अमेरिकन तेल उद्योगाचा गाभा आहेत. अमेरिकेतील शेवरॉन, एक्सॉन मोबिल, ब्रिटिश पेट्रोलियम, मॅरेथॉन पेट्रोलियम या कंपन्या त्याचाच एक भाग आहेत.

    EYErhiXXQAIE8tY

    १८९३ मध्ये त्यांची भेट स्वामी विवेकानंद यांच्यासोबत झाली. स्वामी विवेकानंदांकडून त्यांनी दानधर्म करण्याबाबत चर्चा केली. पुढे १८९५ नंतर रॉकफेलर यांनी रिटायरमेंट घेतली आणि आपले उर्वरित आयुष्य दानधर्म करण्यात घालवले. त्यांनी युनिवर्सिटी ऑफ शिकागो उभारण्यात मदत केली. १९०९ मध्ये चालू झालेल्या रॉकफेलर सॅनिटरी कमिशनने अमेरिकेतून हुकवर्म हा रोग समूळ नष्ट होण्यासाठी प्रयत्न केले आणि पुढच्या वीस वर्षात त्यांनी आपले लक्ष्य साध्य देखील केले. रॉकफेलर फाउंडेशनमार्फत त्यांनी रिसर्च अँड डेव्हलपमेंटला प्रोत्साहन दिलं. अशा अनेक सामाजिक कार्यांसाठी लक्षावधी डॉलर्स रॉकफेलर यांनी दान केले.

    १९१६ साली ते आधुनिक जगातील पहिले अब्जाधीश बनले. अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या २ टक्के इतकी एकट्या रॉकफेलर यांची संपत्ती होती. आजच्या मूल्यानुसार हा आकडा ४८० अब्ज डॉलर्स म्हणजे ३५ लाख कोटींहून अधिक होतो. म्हणजे सध्या जगात सर्वात श्रीमंत असलेल्या एलोन मस्कहुन दुपटीने अधिक.

    Screenshot 2023 12 19 105646

    पुढे त्यांनी स्टील उद्योग क्षेत्रात सुद्धा शिरकाव केला. पण लवकरच स्टील उद्योग सम्राट अँड्र्यू कार्नेगी यांनी ती कंपनी विकत घेतली आणि यामुळे युनायटेड स्टील जगातील सर्वात मोठी कंपनी बनली. पुढील लेखात आपण याच युनायटेड स्टीलचे संस्थापक अँड्र्यू कार्नेगी यांचा जीवनप्रवास जाणून घेणार आहोत.

    रॉकफेलर यांच्या दोन महत्त्वाच्या इच्छा होत्या, त्यापैकी एक म्हणजे १ लाख डॉलर्स कमावणे आणि दुसरे होते शंभर वर्षे जगणे. त्यातली पहिली इच्छा त्यांनी पूर्ण केली, पण दुसरी मात्र होता होता राहिली. वयाच्या ९७व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. गरीब म्हणून जन्माला आलो तरी गरीब म्हणून मरणार नाही, हेच रॉकफेलर आपल्याला शिकवून जातात.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

    आणखी वाचा

  • Rbi Imposes Penalty : सारस्वत बँकेकडून नियमांचे उल्लंघन; 23 लाखांचा दंड भरावा लागणार

    Rbi Imposes Penalty : सारस्वत बँकेकडून नियमांचे उल्लंघन; 23 लाखांचा दंड भरावा लागणार

    भारतीय रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याबद्दल नुकतेच SBI सह 3 मोठ्या बँकांना RBI ने दंड ठोठावला होता. त्यानंतर आता रिझर्व्ह बँकेने आता तीन सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यामध्ये सारस्वत को ऑपरेटिव्ह या मुंबईतील बँकेचा देखील समावेश आहे.

    तीन सहकारी बँकावर कारवाई

    आरबीआयने मुंबई स्थित सारस्वत सहकारी बँक(Saraswat Co-operative Bank Limited), तसेच बेसिन कॅथोलिक सहकारी बँक (Bassein Catholic Co-operative Bank) आणि राजकोट नागरिक सहकारी बँक (Rajkot Nagarik Sahakari Bank) या तीन बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. या तिन्ही बँकांकडून आरबीआयच्या बँकच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यासाठी आरबीआयने सारस्वत सहकारी बँकेला 23 लाख, बेसीन कॅथोलिक सहकारी बँकेला 25 लाख आणि राजकोट नागरी सहकारी बँक लिमिटेडला 13 लाख रुपयांचा दंड आकारला आहे.

    संचालकाशी संबधित कंपन्यांना कर्ज

    सारस्वत बँकेने आरबीआयच्या रेग्युलेशन कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केले आहे. तसेच सारस्वत बँकेच्या संचालकांनी त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांना नियमबाह्यपणे कर्जाचे वितरण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सारस्वत बँकेने ज्या कंपनीला कर्ज दिले होते त्याच कंपनीच्या संचालक पदावर सारस्वत बँकेचे संचालक देखील असल्याचे निदर्शनास आले. त्यासाठी आरबीयाने नियमांचे उल्लघन करण्याचे कारण देत सारस्वत बँकेवर 23 लाखांची दंडात्मक कारवाई केली.

    त्याचप्रमाणे आरबीआयने वसई स्थित बेसिन कॅथोलिक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला ही दंड ठोठावला. कारण,  बँकेने एका संचालकाच्या कंपनीसाठी अनियमितपणे कर्ज पुरवठा केल्याचे निष्पन्न झाले होते. तर राजकोट सहकारी बँकेला ठेवीवरील व्याज दरात अनियमितता आढळून आल्याने दंडात्मक कारवाई केली आहे.. 

  • Tomato Price : टोमॅटोचे भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल!

    Tomato Price : टोमॅटोचे भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल!

    मागच्या दोन महिन्यांपासून सामन्यांच्या किचनचे बजेट बिघडवणारा टोमॅटो आता कवडीमोल भावाने बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. रबीचे पिक संपायला आले असताना आणि पावसाचा जोर वाढल्यामुळे दळणवळण समस्या निर्माण झाल्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये टोमॅटोचे भाव 200 च्याही वर पोहोचले होते. दिल्ली, एनसीआर आणि इतर काही राज्यांत टोमॅटो 250-270 रूपे किलो दराने विकले जात होते. आता मात्र हेच टोमॅटो 5-10 रूपये किलोने विकले जात आहेत.

    शेतकरी हवालदिल 

    जुलै महिन्यात मान्सूनने देशभरात चांगलाच जोर धरला होता. पावसाने अनेक राज्यांना झोडपून काढले होते. अशातच टोमॅटोची सर्वात जास्त पुरवठा करणारे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आदी राज्यांमध्ये भूस्खलन, अतिवृष्टी अशा समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्र, राजस्थान आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये टोमॅटोची आवक मंदावली होती.

    मात्र ऑगस्टमध्ये पावसाळा कोरडाच गेला आणि खरीपाचे पिक बाजारात यायला सुरुवात झाली. पिकाची आवक मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे टोमॅटोचे भाव देखील गडगडायला सुरुवात झाली. 200 रूपये पार गेलेले टोमॅटो आता 3 रुपये, 5 रुपये आणि 10 रुपये किलोने शेतकऱ्यांना विकावे लागत आहेत. काही शेतकऱ्यांनी तर आता टोमॅटो गायगुरांना खाऊ घालायला सुरुवात केल्याचे देखील समोर आले आहे. सर्वाधिक फटका हा आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसला आहे.

    सरकार घेणार निर्णय 

    शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणी लक्षात घेता सरकारी यंत्रणा देखील सज्ज झाल्याचे पाहायला मिळते आहे. स्थानिक बाजारपेठेत टोमॅटोची आवक वाढल्याने ज्या भागात टोमॅटोचे भाव पडले आहेत, तेथून सरकार थेट टोमॅटो खरेदी करू शकते.

    केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या ग्राहक व्यवहार विभागाने याबाबत चाचपणी सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. सदर मंत्रालयाकडे किंमत स्थिरीकरण निधी (Price Stabilization Fund) असतो, जो निधी शेतीमालाच्या किमती स्थिर करण्यासाठी सरकार वापरू शकते. सदर निधीच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करू शकते असे जाणकारांचे म्हणणे आहे.


    आणखी वाचा

  • Big Billion Days Sale: 3 ऑक्टोबरपासून फ्लिपकार्टचा बिग बिलियन डे सेल!

    Big Billion Days Sale: 3 ऑक्टोबरपासून फ्लिपकार्टचा बिग बिलियन डे सेल!

    अनेक दिवसांपासून फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलची वाट पाहणाऱ्या ग्राहकांची प्रतीक्षा आता संपली आहे. याचे कारण म्हणजे फ्लिपकार्टने या सेलची तारीख जाहीर केली आहे. येत्या 3 ऑक्टोबरपासून हा सेल सुरु होणार असून हा सेल 10 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. वर्षातील सर्वात मोठा सेल म्हणून कंपनीने या सेलची जाहिरात करायला सुरुवात केली आहे.

    सध्या देशभरात सणासुदीचा माहोल आहे. सणासुदीला भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात. यात कपडे, इलेक्ट्रिक सामान, गृहपयोगी वस्तू, मोबाईल स्मार्टफोन आदींचा समावेश असतो. भारतीय ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन फ्लिपकार्टने हा सेल लाइव्ह करण्याची योजना आखली आहे.

    काय ऑफर?

    सध्या ‘बिग बिलियन डेज सेल’मध्ये किती सवलत दिली जाईल हे कंपनीने उघड केलेलं नाही. मात्र आतापर्यंतचे ट्रेंड लक्षात घेता मोबाईल स्मार्टफोन, फ्रीज, वाशिंग मशीन, कुकर, ओव्हन,टॅब्लेट, प्रिंटर,लॅपटॉप, मुला-मुलींचे कपडे तसेच गृहपयोगी वस्तूंवर 70 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

    फ्लिपकार्ट अधिकृत विक्रेता असलेल्या Realme, Apple iPhone आणि Poco सारख्या कंपन्यांच्या स्मार्टफोनवर तगडा डिस्काऊंट मिळण्याची शक्यता आहे. सध्या अमेझॉनवर आयफोन 14 आणि 13 ससेरीजच्या काही स्मार्टफोन्सवर जवळपास 10 हजारांची सवलत दिली जात आहे. ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी फ्लिपकार्ट देखील अशी योजना आणण्याच्या तयारीत आहे असे समजते आहे. 

    माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या सेलमध्ये स्मार्ट टीव्हीच्या वेगवेगळ्या ब्रांडवर वेगवेगळी सवलत दिली जाणार आहे. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये स्मार्ट टीव्हीची खरेदी जोरात होत असते, त्यामुळे प्रत्येक सेलमध्ये निरनिराळ्या कंपन्या धमाकेदार ऑफर्स देत असतात. यंदाच्या सेलमध्ये ग्राहकांना 80 टक्केपर्यंतच्या सवलतीच्या दरात स्मार्ट टीव्ही खरेदी करता येणार आहे.

  • Jio AirFiber Plans: जियोच्या एअर फायबरची प्रतीक्षा अखेर संपली. मिळणार अनलिमिटेड डेटा आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्स

    Jio AirFiber Plans: जियोच्या एअर फायबरची प्रतीक्षा अखेर संपली. मिळणार अनलिमिटेड डेटा आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्स

    रिलायन्स जिओने नुकतीच गणेश चतुर्थीच्या दिवशी आपली नवीन ब्रॉडबँड सेवा ‘AirFiber’ लाँच केली आहे. या नवीन ब्रॉडबँड सेवेअंतर्गत Jio ने ग्राहकांसाठी अनेक आकर्षक योजना आणल्या आहेत. 500 हून अधिक चॅनेल्स, अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्सला ऍक्सेस आणि अनलिमिटेड डेटा युसेज अशा अनेक आकर्षक सेवा ग्राहकांच्या खिशाला परवडतील अशा वेगवेगळ्या प्लॅन्समध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.    

    वायरलेस राउटर आणि वेगवेगळे प्लॅन्स

    Jio AirFiber हे Jio च्या ‘True 5G’ सर्व्हिसचे  Fixed Wireless Access (FWA) सोल्युशन आहे. हे मुळात प्लग-एन-प्ले 5G वायरलेस राउटर आहे. Reliance Jio ने Jio AirFiber साठी 6 टॅरिफ प्लॅन जाहीर केले आहेत. जे ग्राहकांना वेगवेगळे फायदे आणि सुविधा देतात. Jio AirFiber सध्या भारतातील अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, मुंबई आणि पुणे या 8 शहरांमध्ये सुरू आहे. येत्या काही दिवसात यात आणखी काही शहरे जोडली जाऊ शकतात.

    Jio AirFiber अंतर्गत येणाऱ्या सेवा

    Jio AirFiber ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी,
    550 पेक्षा जास्त टीव्ही चॅनेल, 
    4 पेक्षा जास्त ओटीटी ॲप्स आणि स्मार्ट होम सर्व्हिसेस.
     
    Jio AirFiber इन्स्टॉलेशन फी 1,000 रुपये आहे. पण वार्षिक प्लॅन घेणाऱ्यांसाठी 1 हजार रुपये फी माफ असेल. रिलायन्स जिओने जाहीर केल्याप्रमाणे 6 योजनांपैकी कोणत्याही प्लॅनसाठी युजर्स  6 महिने किंवा 12 महिन्यांची नोंदणी करू शकतात. ही ऑफर सर्व नवीन ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. प्रत्येक प्लॅनमधील ऑफर आणि इंटरनेटचा स्पीड हा वेगवेगळा असणार आहे. Jio AirFiber योजना 1Gbps पर्यंत स्पीड देतात. युजर्स 30Mbps, 100Mbps, 150Mbps, 300Mbps, 500Mbps आणि 1Gbps प्लॅनमधून निवड करू शकतील.

    योजना 

    599 रुपयांची प्लान

    कालावधी           :   30 दिवस
    Speed              :   30 एमबीपीएस
    डेटा                   :   अनलिमिटेड 
    व्हॉईस कॉल       :   फ्री
    OTT                  :   14 OTT ॲप्स
    मागणीनुसार 550+ टीव्ही चॅनेल उपलब्ध  

    899 रुपयांचा प्लान

    कालावधी                  : 30 दिवस
    Speed                     : 100 Mbps
    डेटा                          : अनलिमिटेड 
    व्हॉईस कॉल              : फ्री
    OTT                         : 14 OTTॲप्स + Disney+ Hotstar, Sony Liv, JioCinema Premium
    मागणीनुसार 550+ टीव्ही चॅनेल उपलब्ध  

    1199 रुपयांचा प्लॅन

    कालावधी                   : 30 दिवस
    Speed                      : 100 Mbps
    डेटा                           : अनलिमिटेड
    व्हॉईस कॉल              : फ्री
    OTT                          : 14 OTT ॲप्स + Netflix, Amazon Prime, JioCinema Premium
    मागणीनुसार 550+ टीव्ही चॅनेल

    Jio AirFiber Max Rs. 1499 चा प्लान

    कालावधी                    :  30 दिवस
    Speed                       :  300 Mbps
    डेटा                            :  अनलिमिटेड
    व्हॉईस कॉल                :  फ्री
    OTT: 14 OTT ॲप्स + Netflix, Amazon Prime, JioCinema Premium
    मागणीनुसार 550+ टीव्ही चॅनेल

    Jio AirFiber Max Rs 2499 चा प्लान

    कालावधी                 :  30  दिवस
    Speed                    :   500 Mbps
    डेटा                         :   अनलिमिटेड
    व्हॉईस कॉल             : फ्री
    OTT: 14 OTT ॲप्स + Netflix, Amazon Prime, JioCinema Premium
    मागणीनुसार 550+ टीव्ही चॅनेल

    Jio AirFiber Max Rs 3999 चा प्लान

    कालावधी              :  30 दिवस
    Speed                 :  1 Gbps
    डेटा                      :  अनलिमिटेड
    व्हॉईस कॉल          : फ्री  
    OTT: 14 OTTॲप्स + Netflix, Amazon Prime, JioCinema Premium
    मागणीनुसार 550+ टीव्ही चॅनेल

  • Success Story: एका भांडणानं बनवली कोट्यावधींची संपत्ती, वाचा ‘ओला’ कॅब मालकाची प्रेरक कथा

    Success Story: एका भांडणानं बनवली कोट्यावधींची संपत्ती, वाचा ‘ओला’ कॅब मालकाची प्रेरक कथा

    कामानिमित्त प्रवास करायचा तर ऑटो किंवा टॅक्सीने फिरणं आलंच. त्यातच रिक्शा आणि टॅक्सीने प्रवास करायचा तर खासकरून रिक्शा टॅक्सी चालक आणि प्रवासी यांच्यातली भांडणं आपण दररोज ऐकत असतो किंवा वाचत असतो. कधी आपल्याही वाट्याला असे प्रसंग येतात. आपलंही त्यावेळेस डोकं फिरतं, मात्र काही काळ गेला की आपण शांत होतो आणि मग इतरांना त्याचा कसा त्रास होतोय हे वाचतो आणि सोडून देतो. मात्र एका व्यक्तीने त्याला आलेल्या वाईट अनुभवातून योग्य तो धडा घेतला आणि त्यापासून प्रेरणा घेत त्याने चक्क कोट्यावधी रुपयांचं साम्राज्य उभं केलं. ऐकून थोडं विचित्र वाटेल मात्र आयआयटी पदवीधर भावेश अग्रवाल यांचा हा अनुभव तुम्हालाही इंटरेस्टिंग वाटेल.


    अनेकदा टॅक्सीचालक आपल्याला मनमानी भाडं सांगतात. आपण नाईलाज म्हणून ते भाडं देण्यासाठी तयारही होतो. आयआयटी पदवीधर भावेश अग्रवाल आपल्या कामानिमित्त असाच एकदा प्रवास करत असताना टॅक्सीचालकाशी त्यांचं भांडण झालं. भांडणाचं  प्रमुख कारण म्हणजे तो टॅक्सीचालक त्यांच्याकडून जादा भाड्याची मागणी करत होता. 


    मात्र हे भांडण झाल्यावर त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं नाही तर देशात लो बजेट फेअर कॅब सर्व्हीसची किती नितांत गरज आहे हे त्यांनी ओळखलं. घरी आल्यावर त्यांनी आपला प्लान कुटुंबाला सांगितला. मात्र ‘आयटीत भरघोस पगाराची नोकरी असताना हे काय मध्येच?’ अशी कुटुंबाची भूमिका होती. भावेश मात्र आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी आपली योजना पूर्णत्वास न्यायची असा चंग बांधला. त्यांना त्यांच्या या बिझनेस प्लानमध्ये त्यांचा मित्र अंकीत भाटी यांची साथ मिळाली आणि मग काय, या दोघांनी मिळून बंगळूरूत ‘ओला’ या टॅक्सी व्यवसायाची सुरूवात केली.


    त्यांनी कायम एक खूणगाठ मनाशी पक्की केली होती की काहीही झालं तरीही प्रवाशांना सर्वोच्च सेवा उपलब्ध करून द्यायची. लो फेअर कॅब सर्व्हिसची मुहूर्तमेढ तिथेच रोवली गेली आणि देशात प्रवाशांना आरामदायी आणि खिशाला परवडणारी अशी ‘ओला’ सेवा मिळाली. आज आपल्यापैकी प्रत्येकानं किमान एकदा तरी स्मार्टफोनवरून ही कॅब बुक करून त्याचा आनंद घेतला असेलच.

    किती आहे ओला कॅबचं नेटवर्थ?

    ओलैा कॅबच्या नेटवर्थबद्दल बोलायचं झाल्यास हा आकडा आजमितीला 4.8 अब्ज डॉलर्स म्हणजेच 39 हजार 832 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.याशिवाय आता कंपनीने ओला इलेक्ट्रिकल्सच्या नावाने सुरू केलेल्या इ टू व्हिलरलाही पसंती मिळतेय. आज याही कंपनीचं नेटवर्थ साधारणपणे 2 हजार 400 कोटी रुपयांच्या घरात पोहोचलं आहे.