Category: यशवंत एक प्रेरणास्रोत

  • गाव खेड्यातील लाखो गरिबांना दृष्टी देणारा डोळ्यांचा डॉक्टर

    गाव खेड्यातील लाखो गरिबांना दृष्टी देणारा डोळ्यांचा डॉक्टर

    Dr. Tatya Lahane: A Visionary Ophthalmologist

    या डॉक्टरला महिन्याला ३० रुपये मजुरीसाठी रोज खांद्यावर कावड घेऊन २५ खेपा असे ५० घागरी पाणी आणावे लागले.या डॉक्टरला MBBS ला ॲडमिशन घेतल्यावर वसतिगृहातील ७ मुलांचा रोज स्वयंपाक करावा लागला. का? तर जेवण फुकट मिळायचे म्हणून..

    अथक परिश्रम करून तो एक नेत्रतज्ज्ञ बनला…

    १९९१ साल उजाडलं या डॉक्टरच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या डॉक्टरांनी एका वर्षांतच तुम्ही मरणार असे भाकीत केलं आईनं अंजनाबाईनं स्वत:ची किडनी दिली. पुनर्जन्म मिळाला. आणि पुढील आयुष्य रुग्णांच्या सेवेसाठी व्यतीत करायचं हा निर्णय त्याने घेतला आजवर या अवलिया डॉक्टरने सव्वा कोटींवर रुग्णांची तपासणी केली आहे. तर, त्यापैकी दीड लाख वृद्धांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्या. जन्मत: अंध असलेल्या १० हजार रुग्णांच्या आयुष्यात नवचैतन्याचे रंग भरण्याचं काम केलं. एक लाख शस्त्रक्रिया केल्याबद्दल या डॉक्टरचा ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरव करण्यात आला असा हा अवलिया डॉक्टर म्हणजे डॉ. तात्याराव लहाने.

    Dr. Tatya Lahane: A Visionary Ophthalmologist

    मुंबईतील जे.जे. रुग्णालयात त्यांचे काम चालत असले तरी विविध शिबीरांच्या निमित्ताने त्यांनी अक्षरशः महाराष्ट्र पिंजून काढला. आनंदवन येथे डॉ. बाबा आमटे यांच्या पुढाकाराने झालेल्या शिबीरातून त्यांनी दुर्गम भागातील अनेक मोतीबिंदू झालेल्या आदिवासी बांधवांनाही दृष्टी दिली.

    तळातील कष्टकरी तसेच हायप्रोफाईल व्यक्तींवरही त्यांनी यशस्वी उपचार केले. बारामतीतील शिबीरात एक एडसग्रस्त व्यक्ती होती, तिच्यावर कोणीच उपचार करायला तयार नव्हते, त्या व्यक्तीची खाजगी रुग्णालयात जाऊन शस्त्रक्रिया करुन घेण्याची परिस्थितीही नव्हती. लहाने यांनी त्याला तपासून लगेचच शिबीरात दाखल करुन त्याच्यावर शस्त्रक्रीया केली, त्याला दिसू लागले.

    Dr. Tatya Lahane: A Visionary Ophthalmologist

    ६६७ वैद्यकीय शिबिरांमधून तीस लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार आणि १८० हून अधिक शिबिरांमधून एक लाख ३० हजार रुग्णांना दृष्टी देणाऱ्या शस्त्रक्रिया एवढे अफाट काम त्यांनी केले. लातूरमधील मकेगावसारख्या लहानशा खेडयातून मुंबईतील जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता, आरोग्य विभागाचे सहसंचालक या पदापर्यंतचा त्यांचा प्रवास सारं काही सांगणारा आहे. नुकतेच डॉ. लहाने ३६ वर्षांच्या शासकीय सेवेनंतर निवृत्त झाले.

    प्रतिकूल परिस्थितीतही आपले ध्येय गाठणारा एक ध्येयवादी म्हणून डॉ. लहानेंचं नाव घेता येईल. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

  • अनाथांची यशोदा म्हणजेच सिंधुताई सपकाळ

    अनाथांची यशोदा म्हणजेच सिंधुताई सपकाळ

    sindhutai-sapkal-the-story-of-a-remarkable-woman

    अठराव्या वर्षापर्यंत चिंधीची तीन बाळंतपणं झाली. ती चौथ्या वेळी गर्भवती असताना तिने तिच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला. तेव्हा गुरे वळणे हाच व्यवसाय असायचा. गुरेही शेकड्यांनी असायची. त्यांचे शेण काढता काढता बायकांचे कंबरडे मोडायचे. शेण काढून बाया अर्धमेल्या व्हायच्या. पण त्याबद्दल कोणतीही मजुरी मिळायची नाही. इथे सिंधुताईंनी बंड पुकारले आणि लढा सुरू केला. त्यामुळे या लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या हप्त्यावर गदा आली. हा लढा जिंकल्या पण त्यांना या लढ्याची जबर किंमत चुकवावी लागली. बाईंच्या या धैर्याने गावातील जमीनदार दुखावला गेला होता. जंगलखात्याकडून येणारी मिळकत बंद झाली.

    मग जमीनदाराने चिंधीच्या पोटातील मूल आपलेच असल्याचा प्रचार सुरू केला. नवऱ्याच्या मनात चिंधीच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला आणि पूर्ण दिवस भरलेल्या चिंधीला त्याने बेदम मारून घराबाहेर काढले. गावकऱ्यांनीही गावाबाहेर हाकलले. माराने अर्धमेल्या झालेली चिंधी माहेरी आली, पण सख्ख्या आईनेही पाठ फिरवली.

    चिंधीने आत्महत्येचा प्रयत्नही केला. पण “लहान मुलीचा जीव घेतला, तर पाप लागेल.” म्हणून चिंधी मागे फिरली. मग भीक मागत पोट भरणे सुरू झाले. परभणी-नांदेड-मनमाड रेल्वे स्टेशनांवर चिंधी भीक मागत हिंडू लागली. चतकोर भाकर, उष्टावलेले एखादे फळ हाती लागेल, म्हणून रात्रभर रेल्वे रुळांच्या कडेने फिरू लागली. भीक मागणे, स्टेशनवर झोपणे, उपाशी राहणे या सारख्या अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. पण, २१ वर्षाची चिंधी डगमगली नाही.

    sindhutai-sapkal-the-story-of-a-remarkable-woman

    चिंधी पुण्यात आली. रस्त्यावर तिला एक मुलगा रडत बसलेला दिसला. मुलाला घेऊन ती पोलीस स्टेशनला गेली. तिथे तक्रार नोंदवून घेतली नाही.

    चिंधीने मुलाला सांभाळण्याचे ठरवले. पुढे महिन्याभरात अशीच भीक मागणारी २-३ मुले तिला भेटली. त्यानांही आपल्या पदराखाली घेतले. निराश्रितांचे जगणे किती भयंकर असते ते तिने अनुभवले होते. ते या मुलांच्या वाट्याला येऊ नये, अशी तिची इच्छा होती. आणि म्हणून ही चिंधी बनली ‘अनाथांची यशोदा’ ही अनाथांची यशोदा म्हणजेच सिंधुताई सपकाळ.

    सिंधुताईनी अनेक अनाथ मुलांना वाढवले, शिक्षण दिले, जगण्याची प्रेरणा दिली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजात मानाचे स्थान मिळवून दिले. त्यांच्या या छत्रछायेखाली त्यांचा नवरा सुद्धा आला. पण, नवरा म्हणून नाही मुलगा म्हणून…

    sindhutai-sapkal-the-story-of-a-remarkable-woman

    अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते. अशी सुमारे १०५० मुले या संस्थेत राहिलेली आहेत.

    sindhutai-sapkal-the-story-of-a-remarkable-woman

    आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणाऱ्या व्यक्तींमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव अग्रक्रमाने आणि आदराने घेतले जाते. प्रेमाला पोरक्या झालेल्या असंख्य निराधारांना आपल्या मायेच्या स्पर्शाने प्रेमाने आपलसं करणाऱ्या सिंधुताई सपकाळ या मातेची कहाणी कुणालाही थक्क करणारी आहे. सिंधुताईंना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. यावर्षी त्यांना पद्मश्री पुरस्कार सुद्धा जाहीर झाला आहे. सिंधुताई सपकाळ या एक खऱ्याखुऱ्या यशवंत आहेत.