Category: आर्थिक नियोजन

  • तुमच्या आमच्यासारखा सामान्य व्यक्ती असो किंवा अगदी मुकेश अंबानी, आर्थिक नियोजनाची गरज प्रत्येकाला आहे

    तुमच्या आमच्यासारखा सामान्य व्यक्ती असो किंवा अगदी मुकेश अंबानी, आर्थिक नियोजनाची गरज प्रत्येकाला आहे

    • मुलांच्या शिक्षणासाठी
    • नवीन / मोठे घर घेण्यासाठी
    • मुलीच्या लग्नासाठी
    • स्वतःच्या निवृत्ती नियोजनासाठी

    अशा प्रकारे आर्थिक ध्येय आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर खुणावत असतात. एका बाजूला वाढणारी महागाई, सुधारत चाललेला राहणीमानाचा दर्जा आणि प्रत्येक वस्तू ब्रँडेड हवी अशी मानसिकता; हे सर्व मिळवण्यासाठी आपली धडपड चालू असते. आज शेअर बाजार गुंतवणुकीतील वेगवेगळे पर्याय समोर दिसत असले, तरी या पर्यायाकडे वळण्याआधी स्वतःचे आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे. कारण जोपर्यंत किती पैसा आणि कोणत्या आर्थिक ध्येयासाठी, कधी लागणार हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत मला किती पैसा गुंतवावा, किती जोखीम घ्यावी हेही कळणार नाही. चला तर मग आज आपण आर्थिक नियोजनाचे महत्व समजून घेऊ.

    why-financial-planning-is-important

    आर्थिक नियोजन म्हणजे नक्की काय?

    आज प्रत्येक व्यक्तीची मग तो तुमच्या माझ्यासारखा सामान्य व्यक्ती असो किंवा मुकेश अंबानी प्रत्येकाला काही ना काही आर्थिक ध्येयं आहेत. आज एखादा व्यक्ती महिन्याला १ लाख रुपये कमवत असेल आणि ४०-५० हजार जर त्याला दर महिन्याला घरखर्चाला लागत असतील तर उरलेली रक्कम बचत आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून पुढील भविष्यातील गरजांसाठी, अडचणीच्या काळातील खर्चासाठी बाजूला ठेवणे अनिवार्य आहे, हो ना? आर्थिक नियोजन म्हणजेच आपल्या भविष्यातील खर्चाचा मागोवा घेणे आणि त्याची तरतूद करणे. आज वाढलेली महागाई, शिक्षण आणि औषधपाण्याचा वाढलेला खर्च त्यामुळे भविष्याबद्दल कमालीची भीती निर्माण झालेली दिसते. या सर्वांतून मार्ग काढण्यासाठी ‘आर्थिक नियोजन’ करून घेणे हाच पर्याय उभा राहतो.

    why-financial-planning-is-important

    आर्थिक नियोजन करताना पुढील मुख्य घटक पहिले जातात

    • सध्याची आर्थिक परिस्थिती
    • भविष्यातील आर्थिक ध्येय
    • गुंतवणुकीत जोखीम घेण्याची क्षमता

    वरील ३ मुख्य घटकांवर बहुतेक गोष्टी अवलंबून आहेत. आर्थिक नियोजनाचे खालील मुख्य भाग आहेत.

    • पैशाचे व्यवस्थापन
    • विमा नियोजन
    • गुंतवणूक नियोजन
    • निवृत्ती नियोजन
    • मालमत्ता हस्तांतरणाचे नियोजन
    why-financial-planning-is-important

    आपण सविस्तरपणे प्रत्येक बाजू समजावून घेऊ, जेणेकरून तुम्हाला स्वतःचे आर्थिक नियोजन करणे सोपे जाईल.

    • पैशाचे व्यवस्थापन – आर्थिक नियोजन करण्याआधी आपल्या पैशाचे व्यवस्थापन आपण कसे करतो हे आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. महिन्याला आपण किती कमावतो, किती खर्च करतो, महिन्याच्या खर्चाचे बजेट, वर्षाच्या खर्चाचे बजेट हे सर्व पैशाच्या व्यस्थापनामध्ये केले जाते. जोपर्यंत तुम्ही पैशाच्या व्यवस्थापनाला महत्व देत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमचा आर्थिक स्तर उंचावू शकत नाही.
    • विमा नियोजन – आज जीवन अनिश्चिततेने भरलेले आहे, त्यामुळे कधी कोणते संकट समोर उभे राहील सांगता येत नाही. विमा नियोजनाच्या माध्यमातून आपण आपल्या आर्थिक जबाबदाऱ्या विमा कंपन्यांवर सोपवू शकतो. जीवन विमा, आरोग्य विमा, वाहन विमा, घराचा विमा अशा अनेक पद्धतीने आपण आपल्या भोवती एक संरक्षक कवच उभा करू शकतो. भारतीय मानसिकतेत अजूनही विम्यावर होणार खर्च म्हणजे वाया गेलेला खर्च समजला जातो.
    • गुंतवणूक नियोजन – आर्थिक नियोजनातील महत्वाचा टप्पा म्हणजे गुंतवणूक नियोजन. वेगवेगळ्या आर्थिक ध्येयासाठी वेगवेगळे आर्थिक नियोजन करणे म्हणजे गुंतवणूक नियोजन होय. मुलांच्या शिक्षणासाठी, नवीन/मोठे घर घेण्यासाठी, मुलीच्या लग्नासाठी अशा एक ना अनेक ध्येयासाठी योग्य नियोजन गरजेचे आहे.
    • निवृत्ती नियोजन – आपण २५ वर्ष शिकत असतो आणि २५-३० वर्ष नोकरी किंवा धंदा करतो आणि या काळात जी काही शिल्लक बाजूला ठेवली असते त्यातून आपल्याला आपल्या निवृत्ती नंतरच्या काळासाठी नियोजन करायचं असते. निवृत्ती नियोजन ही काळाची गरज आहे; कारण वाढलेली महागाई, कमी होणारे व्याजदर यामुळे आपल्या भविष्यासाठीच्या नियोजनाची सुरुवात आजपासूनच करा.
    • मालमत्ता हस्तांतरणाचे नियोजन – बॉलीवूड सिनेमा असो किंवा आपला मराठी सिनेमा, मालमत्तेसाठी होणारे कौटुंबिक वाद आपण त्यामध्ये पहिले आहेत. आज तसे वाद कदाचित आपल्या घरात होणार नाहीत कारण ते बहुधा काल्पनिक असतात, पण आपण हयात नसताना आपल्या मालमत्ता आपल्या कुटुंबियांच्या नावावर हस्तांतरित होताना त्यांना त्रास होऊ द्यायचा नसेल तर काही तरतुदी आजच कराव्या लागतील; जसे की इच्छापत्र किंवा मृत्यपत्र बनविणे. लक्षात घ्या आज या गोष्टी खूप सहजरित्या करू शकतो, पण पैसा कमावण्यातच आपण इतके अडकलो आहोत की ह्या सर्व गोष्टींकडे पाहायला आपल्याला वेळच नाही.
    why-financial-planning-is-important

    पैशाचे व्यवस्थापन आणि आर्थिक नियोजनाचे महत्व ज्याला पटले आणि त्यानुसार स्वतःच्या आर्थिक जीवनाला ज्यांनी योग्य आकार दिला त्यांची आर्थिक ध्येयं दृष्टीक्षेपात येतात कारण एक राजमार्ग त्यांच्यासाठी तयार झालेला असतो. आर्थिक नियोजन नसलेले लोक एक तर बचत करत मन मारून जगत असतात किंवा आलेले पैसे खर्च करून आजचा आनंद घेतात आणि भविष्य भगवान भरोसे सोडतात. या दोघांचा सुवर्णमध्य म्हणजे आपल्या कमाईनुसार खर्च करणे आणि भविष्यासाठी गुंतवणूक करणे आणि त्याचबरोबर स्वतःच्या कमाईचे पर्याय वाढविणे होय.

    आणखी वाचा

  • दहा अशा गोष्टी, ज्यामुळे तुम्ही तिसाव्या वर्षी करोडपती बनू शकता

    दहा अशा गोष्टी, ज्यामुळे तुम्ही तिसाव्या वर्षी करोडपती बनू शकता

    यात न रुचण्यासारखे किंवा वाईट असे काहीच नाही. मी वयाच्या २१व्या वर्षी कॉलेजमधून बाहेर पडलो. जवळचे सर्व पैसे संपले, कर्जबाजारी झालो. तरीही तिसाव्या वर्षी मी करोडपती होतो.

    खाली मी दहा अशा गोष्टी सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही तिसाव्या वर्षी नक्कीच करोडपती बनू शकता.

     १. पैसे वाढवायला शिका                                                                         

    आजच्या आर्थिक जगात जिथे पैसा ही गरजेची गोष्ट बनली आहे. धनसंचय करणे आणि तो वाढवणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, त्यामुळे तुमच्याकडे येणारा पैसा सातत्याने वाढत राहायला हवा. सुरुवातीला माझी मिळकत महिना ३००० डॉलर इतकी होती, नऊ वर्षांनी ती महिना २०,००० डॉलर इतकी झाली, त्यामुळे पैशाने पैसे वाढवायला शिका. त्यातून नवीन संधी निर्माण करा.

    २. नुसता दिखावा नको, काम दिसू द्या!

    माझ्या विविध व्यवसायातून आणि गुंतवणुकीतून जेव्हा मला निश्चित पैसे मिळू लागले, तेव्हा मी माझी पहिली लक्झरी कार विकत घेतली. मी करोडपती झालो तरी टोयोटाची साधी गाडीच चालवत होतो. तुमची ओळख तुमच्या नितीमुल्यांवरून, कामावरून व्हायला हवी, तुमच्याकडे असलेल्या भौतिक गोष्टींवरून नाही.  

    ३. गुंतवण्यासाठी बचत करा…

    पैशांची बचत करा, पण फक्त गुंतवण्यासाठी. वाचवलेले पैसे एखाद्या सुरक्षित आणि अशा ठिकाणी गुंतवा जिथून सहजासहजी काढता येणार नाहीत. या पैशांचा वापर कधीही करू नका, अगदी निकडीच्या प्रसंगी सुद्धा. यामुळे वर सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडील पैसा वाढत जाईल.

    ४. तुम्हाला पैसे मिळवून न देणारे कर्ज काढू नका.

    एक नियम बनवा, आपल्याकडे येणारा पैसा वाढवण्यासाठीच कर्ज काढायचे, नाहीतर काहीही उपयोग नाही. मी कारसाठी कर्ज घेतले, कारण मला खात्री होती की त्यामुळे माझी मिळकत वाढेल. श्रीमंत लोक घेतलेल्या कर्जाचा वापर गुंतवणूक आणि कॅशफ्लो वाढवण्यासाठी करतात. गरीब लोक कर्जाचा वापर वस्तू विकत घेण्यासाठी आणि श्रीमंतांना अजून श्रीमंत करण्यासाठी करतात.

    ५. पैशांवर प्रेम करायला शिका.  

    आर्थिक स्वातंत्र्य कुणाला नको असते. आपल्याकडे भरपूर पैसे असावेत अशी सगळ्या लोकांची इच्छा असते, पण पूर्ण त्यांचीच होते, जे तिला प्राधान्य देतात. श्रीमंत होण्यासाठी आणि श्रीमंती टिकण्यासाठी पैशाला अग्रक्रम द्या. तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केले, तर तो तुमच्याकडे दुर्लक्ष करेल किंवा तुम्हाला सोडून त्याच्याकडे जाईल, जो त्याचे महत्त्व जाणतो.

    ६. पैसा कधीही झोपत नाही.

    पैशाला घड्याळ कळत नाही, वेळापत्रक, सुट्ट्या याचा विचार तो करत नाही, आणि तुम्हीसुद्धा नाही केला पाहिजे. पैसा त्यांच्यावर प्रेम करतो, ज्यांची मेहनतीची तयारी असते. जेव्हा मी २६ वर्षांचा होतो, मी रिटेल स्टोअरमध्ये काम करायचो. आमचं स्टोअर संध्याकाळी ७ ला बंद व्हायचं, पण मी बरेचदा रात्री ११ वाजेपर्यंत तिथे थांबायचो आणि सामान विकायचो. नशीबवान किंवा हुशार माणूस बनण्याचा प्रयत्न कधीही करू नका, तर नेहमी इतरांपेक्षा जास्त मेहनत घ्या.

    ७.  गरीब राहण्यात काहीही अर्थ नाही…

    मी सुद्धा गरीबच होतो आणि ते जीवन खूप निराशाजनक असतं. माझ्याजवळ थोडेफारच पैसे असायचे आणि ते म्हणजे असून नसल्यासारखे होते. त्यामुळे आपण गरीब आहोत ‘ठीक आहे’ असे विचार मनात असतील, तर लगेच काढून टाका. बिल गेट्स म्हणतात, ‘तुम्ही गरीब म्हणून जन्मलात, तर तो तुमचा दोष नाही; पण गरीब म्हणून मराल, तर मात्र तुमचाच दोष आहे.”

    ८. श्रीमंत माणसांचा आदर्श ठेवा.

    आपल्यापैकी बहुतेकजण गरीब किंवा मध्यमवर्गीय असल्यामुळे आपले विचार, आपली स्वप्नं ही जवळच्या इतर लोकांसारखीच मर्यादित असतात. मी नेहमी श्रीमंत लोकांचा अभ्यास करायचो आणि त्यांच्यासारखं वागायचा प्रयत्न करायचो. तुम्ही सुद्धा एखादी आदर्श व्यक्ती निवडा आणि त्यांचे अनुसरण करा. बहुतांश श्रीमंत लोकं ही त्यांच्याजवळील ज्ञान आणि संसाधनं वाटण्याच्या बाबतीत अत्यंत उदार असतात.

    ९. पैशाला तुमच्यासाठी काम करायला लावा.

    श्रीमंत होण्यासाठी गुंतवणूक ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्या कामातून तुम्हाला जितके पैसे मिळतात, त्यापेक्षा जास्त पैसे गुंतवणूकीतून मिळायला पाहिजेत. जर तुमच्याकडे अतिरिक्त पैसा नसेल, तर तुम्ही कधीही गुंतवणूक करू शकणार नाही. माझी दुसरी कंपनी सुरु करताना मी ५० हजार डॉलर्स गुंतवले. तीच कंपनी मला मागील दहा वर्षांपासून दरमहा ५० हजार डॉलर्स मिळवून देत आहे. मी तिसरी गुंतवणूक रिअल इस्टेटमध्ये केली होती आणि त्यातून मला अजून पैसे मिळतात. गुंतवणूक केल्यामुळे तुम्हाला अनेक नवीन संधी शोधता येतात. लक्षात ठेवा, ‘पैशाने तुमच्यासाठी काम केले पाहिजे, तुम्ही पैशासाठी नव्हे.’

    १०. नेहमी मोठा विचार करा…

    मी आजवर केलेली सगळ्यात मोठी चूक कुठली असेल, तर मोठा विचार न करणे. माझं तुम्हाला हेच सांगणं आहे की, फक्त करोडपती नाही, तर अब्जाधीश बनण्याचा प्रयत्न करा. या जगात पैशांची कमतरता नाही, तर मोठा विचार करणाऱ्या लोकांची आहे.

    या दहा मार्गांचा अवलंब करा, तुम्ही नक्की श्रीमंत व्हाल. तुमची स्वप्नं खूप मोठी आहेत असं सांगणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करा. झटपट श्रीमंत होण्याच्या स्कीम्सच्या नदी लागून नका, नैतिकता ठेवा, प्रयत्न कधीही सोडू नका आणि एकदा का तुम्ही हे ध्येय साध्य केलं की इतरांनाही मदत करा.

  • कशी करावी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक?

    कशी करावी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक?

    म्युच्युअल फंडची गुंतवणूक दोन प्रकारात विभागली जाऊ शकते :

    इक्विटी म्युच्युअल फंड : हे फंड इक्विटी बाजारात गुंतवणूक करतात, म्हणजेच ते कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. इक्विटी म्युच्युअल फंड हे दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी एक चांगला पर्याय आहे, कारण ते इक्विटी बाजाराच्या दीर्घकालीन वाढीचा लाभ घेतात.

    डेट म्युच्युअल फंड : हे फंड डेट बाजारात गुंतवणूक करतात, म्हणजेच ते सरकार आणि कंपन्यांनी जारी केलेल्या बॉन्डमध्ये गुंतवणूक करतात. डेट म्युच्युअल फंड हे कमी जोखीम असलेले गुंतवणूक साधन आहे, कारण ते सरकार आणि कंपन्यांच्या सोयीस्कर पतप्रदर्शनाची हमी देतात.

    म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत, जसे की :

    विविधीकरण (Diversification) : म्युच्युअल फंडामध्ये विविध प्रकारच्या सिक्युरिटीमध्ये गुंतवणूक केली जाते, ज्यामुळे गुंतवणूकदारांची जोखीम कमी होते.

    प्रोफेशनल मॅनेजमेंट : म्युच्युअल फंडांचे व्यवस्थापन अनुभवी आणि तज्ज्ञ निधी व्यवस्थापकांद्वारे केले जाते.

    फ्लेक्सिबिलिटी : म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक आणि गुंतवलेली रक्कम काढण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे.

    लिक्विडिटी : म्युच्युअल फंड हे लिक्विड गुंतवणूक साधन आहे, म्हणजेच गुंतवणूकदारांना त्यांच्या रकमेची आवश्यकता असल्यास ती सहजपणे काढून घेऊ शकतात.

    म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, गुंतवणूकदारांनी त्यांची गुंतवणूक उद्दिष्टे, जोखीम सहनशीलता आणि गुंतवणूकीचा कालावधी विचारात घेणे आवश्यक आहे. तसेच, गुंतवणूकदारांनी विशिष्ट म्युच्युअल फंडाच्या मागील २-३ वर्षांच्या कामगिरीचा अभ्यास करणे आणि त्यांच्या गुंतवणूक उद्दिष्टांशी ते किती जुळते ते पहावे.

    म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंड कंपनीकडे किंवा त्यांच्या वित्तीय सल्लागाराकडे खाते उघडण्याची आवश्यकता आहे. एकदा खाते उघडल्यानंतर, गुंतवणूकदार विशिष्ट म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतो.

  • आर्थिक चुकांचा आढावा आणि नवसंकल्प

    आर्थिक चुकांचा आढावा आणि नवसंकल्प

    त्याचप्रमाणे नव्या वर्षी आपल्याकडील रोखता प्रवाह असा ठेवू ज्यामुळे आयकर कमी लागेल. आपण अधिक गुंतवणूक करू शकू असा संकल्प करूया, ज्या योगे येणारे वर्ष भरभराटीचे जाईल. बाजाराचा कल सातत्याने बदलत असतो. आपल्याला मिळणाऱ्या उत्पन्नात प्रतिवर्षी वाढ होत असते.

    हातात खेळत असणाऱ्या पैशांनुसार आपल्या इच्छा, गरजा आणि अपेक्षाही बदलत असतात. करविषयक नियमही थोडेफार बदलत दरवर्षी असतात, त्याचप्रमाणे गुंतवणूकीच्या नव्या संधी उपलब्ध होत असतात. डिसेंबर हा महिना असा आहे जेथे शांतपणे थोडं थांबून निरोप देत असलेल्या वर्षाचा आपण आढावा घेऊ शकतो. केलेल्या आर्थिक चुकांचे विश्लेषण करू शकतो. नवीन वर्ष किंवा त्या पुढील काळासाठीचे घेय्य निश्चित करू शकतो.

    पूर्वी केलेले संकल्प ठरवलेली उद्दिष्ट योग्य आहेत की त्यात बदल करावा, याकडे त्रयस्थ नजरेने पाहू शकतो. सर्वसाधारणपणे बाजाराची दिशा कशी आहे, ती आपल्या मानसिकतेस अनुकूल आहे की प्रतिकूल, यात जोखीम कशी आणि किती याचा विचार करून पुढील वर्षातील गुंतवणूक संधी कोणत्या असतील याचा अंदाज बांधता येईल. त्या क्षेत्रात आपली गुंतवणूक वाढवता येईल का, ते ठरवता येईल. जिथे काहीतरी अभ्यास करून अंदाज बांधावा लागतो तेथे चुका होणं अगदी साहजिकच आहे पण त्या कमीत कमी कशा होतील, एकाच प्रकारच्या चुका वारंवार होत असतील तर त्या टाळता कशा येतील, यावर आपली प्रगती होऊ शकते. यादृष्टीने गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या सर्वसाधारण चुकांचा आणि त्यावरील उपाययोजनांचा एक धावता आढावा घेऊयात-

    ★ कोणत्याही उद्दिष्टाशिवाय केलेली गुंतवणूक:

    अनेकदा कोणतेही धेय्य न ठेवता गुंतवणूक केली जाते, यात आपलेच नुकसान होण्याची शक्यता जास्त असते कारण अशी गुंतवणूक ही त्या वेळेची बाजारातील स्थिती लक्षात घेऊन म्हणजेच अल्पकालीन स्थितीचा लक्ष्यात घेऊन केलेली असते. ती गरजेला आपल्याला उपयोगी पडेलच याची खात्री देता येत नाही कारण उद्दिष्टचं नसल्याने नेमकी किती गुंतवणूक किती काळासाठी आणि कुठे करायची याचा विचारच केलेला नसतो. गुंतवणूक ही जाणीवपूर्वक त्यातील धोका स्वीकारून त्यातून मिळणारा परतावा हा इतर धोकारहित योजनांत मिळत असलेल्या परताव्याहून अधिक असावा या हेतूनेच केलेली असते, हेच त्यामागील प्राथमिक तत्व आपण विसरून जातो. आपलं उद्दिष्ट हे,

    S M A R T म्हणजेच-

    Specific निश्चित,

    Measurable मोजता येणारे,

    Achievable शक्य असणारे,

    Relevant संबंधित,

    Time-bound विशिष्ट कालमर्यादेत

    असावं असं गुंतवणूक तज्ञांचं मत आहे. म्हणजे नेमकं काय आहे समजून घेऊनच मागील गुंतवणूकीचा आढावा घ्यावा आणि नवीन वर्षात गुंतवणूक करण्याचा विचार करावा. याच दृष्टिकोनातून गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या सर्वसाधारण चुका आणि त्यावरील उपाययोजनांचा विचार करूयात-

    ★ आपत्कालीन खर्चाची तरतूद नसणे:

    प्रत्येकाच्या जीवनात काहींना काही संकटे येत असतात यावर मात करण्यासाठी काहीतरी योजना असावी लागते. या वर्षात अशी काही संकटं आपल्यावर आली का, तेव्हा आपण काय केलंत, तेव्हा आपल्याकडे पुरेशी तरतूद होती का,आठवून पहा कोणती संकटं आली ती? नोकरी गेली, कुणीतरी गंभीर आजारी पडलं, गाडी बिघडली ती दुरुस्त करण्यासाठी मोठा खर्च करावा लागला. घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू एकापाठोपाठ एक बिघडल्याने नवीन घ्याव्या लागल्या. हे आपण टाळू शकत नाही यासाठी पुरेशी तरतूद नसेल तर उधार उसनवार करावी लागते, कर्ज घ्यावं लागतं, मालमत्ता विकावी लागते. यामुळे आपल्या आर्थिक परिस्थितीत प्रगती होण्याऐवजी आपण दोन पावलं मागे जातो कदाचित क्रेडिट कार्डसारख्या महाग कर्जाच्या सापळ्यात अडकतो. असा काही प्रसंग आपल्यावर आला का? यासाठी आपला किमान घरखर्च 12 महिने चालेल असा आपत्कालीन फंड आपल्याकडे हवा. तो नसल्यास असा फंड कसा निर्माण करता येईल या दृष्टीने नववर्षाचा विचार करावा.

    ★ निवृत्ती नियोजनासाठी लवकरात लवकर तरतूद करण्याची आवश्यकता न वाटणं:

    आपण जसे आयुष्य आज जगत आहोत तसेच आयुष्य आपल्या निवृत्तीनंतर याच जीवनशैलीच्या जवळपास असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यासाठी लवकरात लवकर गुंतवणूक करावी लागते ही गुंतवणूक आपण जितक्या लवकर (शक्यतो उत्पन्न मिळवायला लागल्यावर दोन महिन्यात आणि उत्पन्नाच्या दहा टक्के) करू तेवढी कमीतकमी करावी लागते आणि त्याच्या चक्रवाढीचा फायदा आपल्याला मिळतो. हे करण्यासाठी जेवढा विलंब तेवढी गुंतवणूक रक्कम वाढवावी लागते.

    ★ आयकर कायद्याच्या संबंधित चुका:

    अनेकदा आयकर, अग्रीमकर आयकर विवरणपत्र वेळेवर न भरणं यामुळे आपल्याला दंड भरावा लागतो काही सवलती सोडून द्याव्या लागतात. कर वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणी धावपळ केल्यास त्याचा आर्थिक ताण पडू शकतो. तेव्हा यासाठीची निश्चित योजना बनवून ठेवावी.

    ★ आपल्या गुंतवणूक संचाचा आढावा न घेणे:

    गुंतवणूक संचाचा वेळोवेळी आढावा घेऊन तो आपल्या घोरणानुसार अपेक्षित परतावा देत आहे की नाही ते पाहून त्यात योग्य ते बदल करणं हे उत्तम गुंतवणूकदाराचं लक्षण आहे. जर एखादी गुंतवणूक अपेक्षित परतावा देत नसेल तर थोडाफार तोटा सहन करून त्यातून वेळीच बाहेर पडणे आवश्यक असतं. असा आढावा वर्षातून किमान दोनदा तरी घ्यावा.

    ★ महाग कर्जाचा बोजा कमी न करणे:

    गृहकर्जाचा अपवाद सोडल्यास कोणतेही कर्ज लवकरात लवकर फेडणे कधीही चांगले. अनेकदा गुंतवणूक करण्याच्या नादात महाग कर्ज फेडलं जात नाही. कर्ज काढून गुंतवणूक करणं हे आर्थिक मागासलेपणाचं लक्षण आहे यामुळे व्याजाचा बोजा तर वाढतोच पण गुंतवणूकीतून अपेक्षित परतावा न मिळाल्यास दुहेरी नुकसान होतं. जेव्हा गुंतवणूकीतून व्याज देऊन अधिक परतावा मिळवण्याची हमखास खात्री असल्यास असे धाडस करावे, शक्यतो अशी नसती उठाठेव करू नये.

    ★ जीवनविमा, मेडिक्लेमकडे दुर्लक्ष करणं:

    आयुष्य अशाश्वत असल्याने कुटुंबातील कमावती व्यक्ती मरण पावल्यास पूर्ण आर्थिक घडी विस्कटते त्यासाठी जीवनविमा असतो. सातत्याने वाढणाऱ्या वैद्यकीय खर्चामुळे घरातील एखाद्या सदस्यास एखाद्या गंभीर आजाराशी सामना करायला लागल्यास मोठा आर्थिक फटका बसतो. जीवनविमा आणि आरोग्यविमा यासाठी करावा लागणारा खर्च त्यात असलेल्या जोखमीची किंमत समजावी. पुरेशा रकमेचा विमा घेऊन त्याचे वेळेवर नूतनीकरण करावे.

    ©उदय पिंगळे

    अर्थ अभ्यासक

    (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते आणि मध्यवर्ती कार्यकारी मंडळाचे सदस्य असून महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत, लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक समजावी)

    आणखी वाचा

  • सरकार विकतंय स्वस्तात सोनं | Gold Investment Options in India

    सरकार विकतंय स्वस्तात सोनं | Gold Investment Options in India

    तुम्हाला सोनं खरेदी करायला आवडतं का? आत्ता नुकतीच अक्षय्य तृतीया देखील झाली. या दिवशी तुम्ही काहीतरी सुवर्ण खरेदी केलीच असेल, पण आजकाल सोन्याच्या किमती एवढ्या वाढल्या आहेत की विचारायची सोय नाही, पण मी आज तुम्हाला अशा एका सरकारी योजनेबद्दल सांगणार आहे, ज्यातून आपण स्वस्तात सोनं खरेदी करू शकतो (Gold Investment.)

    तुम्हाला माहिती आहे का की, भारत जगातील सर्वांत मोठी सोन्याची बाजारपेठ आहे. भारतातच सर्वांत जास्त दागिने विकले जातात. आपण जन्माला आल्यापासून आपल्या अंगावर सोन्याचा एखादा तरी दागिना असतोच. सोनं भौतिक स्वरूपात म्हणजे दागिने, बिस्किट किंवा नाणी या  स्वरूपात ठेवायला आपल्याला आवडतं, नाही का? पण बदलत्या काळानुसार सोने खरेदी आणि सोन्यातील गुंतवणूक करण्याची पद्धत सुद्धा आता बदलली आहेत. सध्या सोन्यातील गुंतवणुकीचा सुरक्षित आणि चांगला परतावा मिळविण्यासाठी सार्वभौम सुवर्ण रोखे किंवा गोल्ड इटीएफ आणि असे अनेक चांगले पर्याय आहेत.

    2013 मध्ये सोन्याचा दर 28,000 दरम्यान होता, तोच दर आत्ताच्या घडीला ६१८०० रुपये इतका वाढला आहे. आणखी काही वर्षांनी हाच दर लाखांच्या घरात देखील जाऊ शकतो. त्यामुळे सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक वाया जाणार नाही. तर आता बघुयात सोन्यामध्ये गुंतवणुकीचे (Gold Investment) कोणते आधुनिक पर्याय उपलब्ध आहेत ते….

    पहिला पर्याय म्हणजे

    गोल्ड कॉईन :

    आपण दागिने खरेदी करताना त्यावर मेकिंग चार्ज लागतो, पण गोल्ड कॉईन खरेदीवर मेकिंग चार्ज कमी असतो. त्यामुळे दागिन्यांच्या तुलनेत सोन्याची नाणी स्वस्त पडतात. तसेच सोन्याची नाणी दागिन्यांप्रमाणे कालांतराने काळी पडत नाहीत. तसेच गोल्ड कॉइन खरेदीमध्ये भेसळीची शक्यता कमी असते. साधारणत: 0.5 ग्रॅम ते 50 ग्रॅम पर्यंत गोल्ड कॉईन बाजारात उपलब्ध असतात. ही नाणी तुम्ही बँक, सराफा दुकानदार किंवा मुथूट सारख्या वित्तीय कंपनीकडुन खरेदी करू शकता. मात्र बँकेकडून सोन्याची नाणी खरेदी करणे टाळले पाहिजे. कारण तुम्ही ही नाणी बँकेला परत विकू शकत नाही.

    गोल्ड ETF

    गोल्ड ETF म्हणजे Gold Exchange Traded Fund. याला कागदी सोनं किंवा पेपर गोल्डसुद्धा म्हणू शकतो. ही गुंतवणूक शेअर मार्केटशी मिळतीजुळती असते. जसे आपण शेअर खरेदी करतो तसे इथे DMAT अकाऊंट काढून तुम्ही गोल्ड खरेदी करू शकता. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या किंमतीप्रमाणे या फंडची किंमत बदलत असते. यामध्ये प्रत्यक्ष सोने खरेदी आणि देखभाल करण्याची गरज उरत नाही तसेच दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास चांगला परतावाही मिळतो. गोल्ड ईटीएफचा वापर कर्ज घेण्यासाठी सुरक्षा म्हणूनही केला जाऊ शकतो. यामध्ये प्रत्यक्ष सोन्याच्या तुलनेत खरेदी शुल्क कमी आहे, तर १०० टक्के शुद्धतेची हमी दिली जाते.

    गोल्ड म्युच्युअल फंड:

    गोल्ड म्युच्युअल फंड हे सोन्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या गुंतवणूक करतात. ते अशा कंपन्यांच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करतात ज्या खाणीतून सोने खणणे, त्यावर प्रक्रिया करणे, घडवणे आणि वितरण करणे अशी कामे करतात. याची सुरुवात तुम्ही कमीतकमी 500 रुपयांपासून करू शकता. बाजारातील चढ उतारानुसार तुम्हाला यातून परतावा मिळू शकतो. 

    सोवेरन गोल्ड बॉन्ड:

    केंद्र सरकारने नोव्हेंबर, 2015 साली सोवेरन गोल्ड बॉन्ड या योजनेची सुरुवात केली. यामध्ये तुम्हाला प्रत्यक्षरित्या सोनं मिळतं नाही तर बॉन्ड स्वरूपात सोनं मिळतं. या बॉन्डची एक ठरलेली किंमत असते. यावेळी याची किंमत 5,611 प्रतिग्रॅम इतकी ठरवण्यात आलेली आहे. हे बॉन्ड आठ वर्षांत मॅच्युअर होतात. म्हणजेच त्यानुसार आठ वर्षांनंतर बाँड परत केल्यानंतर तेव्हा सोन्याचा जो भाव असतो, तेवढी रक्कम परत मिळते. दरवर्षी 2.5 टक्के व्याजही तुम्हाला मिळत जातं. हे व्याज दोन भागात सहा-सहा वर्षांच्या फरकाने मिळत जाते. हे बॉण्ड्स तुम्ही बँक, HSCIL ऑफिस, पोस्ट ऑफिस आणि एजंट्सकडून फॉर्म घेऊन विकत घेऊ शकता किंवा RBI ची वेबसाईट आणि बँकांतून ऑनलाईन अर्ज भरून तुम्ही फॉर्म विकत घेऊ शकता.

    या योजनेअंतर्गत तुम्ही वैयक्तिक एका वर्षात एक ग्रॅमपासून ते जास्तीत जास्त चार किलो सोन्यात गुंतवणूक करू शकता. संस्था किंवा कंपन्या 20 किलोपर्यंत गुंतवणूक करू शकतात.

    हा लेख विडीयो मध्ये पहा
  • मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या योजनांमध्ये करा गुंतवणुक

    मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या योजनांमध्ये करा गुंतवणुक

    आपल्या मुलामुलींचे भवितव्य सुकर व्हावे असे प्रत्येक सुजाण पालकाला वाटणे स्वाभाविक आहे. मातृभाषेत शिक्षण द्यावे असे सर्व तज्ञ सांगत असले तरी जवळपास सर्वांनीच यावर काट मारली असून इंग्रजी माध्यमास पसंती दर्शवली आहे. त्यामध्ये स्टेट बोर्ड, सेंट्रल बोर्ड, इंटरनॅशनल बोर्ड असे प्रत्येक टप्यावर महाग होणारे पर्याय असून अनेक पालक आपल्याला परवडत नसतानाही त्याच्या मुलांना हे शिक्षण कसे मिळेल याची धडपड करीत आहेत. ज्यांची ऐपत आहे त्यांचे ठीक पण नाही त्यांचे काय?


    उच्च शिक्षण घेण्यासाठी कमी व्याजदराने विनातारण कर्ज मिळू शकते त्यामुळे अनेक ऐपत असलेले आणि नसलेले अशा कर्जाचा उपयोग करून घेत आहेत परंतु शालेय शिक्षणाचे काय? त्याचा खर्च सध्या एवढा वाढला आहे की या एक वर्षाच्या खर्चात 20 वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांचे सर्व शालेय शिक्षण होत होते. तेव्हा मुले जन्माला येण्यापूर्वी किंवा अगदी लहान असताना विविध प्रकाराच्या मालमत्ता प्रकारात गुंतवणूक करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे सध्या यासाठी उपलब्ध पर्याय आपण पडताळून पाहुयात.


    ★सुकन्या समृद्धी योजना-(Sukanya Smruddhi Yojana)


    *ही सरकारी योजना असून केवळ मुलींसाठीच उपलब्ध आहे.
    *मुलीचा जन्म झाल्यापासून 10 वर्ष पूर्ण होईपर्यंत पालकांना किंवा कायदेशीर पालकाला मुलीच्या नावे याचे खाते पोस्ट ऑफिस, सरकारी आणि खाजगी बँकेत काढता येते.
    *एकाच व्यक्तीच्या नावे दोन खाती काढता येत नाहीत. जास्तीत जास्त 2 मुलींच्या नावे अपवादात्मक परिस्थितीत 3 खाती काढता येणे शक्य आहे.
    *खात्याची मुदत 21 वर्ष अथवा मुलीचे लग्न ठरेपर्यत यातील जे प्रथम पूर्ण होईल ते.
    *किमान गुंतवणूक ₹1000/- प्रतिवर्षी कमाल ₹150000/- पालकास 80 c सवलत घेता येईल.
    *सध्याचा व्याजदर 8% व्याजदर दर 3 महिन्यांनी बदलतो सरकारकडून जाहीर केला जातो. व्याज करमुक्त मुदतपूर्ती रक्कम मुलीच्या हातात पूर्णपणे करमुक्त.
    *मुलीला 18 वर्षे पूर्ण झाली असताना त्यांच्या आधीच्या वर्षी शिल्लख असलेल्या रकमेच्या 50% रक्कम योग्य ते पुरावे देऊन शिक्षणासाठी काढता येते.


    ★पोस्ट ऑफिस मुदत ठेव (Time deposit)


    *अल्पबचत योजनेत याचा समावेश होतो, त्यास सरकारची हमी असल्याने पूर्ण सुरक्षित.
    *केवळ पोस्ट ऑफिसमध्ये याचे खाते काढता येते. भारतातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये बदलून घेता येते.
    *मुदत 1 ते 5 वर्ष, व्याजदर कामाल 7.5% प्रतिवर्षी.
    *10 वर्षाच्या वरील मुलांचे खाते काढता येईल.
    *किमान गुंतवणूक ₹1000 कमाल कोणतीही मर्यादा नाही.


    ★मुदत ठेव योजना


    *योजना वरील प्रमाणेच फक्त गुंतवणूक बँकेत.
    *बँकेतील एकत्रित ठेवीस नियमानुसार ₹5 लाख विमा संरक्षण.


    ★राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National Saving Certificate)


    *अल्पबचत योजना
    *मुदत 5 वर्षे व्याजदर 7.70% दरवर्षी.
    *10 वर्षावरील मुलांना त्यांच्या नावे घेता येईल.
    *किमान गुंतवणूक ₹1000 कमाल मर्यादा नाही.


    ★रिकरिंग डिपॉझिट-


    *पोस्ट बॅंक येथे उपलब्ध
    *व्याजदर मुदतीनुसार मुदत 1 ते 5 वर्ष.
    *शिस्तबद्ध रीतीने गुंतवणूक करण्याची पद्धत.


    ★सार्वजनिक निवृत्तीवेतन योजना ( Public Providand Fund)


    *पालकासह मुलांना खाते काढता येते.
    *किमान गुंतवणूक ₹ 500/-प्रतिवर्षी कमाल ₹ दीड लाख. मुदत 16 आर्थिक वर्षे.
    *नंतर मुदत 5 वर्ष अशी कितीही वेळा वाढवता येते
    *7 व्या आर्थिक वर्षापासून 3 ऱ्या आर्थिक वर्षातील शिल्लख किंवा पूर्वीच्या वर्षातील शिल्लख याच्या 50% रक्कम काढून घेता येते.
    *18 वर्षानंतर मुले सदर खाते स्वतंत्रपणे चालवू शकतात.
    गोल्ड इटीएफ : मुलांसाठी ज्यांना सोन्यामध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांना गोल्ड इटीएफ हा पर्याय आहे याचे कार्य म्युच्युअल फंडाप्रमाणेच चालते यातील एक युनिट 1 gm सोन्याची किंमत दर्शवतो. यात गुंतवणूक कधीही करता किंवा काढून घेता येते.
    म्युच्युअल फंड योजना: म्युच्युअल फंड युनिट मध्ये कालबद्ध गुंतवणूक ही योजनेत कालबद्ध गुंतवणूक दीर्घकाळ करून करता येते यामुळे
    सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन यामुळे जोखीम कमी होऊन परतावा अधिक मिळण्याची शक्यता वाढते. या योजनेशिवाय योजना आहेत त्यांना चिल्डरेन गिफ्ट ग्रोथ फंड असे म्हणतात त्यांचे कार्य बॅलन्स फंडाप्रमाणे चालते यातून चांगला परतावा मिळू शकतो.
    विमा योजना/ युलीप :मुलांसाठी खास निश्चित परतावा देणाऱ्या त्याचबरोबर विमा माध्यमातून सुरक्षा कवच मिळते यात निश्चित परतावा देणारे त्याचबरोबर बाजार निगडित परतावा देणाऱ्या योजना आहेत. त्या करारानुसार सुरक्षा कवच पुरवतात यामध्ये निश्चित परतावा देणाऱ्या योजना आपली जाहिरात करताना सुरक्षा कवच मोफत देत असल्याचे सांगत असतील तरी त्यातून मिळणारा परतावा बाजारात मिळू शकणाऱ्या परताव्याहून कमी असतो त्यामुळे कोणी कोणाला फुकट काही देत नाही हे लक्षात ठेवावे. त्यांच्या अनेक योजनांना संचय, चाईल्ड प्लस, चाईल्ड एडव्हॅनटेज अशी आकर्षक नावे आहेत. युलीप मध्ये अनेक पर्याय आहेत यात बाजार निगडित परताव्यातून दीर्घकाळ राहिल्यास चांगला लाभ होऊ शकतो या दोन्ही प्रकारातून पुरेसे विमा संरक्षण मिळू शकत नाही, हमी देणाऱ्या योजनेतून पुरेसा परतावाही मिळू शकत नाही असे माझे मत आहे. यातील परताव्याबद्धल अनेकदा एजंट चुकीची माहिती देऊन गुंतवणूकदारांची दिशाभूल करतात.
    या आणि अशा प्रकारच्या योजना लहान मुलांसाठी उपयुक्त आहेत यातील सुकन्या समृद्धी योजना फक्त 10 वर्षाच्या आतील मुलींना उपलब्ध आहे. आपली गरज, क्षमता, जोखीम स्वीकारण्याची ताकद याचा विचार करून वेगवेगळ्या मालमत्ता प्रकारात गुंतवणूक विभागता येईल. यातील बहुतेक योजनांत पाल्याच्या नावे केलेल्या गुंतवणूकसाठी पालकांना 80 C नुसार आयकर सवलत मिळते.

    ©उदय पिंगळे
    अर्थ अभ्यासक

    (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेच्या कार्यकारिणीचे पदाधिकारी असून महारेराच्या सलोखामंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत)

  • पैशाचे नियोजन (Financial Planning) : 7 महत्वाचे टप्पे

    पैशाचे नियोजन (Financial Planning) : 7 महत्वाचे टप्पे

    पैसा हा आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. आपल्या जीवनातील बऱ्याचशा गोष्टीवर पैशांचा प्रभाव पडतो, मग तो कमी असला तरी किंवा जास्त असला तरी. या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीचा विचार हा व्हायलाच हवा, म्हणून या लेखामध्ये आपण पैशाविषयी बोलूया…( Financial Planning )

    पैशाचं योग्य (Financial Planning) नियोजन करण्यासाठी आपण काही महत्वाचे मुद्दे पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला किचकट वाटणारं पैशाचं नियोजन जरा सोपं होऊन जाईल.

    १. उत्त्पन्न : पैशाचं नियोजन करताना पहिला मुद्दा आहे तुमचं उत्पन्न!  तुम्ही नोकरदार असा की व्यावसायिक, बेरोजगार असा किंवा गृहिणी, तुमचे उत्पन्नाचे स्रोत कोणते आहेत आणि ते तुम्ही कसे वाढवू शकता जेणेकरून तुमच्याकडे येणारा पैसा वाढेल याचा तुम्हाला सर्वात आधी विचार करावा लागेल.

    २. खर्च : दुसरा आणि महत्वाचा मुद्दा असा की तुमचा पैसा खर्च कुठे आणि कसा होतो याची नोंद तुम्ही रोजच्या रोज ठेवायला हवी. बचतीचा मार्ग न स्वीकारता जर तुम्ही वारेमाप पैसा खर्च करत असाल, तर त्याचा तुमच्या आर्थिक भविष्यावर नक्कीच परिणाम होऊ शकतो.

    ३. बचत : आपला तिसरा मुद्दा आहे बचत. आप कितना कमाते हो पेक्षा आप कितना बचाते हो हे सध्या जास्त महत्वाचं झालंय ! बचत करण्यासाठी अतिरिक्त खर्च टाळणे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे बचत करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधून काढा.

    ४. गुंतवणूक : पैसा वाढवल्याने वाढतो हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे आपला चौथा मुद्दा आहे गुंतवणूक ! बचत केलेल्या पैशाची विभागणी करा आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. प्रसिद्ध गुंतवणूकदार Warren Buffett यांचा एक फेमस quote आहे  “If you don’t find a way to make money while you sleep, you will work until you die” म्हणजे जर तुम्हाला झोपेत पैसे कमवण्याचा मार्ग सापडला नाही, तर तुम्हाला मरेपर्यंत कामच करत राहावं लागेल.

    ५. कर्ज : आपला पुढचा मुद्दा आहे कर्ज! तुमची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे नेहमी पुरेसा पैसा असेलच असे नाही. त्यामुळे वेगवेगळ्या मार्गाने कर्ज घेणे आणि ते सुद्धा सोयीस्कर अटींसह हे खूप गरजेचं आहे.

    ६. अर्थसंकल्प : जसा देशाचा अर्थसंकल्प असतो तसा देशातील प्रत्येक नागरिकानेसुद्धा आपला स्वतःचा वैयक्तिक अर्थसंकल्प बनवला पाहिजे. अर्थसंकल्प बनवल्यामुळे आपल्या पैशांचे सुयोग्य नियोजन करण्यास मदत होते. यात तुमचे उत्पन्न, खर्च, कर्ज आणि गुंतवणूक अशा सर्व गोष्टींचा ताळेबंद असायला हवा.

    ७. सातत्य : शेवटचा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे सातत्य! आपल्याकडे आर्थिक नियोजनात कधीच सातत्य आढळत नाही. त्यामुळे वरील सर्व गोष्टींमध्ये तुम्ही कितपत सातत्य राखता यावर तुमचे आर्थिक भविष्य अवलंबून असेल.

    आणखी वाचा