Tag: financial-planning

  • देणगी आणि आयकर सवलत

    देणगी आणि आयकर सवलत

    करगणना ही करदात्यांच्या निव्वळ करपात्र उत्पन्नावर केली जाते. 80G नुसार दिलेली देणगी अनेक ठिकाणी 50% तर काही ठिकाणी 100% सवलत मिळते 80 GGA ही सवलत केवळ शैक्षणिक आणि संशोधन करणाऱ्या संस्थेस दिलेल्या देणगीस 100% सवलत मिळते. या दोन्ही सवलती एकूण सामाजित उत्पन्नाच्या (80 G नुसार मिळू शकणारी सवलत वगळून येणारे उत्पन्न) 10% या मर्यादेत सूट मिळते.

    याचाच अर्थ असा की,

    करदात्यांच्या-

    ●सर्व मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाची बेरीज केली जाईल यात अल्पकालीन दिर्घकालीन भांडवली नफा मिळवला जाईल याशिवाय त्यात जे उत्पन्न करपात्र नाही तेही मिळवले जाईल.

    ●त्यातून 80G अथवा 80 GGA खाली मिळू शकणारी वजावट वगळून अन्य वजावटी घेतल्या जातील.

    ●आता जे उत्पन्न मिळाले ते करदात्याचे सामाजित उत्पन्न समजले जाईल त्याच्यातून जास्तीत जास्त 10% या मर्यादेत देणगी वजा केली जाईल.

    करपात्र उत्पन्न काढताना,

    सामाजित उत्पन्नातून करपात्र नसलेले उत्पन्न, कायद्याने मिळणाऱ्या सर्व वाजावटी पात्र देणगीच्या वजावटीसह घेतल्यास निव्वळ करपात्र उत्पन्न मिळेल.

    80 G आणि 80 GGA नुसार सवलत मिळण्यासाठी आवश्यक गोष्टी

    ●₹2000/-हून अधिक देणगी रोख दिली असेल तर सूट मिळत नाही. याहून अधिक रकमेची देणगी चेक, डिमांड ड्राफ किंवा ऑनलाइन पद्धतीनेच द्यावी.

    ●दिलेल्या देणगीच्या पावतीवर देणगीदाराचे नाव, पॅन, रक्कम आणि देणगी कोणत्या पद्धतीने दिली याचा उल्लेख असावा.

    ●याच पावतीवर देणगी स्वीकारणाऱ्या निधी किंवा संस्थेचा नोंदणी क्रमांक, वैधता, संस्थेचा पॅन आणि सूट पात्रता टक्केवारी यांचा उल्लेख असावा.

    ●अलीकडेच विवरणपत्र भरताना देणगी संदर्भ क्रमांक मागितला जातो तो आहे की नाही ते पाहावे.

    ●देणगी स्वीकारणारी संस्था स्वदेशी असावी.

    यासंदर्भात विचारले जाणारे सर्वसाधारण प्रश्न आणि त्याची उत्तरे-

    ★देणगीस असलेल्या सवलतीचा लाभ आपला मालक आपल्याला देऊ शकेल का?

    ~देणगी थेट करदात्यांच्या पगारातून कापून थेट देण्यात आली असेल तर त्याचा लाभ मालक देऊ शकतो.

    ★विवरणपत्र सादर करताना देणगी पावती देण्याची गरज आहे का?

    ~ आता विवरणपत्र कागद विरहित पद्धतीने सादर केली जात असल्याने देणगी पावती देण्याची गरज नाही. मोजणी करणे किंवा आयकर खात्याने देणगीचा तपशील मागितला तरच पावतीची गरज लागेल.

    ★देणगीची पावती विशिष्ठ नमुन्यातच असावी असे काही आहे का?

    ~ नाही, देणगी देणारा आणि स्वीकारणारा यांची वर दिल्याप्रमाणे सर्व माहिती आणि संदर्भ क्रमांक पावतीमध्ये असायला हवा.

    ★जर मालकाने सर्वांची एकत्रित देणगी दिली असेल तर पावती कशी असावी?

    ~अशा परिस्थितीत कंपनी लेटर हेडवर जबाबदार व्यक्तीने दिलेले पत्र आणि सर्वाचा वेगळा एकत्रित तपशील पुरेसा आहे.

    ★देणगीवर मिळणारा कर सवलतीचा लाभ सर्व प्रकारच्या उत्पन्नातून घेता येतो का?

    हो, विहित मर्यादेत पगार, पेन्शन, व्याज, घरभाडे भांडवली नफा अन्य उत्पन्न या सर्वांसाठी या करसवलतीचा लाभ घेता येतो.

    ★अनिवासी भारतीय या सवलतीचा लाभ घेऊ शकतात का?

    ~हो, अनिवासी भारतीय त्याच्या भारतातील उत्पन्नावर हा लाभ घेण्यास पात्र आहेत.

    ★विवरणपत्र भरून झाले आणि ते खात्याकडून मान्य केले गेले आहे परंतु माझ्याकडून देणगीचा लाभ घेण्याचे राहून गेले अशा प्रसंगी हा लाभ मला कसा मिळवता येईल?

    ~विवरणपत्र दुरुस्ती करण्याची मुदत उलटून गेली नसेल तर सुधारित विवरणपत्र सादर करून हा लाभ मिळवता येईल.

    ★देणगीचे वर्गीकरण आणि खात्री कशी करता येईल?

    ~देणगीची पूर्ण सवलत अथवा 50% सवलत आहे त्याची माहिती आणि खात्री संस्थेचे नाव आणि पॅन याचा वापर करून आयकर विभागाच्या संकेतस्थळास भेट देऊन मिळवता येईल.

    ★पैश्याव्यतिरिक्त अन्य पद्धतीने दिलेल्या देणगीस सूट मिळते का?

    ~नाही फक्त पैशाच्या स्वरूपातील मदतीसच ही सवलत मिळते. आपण कपडे, धान्य, वस्तू स्वरूपात मदत करू शकत असलो तरी त्यास अथवा 2 हजार रुपयांहून अधिक रोख स्वरूपातील मदतीस ही सवलत उपलब्ध नाही.

    ★व्यक्तिशिवाय अन्य कोणास या सवलतीचा लाभ मिळतो का?

    ~हिंदू अविभाज्य कुटुंब, कंपनी, भागीदारी व्यवसाय यांची गणना कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम स्वतंत्र व्यक्तीत होते त्यांनाही 80 G खाली लाभ घेता येतो.

    ★काही न्यास आहेत उदा सेव द चाईल्ड, अक्षयपात्र यांना केलेल्या मदतीस ही सवलत मिळते का? एनजिओस देणगी देऊन मला कर कसा वाचवता येईल?

    ~नमूद केलेल्या न्यासाना 50% सवलत आहे अन्य संस्था, न्यास, निधी, एनजिओ याबाबत आयकर विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन सवलत मिळते की नाही, मिळत असल्यास किती मिळते? याची माहिती मिळवता येईल

    आणि त्याप्रमाणे सवलत मिळेल.

    अनेक संस्था ट्रस्ट बहुमोल सामाजिक कार्य करीत असतात. त्यांना कार्यकर्ते, मदतनीस आणि पैसे यांची चणचण भासते. अनेक अडचणींना तोंड त्यावे लागते तरी त्या निष्ठेने आपली कार्ये करीत असतात. आपण त्यात आपला प्रत्यक्ष सहभाग देऊ शकत नसलो तरी मदत नक्कीच करू शकतो. ही मदत वस्तुरूपात अथवा पैशात कशीही करता येऊ शकते. केवळ आयकरात सवलत मिळवावी असा या मागे हेतू नसेल अथवा नसावा असे मला वाटते. केवळ पैशांच्या स्वरूपातील मदतीस आयकर सवलत मिळते अशी सवलत मिळून काही कर वाचल्यास त्यात भर टाकून अधिक मदत करावी आणि आपली सहवेदना आणि समाजभान जागृत ठेवावे.

    ©उदय पिंगळे

    अर्थ अभ्यासक

    (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक समजावीत)

    1 मार्च 2024 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉमवर पूर्वप्रकाशीत.

    आणखी वाचा

  • कोण म्हणतं जॉब करणारे श्रीमंत नाही बनू शकत? ‘असे’ प्लॅनिंग करून तुम्हीही श्रीमंत बनू शकता

    कोण म्हणतं जॉब करणारे श्रीमंत नाही बनू शकत? ‘असे’ प्लॅनिंग करून तुम्हीही श्रीमंत बनू शकता

    आर्थिक नियोजन

    आपण या लेखातून जॉब करणारा व्यक्ती कशाप्रकारे योग्य आर्थिक नियोजनाद्वारे श्रीमंत कसा बनू शकतो, हे पाहूयात. आज तुमचा पगार कमी जरी असला, तरीही तुम्ही स्वत:ला धन्यवाद द्या की, तुम्ही या काळात जन्माला आलात. कारण, आज तुम्ही कुठल्या कॉलेजमधून आलात, त्याचे महत्त्व कमी झाले आहे. तुमची पदवी काय आहे, त्याचे महत्त्व कमी झाले आहे. एवढंच काय, तर तुमचे मार्क्स किती आहेत, याचेही महत्त्व कमी झाले आहे. आजपासून १०-१५ वर्षांपूर्वी या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरत होत्या. मात्र, आता त्यांचा एवढा फरक पडत नाही. आता फक्त एकच गोष्ट गरजेची आहे, ते म्हणजे तुम्ही कोणत्या एका गोष्टीमध्ये चांगले आहात. तसेच, जर तुम्ही एखाद्या गोष्टीत चांगले नसलात, पण तुम्हाला त्यात रस असेल; तर तुम्ही मोफत इंटरनेटच्या वापराने त्यात चांगले होऊ शकता. मग ते काहीही असू शकते. ग्राफिक्स डिझायनिंग असू शकते, वेब डेव्हलपमेंट असू शकते किंवा कंटेंट रायटिंगदेखील असू शकते.

    तुम्ही कोणत्यातरी एका गोष्टीत स्वतःला एक चांगली व्यक्ती बनवू शकला, तर कोणतीही कंपनी तुम्हाला जॉब देईल, जिथे तुमचा पगार २० हजार किंवा त्याहून अधिक असेल. तर अशा परिस्थितीत आम्ही जे आर्थिक नियोजन तुम्हाला सांगत आहोत, ते तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.

    How job seekers can become rich know here

    जर तुमचा पगार २० हजार रुपये किंवा त्याहून अधिक असेल, तर तुम्ही कोट्याधीश कसे बनू शकता? यासाठी काही नियम आहेत. एक असा की, ५०, ३० आणि २० नियम. या नियमानुसार, तुमचा जो काही पगार आहे, त्यातील ५० टक्के पगार तुम्ही गरजांवर खर्च करू शकता. जसे की, वीज बिल, पेट्रोल, फोन बिल, खान-पान आणि घराचे भाडे. त्यानंतर ३० टक्के पगार तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींवर खर्च करू शकता. जसे की, चांगले कपडे घ्यायचे आहेत, पार्टी करायची आहे, कुठे फिरायला जायचे आहे, मूव्हीला जायचं आहे. यानंतर पुढचा भाग येतो २० टक्के पगार, जी आहे बचत. तुम्हाला तुमच्या पगारातील कमीत कमी २० टक्के पैशांची बचत करायची आहे. त्यानंतर याच पैशांची गुंतवणूक करायची आहे. चला तर, आपण याची आकडेमोड करून पाहूयात.

    तुमचा पगार फक्त २० हजार असला, तरीही हा हिशोब वैध आहे. आपण २० हजार रुपयांविषयी बोलत आहोत, तर तुम्हाला यापैकी किती रुपयांची बचत करायची आहे, तर २० टक्के. तुम्ही जर यापेक्षा जास्तीची बचत करू शकला, तर अति उत्तम. २० टक्के रक्कम तुम्ही बचत करत आहात, तर ती रक्कम होते ४ हजार रुपये. आता ४ हजार रुपयांची तुम्ही बचत करत आहात किंवा तुमचं ते ध्येय आहे. आता आपण पाहूयात की, तुम्ही जे ४ हजार रुपये बचत करत आहात, त्यातून तुम्ही काय कराल. पहिला नियम होता ५०-३०-२० आता आपण दुसरा नियम पाहूयात, जो गुंतवणुकीचा आहे. त्यानुसार तुम्हाला त्या ४ हजार रुपयांची गुंतवणूक करायची आहे.

    How job seekers can become rich know here

    यासाठी तुम्ही जीवन विमा घेऊ शकता. तुम्ही जर तरुण असाल, २७ ते ३० पेक्षा कमी वयाचे, तर तुम्हाला १ कोटी रुपयांचा विमा मिळेल. हा तुम्हाला साधारण ५०० रुपये प्रति महिना हिशोबाने मिळेल. आता ४ हजारातील ५०० रुपये गेले, तेव्हा तुम्ही साधारण विमा नाही, तर टर्म प्लॅन घ्याल आणि काही गोष्टींची काळजी घ्या. जसे की, कुटुंबातील सर्वांचा जीवन विमा घ्यायचा नाहीये. जे कमावते लोक आहेत किंवा तुम्ही कमावते आहात, तर तुमचा विमा घ्या. कोणत्याही स्कीममध्ये अडकून स्वतःची फसवणूक करून घेऊ नका.

    दुसरी पायरी म्हणजे, आरोग्य विमा. हा विमा सर्वांचा घ्यायचा आहे. कारण, आजारी कुणीही पडू शकतो. त्यामुळे यासाठी जवळपास ५०० रुपयात तुमचा आरोग्य विमाही मिळेल. आता ४ हजारांपैकी १ हजार रुपये तुमच्या जीवन आणि आरोग्य विम्यासाठी खर्च झाले. सर्वप्रथम ही दोन कामे केली पाहिजेत.

    आपत्कालीन निधी

    आता पुढची पायरी म्हणजे आपत्कालीन निधी. आजकाल फ्रीलान्सिंग सुरू आहे. मात्र, त्याचाही काही भरोसा नाहीये. कधी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जाते. कधी व्यवसाय ठप्प पडतो, किंवा लॉकडाऊनची स्थिती उद्भवते. कोणतीही आपत्कालीन स्थिती उभी राहते. मात्र, खर्च हा सुरूच असतो. त्यामुळे त्याची आधी तयारी करायची. त्यानंतर गुंतवणुकीचा विचार करायचा.

    जर तुमच्या घरात एकटे कमावते असाल, तर तुमच्याकडे सहा महिन्यांचा आपत्कालीन निधी असावा. तसेच, जर तुमच्या घरात दोन कमावते लोक असतील, तर तुमच्याकडे तीन महिन्याचा आपत्कालीन निधी असावा. आता तीन महिन्यांचा आपत्कालीन निधी समजून घेऊयात. तुमचा पगार २० हजार आहे, तर आपण ५०-३०-२० नियमानुसार ५० टक्के रुपये तुमच्या गरजांसाठी आहेत, त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. तुमची नोकरी जरी गेली, तरीही तुम्ही तो खर्च दुर्लक्षित करू शकणार नाहीत. म्हणजेच महिन्याचा १० हजार रुपये हा असा खर्च आहे, जो तुम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजेच. त्यामुळे तुम्ही जर घरातील दुसरे कमावते व्यक्ती असाल, तर तुमचा आपत्कालीन निधी कमीत कमी तुमच्या गरजांपेक्षा तीन पट असला पाहिजे. तसेच, घरातील प्रथम कमावते व्यक्ती असाल, तर आपत्कालीन निधी तुमच्या गरजांपेक्षा सहा पट असला पाहिजे. म्हणजेच तुमच्या महिन्याच्या गरजांवरील खर्च १० हजार रुपये आहे, तर तुमचा आपत्कालीन निधी हा कमीत कमी ३० हजार रुपयांचा असावा. जास्त असेल, तर उत्तमच.

    How job seekers can become rich know here

    आता हे ३० हजार रुपये कसे येणार हे पाहूयात. तुमच्या बचतीतील ४ हजार रुपये जे होते, त्यातील १ हजार महिना तर विम्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील. उरलेल्या ३ हजार रुपयांतून तुम्ही आताच गुंतवणुकीला सुरुवात करू नका. तुम्हाला १० महिन्यांसाठी ते ३-३ हजार रुपये जोडून बचत खात्यात आधी ३० हजार रुपये जमा केले पाहिजेत. तसेच, तुम्ही पे ऑटो स्विच ऑन करा. जर तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही पैसे खर्च कराल, तर एफडी करा, जी रक्कम काढता येऊ शकेल. अशाप्रकारे तुम्ही १० महिन्यांपर्यंत ३-३ हजार रुपये जमा करून आपत्कालीन निधी तयार करू शकता. हे तुम्ही कामाला लागल्यानंतर पहिल्या १० महिन्यात करावे लागणार आहे.

    जीवन विमा तुम्हाला सर्वप्रथम घ्यायचा आहे. कारण, जितक्या तरुण वयात तुम्ही हा विमा घ्याल, तेवढा तुम्हाला प्रीमियम (हप्ता) कमी भरावा लागेल. तर या झाल्या तीन महत्त्वाच्या पायऱ्या. तुम्ही तुमचा जीवन आणि आरोग्य विमा घेतला. तुमचा आपत्कालीन निधी बनवला. आता ११ महिन्यानंतर तुम्ही गुंतवणूक सुरू करू शकता.

    गुंतवणूक

    अनेकजण काय करतात की, पहिल्या महिन्यापासूनच गुंतवणूक सुरू करतात. तसे करायचे नाही. जेव्हा ११ महिने होतील, तेव्हा गुंतवणूक सुरू करा. तुमच्याकडे आता ३ हजार रुपये आहेत, तुम्हाला स्टॉक्समध्ये, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवायचे आहेत, तर आता तुम्ही गुंतवू शकता. म्युच्युअल फंड्समध्ये अभ्यासपूर्ण गुंतवणूक केल्यास १२-१५ टक्के परतावा सहज मिळवू शकता. यासाठी एखाद्या अनुभवी आर्थिक सल्लागाराची मदत घेऊ शकता.

    आपण अद्याप एक गोष्टीचा हिशोब केलाच नाही, तो म्हणजे तुमचा पगार कायम २० हजार असणार नाहीये. कधी ना कधी तुमचा पगार वाढणार आहे. तुम्ही नेहमी एवढीच गुंतवणूक करणार नाहीयेत. नक्कीच त्यात वाढ कराल. त्यामुळे जेव्हा तुम्ही जास्त गुंतवणूक कराल, तेव्हा तुम्हाला जास्त पैसे लागतील आणि त्यावर जास्त परतावा मिळेल. जसे तुम्ही सध्या ३००० रुपयांची गुंतवणूक करत आहात, पण पुढच्या वर्षी त्यात १५ टक्के वाढवाल. म्हणजेच पुढच्या वर्षी तुम्ही ३ हजार नाही, तर जवळपास ३५०० हजार रुपये गुंतवाल. त्यानंतर पुन्हा तुम्ही १५ टक्के वाढवाल. आता एक प्रश्न असाही आहे की, कुणाचा पगार दरवर्षी १५ टक्के वाढतो. जर महागाईचा दर ६.७ टक्के वाढला आणि तुमचा पगार १० टक्क्यांनी वाढला, तर तुमच्या पगाराच्या २० टक्के रक्कम गुंतवत आहात आणि त्यात तुम्ही १० टक्क्यांच्या वाढ केली, पण इतर ८० टक्के खर्च तुमचा गरजा आणि इतर गोष्टींसाठी ६ टक्क्यांनीच वाढला, तरी ४ टक्के तुम्ही गुंतवू शकाल.

    How job seekers can become rich know here

    आपण हे एका उदाहरणाद्वारे समजूया. समजा तुमचा पगार २० हजार आहे. आपण ५/६ टक्क्यांची महागाई पकडली, तर हिशोब सोपा होईल. आता ५ टक्के मानूया आणि तुमचा पगार १० टक्क्यांनी वाढला, तर पगार झाला २२ हजार. आधी तुमचा पगार २० हजार होता, तेव्हा तुमच्या गरजा आणि इतर गोष्टींसाठी ५०+३० म्हणजेच ८० टक्के म्हणजेच २० हजार पगाराच्या ८० टक्के रक्कम होते १६ हजार. आता तुमच्या मागील वर्षीच्या गरजा आणि इतर गोष्टींवरील खर्च १६ हजार होता. आता महागाई ५ टक्के वाढली आहे असे समजू. जे काम तुमचे आधी १६ हजारात व्हायचे, त्यावर आता ५ टक्के आणखी खर्च होत आहे, तेव्हा तुमचे ८०० रुपये आणखी खर्च होत आहेत, तेव्हा मागील वर्षी जे काम १६ हजारात व्हायचे, त्यासाठी आता १६८०० रुपये मोजावे लागत आहेत. तुमचा पगार २ हजारांनी वाढला आहे, ज्यातील ८०० रुपये महागाईमुळे खर्च झाले, तरीही तुमच्याकडे १२०० रुपये आहेत.

    आता हे समजून घेऊयात की, २० टक्के नियम हा आहे की, २० टक्के तुम्हाला आणखी गुंतवायचे आहेत. जेव्हा तुम्ही २० हजार कमवत होता, तेव्हा त्यातून ४ हजार रुपये बचत करायचा. आता तुम्ही २२ हजार कमवत आहात, तर त्याचे २० टक्के होतात ४४००.

    तुम्ही ४ हजार रुपये बचत करण्यापासून सुरुवात केली होती. त्यातील १ हजार रुपये विम्यासाठी गेले आणि ३ हजार रुपये उरले आणि तुम्ही प्रत्येक महिन्यात गुंतवणूक करू लागला. जर तुम्ही आता २०-२५ वर्षांचे असाल, तर ४०-४५ वर्षांचे होईपर्यंत २० वर्षांत तुम्ही दर वर्षी ३ हजारांपासून सुरू केलेली गुंतवणूक १५ टक्क्यांनी वाढवत असाल, तर तुम्हाला १२ किंवा १३ टक्क्यांच्या हिशोबाने ४० वयापर्यंत १ कोटी रुपये जमा होतील. म्हणजेच तुम्ही चाळिशीपर्यंत कोट्याधीश बनाल. २० वर्षांनंतर तुमच्याकडे १ कोटी असतील आणि तुम्ही आणखी ५-६ वर्षे थांबलात, तर तुमच्याकडे ५० वयापर्यंत २ कोटी रुपये येतील. यात दोन प्रश्न उद्भवू शकतात, त्यातील एक असा की, दोन कोटी जरी असले, तरीही तेव्हा यांचे मूल्य किती असेल.

    हेही आपण पाहूयात. आजपासून २५-३० वर्षांनंतरही २ कोटी रुपयांचे मूल्य जर ५-६ टक्के महागाई पकडली, तरीही तुमच्याकडे त्यावेळी आजच्या हिशोबाने ६५-७० लाख रुपये असतील. एवढ्या पैशात तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता. आणखी एक गोष्ट अशी की, तुमचे लग्न झालेले असेल. त्यामुळे तुमचा पार्टनरही कमावता असेल. त्यामुळे दोघेही कमावते असल्यामुळे खर्च वाढणार नाही. अनेक खर्च सामान्य असतात. घरखर्च तेवढा वाढणार नाही. तुमची बचत जास्त होऊ शकते. कधी पगारात १० टक्क्यांची वाढ मिळेल, कधी २० टक्क्यांची, तर कधी ३० टक्क्यांची. या गोष्टींचा हिशोबही आपण अद्याप केला नाही. त्यानंतर एक शेवटचा प्रश्न असा की, ५० वर्षांच्या वयात श्रीमंतीचा काय फायदा.

    तर हे आपण एकदम वर्स्ट केसमध्ये पाहिलं आहे. मात्र, जर तुमच्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळाला. जर तुम्ही जास्त गुंतवणूक केली, तर होऊ शकतं की, तुम्ही ३५-४० वयात श्रीमंत होऊ शकाल. त्यामुळे तेव्हा तुम्ही या पैशांचा मनासारखा वापर करू शकाल.

    आणखी वाचा

  • स्मार्ट गुंतवणूकदार – मनोगत

    स्मार्ट गुंतवणूकदार – मनोगत

    जगभरातील आर्थिक गणिते कोणत्याही क्षणाला बदलायची ताकद ठेऊन असणारे हे क्षेत्र आहे. हे प्रत्येकाला जाणून घेण्याची इच्छा आहेच, त्यातून पैसे सुध्दा मोठ्या प्रमाणात कमावयचे आहेत; काहीजण कमावत सुध्दा आहेत, मात्र हे शिकावे कुठे? शिकवणारे भेटत नाहीत. यावरचा कोणताही कोर्स (प्रशिक्षण अभ्यासक्रम) नाही. स्वतः शिकायचे तर कोणती पुस्तके वाचायची? डिमॅट अकाउंट काय असते? त्याची गरज काय? ते कसे प्राप्त करावे?

    कोणत्या दिवशी शेअरबाजार उसळी मारणार? कोणत्या दिवशी शेअर बाजार ढासळणार? उसळीतच पैसे कमावता येतात की ढासळीत सुध्दा पैसे कमावता येताता? रुपया-डॉलर यांच्या पडझडीवर वरती शेअर बाजार कितपत अवलंबून आहे? सोने-चांदीच्या तेजी-मंदीचा शेअर बाजारावर काही परिणाम होतो का? जागतिक मंदी कशाने उद्भवते? म्युचुअल फंड म्हणजे काय? SIP (एसआयपी) म्हणजे काय? त्यात गुंतवणूक कशी करायची? कोणत्या कंपन्यांचे शेअर घ्यायचे? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे शोधायची कुठे? हा प्रश्न सुध्दा अनुत्तरीत राहतो व सगळेच प्रश्न जागच्या जागी तसेच सगळीच माणसे जागच्या जागी राहतात. सुरुवातीलाच बऱ्याच जणांना आलेल्या अपयशयाच्या अनुभवामुळे बाकीचे लोक सुध्दा या क्षेत्राची धास्ती बाळगून असतात. ‘दुधाने तोंड पोळलं की ताक सुध्दा फुंकून पिण्याची सवय’ या माणसाच्या नैसर्गिक स्वभावातून न्यूनगंड व भीती निर्माण होत असतात, त्यामुळे परत त्या गोष्टीच्या वाटेलाच माणूस जात नाही.

    शेअर बाजारात गुंतवणूकीला सुरुवात करण्याआधी एक समान गोष्ट सगळ्यांना माहिती असावी आणि शेअर बाजार शिकवणारे बरेच प्रशिक्षक ही गोष्ट प्रत्येकाला सुरवातीला सांगतात. एका गावात दोन माणसे येतात. एक गुरु व दुसरा त्याचा शिष्य. गुरु त्या गावकऱ्यांना सांगतो की, या गावात जेवढी माकडे आहेत, ती माकडे पकडून मला आणून दिली की मी प्रत्येक माकड १०० रुपयांना खरेदी करणार आहे. गावातील लोकांना वाटते चला गावात भरपूर माकडे आहेत. पकडायची आणि गुरुला नेऊन द्यायची. गावातील सगळे लोक माकडे पकडतात व गुरुकडून १०० रुपये प्रतिमाकड अशी रक्कम घेऊन जातात. गुरु ती सगळी माकडे एका मोठ्या पिंजऱ्यात ठेवत असतो. त्यांना खायला घालत असतो. गावातील माकडांची संख्या कमी झाल्यामुळे कमी लोक माकडे पकडतात, मग गुरु माकडांची किंमत वाढवून २०० रुपये प्रतिमाकड अशी करतो. गावातील लोकांचा उत्साह परत वाढीस लागतो. उरलेली जवळजवळ सगळी माकडे पकडली जातात. मग गुरु एके दिवशी दुसऱ्या गावाला निघून जातो. तेव्हा शिष्य गावकऱ्यांना बोलावतो व सांगतो की माकडांची किंमत अजून वाढणार आहे. तेव्हा मी तुम्हाला या पिंजऱ्यातली माकडे ५०० रुपयांना एक याप्रमाणे देतो आणि गुरु गावावरुन परत आल्यावर त्यांना ही माकडे १००० रुपयांना एक याप्रमाणे खरेदी करतील; म्हणजे तुमचा फायदाच फायदा होईल. शिष्य सगळ्या गावकऱ्यांकडून ५०० रुपये प्रतिमाकड अशी रक्कम वसूल करतो व एके रात्री गावातून निघून जातो. गावकरी गावात वाट बघत राहतात. गुरु व शिष्य दोघे परत कधीही दिसले नाहीत. आता माकडे परत गावात मोकळेपणाने फिरतात. गावकरी गावातच आहेत. पैसा गुरु व शिष्य यांना मिळाला आहे व दोघेही गाव सोडून गेले आहेत.

    या गोष्टीत शेअर बाजारात प्रवेश हा १०० रुपयांनी होऊ शकतो. त्याचे २०० रुपये, ५०० रुपये सुध्दा होऊ शकतात आणि १००० रुपयांच्या नादात बरेच नुकसान सुध्दा होऊ शकते. म्हणजेच कोणता शेअर कधी खरेदी करावा? तो कधी विकावा? त्यातून बाहेर कधी पडावे? याचा अंदाज आला की माणूस शेअर बाजारात चांगला खेळू शकतो. पैसे कमावू शकतो. हा खेळ चांगल्या रितीने खेळण्यासाठी या खेळाचे नियम चांगल्या पध्दतीने माहिती असल्यास तो जिंकण्याची जास्त शक्यता निर्माण होते. हा खेळ योग्य रितीने खेळण्याचे कानमंत्र या पुस्तकात आहेत.